नवी भरती का नाही?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

सध्या रेल्वेची स्थिती अनेक अर्थाने बिकट बनली आहे. मुळात रेल्वेकडे सरकारचे लक्षच आहे की नाही, असा प्रश्न मनात येतो. रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांची सर्वच पातळ्यांवर तीव्र कमतरता जाणवत आहे. त्याविषयीचे अहवाल वेळोवेळी सरकारकडे सादर झाले आहेत. पण त्याकडे सातत्याने कानाडोळा केला गेला. आता अगदी परिस्थिती हातघाईवर आल्यावर एक नवीनच निर्णय सरकारने घेतल्याचे कानावर आले. सरकारने नवी भरती करण्याऐवजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा एक आगळाच फंडा शोधून काढला आहे. या अंतर्गत म्हणे २५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले जाणार आहे. 

६५ वर्षांच्या वयाच्या आतील कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेची संधी दिली जाईल आणि त्यांना जेमतेम दोन ते पाच वर्षांच्या अवधीसाठी नेमले जाईल. त्यांना शेवटी म्हणजे, निवृत्तीच्या वेळी शेवटच्या महिन्यात जेवढे वेतन मिळत होते त्या वेतनावर त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याखेरीज त्यांना पगारवाढ वगैरे काहीही मिळणार नाही, असेही या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे. २५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियुक्त करणे म्हणजे किमान तेवढ्या नवयुवकांना नोकरीची संधी नाकारण्यासारखीच परिस्थिती आहे. सरकार हे असले तकलादू उपाय योजून नेमके काय साधू इच्छित आहे हे कळत नाही. सरकारला वेतनावरचा खर्च टाळायचा आहे म्हणूनच बहुदा नोकरभरती टाळली जात आहे की काय, अशी शंका निर्माण होते. अन्यथा सरकारने वेळोवेळी रिक्त पदांवर नवयुवकांना संधी दिली असती, तर आज त्या युवकांचे संसारही सावरले गेले असते आणि देशातील बेरोजगारी काहीअंशी कमी होण्यास मदत झाली असती. पण कायमच उफराट्या भूमिकेत असलेल्या सरकारने हा तकलादू पर्याय स्वीकारलेला दिसतो आहे. 

देशातल्या प्रत्येक क्षेत्रात सरकारी नोकऱ्यांमध्ये कमतरता जाणवते आहे. एका माहितीनुसार, केंद्र सरकारच्या एकूण सेवांमध्ये तब्बल सुमारे दहा लाख पदे रिकामी आहेत. ही पदे भरण्याचे आश्वासन सरकारने निवडणूक काळातही दिले होते; पण त्याचा त्यांना पुन्हा विसर पडला. त्याऐवजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन त्यांना तात्पुरत्या स्वरूपात नेमून कशीबशी वेळ भागवून नेण्याचे काम हे सरकार करते आहे. म्हणजेच नव्याने भरती करून त्याचा जो आर्थिक बोजा सरकारवर पडणार होता तो टाळण्यासाठीची ही पळवाट आहे हे स्पष्ट दिसते आहे. 

रेल्वेकडे कर्मचारी टंचाई एवढीच एकमेव समस्या नाही, तर देशातील एकूणच रेल्वे खाते सध्या अनेक अर्थाने डबघाईस आलेले पाहायला मिळते आहे. रेल्वेच्या यंत्रणेकडे कोणत्याच पातळीवर गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. किंबहुना रेल्वे ही जनतेच्या सोयीसाठी आहे आणि ती प्रभावी आणि कार्यक्षम असली पाहिजे याचेच भान सरकार विसरलेले दिसते आहे. म्हणून तर करोना काळात रद्द केलेल्या अनेक रेल्वे गाड्या आजही सुरू झालेल्या नाहीत. अगदी आपल्या पुण्यातील उदाहरण द्यायचे झाले तर करोनापूर्वकाळात पुणे-लोणावळा मार्गावर जितक्या संख्येने लोकल धावत होत्या तेवढ्या संख्येने आज त्या धावताना दिसत नाहीत. त्यातून लोकांची होणारी अडचण सरकारला दिसत नाही. सगळा कारभार दिखाऊपणाच्या आवरणाखाली झाकून टाकला जात आहे. रेल्वेतील अपघातांचे प्रमाणही सध्या खूप वाढले आहे. दर महिन्याला कुठे ना कुठे रेल्वे रुळावरून घसरल्याच्या बातम्या येतात. लोहमार्ग आणि एकूणच तांत्रिक विभागातील देखभालही दुर्लक्षित झाली आहे, असेही अनेकांचे म्हणणे आहे. सरकारला त्याचे काहीही पडलेले दिसत नाही. मुळात रेल्वेचे स्वतंत्र बजेट रद्द करून त्याचा अंतर्भाव केंद्रीय अर्थसंकल्पामध्येच करण्याचा नवीन प्रघात या सरकारने पाडला, तेव्हापासून रेल्वेची वाताहत सुरू व्हायला सुरुवात झाली आहे. रेल्वेचा ऑपरेशनल रेशो कमालीचा घसरला आहे. त्याविषयी कोणी वाच्यता करताना दिसत नाही. त्या उलट लोकांचे डोळे दिपवण्यासाठी 'वंदेभारत'सारख्या गाड्या सुरू करून रेल्वेसाठी आम्ही फार काही करत आहोत, असे सरकार भासवत असले तरी, या वंदेभारत गाड्यांसाठी नियमित स्वरूपातील गाड्यांचा बळी दिला जातो हा प्रकार लोकांना सहन होण्यासारखा नाही. त्यामुळे देशात विविध ठिकाणी वंदेभारत गाड्यांवर दगडफेक होण्याचे प्रकार वाढले आहेत. वंदेभारत गाड्या हा केवळ दिखाऊ उपाय आहे तो सर्वसामान्य प्रवाशांच्या हिताचा नाही हे रेल्वे प्रवाशांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर लक्षात येते. या गाड्यांचे भाडेही अव्वाच्या सव्वा आहे. रेल्वेची भाडेवाढ करता येत नाही म्हणून असले काहीतरी थातूरमातूर उपाय योजून सरकार धूळफेक करीत आहे हे जाणवते आहे. मुळात स्वतंत्र रेल्वे बजेट रद्द झाल्यापासून रेल्वे हा विषय प्रसारमाध्यमांमधून गायब झाला आहे. 

पूर्वी निदान रेल्वे बजेटच्या अनुषंगाने रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर संसदेत आणि संसदेबाहेरही विस्तृत चर्चा व्हायची. त्यातून लोकांना काय हवे काय नको हे समजायचे. लोकांच्या तक्रारींकडे आवर्जून लक्ष दिले जायचे. पण आता या सगळ्या प्रकाराला पद्धतशीर बगल दिली गेली आहे. चालू वर्षाचा जो अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला त्यावेळी त्यांनी रेल्वेसाठीच्या तरतुदींचा कोणताच स्वतंत्र उल्लेख आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केलेला दिसला नाही. त्यातूनच तूनच सरकारची रेल्वेविषयीची एकूण अनास्था लक्षात येते. त्यामुळेच आज भारतीय रेल्वे बिकट स्थितीला सामोरे जाताना दिसते आहे. रेल्वे हा सरकारच्या आर्थिक नफा-तोट्याच्या बाहेरचा विषय आहे. हा केवळ जनतेच्या सोयीसाठीचा मामला आहे, त्यात नफ्या-तोट्याचा विचार करता येणार नाही हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे. 

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नेमून आपण तात्पुरती वेळ भागून न्याल, पण कायमस्वरूपी उपाययोजनांचे काय हा मुद्दा शिल्लकच राहतो. त्यामुळे सरकारने तातडीने रेल्वेच्या गरजांचा अभ्यास करून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या नाहीत, तर जनसामान्यांच्या प्रवासाचा हा मार्ग दिवसेंदिवस आणखीनच खडतर होईल हे सरकारने वेळीच ध्यानात घेतलेले बरे.

समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन


सह्याद्री चौफेर । वृतसंस्था 

नवी दिल्ली : माजी आमदार आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांनी प्रवेश केला. 

यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील केदार, सतेज पाटील उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता कपिल पाटील यांना गोरेगाव विधानसभा मिळण्याची शक्यता आहे. 

शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी जदयूला रामराम ठोकल्यानंतर समाजवादी गणराज्य पक्ष या नव्या पक्षाची स्थापना केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी नवीन पक्षाची स्थापना केली होती.

मात्र, आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीत गोरेगाव किंवा वर्सोवा ही जागा काँग्रेसला सुटणार आहे. त्या जागेवर कपिल पाटील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस विभागाने दिली मानवंदना

सह्याद्री चौफेर । वृतसंस्था 

यवतमाळ : 1 सप्टेंबर 2023 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये देशांमध्ये एकूण 216 जवानांनी आपले कर्तव्य बजावत असताना मातृभूमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिली,त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून आज पोलीस स्मृतिदिन पाळण्यात आला. 

यावेळी प्रमुख अतिथी असलेले जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी स्मृती दिनाचे महत्त्व विशद केले. आयोजित कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय हुड यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्मृतिदिनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले तर, जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी स्मृतिदिनाचे महत्त्व सांगून 216 जवानांनी मातृभूमीच्या रक्षणार्थ प्राण्यांची आहुती दिली त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून त्यांना विनम्र अभिवादन केले.

हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले आणि परेड ग्राउंड वर शोकपरेडची कारवाई करून तीन ब्लॅक राउंड फायर केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट कडून स्वागत

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : देशातील बाल विवाह कायद्यावर ऐतिहासिक निर्णय देताना, सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी करून असे म्हटले आहे की बाल विवाहामुळे स्वत: च्या इच्छेनुसार जीवनसाथी निवडण्याचा अधिकार काढून घेतला जातो. सोसायटी फॉर एनलाइटनमेंट अँड व्हॉलंटरी ॲक्शन (SEWA) आणि 'बालविवाह मुक्त भारत' मोहिमेचे भागीदार कार्यकर्ते निर्मल गोराणी यांच्या याचिकेवर आलेल्या या निर्णयाचे स्वागत करताना, आधार बहुउद्देशीय संस्था प्रतिनीधी डॉ. भारती पाटील,रेणू प्रसाद, आनंद पगारे म्हणाले, “हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशातील बालविवाह संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि आम्ही राज्य सरकारला या मार्गदर्शक तत्त्वांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन करतो जेणेकरून २०३० पर्यंत भारत बाल विवाह मुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल.” 

ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ जिल्ह्यात 'बाल विवाह मुक्त भारत' (CMFI) मोहिमेचा एक प्रमुख भागीदार आहे, देशभरातील 200 हून अधिक स्वयंसेवी संस्थांची युती आहे जी 2030 पर्यंत बालविवाह समाप्त करण्यासाठी 400 हून अधिक जिल्ह्यांमध्ये तळागाळात मोहीम राबवत आहे.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने निकाल देताना म्हटले आहे की, बाल विवाह प्रतिबंध कायदा (PCMA), 2006 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार आणि प्रशासनाने प्रतिबंध व अभ्यासाची रणनीती असलेल्या समुदाय-आधारित दृष्टिकोनाने काम करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वां मध्ये शाळा, धार्मिक संस्था आणि पंचायतींना बाल विवाहाचे उच्च प्रमाण असलेल्या भागात बाल विवाह रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी शाळा, धार्मिक संस्था आणि पंचायतींना महत्त्वाचे साधन म्हटले आहे. बाल विवाहा विरुद्ध जनजागृती करणे. विभागीय खंडपीठासमोर स्वयंसेवी संस्था सेवा आणि कार्यकर्ते निर्मल गोराणा यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, देशातील बालविवाहाची परिस्थिती गंभीर आहे आणि बाल विवाह विरोधी कायद्याच्या मूळ भावनेशी खेळले जात आहे. 

निकाल देताना न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड म्हणाले, “बहु-क्षेत्रीय समन्वय असेल तेव्हाच कायद्याची अंमलबजावणी यशस्वी होऊ शकते. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता वाढण्याची गरज आहे. आम्ही पुन्हा एकदा समुदाय-आधारित दृष्टिकोनाच्या गरजेवर जोर देतो.” या निर्णयाचे स्वागत करत.. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट चे समन्वयक प्रकाश चहानकर म्हणाले, “हा आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा निर्णय आहे. बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन ज्या आवेशाने आणि जिद्दीने काम करत आहे ते कौतुकास्पद आहे आणि हा निर्णय आपल्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांना अधिक बळ देईल. बालविवाह हा एक गुन्हा आहे ज्याने संपूर्ण देशाला वेठीस धरले आहे आणि त्याच्या स्पष्ट व्याख्याबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत. आम्हाला विश्वास आहे की एकत्रितपणे आणि एकत्रित प्रयत्नांनी आम्ही 2030 पर्यंत हा गुन्हा पूर्णपणे नष्ट करू.” आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या एका वर्षात बालविवाह मुक्त भारत अभियान आणि त्याच्या भागीदार स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे देशात 120,000 बालविवाह यशस्वीपणे थांबवण्यात आले. याव्यतिरिक्त, सरकारी प्रयत्नांमुळे बालविवाहास बळी पडलेल्या 1.1 दशलक्ष मुलांना विवाह करण्यापासून रोखले गेले.

बालविवाह मुक्त भारत' मोहिमेचे संस्थापक भुवन रिभू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे वर्णन भारत आणि संपूर्ण जगासाठी एक उदाहरण म्हणून केले आणि ते म्हणाले, "हा ऐतिहासिक निर्णय संस्थात्मक संकल्पना मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण वळण देणारा ठरेल. देशातून बालविवाह समूळ निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा विजय आहे. सुप्रीम कोर्ट आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे हे दिसून आले आहे की त्यांना मुलांची काळजी आहे आणि आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी पुढे येऊन या सामाजिक गुन्ह्याचा अंत करण्याची वेळ आली आहे.

रिभू म्हणाले, “जर आपण आपल्या मुलांचे संरक्षण करण्यात अयशस्वी झालो तर जीवनात दुसरे काहीही महत्त्वाचे नाही. सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा सर्वांगीण दृष्टिकोनाची गरज अधोरेखित केली आहे आणि ‘बालविवाह मुक्त भारत अभियान’ देखील ‘पिकेट’ रणनीतीद्वारे यावर जोर देत आहे. बालविवाह त्याच्या मूळ स्वरुपात लहान मुलांवर होणारा बलात्कार आहे. "हा निर्णय केवळ आमचा निश्चयच मजबूत करत नाही तर उत्तरदायित्व आणि सहयोगी प्रयत्नांद्वारे आम्ही बालविवाह संपुष्टात आणू शकतो, मुलांवरील हिंसाचाराचा सर्वात घृणास्पद प्रकार देखील अधोरेखित करतो."

बाल विवाह प्रतिबंध प्रभावी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे

• सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, बालविवाह हे स्वतःच्या इच्छेने जीवनसाथी निवडण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करते.
• हा निर्णय एनजीओ 'सेवा' आणि कार्यकर्ते निर्मल गोराणा यांच्या याचिकेवर आला, दोन्ही सदस्य आणि 'बालविवाह मुक्त भारत' मोहिमेचे सहकारी, आधार बहुउद्देशिय संस्था यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितले की, या निर्णयामुळे 2030 पर्यंत देशातून बाल विवाहाचे उच्चाटन होईल.
• बालविवाह मुक्त भारत ही 200 हून अधिक स्वयंसेवी संस्थांची युती आहे .जी एकट्या 2023-24 मध्ये देशभरात 120,000 बाल विवाह थांबवेल आणि 50,000 बाल विवाह मुक्त गावे तयार करेल
.

विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नये - एसडीपीओ गणेश किंद्रे

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेवून चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचा विकास केल्यास करिअर बनवणे सहज शक्य आहे. प्रत्येकात प्रचंड क्षमता आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वतःच्या मनात डोकावून उपजत क्षमता, कौशल्ये विकसित व अद्यावत केल्यास करिअरच्या संधी चालून येतील असा सल्ला उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांनी दिला. ते लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

लायन्स क्लब वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लायन्स क्लब चे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर, सचिव किशन चौधरी, प्रोजेक्ट डायरेक्टर पुरुषोत्तम खोब्रागडे, महेन्द्र श्रीवास्तव, चंद्रकांत जोबनपुत्रा, अकॅडमीक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्य चित्रा देशपांडे मंचावर उपस्थित होते.

मोबाईल फोनच्या अतिरेकी वापरामुळे वाचन व विचारशक्ती कमी झाली असून "मोबाईल आपल्यासाठी की, आपण मोबाईलसाठी" याचा विचार करण्याची गरज आहे. हे स्पष्ट करुन मुलींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 

पाहुण्यांचा परिचय श्री राम पवार यांनी केला. कार्यशाळेचे प्रास्ताविक राजाभाऊ पाथ्रडकर, सूत्रसंचालन किरण बुजोणे तर आभार किशन चौधरी यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.