अखेर राजुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील नवीन रुग्णवाहिकेचे करण्यात आले लोकार्पण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (३० सप्टें.) : तालुक्यातील राजुर प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्य प्रशासना कडुन देण्यात आलेल्या नविन रुग्णवाहिकेचे अखेर लोकार्पन करण्यात आले. मागील दोन महिन्यांपासुन ही रुग्णवाहिका राजुर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना सेवा न देताच उभी होती. अखेर ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेकरीता उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पन सोहळा आमदार संजीवरेड्ड़ी बोद्कूरवार यांच्या अध्यक्षतेत पार पडला. आमदारांनी रिबिन कापुन या रुग्णवाहिकचे लोकार्पन केले. राजुर प्राथमिक आरोग्य केंद्राला नविन रुग्णवाहिका मिळावी म्हणून आमदार संजीवरेड्ड़ी बोद्कूरवार व जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत यांनी विशेष प्रयत्न केले. या छोटेखानी सोहळ्यात प.स. सभापती संजय पिंपळशेंडे, सरपंच विद्याताई पेरकावार, बिडियो गायणार, उपसरपंच बल्की, माजी सरपंच प्रणिता असलम, टिएचओ शेंडे, डॉ. राहुल चिखलकर, आरोग्य कर्मचारी तथा ग्रामवासी उपस्थित होते. 

यवतमाळ जिल्ह्यात राजुर येथे सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतू या आरोग्य केंद्रात आद्यापही हव्या त्या सोई सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे हे आरोग्य केंद्र नेहमी दुर्लक्षित राहिलं आहे. पालकमंत्र्यांनी दोन महिने आधिच या रुग्णवाहिकेचे लोकार्पन केले होते. पण आज अधिकृतरित्या लोकार्पन सोहळा घेऊन ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत देण्यात आली. चक्क दोन महिने ही रुग्णवाहिका नुसतीच रुग्णालयात उभी राहिली. रुग्णवाहिके अभावी रुग्णांना रेफर करतांना मात्र रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. रुग्णांचे मोठे हाल झाले. पण अखेर लोकार्पनाचा मुहूर्त सापडला व रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेकरीता उपलब्ध करुन देण्यात आली.

दाेन दिवशीय बैठकीत चंद्रपूरातील ऑटो रिक्षाचालक मालक संघाचे पदाधिकारी उपस्थित

 

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, ( ३०सप्टे.) : महाराष्ट्र ऑटो रिक्षाचालक-मालक जिल्हा चंद्रपूर तर्फे मुंबई पनवेल येथील स्वाभिमानी रिक्षा मंच या ठिकाणी दोन दिवशीय परिषद घेण्यात आली. या बैठकीला २८ जिल्ह्याचे ऑटो युनियनचे पदाधिकारी व रिक्षा चालक माेठ्या संख्येने उपस्थित होते. या शिवाय सदरहु बैठकीला चंद्रपूरचे संस्थापक व अध्यक्ष राजू भाऊ खांडेकर, जिल्हा अध्यक्ष मधुकर राऊत, खुशाल साखरकर, सुधाकर बिसने, शंकर थोरात आदीं पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते. या बैठकीत पाच महत्वाचे विषय चर्चेला घेण्यात आले.

कल्याणकारी बाेर्ड स्थापन करणे, परमिट बंद करणे, विधान परिषद मध्ये ऑटाे चालकांना प्रतिनिधीत्व मिळणे असे झाले नाही तर, मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. ऑटाे चालकांना शहर व गाव पातळीवर स्टँड पार्किंग उपलब्ध करुन देण्याबाबत उपराेक्त बैठकीत चर्चा करण्यात आली.

टाटा ट्रस्ट व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या संयुक्ताने पार पडले


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३०सप्टें.) : टाटा ट्रस्ट कॅन्सर केअर प्रोग्राम व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचे वतीने आज आयोजित थर्मल अब्लेशन ट्रेनिंग मध्ये 50 डॉक्टर्स आणि स्टाँफ नर्स सहभागी झाले होते.
प्रशिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
थर्मल अब्लेशन हे उपकरण गर्भाशयाच्या कॅन्सर साठी वापरले जाते. यावेळी डॉ.राठोड यांनी हे उपकरण उपलब्ध करून दिल्या बद्दल टाटा ट्रस्टला धन्यवाद दिले .

यावेळी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सारिका ठाकरे, डॉ. मनीषा घाटे, डॉ.रुजुता मुंदडा यांनी मार्गदर्शन केले. सदरहु प्रशिक्षणास बेंगलोरचे श्री हिल्बर्ट जे प्रशिक्षक म्हणून आले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मनीषा घाटे यांनी कर्करोग होण्याची कारणे व जोखीम वाढवणारे घटक लहानपणापासून शारीरिक संबंध कुटुंब नियोजनाच्या पद्धतीचा अस्वीकार अनेक व्यक्तींशी शारीरिक संबंध वारंवार गर्भधारणा किंवा गर्भपात गर्भ निरोधक गोळ्यांचे अधिक काळपर्यंत सेवन धूम्रपान, रोग प्रतिकारशक्ती कमी होणे, एच आयव्ही अथवा लैंगिक संबंधामुळे पसरणारे इतर रोग, ह्युमन पॅपिलोया विषाणू तसेच त्यावरील उपचार पद्धती डॉ. मनिषा घाटे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

उशिरा दिसून येणाऱ्या लक्षणांमध्ये शरीर संबंधानंतर असामान्य रक्तस्राव होणे हे प्रमुख कारण होय. शिवाय भूक न लागणे, वजन कमी होणे, पायावर सूज येणे, पोटावर सूज असणे, लघवी किंवा शौचावाटे रक्तस्त्राव होणे इत्यादी लक्षणे सुद्धा उशिरा आढळतात. लवकर निदान होण्याकरिता सर्व महिलांनी वयाच्या ३५ व्या वर्षापासून आपल्या स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. हा कर्करोग नियंत्रणासाठी ह्युमन पॅपिलोमा लसीकरण हा एक मोठा टप्पा ठरू शकतो. साधारणत: वयाच्या ११ ते १२ व्या वर्षांपासून ही लस घेणे फायद्याचे ठरते. या लसीच्या तीन मात्रा दिल्या जातात असे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रूजुता मुंदडा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाटा ट्रस्टचे सुरज साळुंके यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार डॉ.आशिष बारब्दे यांनी मानले.

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (३० सप्टें.) : तालुक्यातील कृष्णापुर येथील अल्पभुधाक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळुन टेकडीवर जाऊन टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केली.

अर्जुन रामचंद्र आडे (४३) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार ढाणकी येथून जवळच असलेल्या उमरखेड तालुक्यातील कृष्णापुर येथील तरुण अल्पभूधारक शेतकरी अर्जुन आडे यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.

मृतक शेतकरी यांच्या वर विविध सहकारी सोसायटी ढाणकी यांचे कर्ज असल्याचे समजते. व त्याच कर्जाच्या परतफेडीची काळजी त्यांना असल्याचे बोलल्या जात आहे. त्यांच्या पश्चात आई पत्नी,दोन मुले व एक मुलगी असा कुटूंब आहे. 

ग्रामसभा घेण्यासाठी राजूर विकास संघर्ष समितीचे ग्रा पं ला निवेदन

सह्याद्री न्यूज | जयंत कोयरे 
राजूर, (३० सप्टें.) : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे व वाढलेल्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन लावले होते, परिणामी कुठेही गर्दी होऊ नये म्हणून ग्रामसभा घेण्यास आळा बसला होता. परंतु आता संक्रमण कमी झाल्यामुळे शासनाने लॉकडाऊन हटविले आहे.सध्या ग्रामसभा घेण्यास काहीच अडचण नसल्याने जनतेच्या समस्या, तक्रारी व मागण्या ग्रामसभेच्या माध्यमातून ऐकून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त ग्रामसभा घेण्यात यावी, यासाठी येथील राजूर विकास संघर्ष समितीचे वतीने राजूर ग्रा पं च्या सरपंच यांना निवेदन देण्यात आले.

ग्रामपंचायत अधिनियमानुसार वर्षातून किमान ४ ग्रामसभा होणे अनिवार्य आहे. लॉकडाऊन हटविल्यानंतर १५ आगस्ट स्वातंत्र्य दिनी ग्रामसभा घेण्यात आली पाहिजे होती. परंतु ती घेण्यात आली नाही. ग्रामसभा ही लोकशाही प्रक्रियेची उच्चतम प्रक्रिया आहे. लोकशाहीमध्ये लोक म्हणजेच जनता ही सर्वतोपरी असते. जनतेला काय हवे, काय नको, त्याच्या समस्या काय आहेत?, त्यांच्या मागण्या काय आहेत? हे ग्रामसभेत ऐकून त्याचे निराकरण करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य असते आणि ग्रामसभेच्या माध्यमातून आपले म्हणने मांडणे हे जनतेचे अधिकार असते. त्यामुळे ग्रामसभा न होणे किंवा न घेणे हे जनतेच्या अधिकाराचे हनन आहे, त्यांना आपल्या अधिकारापासून वंचित करणे आहे.

गेल्या दीड वर्षांपासून ग्रामसभा न झाल्याने गावातील अनेक समस्या व मागण्या जनतेला मांडत्याच आल्या नाहीत, त्यामुळे येत्या २ ऑक्टोबर गांधी जयंतीला ग्रामसभा घेण्यात यावी अशी मागणी राजूर विकास संघर्ष समितीचे कॉ. कुमार मोहरमपुरी, साजिद खान, जयंत कोयरे, राजेंद्र पुडके यांनी ग्रा पं ला दिलेल्या निवेदनातून केली आहे.