कोरोनाची तिसरी लाट थांबविण्यासाठी यंत्रणा सज्ज – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत


सह्याद्री न्यूज नेटवर्क |

नागपूर, (ता.२८) : कोविडवर मात करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक असून तिसऱ्या लाटेची शक्यता  लक्षात घेवून ऑक्सिजन, बेडची व्यवस्था, ग्रामीण तसेच  शहरी भागातील सर्व रुग्णालयातील यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. राऊत यांनी कोरोनासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून आढावा घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार,  जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उद्योग सह संचालक श्री. धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

कोरोनावर प्रभावी व परिणामकारक उपाययोजना करण्यात आल्यामुळे दुसऱ्या लाटेचा परिणाम कमी होत असल्याचे सांगताना डॉ. नितीन राऊत म्हणाले की, ग्रामीण तसेच शहरी भागात लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. दररोज ५० हजारपेक्षा जास्त पात्र नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवून १८ वर्षांवरील युवकांना  मोठ्या प्रमाणात लसीकरण  करणे आवश्यक आहे. १८ ते ४४ या वयोगटात सरासरी १३ लाख नागरिक असून त्यांना डोज  देण्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र सुरु करावे, तसेच शहरातील किमान २५ खासगी रुग्णालयासाठी लसीकरणाची सुविधा निर्माण केल्यास मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट साध्य होवू शकेल. लसीच्या उपलब्धतेबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

ग्रामीण  भागात १८ वर्षांवरील सरासरी ४० टक्के नागरिकांना पहिला डोज देण्यात आला आहे. तर ९ टक्के नागरिकांना दुसरा डोज देण्यात आला आहे. शहरातही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शहरात ३० ठिकाणी ऑक्सिजन सेंटर

कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून नागरिकांना सुलभपणे ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी ३० ऑक्सिजन वॉक एन सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. या सेंटरवर ज्या नागरिकांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यांना तात्काळ ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यात येईल व त्यानंतर जवळच्या  हॉस्पिटलमध्ये भरती होण्यासाठी मदत करण्यात येईल. यासाठी १०० कॉन्सनट्रेटर सज्ज ठेवण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार आणखी १०० कॉन्सनट्रेटर जिल्हा निधीमधून खरेदी करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिली.

कोविडसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच ग्रामीण रुग्णालयांसाठी आवश्यकतेनुसार ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी ऑक्सिजन निर्मिती सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच द्रवरुप ऑक्सिजन साठविण्यासाठी मध्यवर्ती केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच १ हजार ३७५ नवीन ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. जिल्ह्यासाठी दररोज १६० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असून यामध्ये तीनपट जास्त ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अमरावती रोड येथे ६०० बेड्स नव्याने उपलब्ध होणार असून शहरात एकूण १ हजार ८०० बेड्स उपलब्ध होतील. त्यामुळे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी अडचणी येणार नसल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. यामध्ये सुमारे दोनशे खाटा बालकांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन आहे.

जिल्ह्यात नवीन प्रकारचे कोविड रुग्ण आढळले असून यामध्ये उमरेड येथे आठ तर नागपूर येथे चार रुग्णांचा समावेश आहे.  या रुग्णांच्या कोविड तपासणीचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे पाठवून तात्काळ रिपोर्ट मिळेल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या.

कोरोनाची तिसरी लाट थांबविण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जनतेने  प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन यावेळी  करण्यात आले.

पावसाळी अधिवेशनासाठी ३ व ४ जुलै रोजी आरटी-पीसीआर चाचणी

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता.२८) : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै, २०२१ रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून त्यासाठी विधान भवन प्रवेशाकरीता कोविड-१९ संदर्भात RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या दिनांक २२ जून, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत याबाबत झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विधान भवन, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत RT-PCR चाचणी संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

दोन्हीही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, त्यांच्या वाहनांचे चालक आणि वाहनातून मुंबईत येणारे सहप्रवासी अशा सर्वांनी सोयीच्या ठिकाणी मान्यताप्राप्त लॅबमध्ये दिनांक ३ किंवा ४ जुलै, २०२१ या निर्धारित वैध कालावधीसाठीची RT-PCR चाचणी करून त्याचा अहवाल विधान भवन प्रवेशासाठी सोबत ठेवणे आवश्यक असेल. लसीकरणातील पहिला वा दुसरा डोस घेतलेल्यांना तसेच कोविड-१९ संदर्भातील प्रतिपिंड (Antibodies) चाचणीचा सकारात्मक अहवाल असणाऱ्यांनासुद्धा RT-PCR चाचणी करणे अनिवार्य राहिल. मागील अधिवेशनांप्रमाणे विधान भवन प्रवेशद्वाराजवळील मंडपात दिनांक ३ आणि ४ जुलै, २०२१ रोजी, सकाळी ९.०० ते सायं. ६.०० यावेळेत RT-PCR चाचणीची सुविधा सर्व संबंधितांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविड-१९ संदर्भातील लसींचा पहिला अथवा दुसरा डोस घेतलेल्यांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असली तरी काही जण कोरोना विषाणूचे वाहक असू शकतात. त्यामुळे दोन्हीही डोस घेतलेल्यांना सुद्धा RT-PCR चाचणी इतरांच्या सुरक्षिततेसाठी करणे अत्यावश्यक असल्याचे मत या उच्चस्तरीय बैठकीत नोंदविण्यात आले.

या बैठकीस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव, श्री. राजेन्द्र भागवत, वैद्यकीय शिक्षण संचालक, डॉ. तात्याराव लहाने, जे. जे. रुग्णालय समूहाचे अधिष्ठाता डॉ.माणकेश्वर, मुंबई महापालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, डॉ. प्रणिता टिपरे, डॉ. संतोष गायकवाड, विधानमंडळाचे विशेष कार्य अधिकारी, डॉ.अनिल महाजन, अवर सचिव श्री. रविंद्र जगदाळे उपस्थित होते.



जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई.

कुलरचा शॉक लागून महिलेचा मृत्यू, राजूर ईजारा येथील घटना


                       (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता. २८) : कुलरचा करंट लागून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील राजूर ईजारा येथे उघडकीस आली. घरची साफ सफाई करत असतांना कुलरमध्ये संचारलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून महिलेचा दुर्दैवी अंत झाला. शालू रामकृष्ण जगनाडे (३४) असे या मृतक महिलेचे नाव आहे. 
शहरापासून जवळच असलेल्या राजूर ईजारा येथील मजूर महिलेचा घराची साफ सफाई करतांना कुलरला स्पर्श झाला. कुलरमध्ये संचारलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने घटनास्थळीच महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास राजूर ईजारा येथील महिलेच्या राहत्या घरी उघडकीस आली. शालू जगनाडे यांच्या पतीचाही सात वर्षांपूर्वी विजेचा धक्का लागूनच मृत्यू झाल्याचे समजते. या महिलेचा पती विद्युत कंत्राटदारांकडे कामाला होता. पतीच्या मृत्यू नंतर मोलमजुरी करून ती मुलांचा सांभाळ करीत होती. तिच्या मागे एक मुलगी व एक मुलगा असून माता पित्याचे छत्र हरपल्याने दोन्ही मुले पोरकी झाली आहेत. महिलेच्या अकाली मृत्यूने गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह अंतिम संस्काराकरिता नातलगांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

२५ लाखाचा बकरा बनला चर्चेचा विषय, तसे झळकले गावात पोस्टर

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
चंद्रपूर, (ता.२८) : सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या पालेबारसा या गावातील तामदेव उंदीरवाडे यांच्याकडे बकरा विक्रीस उपलब्ध असल्याचे बॅनर क्षेत्रात लावण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे, या बकऱ्याची जी किंमत ठरविण्यात आली आहे, ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. चक्क २५ लाख रुपये, आता बोला.

सावली तालुक्यात पालेबारसा गाव आहे. या गावातील तामदेव उंदीरवाडे यांच्याकडे बकरा आहे. साडेतीन वर्ष वय असलेल्या बकऱ्याची चांगली जोपासना केली असून बकऱ्याचे वजन ८५ किलो आहे. आता हा बकरा त्यांनी विक्रीसाठी काढला आहे. मात्र, या बकऱ्याची किंमत त्यांनी २५ लाख रुपये ठेवली आहे. हा बकरा विक्रीस उपलब्ध असल्याचे बॅनरही त्यांनी गावात लावून टाकले आहे.
यामुळे विविध ठिकाणी चचेर्ला उधाण आले आहे. लाखो रुपयांची किंमत असलेल्या बकऱ्यामधील नेमके आश्चर्य आणि वैशिष्ट काय आहे, हे मात्र कुणालाही माहीत नाही. पालेबारसा येथील तामदेव उंदीरवाडे यांना फोनद्वारे विचारणा केली असता बकऱ्याच्या कपाळावर चांद आहे आणि बकरी ईदनिमित्त कपाळावर चांद असलेल्या बकऱ्याला विशेष महत्त्व असते, असे त्यांनी सांगितले.

'गंगुबाई काठीयावाडी' ची शूटिंग पूर्ण


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता.२८) : सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'गंगुबाई काठियाडवाडी' या चित्रपटासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केल्यानंतर प्रेक्षकांची ही उत्सुकता शिगेला जाऊन पोहचली आहे. 'क्युट' अभिनेत्री आलिया भट्ट आणि बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण स्टारर 'गंगुबाई काठियाडवाडी' चित्रपटाची शूटिंग पूर्ण झालीय.
लॉक डाऊन मुळे या चित्रपटाचं एक गाणं आणि छोटया भागातील शूटिंग राहिली होती. अनलॉक नंतर या चित्रपटाची उरलेल्या शूटिंग ला सुरुवात करण्यात आली होती.
ती आता पूर्ण झाली असून हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झालाय. याबाबत अभिनेत्री आलिया भट्ट ने स्वतः ही माहिती दिली आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन काही फोटोज शेअर करून ही माहिती दिलीय. हे फोटो शेअर करताना आलियाने लिहिलं '८ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली होती. त्यानंतर २ वर्षांनी आम्ही या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केलीय. या चित्रपटाने दोन लॉक डाऊन, दोन चक्रीवादळ आणि ब? याच समस्यांचा सामना केलाय. पण तरी सुद्धा आम्ही हार मानली नाही.