वणीत अभिनव पद्धतीने संस्कृत सप्ताह संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
       
वणी : शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा संस्कृत विभाग आणि संस्कृत भारती शाखा वणी यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने संस्कृत सप्ताह संपन्न करण्यात आला. 
         
 संस्कृत भारती द्वारा प्रकाशित संस्कृतं वदतु ! या पुस्तिकेच्या आधारे महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या निवडक विद्यार्थिनींनी वणी शहरातील विविध ५० घरांची संपर्क साधून त्यांना या पुस्तकांचे नि: शुल्क वितरण करण्यात आले. 
           
 या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तिकेत रोजच्या जीवनात आवश्यक असणारी शेकडो संस्कृत वाक्ये, वेगवेगळ्या पदार्थांना, वस्तूंना असणारी संस्कृत नावे, संस्कृत मध्ये वेळ सांगण्याची पद्धत, विविध व्यवसायात आवश्यक संस्कृत वाक्ये अशा स्वरूपातील माहितीच्या आधारे सात दिवसात एकूण ५० प्रश्नांच्या सात प्रश्न मालिका त्या सर्व घरात वितरित करून त्यांच्याकडून त्या पूर्ण करून घेण्यात आल्या. 
         
छकुली मांदाडे, प्राजक्ता धांदे, श्रद्धा वानखेडे, दीपाली कांबळे, दुर्गा बनसुले, ज्योत्स्ना शेडामे, साक्षी म्हसे, साक्षी सोनेकर, सम्यक् तामगाडगे, ईशा पारशिवे, तनिषा सहारे, योग्यश्री वाढनकर, प्रतिक्षा जोशी या विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे संस्कृत विभाग प्रमुख तथा संस्कृत भारती शाखा वणीचे अध्यक्ष विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्या मार्गदर्शनात या अभिनव स्वरूपात संपन्न केलेल्या उपक्रमात विचारलेले सर्व प्रश्न देखील सम्यक् तामगाडगे या विद्यार्थिनीनेच तयार केले होते हे विशेष उल्लेखनीय. 
         
या निमित्ताने आम्हाला संस्कृतमधील अनेक गोष्टी प्रथमच समजल्या. ही खूप कठीण भाषा आहे अशी आमची पूर्वग्रह भूमिका निश्चितच थोडी दूर झाली. संस्कृत भाषेतील अशा अनेक गोष्टी समजून घेण्यास आम्हाला आनंदच वाटेल. अशा स्वरूपात उपक्रमात सहभागी नागरिकांच्या प्रतिक्रियांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. 
          
अशा स्वरूपात प्रथमच साकारलेल्या या उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थिनींचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी विशेष कौतुक केले आहे.

माजी शहराध्यक्षा सविता ठेपाले यांचं अल्पशा आजाराने निधन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : महिला काँग्रेसच्या माजी शहराध्यक्ष सौ.सविता कुंदनराव ठेपाले यांचे काल बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अशा अकाली निधनाने सामाजिक, राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. 

सौ.सविता ठेपाले ह्या राजकीय,सामाजिक कार्यात त्या नेहमी अग्रेसर असायच्या. मागील काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. काल बुधवारी त्यांची तब्येत अचानक खालावली, त्यामुळे त्यांना उपचारार्थ नागपूर येथे नेण्यात आले होते. मात्र, नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी (ता.21) मध्यरात्री दिड वाजताच्या दरम्यान, त्यांची प्राणजोत मालवली. 

त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं आहेत. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 12.30 वाजता दरम्यान त्यांचे राहते घरी भुमिपार्क, MIDC येथून निघणार असून त्यांच्या पार्थिवार मोक्ष येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

वणी येथील आदिवासी एकता महोत्सव थाटात संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आदिवासी गौरव दिनानिमित्त आदिवासी एकता महोत्सवाचे आयोजन बिरसा ब्रिगेड वणी शाखेच्या वतीने (ता.18) ऑगस्ट रोजी स्थानिक एसबि लॉन येथे करण्यात आले होते. 

कार्यक्रमाचे उदघाटन सुरेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. गजानन मेश्राम,तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघ मुंबई संचालक संजय खाडे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, कवी उत्तम गेडाम, सामाजिक कार्यकर्ते प्रीतम राजगडकर, सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण मडावी, सामाजिक कार्यकर्ते विजय गेडाम, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना किनाके, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी अंजीकर यवतमाळ, दिलीप शेडमाके जि. अ. गों.ग.पा., विठ्ठल उईके सामाजिक कार्यकर्ते, चेतन कुळमेथे प्रदेश अध्यक्ष गोंडवाना जंगम दल, नामदेव कोडापे सामाजिक कार्यकर्ते, निलेश पंधरे जि.स बि. ब्रि., सुरज आत्राम जि.अ. बि. ब्रि. वर्धा, शेषराज मडावी बि. ब्रि.ता.अ.मारेगाव, योगेश रायपुरे, जि.अ.भि. टा. से., मारोती दादा कुसराम सामाजिक कार्यकर्ते, तुळशीराम पेंदोर सामाजिक कार्यकर्ते, मोरेश्वर गेडाम सामाजिक कार्यकर्ते, मंगेश उईके ग्रा.पं.सदस्य बोटोणी, विशाल वाघ गो.ग.पा. ओबीसी सेल जि अध्यक्ष, जयसिंग कांबळे सामाजिक कार्यकर्ते वणी हे प्रामुख्याने उपस्थित होते. 

या प्रसंगी सर्व मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने जंगी स्वागत तसेच औक्षवंण केले, त्यानंतर क्रांतीसुर्य बिरसा मुंडा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके, रॉबिन हूड शामादादा कोलाम व इतर क्रांतिकारीकारक महामानवांना पुष्पहार हारार्पण दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. 

प्रास्ताविविकेतून कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सुधाकर चांदेकर यांनी आदिवासी समाजाच्या व्यथा मांडल्या, उदघाटनपर भाषणात सुरेश काकडे यांनी अडल्या नडल्यांच्या समस्या मार्गी लावू असे अभिवचन दिले. संजय खाडे यांनी कार्यक्रम व आयोजकांचे भरभरून कौतुक केले. तसेच इतरही मान्यवरांनी आपल्या भाषणातून या दिनानिमित्त अमूल्य विचार मांडले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 10 वी 12 वी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशासनातील अधिकारी तसेच कर्मचारी,पालक यांचा देखील मंचावर जाहीर सत्कार करण्यात आला. 

दुपारी आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आदिवासी नृत्य, ठेमसा नृत्य, गोंडी नृत्यांचा समावेश होता. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ पारितोषिक सहभागी स्पर्धेकांना देण्यात आली. यावेळी वणी मारेगाव झरी जामणी येथील प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विनोद आदे यांनी तर, आभार शेषराज मडावी यांनी मानले. या कार्यक्रमाला यशस्वीकरण्यासाठी संजय मडावी, विनोद आत्राम, डॉ चांदेकर, दिनेश आत्राम, कवडू उईके, स्वप्नील आत्राम, चंदू मडावी, प्रवीण आत्राम, हंसराज भादीकर, गोविंदा आत्राम, संतोष कुळसंगे, रंजना तोडसाम, चंदा किनाके, यांनी परिश्रम घेतले.

बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (ऊबाठा) च्या वतीने निषेध आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महागांव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात बदलापूर मध्ये शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर तेथील सफाई कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी कडून केले जात आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपींना फास्टट्रॅक कोर्टाचा निकाल दोन ते तीन दिवसात घेऊन तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महागाव तालुक्याच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. 

या वेळी उपजिल्हा प्रमुख प्रमोद भरवाडे, विधानसभा प्रमुख भीमराव भालेराव, तालुका प्रमुख रवींद्र भारती, युवती जिल्हा संघटिका मंजुषा वानखेडे, तालुका संघटिका उज्वला ठाकरे, जया हेमंत खरे, तेजस नरवाडे, राहुल राठोड, सुशील गावंडे, विलास फाळके, आकाश राठोड, सोनू खान, विनोद चव्हाण, राजू दोडके, प्रवीण भांगे, शंकर टेटस, रमेश चव्हाण, उमेश गाडे आदींची उपस्थिती होती. 

नारीशक्तीचा एल्गार, अवैध दारू विक्री होत असलेल्या धाब्यावर 'हल्लाबोल'

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील मंदर येथील महिलांनी अवैध दारू विक्री विरोधात एल्गार पुकारत धाब्याला आगीत ढकलले. तसेच धाबा चालक व धाब्यातील एका सहका-याला बेदम चोप दिला. मंगळवारी (ता. 20) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वणी-घुग्घुस रोडवरील निलगिरी बन जवळ हा खळबळजनक प्रकार घडला आहे. 

वारंवार तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी धाब्यावर हल्लाबोल केल्याची माहिती आहे. घटनास्थळी येजा करणाऱ्याची तोबा गर्दी उसळली होती.

वणी-घुग्घुस महामार्गांवर निलगिरी बन च्या समोर 'बाबूभैया का धाबा' नामक धाबा आहे. या धाब्यातून दारूची अवैधरित्या विक्री सुरु होती, असा महिलांचा आरोप आहे. गावातील अनेक तरुण मुलं व्यसनाच्या आहारी गेले. त्यामुळे गावाचे घरचे वातावरण कलूषित होऊन अनेक समस्याचा सामना करावा लागत असल्याने याबाबत महिलांनी अनेकदा धाबा संचालकाला समज दिली. मात्र, धाबा चालकाने याकडे दुर्लक्ष केले. 

तीन दिवसांपूर्वी मंदर येथील महिलांनी याबाबत तक्रार दिली. त्यानंतर महिलांनी वाट पाहिली. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर मंगळवारी येथील संतप्त नारीशक्ती एकवटल्या व सुमारे 35 ते 40 महिलांनी धाब्यावर हल्लाबोल केला.