लाभार्थी महिलांच्या खात्यात केवळ एक रुपया जमा होणार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. रक्षाबंधनच्या दिवशी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे हफ्ते एकत्र जमा करण्यात येणार आहेत. त्यासाठी तांत्रिक पडताळणीला आता सुरुवात झाली आहे. त्यासाठी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 'एक रुपया' जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा केवळ तात्रिक प्रक्रियेचा भाग असून वेरिफिकेशन साठी 1 रुपया जमा केला जात असून याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नका, असे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे.

महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. या ट्वीटमध्ये बोलताना त्या म्हणाल्या की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत खूप अर्ज येत आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करने, हे आमच्यासाठी गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रायोगित तत्त्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यांत प्रत्येकी एक रुपया जमा करत आहोत. जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक पडताळणी प्रक्रियेचा भाग आहे.

ही पडताळणी सुरू झाल्यानंतर पुढची प्रक्रिया आणखी सुरळीत होण्यासाठी निश्चितपणानं मदत होणार आहे. अर्जदार माता-भगिनींना आमची विनंती आहे की, हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबाबतचा कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्या प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नका.

लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा करणार : अदिती तटकरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिला आणि बालविकास विभागाकडे 1 कोटी हून अधिक अर्ज आले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा करणार आहोत. हा 1 रुपया सन्मान निधीची रक्कम नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल. बँक खाते वेरिफिकेशन करण्यासाठी हा 1 रुपया जमा केला जात आहे. तेव्हा यासंदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला आणि गैरसमजाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.https://x.com/iAditiTatkare/status/1818637628259938381?t=dSx7Lc5IVZQoLUFaIHdvuw&s=08

मारेगाव नगर पचांयत नगराध्यक्ष कोण होणार!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : ऑगस्ट महिन्यात विद्यमान नगराध्यक्ष डॉ.मनिष मस्के यांचा कार्यकाळ संपणार असून आता नवीन चेहऱ्याला संधी मिळणार असल्याने नगर पंचायतचे अध्यक्ष कोण होणार? याकडे नगरवासियांच्या नजरा वळल्या आहे. काही दिवसात आरक्षणाची सोडवत होण्याची शक्यता असल्याचे बोलल्या जात आहे. 
मारेगाव नगर पचांयतचे विद्यमान नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्के व उप-नगराध्यक्षा हर्षा महाकुलकर यांचा कार्यकाल अवघे काही आठवडे राहिला आहे. आता नगराध्यक्ष पदांसाठी मुबई सोडत निघणार व नविन निवड होणार आहे. काही दिवसात ही आरक्षण सोडवत होण्याची शक्यता आहे, मात्र कोणत्या प्रवर्गासाठी हे आरक्षण सुटते हे पाहण्यासाठी नेते,पुढारी व नागरीकांची देखील उत्सुकता वाढली आहे. नगरविकास विभागाने हे आरक्षण सोडवत जाहिर केले नाही तर, मग आणखीन काही महिने वाट पाहावी लागणार आहे. 
आरक्षण सुटले नाही म्हणुन शांतता आहे, परंतु बाहेर दिसणारी शांतता मात्र आरक्षण सोडवत जाहिर झाल्यावर संपणार आहे. नविन समीकरणे पहावयास मिळणार आहे. या वेळेस आरक्षण ओपन किंवा अनुसूचित जाती च्या पुरुष वर्गाला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात  हालचालीना वेग आल्याचे दिसून येत आहे. बिगुल वाजताच नगरसेवक तोडजोडीचे राजकारण तापणार असून आरक्षण जर अनुसूचित जमातीसाठी निघाल्यास मारेगाव नगर पचांयतचा कोण "नगराध्यक्ष" होणार याकडे मात्र सर्वाचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री "लाडकी बहीण योजना" सरसकट मतदार यादी नुसार लाभ द्या – सीमा स्वामी लोहराळकर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नांदेड : सध्या महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त चर्चेत असेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना ही योजना सरसकट मतदार यादीनुसार लाभ देण्यात यावा,अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य च्या महिला उपाध्यक्ष सीमा स्वामी लोहराळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदनातून करण्यात आली आहे. 

लाडकी बहीण योजना तळागळातील महिला पर्यंत पोहोचण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहे. मात्र, कुटुंब सांभाळत पोटासाठी बाहेर काम करणाऱ्या काही महिलांना या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. या योजनेपासून कोणतीही महिलां वंचित राहू नये, तसेच बहिणीला शहराच्या ठिकाणी होणारा दैनंदिन आर्थिक भुरदंड,काम बुडवून योजनेच्या मागे फिरणे, व सतत योजनेतील बदलामुळे आपल्या लाडक्या बहिणीला नाहक त्रास होणार नाही आणि जाचक अटीपासून सुटका मिळेल अशी अपेक्षा आहे.

त्यामुळे सरसकट हाच एकमेव उपाय दिसत असून मतदार यादीनुसार लाभ देण्यात यावे अशी, मागणी सौ.लोहराळकरांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना केली. निवेदनाचा तात्काळ विचार करून माझ्या लाडक्या बहिणींसाठी निर्णय घ्यावा,अशी विनंती सह मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्याच्या महिला उपाध्यक्ष सीमा स्वामी लोहराळकर यांनी केली आहे. 

संगीत विशारद रविकिरण घुमे सन्मानित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सावित्रीबाई फुले गुण गौरव समिती, मारेगावच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत वैशिष्ट्य पुर्ण गुण घेऊन उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये संगीत विशारद रविकिरण घुमे यांना मा. श्री. उत्तम निलावाड (तहसीलदार) यांचे हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येथील शेतकरी सुविधा केंद्रात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट होते,उद्घाटन वर्धमान फाउंडेशन वणीचे अध्यक्ष विजय चोरडीया यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणुन मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड, गटविकास अधिकारी भिमराव व्हनखडे, नायब तहसीलदार गिरीश बोर्डे, क्रुषी अधिकारी संदिप वाघमारे, तालुका सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारेगावचे व्यवस्थापक आरीफ शेख, दुग्ध विकास विभागाचे सेवानिवृत्त कार्यालयीन अधिक्षक श्रीराम कुमरे,स्वागताध्यक्ष सरपंच संघटनेचे तालुका सचिव सुरेश लांडे, सरपंच तुळशिराम कुमरे, नगरपंचायत बांधकाम सभापती अंजुम शेख, मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी सन 2023-24 या सत्रात 10 वीच्या परिक्षेत 80 टक्के व 12 वी च्या परीक्षेत 65 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच या सन्मान सोहळ्यात, सन 2023-24 वर्ष भरात उत्तम सेवा करणाऱ्या लोकसेवक,व पदाधिकारी यांचा सुध्दा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या मध्ये समाजसेवक म्हणुन कोसारा येथील व्रुध्दाश्रमाचे अध्यक्ष जीतेंद्र जाधव, पत्रकार कुमारअमोल कुमरे, तलाठी जयवंत कनाके, पोलीस पाटिल प्रेमानंद गाणार,ग्रामसेवक विलास शिवरकर, अंगणवाडी सेविका दमयंती फुलझेले, क्रुषी उद्योजक राजु तुराणकर,संगित विशारद रविकिरण घुमे, डॉ.कवि:विनोद कुमार आदे, यांचा समावेश आहे. 

सुत्रसंचालन स्नेहलता चुंबळे,यांनी प्रास्ताविक तुळशिराम कुमरे,तर आभार प्रशांत भंडारी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आदेश तातेड,अविनाश कनाके,विजया दारूंडे,आनंद गव्हाणे ईत्यादी नी प्रयत्न केले. कार्यक्रमात पालक, विद्यार्थी तथा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रकमाचे आयोजक प्रतिभा तातेड, पत्रकार माणिक कांबळे यांनी केले होते. 

पाटण येथे नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराला प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : स्व. पारसमलजी चोरडिया फाऊंडेशन, वणीतर्फे पाटण येथील बालाजी सभागृहात (ता. 1) ऑगस्ट रोजी मोफत नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटपवर आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. शिबिरात जवळपास 850 रुग्णांनी सहभाग घेतला. शंभरावर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरून 50 च्या वर रुग्णांना कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे पाठविण्यात आलं.

स्व. पारसमल चोरडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी वणी, मारेगाव व झरी तालुक्यात विविध ठिकाणी नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व निःशुल्क चष्मे वाटप करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. अनेक वर्षांपासून विजय चोरडिया यांनी अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करून रुग्णांच्या आवश्यकतेनुसार सेवाग्राम येथे स्वतः खर्चाने पाठवून डोळ्यांची शस्त्रक्रिया करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

त्यांच्या उपक्रमाला समाजातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या शिबिरासाठी चोरडिया हॉस्पिटल, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विजय चोरडिया मित्र परिवार तथा वणी विधानसभा क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.