खैरी येथे भगवान महावीर स्वामी जयंती उत्साहात

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे

राळेगाव : तालुक्यातील खैरी येथे श्री जैन श्रावक संघाच्या वतीने जैन धर्माचे २४ वे तिर्थकार भगवान महावीर स्वामी यांची जयंती (ता.२१) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

भगवान महावीर स्वामी यांची जयंती साजरी करण्याकरीता परीसरातील कुंभा, मार्डी, वनोजा देवी, मारेगाव, वडकी, खडकी, पिंपळापुर, वेडशी, येथील जैन बांधव खैरी येथे उपस्थिती दर्शवून भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेची गावातील प्रमुख मार्गानी वाजत गाजत महावीर स्वामी यांचा जयघोष व जियो ओर जिने दो चा जयघोष करीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. 

शोभयात्रा परत महावीर भवन येथे येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी महाभोजनाचा कार्यक्रम करण्यात आला होता. भगवान महावीर स्वामी जयंती उत्सवाचे आयोजन श्री जैन श्रावक संघ खैरी यांच्या वतीने करण्यात आले होते.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात झाले 67.57 टक्के मतदान

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : लोकसभा निवडणूक म्हणजे एकप्रकारे लोकशाहीचा उत्सवच असल्याचं वातावरण निर्माण करण्यात आल्याने लोकांनीही या उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. 19 एप्रिल ला चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पुरूषांसोबतच महिलांनीही मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. रखरखत्या उन्हातही महिलांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केले. 

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 67.57 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 5 लाख 83 हजार 541 महिला तर 6 लाख 58 हजार 400 पुरुष मतदारांचा समावेश आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 18 लाख 37 हजार 907 मतदार आहेत. त्यापैकी 12 लाख 41 हजार 952 मतदारांनी मतदान केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 6 विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. यात सर्वाधिक 73.24 टक्के मतदान वणी विधानसभा क्षेत्रात झाले.

त्याचबरोबर राजुरा 70.09 टक्के, चंद्रपूर 58.43 टक्के, बल्लारपूर 68.37 टक्के, वरोरा 67.73 टक्के तर आर्णी विधानसभा मतदार संघात 69.52 टक्के मतदान झाले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात 338 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. वणी शहरात 48 तर तालुक्यात 186 मतदान केंद्र देण्यात आली होती. सर्वच मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्वच सोइ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

सर्वच केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. पोलिसांचाही चोख बंदोबस्त दिसून आला. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 15 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जून महिन्यात मान्सूनच्या आगमनांसह अनेकांच्या चेहऱ्यावर विजयाच्या आनंदाचे भावपूर्ण आहेत तर काहींच्या नशिबी पराभवाचा पाऊस पडणार आहे. त्या उमेदवारांचे भवितव्य जरी शुक्रवारी ईव्हीएममध्ये लॉक झाले असले तरी कोणाचे भाग्य उघडते याची प्रत्यक्ष सर्वच उमेदवारांसह जनतेला 47 दिवस प्रतीक्षा करावीच लागणार आहे.


"विशेष म्हणजे गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा 42/43 अंशावर असतांनासुध्दा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्यामुळेच 2019 च्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीत 3 टक्क्यांची वाढ झाली."

वणीत गीत रामायणाचे उत्कृष्ठ सादरीकरण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील संस्कार भारती समिती वणी व जैताई देवस्थान यांच्या संयुक्त, व पारसमल चोरडिया फौंडेशन वणी यांच्या सौजन्याने जैताई मंदिर रंगमंचावर रामनवमीच्या पूर्वसंध्येला नृत्याद्वारे गीत रामायण अशा उत्कृष्ठ कार्यक्रम आयोजित  करण्यात आले, त्यात अनेक गीत रामायण सादरीकरण केले.

कार्यक्रमात राम अष्टकम या शास्त्रीय नृत्याने सुरुवात झाली. त्यानंतर गीत रामायणातील "स्वयें श्री राम प्रभू ऐकती" या गीतावरील नृत्याने गीत रामायणावरील नृत्याला सुरुवात झाली. यात गितरामायणातील 14 गीतांवर कार्यक्रम सादर करण्यात आला होते. त्यानंतर राम जन्मला ग सखे, स्वयंवर झाले सीतेचे, कोण तू कुठला राजकुमार, मज आणून द्या तो हरीण, त्रिवार जयजयकार इत्यादी गीतावर प्रियंका कोटनाके, सागर मुने, निखिल वाघाडे, अपूर्वा तिमांडे, बाल कलावंत लोकित कोरडे, अशोक सोनटक्के, रिद्धी राऊत, हितेश गोडे, पूजा ठाकूर, जयती सुराणा, वैष्णवी लिंगमे, सुनिता डाबरे, आरोही खैरे, सिमा सोनटक्के, अन्वी पावडे, स्पृहा कोरडे, कांचन गुरनुले, मीना वानखेडे, वृषाली मुंजेकर, प्रिया कोणप्रतीवार, दृष्टी कोणप्रतीवार, जयश्री मेहता, सानवी मुंजेकर, गौरव नायनवार, प्रविण सातपुते यांनी नृत्य व नाट्याचे सादरीकरण केले. अतिशय सुंदर आकर्षक कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन अमेझॉन मध्ये टीम लीडर असलेल्या प्रियंका कोटनाके यांनी केले. 

या प्रसंगी जैताई देवस्थान समितीचे अध्यक्ष माधव सरपटवार, ठाणेदार अनिल बेहरानी, पारसमल चोरडिया फौंडेशनचे कुणाल चोरडिया, मुन्नालाल तुगणायत, तिरुमल्ला तिरुपती क्रेडिट को. ऑफ. सोसायटीचे राकेश खामनकर प्रामुख्याने उपस्थित होते.

 सागर झेप बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सागर मुने यांनी पुढाकार घेऊन हा गीत रामायण वर नृत्य व नाट्य कार्यक्रम सादर करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विजय चोरडिया व हरणे कॅटरर्स चे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या अलोणे यांनी केले.

पिक अप च्या धडकेत कामगार जागीच ठार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पिकअप आणि मोटारसायकलची जोरदार भिडंत झाल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारला संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास वणी- यवतमाळ राज्यमहामार्गांवरील नायरा पेट्रोल पंप नजीक घडली.

मृतक मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी येथील रविदास हरिदास कोरझरे असल्याची प्राथमिक माहिती वृत्त लिहीपर्यंत प्राप्त झाली असून मृतक हा नरसाळा येथे गिट्टी क्रशर वर चालक म्हणून कार्यरत असल्याचे समजते. मृतकाच्या पाठीमागे पत्नी व दोन मूले असल्याचीही माहिती आहे.

वणीहून पिक अप चारचाकी वाहन क्र. (MH 29 BE  6629) मारेगाव च्या दिशेने भरधाव असताना पिक अप चा टायर फुटूला व समोरून येणाऱ्या मोटारसायकल क्र. (M H 31 AS 2579) स्प्लेंडर कंपनीची दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. ही घटना विनायक कोटेक्स जिनींग नायरा पेट्रोल पंप जवळ घडली असून या जबर धडकेत त्या कामगार चालकाच्या डोक्याला जबर मार लागून डोकं छिन्नविच्छिन्न झाल्याने तो जागीच ठार झाला. 


मंडपात जाण्यापूर्वी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा महत्वाचा प्रसंग असतो, पण त्याहून महत्वाचं असतं ते आपल्या देशाप्रती असलेलं कर्तव्य. हेच लक्षात ठेवत वणी विधानसभेतील लाठी गावातील एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याचं मतदानाचं कर्तव्य बजावलं. लग्न मंडपात जाण्यापूर्वी लग्नाच्या वरातीसाठी घोड्यावर बसण्यापूर्वी तो नवरदेव मतदान केंद्रावर गेला आणि आधी त्याने मतदानाचा हक्क बजावला.
      
आज महाराष्ट्रात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली असून पूर्व विदर्भात आज मतदान होत आहे. सकाळपासूनच तरूण, म्हातारे-कोतारे, मध्यमवयीन नागरिक, मतदानासाठी सर्वजण उत्साहाने बाहेर पडले आहेत. एवढंच नव्हे तर दिव्यांग नागरिकही त्यांचं मतदानाचं कर्तव्य बजवाताना दिसत आहेत.
       
त्यातच वणी विधानसभेतील लाठी गावातील एका तरूण मतदाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अंगात शेरवानी, डोक्यावर पगडी अशा वेशातील एक तरूण मतदान केंद्रावर आला आणि सर्वांच्या नजरा त्याच्याकडेच वळल्या. राहूल खिरटकर असे त्या तरूणाचे नाव असून लग्न मंडपात जाण्यापूर्वी तो मतदान केंद्रावर आला, अन् तेथे त्याने मतदानाचा हक्क आपला बजावला. 

लोकशाहीसाठी योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण मतदान केलं असं राहुलने आवर्जून सांगितल. जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहनही त्याने नागरिकांना केलं. नवरदेवाचा हा उत्साह पाहून लोकं त्याचे कौतुक करत आहेत.