धान्याचे चुकारे थकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या धान्याचे कास्तकारांना अद्यापही चुकारे न मिळाल्याने कास्तकार व बाजार समितीची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी कास्तकार व बाजार समितीची कोट्यावधी रुपयांनी फसवणूक करण्याऱ्या दोन व्यापाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कास्तकारांच्या धान्याची व्यापाऱ्यांमार्फत खरेदी केली जाते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवानाधारक व्यापारी धान्याची बोली लावून कास्तकारांकडून धान्य खरेदी करतात. बाजार समितीच्या माध्यमातून खरेदी विक्रीचा हा व्यवहार चालतो. ५ जानेवारी २०२२ ते ११ जानेवारी २०२२ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कास्तकारांनी विक्रीकरिता आणलेले धान्य बाजार समितीचा परवानाधारक व्यापारी धीरज अमरचंद सुराणा रा. बन्सल ले-आऊट, दत्त मंदिर याने खरेदी केले. या व्यापाऱ्याची रुपेश नवरतनमल कोचर रा. पद्मावती नगर याने हमी घेतली होती. कास्तकारांचे धान्य घेतल्यानंतर व्यापारी व जमानतदार दोघेही धान्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. धान्य खरेदी केल्यानंतर २४ तासांच्या आत धान्याच्या चुकाऱ्याची रक्कम कास्तकाराच्या खात्यात जमा होणे अनिवार्य असते. पण महिना लोटूनही कास्तकारांना अद्याप धान्याचे चुकारे मिळाले नाही. व्यापाऱ्यांना वारंवार नोटिसा बजावूनही ते धान्याची रक्कम अदा करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळे कास्तकार व बाजार समितीची त्यांनी फसवणूक केल्याचे दिसून येते. या व्यापाऱ्यांनी १४७ कास्तकारांकडून जवळपास १९३५.०२ क्विंटल धान्य (चना, तूर, सोयाबीन) खरेदी केले असून त्या धान्याचे बाजार मूल्य १ कोटी १३ लाख ७८ हजार १३१ रुपये एवढे आहे. बाजार समितीचे सेवा शुल्क देखिल या व्यापाऱ्यांनी भरले नसून ८५ हजार ३३५ रुपये या व्यापाऱ्यांकडे थकीत आहे. कास्तकार व बाजार समितीचे मिळून १ कोटी १५ लाख २६ हजार ४६ रुपये या व्यापाऱ्यांकडे थकीत असून पैसे देण्याची त्यांची नियत नसल्याने ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यांना गुन्हे दाखल झाल्याचे कळताच त्यांनी अटकपूर्व जामिनीसाठीही प्रयत्न केल्याचे समजते. धीरज अमरचंद सुराणा हा बाजार समितीचा परवानाधारक व्यापारी असून त्याचा परवाना नंबर ०७ हा आहे. या जेम्सबॉन्ड ने कोट्यवधी रुपयांचे धान्य हडप केले आहे. मागील दोन वर्षांपासून संकटांचा सामना करणाऱ्या कास्तकारांच्या तोंडचा घास या व्यापाऱ्यांनी पळवला असून त्यांना आर्थिक संकटात टाकले आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या कास्तकाराच्या पोटावर मारून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या या लबाडांवर बाजार समितीचे सचिव अशोक काशीनाथ झाडे (५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि च्या कलम ४०६,४२०,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्यांचा शोध घेत असून लवकरच त्यांना गजाआड करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोउपनि शिवाजी टिपूर्णे करीत आहे.

जिवती भागात अदिवासी बांधवांवर हाेताेय सातत्याने अन्याय: शासकीय योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची सिंधूताई जाधवंने केली मागणी !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : कोलाम बांधवाचे जीवनमान उंचवण्यासाठी शासन विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांचा निधी खर्च करीत असले तरी प्रत्यक्षात कोलाम बांधवाना शासन योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र अतिदुर्गम भाग म्हणून शासन दरबारी गणल्या गेलेल्या जिवती भागात दिसून येत असल्याचे सिंधूताई जाधव यांनी म्हटले आहे. कोलाम बांधवांना विकासापासून वंचित ठेवणां-या अधिकारी व कर्मचा-यांची चौकशी करून त्यांचेवर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी जिवती तालुका शिवसेना महिला संघटिका सिंधूताई जाधव यांनी काल सोमवार दि.२८ फेब्रुवारीला एका लेखी निवेदनातुन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांना केली असल्याचे त्यांनी आज आमच्या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले.
    
तालुक्यातील भुरीयेसापूर येथील कोलाम बांधव स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही मुलभूत सोयी-सुविंधापासून वंचित असल्याची खंत देखिल त्यांनी आपल्या बाेलण्यातुन या वेळी व्यक्त केली आहे. उपरोक्त क्षेत्रात घरकुलांचे कामे प्रलंबीत आहेत.इतकेच नाही तर शासनाने वनहक्क समितीच्या माध्यमातून जमिनीचे पट्टे दिले,माञ लाभार्थ्यांना अद्याप सातबारा पुरविला नाही. या शिवाय अनेक गावात रोजगार हमीचे कामे सुरू नाही. तसेच पेसा अंतर्गत आलेल्या शासन निधीचा कोलाम बांधवांच्या विकास कामासाठी खर्ची घातला नसल्याचा स्पष्ट आरोप देखिल शिवसेना जिवती तालुका महिला संघटिका सिंधुताई जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनातून केला आहे.सातत्याने दुर्लक्षित असलेल्या भुरीयेसापूर येथील कोलाम बांधवांना नियमितपणे (स्वस्त दुकानातुन) धान्य मिळत नाही ही एक शाेकांतिका आहे. काहींचे रेशन कार्ड स्वस्त धान्य दुकानदाराकडेच असून अनेकांची नावे अंतोदय            याेजनेतून कमी केल्याचे बोलल्या जात आहे. या बाबत सिंधूताई जाधव यांनी जिवती तहसीलदारांना संबंधित भुरीयेसापूर येथील कोलाम बांधवांवर होणाऱ्या अन्यायाची चौकशी करून रेशन दुकानदारावर कार्यवाही करा अशी तक्रार कोलाम बांधवांच्या वतीने केली होती. परंतु यावर संबधित तहसीलदार व अन्न पुरवठा निरीक्षक यांनी कार्यवाही न करता त्या रेशन  दुकानदाराची पाठराखन केली आहे. फक्त सदरहु रेशन दुकानदाराचे दुकाण दुस-या दुकानास जोडून ते अधिकारी मोकळे झाले आहे. काही दिवस रेशन दुकान दुस-या दुकाणाला जोडायचे आणि नंतर परत त्या दुकानदारांना ते दुकान चालवायला द्यायचे ही प्रथा वर्षांनुवर्षा पासून सुरु असल्याचे जनतेत बोलल्या जात आहे. दरम्यान शेणगाव येथील रेशन दुकानदारांनी केलेल्या गैरप्रकाराची चौकशी करून त्या दुकाणदारावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी एका शिष्टमंडळाने काल केली आहे.

धनकदेवीत घरकुलांची कामे अपूरे ! 

शासकीय विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे मागील दोन वर्षापासून कोलाम बांधवांना शासन योजनेतून मिळालेले घरकुले अजूनही अपुर्ण आहे.तर काही घरकुलांची कामे निकृष्ट पध्दतीने केल्याने पक्या घरात राहण्याचे त्यांचे (कोलाम बांधवाचे) स्वप्न अक्षरश: भंगले आहेत. त्या बांधवाना तेंदूपत्ता बोनसही दोन वर्षापासून मिळालेला नाही. याच परिसरातील वनहक्क समितीच्या माध्यमातून २७ वनदावे दाखल केले आहे .अद्यापही त्यांना जमिनीचे पट्टे दिल्या गेले नाही. त्याच प्रमाणे खडकी रायपुरमध्ये सुध्दा घरकुलाची कामे अपुर्ण अवस्थेत आहेत.

वरील संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी व आदिवासी बांधवांना याेग्य न्याय द्यावा, अन्यथा विश्व महिला दिनी संपूर्ण कोलाम बांधवांना साेबत घेवून जिवती तहसिल कार्यालय समाेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सिंधूताई जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला एका निवेदनातुन दिला आहे.

भजन किर्तनात समाज प्रबोधनाची ताकत - आ. किशोर जोरगेवार


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
 
चंद्रपूर : महाराष्ट्र ही संताची पवित्र भुमी आहे. याच भुमितुन संतानी भजन किर्तनाच्या माध्यमातून व्यसमुक्ती, तंटामुक्ती, रुढी पंरपरा याबाबत प्रबोधन करत समाजाला दिशा देण्याचे काम केले. भजन किर्तनात समाज प्रबोधनासह परिर्वतनाची ताकत असून येत्या काळात आपण शहरातील विविध मंदिरांमध्ये १ हजार ८ भजन मंडळांचा भव्य भजन महोत्सव घेणार असल्याचे प्रतिपादन चंद्रपूरचे अपक्ष आमदार तथा यंग चांदा बिग्रेडचे सर्वेसर्वा किशोर जोरगेवार यांनी आज (मंगळवारी) केले.
    
महाशिवरात्री निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अंचलेश्वर मंदिर प्रांगणात सर्व भाषीय १०० भजन मंडळांचा ४ दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ. जाेरगेवार बोलत होते. आरंभी शंखनाथ करून महादेवाची पूजा अर्चना करण्यात आली. या प्रसंगी प्रवर्तक संत श्री. मनीष भाईजी महाराज, वढा विठ्ठल मंदिरचे स्वामी चैतन्य महाराज, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळचे जिल्हा सेवाधिकारी एड. दत्ताभाऊ हजारे, मानव उत्थान सेवा केंद्राच्या साधवी कांताबाईजी, स्वग्रामगीताचार्य जिल्हा प्रचार प्रमुख दादाजी नंदनवार यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, दुर्गा वैरागडे, आदि मान्यवरांची प्रमूख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
        
भजन हे योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. भजन ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे. पूर्वीच्या संत परंपरेतील श्री संत ज्ञानेश्वर, तुकाराम, सोपान, निवृत्ती, एकनाथ, नामदेव, चोखामेळा इत्यादी संतांनी अनेक भजने तयार केलीत. टाळ, मृदंग किंवा पखवाज या वाद्यांच्या साथीत ईश्वर गुणवर्णनपर व नामस्मरणपर करीत या भजनातून समाजाला आध्यात्माकडे वळवित समाज प्रबोधनाचे काम केले. त्यानंतर महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने भजनगायनाची परंपरा सुरू ठेवत ती पूढे नेली. आज ती प्रत्येक घरात पोहचली आहे. आता अनेक भजन मंडळे तयार झाली असून ते हा वसा पूढे नेण्याचे काम करत आहे. खरतर कुटुंबातील वाढते ताणतणाव, भांडण, मानसिक अशांततेतून परमार्थ शोधण्यासाठी तसेच संस्कृतीचा समृद्ध मार्ग जोपासण्यासाठी भजनाचा मार्ग.हा उत्तम पर्याय असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
       
महाशिवरात्री निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलेल्या या आयोजनात सहभागी झालेले भजन मंडळे चांगल्या समाजाच्या निर्मितीचे काम करत आहे. खर तर एक दिवसीय भजन महोत्सव घेण्याची आमची संकल्पना होती. मात्र यात भजन मंडळांच्या मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामूळे हे चार दिवसीस विविध भाषिय १०० भजन मंडळांचे महोत्सव पार पडत आहे. विकास कामे होत असतांना धार्मीक क्षेत्रांचा विकास झाला पाहिजे ही पण आपली भुमिका राहिली आहे. आपण वढा तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्नशिल असून या क्षेत्राचा पर्यटनदृष्ट्या विकासासाठी ४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. माना टेकडी येथील जगनाथ बाबा मठाचेही सौदर्यीकरण आपण करीत असून निसर्गाच्या सानिध्यात असलेले सर्व सोयी सुविधायुक्त एक सुंदर मठ तेथे तयार झाले आहे. आजचा हा भजन महोत्सव चांगल्या समाजाच्या निर्मितीकडी एक पाउल असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणातुन केला.
    
कार्यक्रमात प्रवर्तक संत श्री मनीष भाईजी महाराज यांनी कैलास के वासी नमो बार बार हो हे भजन गायत संपूर्ण वातावरण भक्तीमय केले. यावेळी चंद्रशेखर देशमूख, यंग चांदा ब्रिगेडच्या युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, सविता दंडारे, सायली येरणे, विमल कातकर, वैशाली मेश्राम, अस्मिता डोणारकर, कौसर खान, आशू फुलझरे, आशा देशमूख, कल्पना शिंदे, मुन्ना जोगी, नकुल वासमवार, वंदना हजारे, नंदा पंधरे, वैशाली मद्दीवार, संगीता विश्वोज्वार, चंदा ईटनकर, हेमलता पोहनकर, कल्पना मंडळ, रिंकू मंडळ, शोभा पाल, यांच्या सह भजन मंडळांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सदरहु महोत्सव ४ मार्च पर्यंत चालणार असून नागरिकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

२१ वर्षांत शेतकऱ्यांना थेंबभरही पाणी मिळाले नाही; शेतकरी म्हणतात, जमीन पूर्ववत करून द्या!


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : आदीवासीबहुल तालुक्यातील अहेरअल्ली या गावातील शेतकरी तब्बल २१ वर्षांपासून धरणाच्या पाण्यासाठी तरसले आहेत. सतपल्ली पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी (पोड) धरणातून या लोकांना पाणी तर मिळालेच नाही, पण त्यांच्या जमिनी सुध्दा वाया गेल्या आहेत. अहेरअल्ली येथील शेतकरी म्हणतात जमीन पूर्ववत करून देण्यात याव्यात.

‘सरकारी काम अन् एक वर्ष थांब’ असं शासकीय कार्यालयांच्या बाबतीत नेहमीच बोललं जातं. परंतु एक वर्ष नाही तर २१ वर्षांपूर्वी येथे लघु पाटबंधारे विभाग पांढरकवडा व्दारे सतपल्ली जवळील उमरी येथे धरण बांधण्यात आले. उजवा आणि डावा, असे दोन कालवे तयार करण्यात आले. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्या. शेतांमध्ये खोदकाम करून कालवे काढण्यात आले. पण तेव्हापासून आजता गायत एक थेंबही पाणी अहेरअल्लीतील शेतकऱ्यांना मिळालेले नाही. कालवे मात्र प्रत्येकाच्या शेतात खोदून ठेवलेले आहेत. त्यामुळे गेल्या २१ वर्षांपासून तेथे पीक घेता येत नाही. आधी आमचे वडील आणि आता आम्ही दरवर्षी नुकसान सोसतोय.

शेत पूर्ववत करून द्या!

आम्ही स्वतः कालव्यात गेलेली जमीन पूर्ववत करतो म्हटलं, तर लाख रुपयांच्यावर खर्च लागेल आणि हा खर्च करण्याच्या परिस्थितीत आम्ही नाही. गेल्या २१ वर्षांत धरणाचे पाणी मिळू शकले नाही, ते आता मिळण्याची शक्यताही पूर्णतः मावळली आहे. त्यामुळे मायबाप सरकारला विनंती आहे की, नका देऊ पाणी, पण आमचे शेत पूर्ववत करून द्या. धरणात लिकेज झाल्यामुळे तेथे पाणी शोधूनही सापडत नाही. त्यामुळे जे धरणातच नाही ते आमच्या शेतात कसे येणार, असा प्रश्‍न वैभव राऊत, रिवास भोयर, रोहित राऊत या शेतकऱ्यांनी केला आहे.

मत्स्य उत्पादनही नाही

धरणात पाणी तर नाही, पण जमिनीही गेल्या. धरणात मत्स्य उत्पादनाचेही नियोजन केले गेले होते. मच्छीमार संस्थेने तशी तयारीही केली. पण धरणात पाणीच टिकत नसल्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले. धरणासाठी जमिनी घेतल्या तेव्हा परिसर सुजलाम सुफलाम होईल, असे चित्र रंगवण्यात आले होते. पण काहीच झाले नाही. मग या प्रकल्पातून साध्य काय झाले तर, संबंधितांनी थातूरमातूर प्रकल्प उभारला आणि आपले उखळ पांढरे करून घेतले. आज या प्रकल्पावर एक कर्मचारीसुद्धा नाही, असे हितेश राऊत म्हणाले.

गडचिराेलीत काव्य मैफीलचा कार्यक्रम संपन्न !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर : काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्था शाखा गडचिरोलीच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने काव्यमैफिल आयोजित करण्यात आली हाेती.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान काव्यांगण साहित्य समुहाच्या राज्य सल्लागारच्या कुसुम ताई अलाम यांनी विभूषित केले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले की गडचिरोली जिल्हाच्या साहित्यिकांची मोठी जबाबदारी आहे. हा जिल्हा विविध कारणाने जळतो आहे. आपल्या जिल्ह्यातील समस्या वेगळी आहे. हे लेखणीतून उतरले जावे. या जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जावा असे लेखक कलावंत येथे आहेत. आपल्या लेखणीला अधिक धारदार बनवले गेले पाहिजे. काव्यांगणचे जिल्हाध्यक्ष अशोक मांदाडे यांच्या पुढाकाराने व सर्वांच्या सहकार्याने काव्य मैफिलचा कार्यक्रम यशस्वी झाला याप्रसंगी निरज आत्राम (राष्ट्रीय संस्थापक कार्याध्यक्ष) यांचा गडचिरोली शाखेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मारोती आरेवार, जितेंद्र रायपुरे, उपेंद्र रोहनकर प्रतिक्षा पि.कोडापे, प्रेमिला अलोणे, सुधाताई चौधरी, पुरुषोत्तम लेनगुरे, हरिदास कोटरंगे, पुरुषोत्तम ठाकरे, शरद गायकवाड, नयन निकोडे यांनी या वेळी काव्य वाचन केले.
विज्ञान,युवकांच्या प्रातिनिधिक स्वरूपातील, शेती, महिला अस्तित्व, हिंसा, सावित्री माई फुले, बाबासाहेब भीमराव, परिवर्तन, प्रबोधनशिल अशा सामाजिक आशयाच्या अनेक प्रकारच्या कविता या वेळी सादर झाल्या. सदरहु कार्यक्रम प्रसंगी नरेंद्र निकोडे, किर्ती निकोडे, मंगला मांदाडे, विजया मांदाडे, निरुपम मांदाडे आदीं उपस्थित होते. काव्य मैफिलचे संचालन अशोक मांदाडे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार नयन निकोडे यांनी मानले.

कार्यक्रमाला गडचिराेलीतील बरेच श्राेते उपस्थित हाेते.