शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतुन तयार केला पांदण रस्ता

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : ग्रामीण भागांत शेतांना रस्ते नसल्याने हंगामात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शासकीय योजना असूनही त्याची अंमलबजावणी योग्य प्रमाणात नसल्यानेही फारसा फायदा नाही.
यामुळे शेतकऱ्यांनी लोकवर्गणी करीत शेतरस्ता तयार करण्याचे काम हातात घेतले आहे. बामर्डा येथील सुधाकर वाघमारे, भास्कर गायधन, उमेश ढुमणे, दत्तू थेरे, अतुल जिवतोडे, गणेश काळे, सुभाष तोतडे, या शेतकऱ्यांनी बामर्डा ते गोरज हा पांदण रस्ता करण्यासाठी लोकवर्गणी जमा करीत काम सुरू केले. 

मच्छिन्द्रा गट-ग्रामपंचायतीच्या वतीने प्रस्ताव पाठविण्यात आला होता. असे असताना बामर्डा येथील पांदण रस्त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने शासनाने गावातील शेतकऱ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना बनली आहे. 
या रस्त्यासाठी बामर्डा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणी गोळा केली. श्रमदान करीत हा पांदण रस्ता तयार करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास जाण्या-येण्यासाठी हा रस्ता कच्चा स्वरूपात केला गेला आहे.मात्र,पक्या पांदण रस्त्याची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा आहे. लोकप्रतिनिधींनी नुकतेच शेतकऱ्यांना कापूस खरेदीत टोकन मुक्त केलं, तसेंच शेतकऱ्यांना पांदण रस्ते युक्त करावे अशी मागणी केली जात आहे.