१ मे महाराष्ट्र दीन सत्कराने साजरा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ कला महा. राजूर कॉलरी येथे शिक्षण घेऊन परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत चिकाटीने व जिद्दीने कु. योगिनी रविंद्र सावळे हिने सरळ सेवा परीक्षेमध्ये यश मिळवून भूमीअभिलेख या विभागात नौकरी मिळवली. या प्रसंगी राऊत सर, मिलमिले सर, शेडमाके सर, दुर्गमवार मॅडम, यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना योगिनी रविंद्र सावळे चे मूर्तिमंत उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. प्राचार्य धानोकर सर यांनी यथोचित योगिनी सावळेचा गुणगौरव करून सत्कार केला. 

आज 1 मे महाराष्ट्र दीन सत्काराने साजरा करण्यात आले. या अनुषंगाने विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनी व शिक्षक वृंद तसेच कर्मचारी उपस्थित होते. 

केळापूर येथे कोलाम समाजाचा विवाह मेळावा संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पांढरकवडा : दि. 28 एप्रिल रोजी कोलाम समाज संघटना तथा विवाह समिती जिल्हा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने तेलंगणा, मराठवाडा, विदर्भाची पावन भूमी श्री.जगदंबा माता संस्थान, केळापूर येथे सामूहिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यात कोलाम समाज रितिरिवाज प्रमाणे  संस्थानच्या भव्य प्रांगणात मेळावा पार पडला. या सामूहिक विवाह मेळाव्यात 11 जोडपे विवाहबद्ध झाले.

या मेळाव्याकरिता लाभलेले प्रमुख पाहुणे विवाह मुहूर्त पूजन मा.श्री.सुभाष कासार (विदर्भ अध्यक्ष) आदिम जमात कोलाम समाज संघटना तसेच मा. श्री.निळकंठराव टेकाम साहेब,से.नि. नाने परीक्षण अधिकारी रिझर्व्ह बँक नागपूर मा.श्री.मधुकरराव घसाळकर साहेब से. नि. गट विकास अधिकारी मा.लक्ष्मणराव भिवनकर साहेब, मा.श्री सोनार साहेब.सहाय्यक प्रकल्प अधिकारी पांढरकवडा, मा.श्री.वामनराव ढोबळे सर से नि.मुख्याध्यापक पांढरकवडा, मा.श्री.रामदास टेकाम सर मुख्याध्यापक विवाह समितीचे अध्यक्ष, मा. माधव बी. टेकाम साहेब माजी सैनिक, सुभेदार मेजर मा.श्री तुकाराम आत्राम, माजी सरपंच विवाह समिती उपाध्यक्ष मा.श्री.आनंद मसराम साहेब, से.नि.माजी सैनिक विवाह कमिटी अध्यक्ष,श्री. आकाश आत्राम सचिव, श्री.उशेन आत्राम साहेब, श्री.रमेश आत्राम सर, श्री.जयवंत टेकाम सर, श्री.युवराज वरने साहेब, डॉ महादेव मुरझडी साहेब, डॉ.भगवान टेकाम साहेब, श्री. पोतू आत्राम साहेब, श्री.दिनकर कोंडेकर साहेब, श्री.कवडू सुरपाम गायक तसेच विवाह मेळावा करिता जिल्ह्यासह तालुक्यातील कर्मचारी  वर्ग व पदाधिकारी साहेब सामाजिक कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी विवाहबद्ध झालेल्या 11 ही जोडप्यांना शुभ आशीर्वाद देण्यात आले. 

देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांचा शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मधील कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मतदान जनजागृतीसाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी या महिला मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला.

मतदान जनजागृतीच्या या कार्यक्रमास "स्वीप" च्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे-पाटील, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संचालक दीपाली मासिरकर, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सल्लागार साधना राऊत, `अपने आप` स्वयंसेवी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजू व्यास, नागपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर आदी उपस्थित होते.

दीपाली मासिरकर म्हणाल्या, ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आयोजित आजच्या मतदान जनजागृती उपक्रमात एक जागरूक मतदार म्हणून मोठ्या संख्येने सहभागी झालात. तुम्ही जागरूक झालात तुमच्या सोबतच्या सगळ्यांना मतदान करण्यास सांगावे. आपल्या एक-एक मताचे योगदान महत्त्वाचे आहे. तुमच्या एका मतानेही लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी मदत होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक घटकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाची प्रक्रिया सुलभ केली आहे. देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत’, असे त्यांनी सांगितले तर मतदानातील सहभागाबाबतही श्रीमती मासिरकर यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.

श्रीमती मुकादम यांनी मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे आहे, त्यामुळे काय फरक पडू शकतो याचे महत्व या महिलांना पटवून दिले. मतदान करणे हा आपला हक्क आहे. तुम्ही स्वतः मतदान करा आणि आपल्या परिसरातील महिलांनी मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असून तो आपला अधिकार आहे. २० मे २०२४ रोजी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

श्रीमती राऊत म्हणाल्या, भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक घटकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहेत. या निवडणूक प्रक्रियेत एकही जण मतदानापासून वंचित राहू नये, प्रत्येक घटकाने मतदान करावे व मतदानाचा टक्का वाढावा, हा उद्देश आहे.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना वोटर स्लिपचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी केले. आभार तहसीलदार पल्लवी तभाने यांनी मानले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धोरणात अनेक तृट्या; शेतकऱ्यांत नाराजी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : २०२४-२५ सालाचे पिककर्ज वाटप करण्याकरीता जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून नुकतेच धोरण जाहीर झाले असुन त्या धोरणामध्ये अनेक तृट्या असल्याने सहकारी संस्थाचे कर्जदार शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरलेला आहे. हे अन्यायकरक धोरण तत्काळ रद्द करून नवीन धोरण राबवत सर्व शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करावे, अशी मागणी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व ग्राम, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ,यांच्या वतीने आज (ता.३०) एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना तहसीलदार निलावाड यांच्या मार्फत करण्यात आली.

शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाप्रमाणे सहकारी संस्थाचे सभासद ३१ मार्च पुर्वी नियमित भरणा केला गेला तसेच काही कारणाने थकीत सभासद असल्याने त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत एकमुस्त रक्कम भरणा ची योजना (ओटीएस) त्यामध्ये सुध्दा मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना समाविष्ट करून घेतले व त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेने संस्थेच्या सभासदांना वाटप सुध्दा दिला. परंतु या चालु हंगामत मात्र, काही जणांना कर्जवाटपातुन वगळण्यात आल्याचे धोरणामध्ये दिसुन येत आहे, परंतु अशा ओटीएस च्या शेतकऱ्याना वाऱ्यावर सोडण्याएवजी वाटप करण्यात यावा. अशी निवेदनकर्त्यांची मागणी आहे.

शेतकऱ्यांची दिवसेंदिवस दयनिय अवस्था पाहता शेतमालाला भाव नाही. मात्र शेतीला लागणारे सालगडी, बियाणे खते, औषधे, मजुर, यामध्ये भरपुर अशी वाढ होत आहे. परंतु शेतकऱ्यांकडून नियमित कर्जाचा भरणा करुन सुध्दा जिल्हा मध्यवर्ती बँकेने मुद्दलइतकेच वाटपाचे धोरण ठरवुन दिल्यामुळे संस्थेच्या सभासदांना वाटप करणे अवघड झाले आहे. व यामध्ये शेतकरी पुर्णतः हतबल झाले आहे. अनेक शेतकरी शेतीला कंटाळुन आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांना खाजगी सावकाराकडे देडी-दुपट्टीने कर्ज काढावे लागत आहे. इतर बँका शेतकऱ्यांना दारात उभे ठेवत नाही. अशातच आपली बँक म्हणुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सहकारी संस्थांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना जो कर्ज पुरवठा होत असतो,त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हात वर केल्याचे दिसुन येत आहे.तसेच १ एप्रिल
नंतर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा वाटपासंबंधीचे धोरणामध्ये कसल्याही प्रकारची हमी दिलेली नसल्याने कर्जदार कर्ज भरणार नाही व पर्यायाने संस्थेचे थकीतचे प्रमाण वाढल्याशिवाय राहणार नाही.
अत्यंत किचकट आणि सुरवातीपासून शेवटपर्यंत गोंधळात टाकणारे धोरण असल्याने त्यातून संस्थेबद्दल असलेली नाराजी अधिकच वाढली आहे. आधीच कर्ज वाटपासाठी विलंब होत आहेत. नवीन हंगाम अवघ्या एक महिन्यावर आलेला आहे. त्यामुळे सदर बाबीचा विचार करुन शेतकऱ्यांच्या सोयीने कर्ज वाटप देण्यात यावे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज वाटपाचे धोरण बदलून त्वरित नवीन धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे करावे,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा सहकारी संस्था ह्या कर्ज वाटपच करणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. 

निवेदनावर अध्यक्ष वसंत आसुटकर, अध्यक्ष मनोहर गेडाम, अध्यक्ष गजानन किन्हेकर,अध्यक्ष दिनेश मोहितकर, अध्यक्ष सुदर्शन टेकाम, अध्यक्ष दादाराव टेकाम,उपाध्यक्ष गजानन घोटेकर, अध्यक्ष संदीप आस्वले, अध्यक्ष गणू थेरे, उपाध्यक्ष माणिक पांगुळ, संचालक मारोती गौरकार, संचालक अरविंद वखनोर, संचालक मारोती सोमलकर, संचालक अशोक धोबे, माजी संचालक मारोती ठोंबरे, माजी अध्यक्ष नानाजी डाखरे, संचालक गोपाल खामणकर यांच्या सह इतरही सदस्यांच्या सह्या आहेत. 

कर्ज वाटपामध्ये अनेक जाचक अटी जिल्हा बँकेने संस्थेवर लादल्या गेले आहे. यावरून असे दिसुन येते की, जणुकाही बँकेला शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावयाचेच नाही असे दिसुन येत आहे. शेतीकरीता लागत असलेले भांडवल हे दरवर्षी वाढत असुन जिल्हा बँकेने मात्र जेवढी रक्कम शेतकऱ्यांनी ३१ मार्च पुर्वी भरणा केली तेवढाच वाटप त्यांना देण्याचे धोरणात म्हटल्या गेले आहे. त्यामध्ये उदा. मागील वर्षी १ लाख उचल केलेल्या शेतकऱ्यांना जीएसटी, सीएसटी, शेअर्स, प्रोसेस फी च्या माध्यमातुन दीड ते दोन हजार रुपये कटोती करुन ९८०००/- रुपये शेतकऱ्यांच्या हातात मिळतात व परत पुन्हा नवीन कर्ज मिळण्याकरीता ३१ मार्च पुर्वी एक लाखाचा भरणा करून सुध्दा कर्ज वाटप त्यांना एक लाखापेक्षाही कमी मिळतात अशा परीस्थीतीमुळे शेतकऱ्यांनी काय करायचे हा प्रश्न अनेक कर्जदार शेतकऱ्यांना पडला आहे.

काव्याचा दुर्देवी अंत : साखरझोपेत छकुलीला सापाचा दंश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मोरगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथील चौदा महिन्यांच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यु झाल्याची घटना सोमवारी २९ एप्रिल रोजी रात्री दरम्यान घडली. मृत चिमुकलीचे नाव काव्या वैभव खेवले (वय १४ महिने) आहे.

तालुक्यातील टाकळी येथील निवासी आई पल्लवी व अवघ्या १४ महिन्याची आईच्या कुशीत झोपलेल्या काव्या ही खाली  निद्राव्यस्थेत होती. अशातच मध्यरात्री दोन वाजताचे सुमारास लांब लचक मन्यार जातीचा साप त्यांच्या अंथरुणात शिरला व काव्याच्या हळूच पायाला चावा घेतला. दंश करताच छकुली काव्या रडायला लागली. रडण्याचा आवाज येताच आईला जाग आली अन शेजारी विषारी साप निदर्शनास आला. दरम्यान आरडाओरड करताच शेजारील काहींनी तो साप पकडला. 

काव्याला लगेचच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथे ठोस उपचारपद्धती नसल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलवित असतांना काव्याचा सकाळी सहा वाजता दुर्देवी अंत झाला. या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.