गुणवंत विद्यार्थीनी वैभवी महाकुलकर हीचा सत्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील श्री रंगनाथ स्वामी मंदिरात श्री रंगनाथ सेवा समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. यात गुणवंत विद्यार्थीनीं वैभवी महाकुलकर हिचा सत्कार करण्यात आला. वैभवीने एल टी कॉलेज विज्ञान शाखेमध्ये 12 मध्ये 86.17 टक्के घेऊन वणी तालुक्यातून पहिला येण्याचा बहुमान पटकाविल्याने तीला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

मागील अनेक वर्षापासून श्री रंगनाथ सेवा समितीच्या वतीने दर शनिवारी पंचमुखी हनुमान मंदीर येथे हनुमान चालिसा पठण व श्री रंगनाथ मंदिरात भगवान विष्णूची आरती व महाप्रसादाचे वितरण दानदात्यांच्या हस्ते करण्यात येत असते. तसेच गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनीचा सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात येतो, आज शनिवारी (1 जून) रोजी वैभवी चा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विजय महाकुलकर यांच्या तर्फे प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाला उपस्थित सत्कार मूर्ती वैभवी व तिचे वडील विजय महाकुलकर माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते राजू तुरणकर, समितीचे अध्यक्ष विशाल ठोंबरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दूधलकर, सचिव राजेश मार्गमवार, सहसचिव रविंद्र गौरकर, उत्तम दोरखंडे, महेंद्र तुगनायत, आशिष काळे, गजानन भडगरे, माजी सैनिक, सचिन पिदुरकर, सचिन पारटकर, शामराव नागपुरे, अरूण बुरटकर तसेच बालगोपाल रोहित ठोंबरे, साहील, दूधलकर मिलमिले, रेवणनाथ दोरखंडे, विश्व पिदुरकर, गोविंदा मुजेवार, प्रण्य मोरे, यासह समितचे सभासद व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी समितीची आज यवतमाळमध्ये बैठक

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : वाढत्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागवार 'दुष्काळ पाहणी समिती' गठीत केली आहे. अमरावती विभागाच्या समिती प्रमुखपदी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना जबाबदारी दिली असून या समितीची आढावा बैठक आज शनिवारी दि.1जून रोजी काँग्रेस कार्यालयात, यवतमाळ येथे पार पडली आहे. 

या बैठकीस गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय आदिवासी अध्यक्ष माननीय शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, मा. आमदार वझाहत मिर्झा, दिलीपराव येडतकर, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, मुंबई बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख, काँग्रेस समितीचे सचिव मा. जावेद अन्सारी, देवानंद पवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रशासन, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष संध्याताई बोबडे, शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, अनिल गायकवाड, उषाताई दिवटे, वसंत जिनींग अध्यक्ष आशिष खुलसंगे, घनश्याम पावडे वणी तालुका अध्यक्ष, मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. संपूर्ण यवतमाळ जिल्हा भीषण दुष्काळात होरपळत असून पिण्याचे पाणी मोठी टंचाई निर्माण झाली आहे. भयंकर परिस्थिती असताना सरकारकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. पाण्याचे टँकर, बियाणे टंचाई, पिक कर्ज अद्याप सुरु नाहीत. सरकारला या परिस्थितीचे गांभीर्यही नाही यामुळे विरोधी पक्ष नात्याने सरकारला दुष्काळ प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्यासाठी काँग्रेसने अमरावती विभागवार यशोमती ठाकूर यांची निवड करून अमरावती विभागाची प्रमुख पदाची जबाबदारी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 

यावेळी तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी मारेगाव तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जाबाबत, वारंवार खंडीत होणारा विजेचा प्रश्न, तालुक्यातील पाण्याची टंचाई, हे प्रश्न प्रामुख्याने मांडले. त्यावर बैठकीत विशेषत: शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत माणिकराव ठाकरे, वामनराव कासावार यांनी मनिष पाटील यांच्या सोबत चर्चा करून येत्या सात दिवसात कर्ज वाटप सुरळीत करू असे माजी मंत्री यशोमती ठाकूर, यांनी सांगितले असल्याचे ता. अध्यक्ष मारोती गौरकार यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना माहिती दिली. 

खरीप हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्यात!

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

मारेगाव : सतत नापिकीशी संघर्ष करत असताना शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे. गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामातून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. आता खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे. मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पेरणीसाठी लागणारे बियाणे व खते खरेदीसाठी पैसा आणायचा कुठून, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात दुष्काळाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हाततोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतातून माल घरात आला. मात्र, त्यातून लागवडखर्चही निघू शकला नाही. खरिपातील नुकसान भरून
काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कंबर कसली. एक हंगाम साथ देईल, या आशेवर जगत असताना शेतकऱ्यांची वारंवार निराशाच होत आहे. शेतीत राबताना कामात रात्रंदिवस कित्येकांना बाधा झाली, काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, आणि शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. काही शेतकऱ्यांना मदत मिळाली ती कवडीमोल. औषधोपचारावर खर्च करावा लागला. त्यातून बरे झालेल्यांचे पाऊल खरीप हंगामाच्या लागवडीकडे वळले. हातात पैसा नसल्याने पीककर्ज मिळविण्यासाठी शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवीत आहेत. राष्ट्रीयीकृत बँका दरवर्षीप्रमाणे पीककर्ज वाटपात आखडता हात घेत आहेत. दरवर्षीचा अनुभव बघता शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या दारात जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणीच्या वेळी पैसा उपलब्ध न झाल्यास खते व बी-बियाण्यांसाठी कुठून तजवीज करावी, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जात बुडाले. 
एकही हंगामातून शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे शिल्लक पडत नाहीत. गेल्या वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. आता खरीप हंगामासाठी पैसा कुठून आणायचा, हा प्रश्न आहे. बँकांकडून वेळेवर पीककर्ज मिळत नाही. अशा परिस्थितीत राज्य व केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज देऊन दिलासा द्यावा.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : राज्य सरकारच्या विविध विभागातील 524 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 रविवार, दिनांक 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून दिनांक 30 मे, 2024 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार करण्यात आली आहे.

शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या (अराखीव करीता वयापेक्षा अधिक) उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय सदर शुद्धीपत्रकानुसार आयोगाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 दिनांक 06 जुलै, 2024 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेकरीता मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयापेक्षा अधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत, अशा इतर मागासवर्गातील उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 31 मे, 2024 ते दिनांक 7 जून, 2024 असा आहे. सविस्तर माहितीसाठी संबंधित उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील उपरोक्त शुद्धीपत्रकाचे अवलोकन करावे, असे आयोगाकडून कळविण्यात येत आहे.

शासन प्रतिबंधित कपाशी बियाणे बाळगणे आले अलंगट


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : दिनांक 29/05/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अ उपड गुन्हे उघडकीस आणने व पाहिजे फरार आरोपीतांचा शोध घेणे संबंधाने पो.स्टे. वड़की हद्दीत पेट्रोलीग करीत असतांना गोपनीय बातमीदारकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, विलास नानाजी देवेवार व अविनाश संतोषराव निकम दोन्ही रा. सावित्री (पिपरी), बडकी, हे दोघेही इसम कोठारी ता. बल्लारशा जि. चंद्रपूर येथून भारत सरकारने प्रतिबंधीत केलेले अनाधिकृत कपाशी बियाने विक्री करीता ताब्यात बाळगुण ते स्वतःचे अधिक फायद्याकरीता एक सुझुकी ब्रेझा कार मध्ये वडकी येथे विक्री करीता घेवून येणार आहेत. अशी माहिती मिळाल्याने पथकाने त्याबाबत वरिष्ठाना अवगत करुन त्यांचे मार्गदर्शनानुसार कृषी विभागाचे अधिकारी व त्यांचे पथकास सोबत घेवून माहिती प्रमाणे खैरी बसस्थानक येथे सापळा लावून थांबले असतांना माहिती प्रमाणे सुझुकी ब्रेझा वाहन क्र. (एम एच 41, ई - 6196) हे खैरी बसस्थानकाकडे येतांना दिसल्याने पथकाने त्यास थांबवून वाहनातील दोन इसमांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे विलास नानाजी देवेवार (40), व अविनाश संतोषराव निकम (29) दोघेही रा. सावित्री-पिपरी, असे असल्याचे सांगितलं. दरम्यान कृषी अधिकारी व पथकांनी यांनी वाहनाची झडती घेतली असता वाहनाचे मागील सिट समोरील मोकळ्या जागेत एका प्लास्टीक पोत्यात अंदाजे 33 किलो खुले कपाशी बियाने किमंत अंदाजे 1,05,000/- रु.चे आढळून आल्याने त्यांना सदरचे बियाने कोठून आणले याबाबत विचारपुस केली असता त्यांनी ते बियाने सागर अरुण पारलेवार रा. कोठारी ता. बल्लारशा जि. चंद्रपुर यांचेकडून विक्री करीता आणले असल्याचे सांगितले आहे. नमुद इसमांकडे अनाधिकृत कपाशी बियाने विक्री करीता बाळगून असलेले मिळून आल्याने सदरचे बियाने व नमुद इसमांचे ताब्यात असलेले वाहन तसेच त्याचे कडील मोबाईल फोन असा एकूण 8,15,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पो.स्टे. वणी येथे तिनही इसमाविरुध्द कारवाई नोंद केली. तसेच दिनांक 27/05/2024 रोजी पो.स्टे. शिरपुर हद्दीतील कृषी विभागाचे अधिकारी यांना सोबत घेवून केलेल्या कारवाई मध्ये आरोपी अमोल विजय चिकनकर (33), रा. वार्ड नं.02 भालर, (ता. वणी) ह.मू. पिपरी-कापर (ता. वणी) याचे कब्जातून बलवान रिसर्च हायब्रीड कॉटन सिड 5 जी या अनाधिकृत कपाशी बियांनाचे 15 पाकीटे किमंत 18,000/- रुपये किंमतीचे जप्त करून पो स्टे. शिरपुर येथे त्याचे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, पियुष जगताप, आधारसिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्थागुशा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडुरे, पोलीस अंमलदार योगेश उगवार, सुधिर पांडे, सुनिल खंडागळे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, रजनिकांत मडावी सर्व स्थागुशा यवतमाळ तसेच राजे माळोदे, अमोल जोशी, प्रविण जाधव, कल्याण पाटील व सर्व कृषी विभाग यांनी यशस्वीरित्या पार पाडली.