शिक्षकांचे गतवैभव काळाच्या पडद्याआड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शिक्षक संघटनेचे नेते, इब्टा संघटनेचे विदर्भ प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ता दिवाकर राऊत यांचे नागपूर येथे उपचाररादरम्यान मिडास हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. शिक्षकांसाठी लढणारा एक अष्टपैलू योद्धा म्हणून ओळख असलेले दिवाकर राऊत आज काळाच्या पडद्याआड गेले.

शिक्षकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी त्यांनी संघटना स्थापन केली होती, या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न शिक्षकांचे निकाली काढले होते. संघटना जिल्ह्यात वटवृक्ष झाला होता गेल्या काही दिवसापासून ते तणावात होते यवतमाळतील शिक्षक पदोन्नती प्रकरणांमध्ये त्यांच्यावर काही आक्षेप घेण्यात आले आणि कारवाईत त्यांना निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून ते तणावात गेले. 

त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि उपचार दरम्यान,अचानक प्रकृती अस्वस्थ झाली आणि काही समजण्या पहिलेच त्यांच्यावर मृत्यूने घाला घातला. त्यांच्या मागे दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे.

नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडींनी घेतली मतदान करण्याची शपथ 

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

लातूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी (स्वीप) कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाअंतर्गत आज लातूर शहरात पार पडलेल्या हाके व पांढरे परिवाराच्या लग्न सोहळ्यात नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडी मंडळींनी 7 मे रोजी मतदान करण्याची शपथ घेतली.
श्रीनिवास मंगल कार्यालय येथे उत्तम हाके यांचे चिरंजीव दिनेश व किसनराव पांढरे यांची कन्या पूजा यांच्या शुभविवाहाचे औचित्य साधून लातूर जिल्हा स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी रामदास कोकरे, स्वीप समन्वयक रामेश्वर गिल्डा यांनी नवदाम्पत्यासह लग्न सोहळ्यास उपस्थित वऱ्हाडी मंडळींना लोकसभेच्या निवडणुकीत 7 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याविषयी आवाहन केले.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच विविध समारंभाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत मतदान जागृतीचा संदेश पोहोचविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत प्रयत्न केले जात आहेत. याप्रसंगी शिक्षक सुनिल हाके यांच्या सह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी तसेच स्वीप कक्षाचे सदस्य उपस्थित होते.

35 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथून सात किमी अंतरावर असलेल्या नवरगाव (धरण) येथे एका 35 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली.

उमेश अशोक नक्षिणे (३५) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. त्याने नवरगाव येथील पीठगिरणीच्या बाजूला असलेल्या गोठ्यात दोरीच्या सहाय्याने आज सोमवार (29) ला दुपारी अंदाजे 2 वाजता चे दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली. 

त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून मृतक उमेश याच्या पाठीमागे पत्नी आई एक मुलगा एक मुलगी व मोठा भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. 
मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच असून ही मालिका थांबता थांबेना. मागील आठवड्यात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना पुन्हा आज आत्महत्या ची घटना समोर आल्याने प्रशासनाने तालुक्यात आत्महत्यासारख्या गंभीर विषय रोखण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे.

आंबेडकरी समाज हा जगाचे बौद्धिक नेतृत्व करणारा -प्रा. माधव सरकुंडे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळअलिकडच्या काळात संविधानाचे लचके तोडण्यात येत आहेत. सामान्य माणसाचे मूलभूत अधिकार नाकारले जात आहेत. अशा अटीतटीच्या वेळी इतर सर्व लहान मोठ्या समूहांनी स्वत:ला आंबेडकरी चळवळीशी जोडून घेतले पाहिजे. जगातील सर्व धार्मिक समूह हे अवैज्ञानिक क्रियाकलापात व्यस्त असून चिकित्सेला नकार देत आहेत. बुद्ध मात्र सर्व प्रकारच्या आणि सर्व स्तरातील चिकित्सेला प्राधान्य देतो. आंबेडकरी समाज हा वैज्ञानिक जाणीवा असणारा समूह असल्याने तोच जगाचे बौद्धिक नेतृत्व करू शकतो असे प्रतिपादन प्रा. माधव सरकुंडे यांनी केले. ते 'संघर्षस्तंभ' या डॉ अशोक कांबळे गौरव ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री वसंत पुरके होते. स्थानिक एकविरा हॉटेल येथे गौरव ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विचारमंचावर चित्रकार बळी खैरे, डॉ. प्रकाश राठोड, कवी प्रशांत वंजारे, प्रा. अशोक कांबळे उपस्थित होते.

प्रा. सरकुंडे म्हणाले, आंबेडकरी चळवळीमुळे जीवनाचे मर्म समजते. जीवनाचे ध्येय समजते. उपक्रमशीलता, प्रयोगशीलता आणि वैचारिक दिशा केवळ आंबेडकरी चळवळीतूनच मिळू शकते. आदिवासी समाजाने मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर समजून घेतले पाहिजे.
प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर म्हणाले, अलिकडच्या दहा वर्षांत इतिहास, समाजकारण, सांस्कृतिक वलय या गोष्टींचा अक्षरशः विपर्यास करण्यात आला असून सामान्य माणसांवर खोट्या गोष्टी लादण्यात आल्या आहेत. सर्व संविधानिक स्वायत्त संस्था सत्ताधाऱ्यांनी नियंत्रित केल्या असून या सर्व स्वायत्त संस्था सत्तेच्या बाजूने झुकल्या आहेत. त्यामुळे समकाळाची गंभीर समिक्षा करण्याची गरज आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री वसंत पुरके म्हणाले, मतांसाठी कुठल्याही थराला जाण्याची सत्ताधारी राजकीय लोकांची प्रवृत्ती घातक आहे. राज्यकर्ते अंधश्रद्धेचा प्रसार करून जनतेला भ्रमित करत आहेत त्यामुळे जनतेने जागृत होऊन लोकशाही वाचवली पाहिजे. 'प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय असणे' हाच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा प्रखर राष्ट्रवाद प्रत्येकाने अंगात रूजवला पाहिजे. 
यावेळी प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड, चित्रकार बळी खैरे, प्रशांत वंजारे, डॉ. अशोक कांबळे यांनी सुद्धा समयोचित भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. युवराज मानकर यांनी,सूत्रसंचालन कवी सुनील वासनिक यांनी तर आभार युगंधरा कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला साहित्य रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती.

रहदारीच्या मार्गांवर चौकीदाराची दरोडेखोरांनी केली हत्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : यवतमाळ-वणी या रहदारीच्या राज्यमार्गांवरील एका गोडावूनच्या बाहेर झोपलेल्या चौकीदाराची हत्या करून अज्ञात दरोडेखोरांनी सलाखीचे वजनी बंडल लांबवल्याची घटना आज सोमवारला सकाळी उघडकीस आली. 

मृतक हा साठ वर्षाचा असून जीवन विठ्ठल झाडे रा. आष्टोना (ता. राळेगाव) असे त्याचे नाव आहे. मात्र,चौदा हजाराच्या सलाखी साठी निष्पाप चौकीदाराची हत्या केल्याने व्यापारीवर्गात कमालीची दहशत निर्माण झाली आहे. 
प्राप्त माहितीनुसार वणी येथील सिमेंट व स्टीलचे व्यावसायिक योगेश ट्रेडर्सचे मालक सुरेश खिंवसरा यांचे यवतमाळ-वणी राज्यमार्गावर सिमेंट गोडावून आहे. त्या गोडाऊनची रखवाली राळेगाव तालुक्यातील आष्टोणा येथील जीवन झाडे हा व्यक्ती करित असून मागील दहा वर्षापासून खिंवसरा यांचेकडे चौकीदारीचे काम करत होता. काल रविवारीचे रात्री चौकीदार हा गोदामच्या बाहेरील ठिकाणी बाजेवर झोपला होता. दरम्यान, रात्री आलेल्या अज्ञात लोकांनी बाहेर झोपलेल्या चौकीदाराच्या डोक्यावर तसेच पाठीवर जबर हल्ला करुन त्याची हत्या करून दरोडेखोरांनी गोदामाच्या बाहेर ठेवलेले सळाखीचे 4 बंडल अंदाजे किंमत 14 हजार रुपयाचे वाहनात टाकून पोबारा केला. 
आज सोमवारला सकाळी योगेश ट्रेडर्सचा दिवाणजी रोजच्या प्रमाणे गोदामावर गेला तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेबाबत त्याने तत्काळ गोदाम मालक सुरेश खिंवसरा यांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वणीचे उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी आपल्या चमू सह घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर घटनेबाबत फिर्यादी सुरेश खिंवसरा यांनी ठाण्यात तक्रार नोंद करताच वणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्याने घेत  प्रकरण तपासात घेतले आहे.