कुलरचा शॉक लागून महिलेचा मृत्यू, राजूर ईजारा येथील घटना


                       (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता. २८) : कुलरचा करंट लागून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील राजूर ईजारा येथे उघडकीस आली. घरची साफ सफाई करत असतांना कुलरमध्ये संचारलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून महिलेचा दुर्दैवी अंत झाला. शालू रामकृष्ण जगनाडे (३४) असे या मृतक महिलेचे नाव आहे. 
शहरापासून जवळच असलेल्या राजूर ईजारा येथील मजूर महिलेचा घराची साफ सफाई करतांना कुलरला स्पर्श झाला. कुलरमध्ये संचारलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने घटनास्थळीच महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास राजूर ईजारा येथील महिलेच्या राहत्या घरी उघडकीस आली. शालू जगनाडे यांच्या पतीचाही सात वर्षांपूर्वी विजेचा धक्का लागूनच मृत्यू झाल्याचे समजते. या महिलेचा पती विद्युत कंत्राटदारांकडे कामाला होता. पतीच्या मृत्यू नंतर मोलमजुरी करून ती मुलांचा सांभाळ करीत होती. तिच्या मागे एक मुलगी व एक मुलगा असून माता पित्याचे छत्र हरपल्याने दोन्ही मुले पोरकी झाली आहेत. महिलेच्या अकाली मृत्यूने गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह अंतिम संस्काराकरिता नातलगांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.