सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : या देशात स्त्रिचा जन्म होणे ही भाग्याची गोष्ट आहे. ती शक्ती आणि देवीचे स्वरूप आहे. आपल्या सण उत्सवाला फारच महत्व दिले आहे,त्यात रक्षाबंधनाला फार महत्त्व आहे. हे रेशीम बंध खूप बळकट असतात. असे प्रतिपादन आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी केल, ते शेतकरी भवन येथील लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी ज्यांनी अथक मेहनत घेतली त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी ललिता बोदकुरवार, बालविकास अधिकारी सुरेखा तुराणकर, नगरपालिकेच्या प्रकल्प अधिकारी पौर्णिमा शिरभाते, मा. जि. प. स. मंगला पावडे, संध्या अवताडे, लिशा विधाते, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, रवी बेलूरकर, गजानन विधाते, अशोक सुर, श्रीकांत पोटदुखे, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष तुकाराम माथनकर, बंडु भाऊ चांदेकर, राकेश बुग्गेवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार बोदकुरवार पुढे म्हणाले की, सर्वांनी या कार्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अजूनही करीत आहेत. हा महिलांना आधार देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील 2.5 कोटी महिलांना याचा लाभ झाला. योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला हव्यात. असे आवाहन देखील त्यांनी केले. हे सेवेचे व्रत अंगीकारून आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत. सदैव लाडक्या बहिणीच्या पाठीशी आहोत.असेही ते म्हणाले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी याप्रसंगी सरकारचं विशेष अभिनंदन केलं. ते म्हणाले,अशा चांगल्या कार्यात दिशाभूल करणारे दिशाहीन लोकं असतात. बहिणींनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. हे बहिणींसाठी राखीचं गिफ्ट आहे. बहिणींना अर्ज भरण्याकरता जी मदत अनेकांनी केली, त्यांच्या कार्याचा हा गौरव आहे. हा एक कृतज्ञता सोहळा आहे, अशा अनेक योजना भविष्यातही येतील. बालविकास अधिकारी सुरेखा तुराणकर यांनी या योजनेचा थोडक्यात आढावा मांडला. गेल्या एक-दीड महिन्यांपासून कार्य अविरत सुरू असल्याचं त्या म्हणाल्या. 30,000 हजार महिलांच्या खात्यात प्रत्यक्षात पैसे जमा झाले. उर्वरित बहिणींनी लवकरात लवकर अर्ज भरावे असे आवाहन त्यांनी मंचकावरून केले.
नगरपालिकेच्या प्रकल्प अधिकारी पौर्णिमा शिरभाते यांनी योजनेची माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत 9138 अर्ज वणी नगरपालिका क्षेत्रात प्राप्त झाले असून काम अजूनही सुरू आहे. या योजनेबद्दल सगळ्या बहिणी समाधानी आहेत, असेही त्या म्हणाल्या.
माजी जिल्हा परिषद सदस्य मंगला पावडे यांनी ही योजना लोकप्रिय असल्याचे सांगितले. अनेकांच्या खात्यात पैसेही जमा झालेत. खेळीमेळीच्या वातावरणात प्रामाणिकपणे सर्वांनी काम केलं. पैसे असले की आधार वाटतो. गेल्या दहा वर्षापासून आमदारांची जनतेशी नाळ जुळली आहे, ती अशीच कायम असावी, असे त्या कार्यक्रमाला संबोधिताना म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पिंपळेशेंडे यांनी तर सूत्रसंचालन स्मिता नांदेकर यांनी केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आय सी आर पी, बचत महिला गट, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यासह मोठ्या संख्येने महिला मंडळी उपस्थित होती.