सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
नागपूर : आदिवासी टायगर सेना (ATS) यांच्या वतीने कुवारा भिवसन देवस्थान, भीवगड येथे बुधवार (दि. ८ एप्रिल २०२६) रोजी आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीला विदर्भातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या बैठकीत सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात येऊन आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकजुटीचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीत संघटनेच्या पुढील वाटचालीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यात भव्य तीन दिवसीय राज्य अधिवेशन आयोजित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याने विदर्भासह राज्यातील आदिवासी समाजात नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या बैठकीला विदर्भ अध्यक्ष संतोष कुळमेथे, कार्याध्यक्ष माधुरी मडावी व मिनलताई आत्राम, महासचिव साईनाथ कोडापे, विदर्भ प्रवक्ता मोरेश्वर उईके, उपाध्यक्ष रमेश धुर्वे, प्रकाश कुमरे, वर्षा परचाके, संघटक नरेंद्र टेकाम, दशरथ कुलमेथे, शर्मिला कुंजाम, वर्षा आत्राम, युवा अध्यक्ष अभिलाष परचाके यांच्यासह विदर्भातील सर्व जिल्हा अध्यक्ष, जिल्हा महासचिव आणि विविध जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीतून एकच प्रभावी संदेश देण्यात आला—“जल, जमीन आणि जंगल यासोबतच आपले हक्क, अधिकार आणि न्याय मिळवण्यासाठी सर्व आदिवासी समाजाने एकजुटीने उभे राहिले पाहिजे.”
आगामी काळात सामाजिक न्याय,अधिकार व हक्काच्या मुद्द्यांवर एकत्रितपणे लढा उभारण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. ही बैठक केवळ संघटनात्मक नव्हे, तर विदर्भातील आदिवासी समाजाला एकत्र बांधणारी आणि नव्या दिशेने नेणारी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.