विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश योजनेबाबत संभाजी ब्रिगेडचे निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मोफत गणवेश योजनेबाबत संभाजी ब्रिगेड चे वतीने जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना उपविभागीय अधिकारी,वणी यांचे मार्फत निवेदन दिले.  

या निवेदनात म्हटलं आहे की, शैक्षणिक सत्र 2024-25 सुरु होऊन दोन महिने उलटून गेले आहे आणि देशाचा स्वातंत्र्यदिन सोहळा सुद्धा पार पडला. मात्र, आपल्या जाहिरातबाज, गतिमान सरकारने अद्यापपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेअंतर्गत दरवर्षी प्रमाणे मिळणारे मोफत गणवेश दिलेले नाहीत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील हीच स्थिती असून ज्या ठिकाणी गणवेश प्राप्त झाले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यांची मापे सुद्धा अयोग्य आहेत. 

ग्रामीण व शहरी भागातील सरकारी शाळांतून गोरगरीब विद्यार्थी शिकत असतात. त्यांच्यासाठी नवीन कपडे घालण्याची हीच एकमेव संधी असते. मात्र, आपल्या असंवेदनशील सरकारने त्या विद्यार्थ्यांची ही संधी हिरावून घेत त्यांचा अपमान सुद्धा केलेला आहे. स्वातंत्र्यदिनासारखा अत्यंत महत्वाचा राष्ट्रीय सण त्या विद्यार्थ्यांना जुन्या फाटक्या कपड्यामध्ये साजरा करावा लागला. फक्त लाडक्या बहिणीकडे लक्ष देणाऱ्या सरकारने भाच्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. तरी विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन त्यांना त्वरित दर्जेदार गणवेश उपलब्ध करून द्यावे,अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देताना अजय धोबे यांचेसह मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर, अ‍ॅड. अमोल टोंगे, भाऊसाहेब आसुटकार, दत्ता डोहे, दिनेश बलकी आदी उपस्थित होते.

शेकडो युवक व ग्रामस्थांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : 22 ऑगस्ट 2024 रोजी वणी तालुक्यातील दहेगाव, मुरधोनी व डोंगरगाव येथील शेकडो युवक व ग्रामस्थांनी पक्ष प्रमुख श्रद्धेय अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे विचार व वणी तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्षप्रवेश केला.
यामध्ये विशेषतः आदिवासी तरुणांचा अधिक प्रमाणात समावेश होता. गोरगरिबांना मदत व त्यांच्या मुलभूत अडीअडचणीची जाणीव असणारे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष हरीश पाते अशी ग्रामीण भागात पाते यांची ओळख आहे. तूर्तास वणी विधानसभेत वंचित बहुजन आघाडी मध्ये "इन्कमिंग" मोठ्या झपाट्याने होताना दिसत आहे.        
यावेळी तालुका अध्यक्ष हरीश पाते, पुखराज खैरे, संतोष पेंदोर, युवराज चांदेकर यासह आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते.

योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायला हव्यात, सत्कार समारंभातून आमदार संजीव रेड्डी बोदकुरवारांचं आवाहन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : या देशात स्त्रिचा जन्म होणे ही भाग्याची गोष्ट आहे. ती शक्ती आणि देवीचे स्वरूप आहे. आपल्या सण उत्सवाला फारच महत्व दिले आहे,त्यात रक्षाबंधनाला फार महत्त्व आहे. हे रेशीम बंध खूप बळकट असतात. असे प्रतिपादन आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी केल, ते शेतकरी भवन येथील लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी ज्यांनी अथक मेहनत घेतली त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते. 

यावेळी ललिता बोदकुरवार, बालविकास अधिकारी सुरेखा तुराणकर, नगरपालिकेच्या प्रकल्प अधिकारी पौर्णिमा शिरभाते, मा. जि. प. स. मंगला पावडे, संध्या अवताडे, लिशा विधाते, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, रवी बेलूरकर, गजानन विधाते, अशोक सुर, श्रीकांत पोटदुखे, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष तुकाराम माथनकर, बंडु भाऊ चांदेकर, राकेश बुग्गेवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार बोदकुरवार पुढे म्हणाले की, सर्वांनी या कार्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अजूनही करीत आहेत. हा महिलांना आधार देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील 2.5 कोटी महिलांना याचा लाभ झाला. योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला हव्यात. असे आवाहन देखील त्यांनी केले. हे सेवेचे व्रत अंगीकारून आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत. सदैव लाडक्या बहिणीच्या पाठीशी आहोत.असेही ते म्हणाले. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी याप्रसंगी सरकारचं विशेष अभिनंदन केलं. ते म्हणाले,अशा चांगल्या कार्यात दिशाभूल करणारे दिशाहीन लोकं असतात. बहिणींनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. हे बहिणींसाठी राखीचं गिफ्ट आहे. बहिणींना अर्ज भरण्याकरता जी मदत अनेकांनी केली, त्यांच्या कार्याचा हा गौरव आहे. हा एक कृतज्ञता सोहळा आहे, अशा अनेक योजना भविष्यातही येतील. बालविकास अधिकारी सुरेखा तुराणकर यांनी या योजनेचा थोडक्यात आढावा मांडला. गेल्या एक-दीड महिन्यांपासून कार्य अविरत सुरू असल्याचं त्या म्हणाल्या. 30,000 हजार महिलांच्या खात्यात प्रत्यक्षात पैसे जमा झाले. उर्वरित बहिणींनी लवकरात लवकर अर्ज भरावे असे आवाहन त्यांनी मंचकावरून केले. 

नगरपालिकेच्या प्रकल्प अधिकारी पौर्णिमा शिरभाते यांनी योजनेची माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत 9138 अर्ज वणी नगरपालिका क्षेत्रात प्राप्त झाले असून काम अजूनही सुरू आहे. या योजनेबद्दल सगळ्या बहिणी समाधानी आहेत, असेही त्या म्हणाल्या.

माजी जिल्हा परिषद सदस्य मंगला पावडे यांनी ही योजना लोकप्रिय असल्याचे सांगितले. अनेकांच्या खात्यात पैसेही जमा झालेत. खेळीमेळीच्या वातावरणात प्रामाणिकपणे सर्वांनी काम केलं. पैसे असले की आधार वाटतो. गेल्या दहा वर्षापासून आमदारांची जनतेशी नाळ जुळली आहे, ती अशीच कायम असावी, असे त्या कार्यक्रमाला संबोधिताना म्हणाल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पिंपळेशेंडे यांनी तर सूत्रसंचालन स्मिता नांदेकर यांनी केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आय सी आर पी, बचत महिला गट, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यासह मोठ्या संख्येने महिला मंडळी उपस्थित होती.

स्व. राजीव गांधी जयंती निमित्त काँग्रेस च्या वतीने छत्र्या वाटप

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : स्व.माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांच्या 80 व्या जयंती निमित्ताने वणी शहरात वसंत जिनीग अध्यक्ष तथा तालुका काँग्रेस कमिटी,झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्या सौजन्याने रस्त्यावरील लघु उद्योग करणाऱ्यांना कडक उन्ह आणि पाऊसापासून बचाव व्हावा या उद्दात उद्देशाने छत्री वाटप करण्यात आल्या.

माजी आमदार वामनराव कासावार, अ‍ॅड. देविदास काळे, राजू एलटीवार, ओम ठाकूर, सौ. संध्या बोबडे, विवेक मांडवकर यांच्या उपस्थितीत छत्री वाटपाचा लोकहितार्थ उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी शहरातील उदरनिर्वाहासाठी फळे, भाजीपाला, कपडा व्यवसायिक, मोची व इतरही लहान व्यवसायधारक रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांना पावसापासून व उन्हापासून बचाव करण्यासाठी मोठ्या छत्रीचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या छत्री पासून रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! एक महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अन्यथा शाळेची मान्यता होणार रद्द

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

बदलापूर दुर्घटनेनंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने बुधवारी सर्वच शाळा व परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय असून शाळांनी मोक्याच्या ठिकाणी कॅमेरे ताबडतोब बसविणे बंधनकारक केले असून या तरतुदीचे पालन न केल्यास संबंधित शाळेचे अनुदान रोखणे किंवा त्यांची मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा शालेय शिक्षण विभागाने दिला आहे.

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी प्राधान्याने सीसीटीव्ही बसवावेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी घ्यावा व त्या निधीची पुनर्रचना करून त्यातील पाच टक्के निधी यासाठी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे..

शासन निर्णयातील ठळक बाबी...
• शाळा व परिसरात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, त्याचे फुटेज दररोज तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर
• आठवड्यातून किमान तीनवेळा शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या मुख्याध्यापकांनी ते सीसीटीव्ही फुटेज पहावे
• शाळांमधील नियमित कर्मचाऱ्यांसह कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या सुरक्षारक्षक, सफाई कामगार, मदतनीस, बसचालक यांची चारित्र्य पडताळणी करावी
• शाळांमध्ये बाह्यस्त्रोद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचारी नेमावा
• शाळांमध्ये तक्रारपेटी ठेवावी, आदेशानुसार कार्यवाही न केल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल

 शाळांमध्ये आता विद्यार्थी सुरक्षा समिती
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या लैगिंक छळाच्या घटना होवू नयेत, यासाठी आता शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समित्यांचे गठन केले जाणार आहे. एका आठवड्यात शिक्षणाधिकाऱ्यांनी या समित्या स्थापन कराव्यात, असेही आदेश देण्यात आले आहेत. तर राज्य स्तरावर शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती स्थापन करण्याचाही निर्णय झाला असून ही समिती तीन महिन्यातून एकदा आढावा घेईल.