नवरगाव येथील शेकडो भोई बांधवानी भाजपात केला पक्ष प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात काल बुधवार ला मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील भोई समाजातील शेकडो बांधवांनी भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश केला तसेच हिवरी येथील आमदार विशेष निधी अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन श्री. बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले.

देशाचे नेते प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मान्य करत राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात गाव चलो अभियान, नमो अँप सह नमो चषक नोंदणी तसेच मा. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या विशेष प्रयत्नाने वणी विधानसभा क्षेत्रात 2022 ते 2024 पर्यंत झालेली प्रमुख विकास कामे पोहचवण्याकरिता युद्ध पातळीवर काम सुरु आहेत.

या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा दिनकर पावडे (वणी), भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, भाजपा यु.मो.तालुकाध्यक्ष गणेश झाडे, महिला तालुका सरचिटणीस शालिनीताई दारुंडे, रवींद्र गारघाटे व भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी व कष्टकऱ्यांची सत्ता प्रस्थापित झाल्या शिवाय कॉ. शंकरराव दानव यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही- कॉ. किसन गुजर


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : "कॉ. शंकरराव दानव हे जीवनातील ६० वर्षे शेतकरी व कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी खांद्यावर लाल झेंडा घेऊन सातत्याने संघर्ष करीत राहिले. भांडवलदारी व्यवस्थेमध्ये शेतकरी व श्रमजीवी वर्गाला संपूर्ण न्याय मिळणे कठीण आहे. म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेतृत्वात शेतकरी व श्रमिकांना एकत्र करीत हा संघर्ष गतिमान करीत राहिले. शेतकरी, श्रमिकांच्या हातात सत्तेची सूत्र यावे व समाजवादी व्यवस्थेची सत्ता प्रस्थापित व्हावी हेच स्वप्न उराशी बाळगून ते आंदोलनरत होते, आता त्यांचा पश्चात ते स्वप्न पूर्ण करण्याची जवाबदारी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची आहे व ते तुम्ही पूर्ण करण्यासाठी सातत्याने संघर्षासाठी सज्ज राहावे." असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉ. किसन गुजर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतलेल्या श्रद्धांजली सभेत केले.

३१ जानेवारी ला कॉ. शंकरराव दानव यांचे अकस्मात हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले होते. त्या अनुषंगाने दि. २१ ला वणी येथील वसंत जिनिग सभागृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली घेण्यात आली. या सभेला काँगेस चे ॲड. देविदास काळे, जयसिंग गोहोकर, संभाजी ब्रिगेड चे अजय धोबे, वसंत जिनिंगचे संचालक प्रमोद वासेकर, माजी नगराध्यक्ष पी.के. टोंगे, प्रा. मोहितकर, संयुक्त किसान मोर्चाचे आनंदराव पानघाटे, शिक्षक संघटनेचे व्ही.बी. टोंगे,भाकपचे कॉ. अनिल घाटे,माकपचे राज्य कमिटी सदस्य कॉ. रमेशचंद्र दहीवडे ( चंद्रपूर), कॉ. सुभाष पांडे(अमरावती), कॉ. अरुण लाटकर, कॉ. मनोहर मुळे(नागपूर), कॉ. यशवंत झाडे( वर्धा), ॲड डी.बी.नाईक आदी प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा यावेळेस मार्गदर्शन केले. 

कॉ. अरुण लाटकर यांनी "भांडवलदारी पक्षात व्ययक्तिक लाभासाठी व सत्तेसाठी सकाळी एका पक्षात तर सायंकाळी दुसऱ्या पक्षात अशी कोलांटउडी मारत असताना कॉ . दानव यांनी संपूर्ण जीवन एका पक्षात घालविणे हे एक आश्चर्यच आहे", असे सांगत " कॉ. दानव यांनी तीन पिढ्यांचे नेतृत्व केलेले आहे" असे सांगितले. तर कॉ. रमेशचंद्र दहीवडे यांनी सांगितले की," कॉ. दानव हे मार्क्सवादी विचाराने प्रेरित होते, त्यामुळे त्यांना हे सर्व करण्याची प्रेरणा मिळाली, कार्ल मार्क्स यांनी कष्टकऱ्यांचा शोषणाचे मूळ व त्या शोषणातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितल्याने कार्ल मार्क्स यांना अनेक देशातून हद्दपार करण्यात आले होते, ह्या ओढवलेल्या परिस्थीत मार्क्स ची दोन मुले वारली असतानाही त्यांनी आपला मार्ग सोडला नाही, हाच मार्ग कॉ.दानव यांनी स्वीकारला होता." ॲड. देविदास काळे यांनी कॉ. दानव यांच्या जुन्या आंदोलनातील आठवणींना उजाळा दिला तर अजय धोबे यांनी कॉ. दानव यांचा आंदोलनातील वेळेला किंमत व प्रामाणिकपणा सांगितला, कॉ. यशवंत झाडे यांनी खरा नेता कधीच मरत नसतो तर तो चळवळीत अजरामर असतो , हे सांगितले. कॉ. अनिल घाटे यांनी," देशाची राजकीय व्यवस्था ही हुकूमशाही कडे झुकली असून व्यक्तीचे राजकीय,आर्थिक व सामाजिक अधिकार संपुष्टात येत आहे, त्यासाठी संघर्ष वाढविणे गरजेचे आहे", हे मांडले. 

या श्रद्धांजली सभेत कॉ.अरुण भेलके यांनी क्रांतिकारी गीत सादर करून उपस्थितांमध्ये जोश जागविला तर संचालन कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी केले व कॉम्रेड शंकरराव दानव हे ध्येयवेडे होते, त्यांनी या परिसरात कृतीतून मार्क्सवाद रुजवीला, शोषण विरहित समाजव्यवस्था स्थापित व्हावी हेचं त्यांचे ध्येय होते. असे ऍड दिलीप परचाके यांनी प्रस्थाविकपर भाषणात सांगितले.
या कार्यक्रमाला कॉ.शंकरराव दानव यांची पत्नी कलावती, मुले ॲड.राहुल, मिलिंद व सरिता हे उपस्थित राहून त्यांनी पक्षाला २१ हजाराचा निधी दिला. 

ही श्रद्धांजली सभेत कॉ. मनोज काळे, देविदास मोहकर, चंद्रशेखर सिडाम, कवडु चांदेकर, नंदू बोबडे, अनिता खूनकर, मनीषा परचाके, मनीष इसाळकर, निरंजन गोंधळेकर, सुधाकर सोनटक्के, गजानन ताकसांडे, सदाशिव आत्राम, रामभाऊ जिद्देवार, किसन मोहुरले, प्रकाश घोसले, संजय वालकोंडे, सुरेखा बिरकुरवार, अनिल सातपुते, स्मिता गेडाम आदी व असंख्य जिल्हाभरातून स्त्री-पुरूष काम्रेड्स उपस्थित होते. त्याच सोबत एके काळी एस एफ आय विद्यार्थी संघटनेत कार्य करणाऱ्या व आज नोकरी वर असणारे मिलिंद साव, कोल्हे, मेश्राम आदी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. या सभेत लीलाधर आरमोरिकर यांनी लावलेल्या पुस्तकांचा स्टॉल मध्ये मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचां खप झाला. तर असंख्य कार्यकर्त्यांनी कॉ. शंकरराव दानव यांची प्रतिमा विकत घेऊन जनतेसाठी झटणाऱ्या खऱ्या नेत्याची कदर होते हे दाखवून दिले आहे.

मारेगाव नगरपंचायतीत विषय समिती निवडीत महाविकास आघाडी व मनसे एकत्र

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : काल बुधवार (ता.21) ला नगरपंचायत निवडणुकीत मनसेसह महाविकास आघाडीच्या पक्षाने एकत्र येत सभापतीची सर्व पदे काबीज केली, तर नुकतेच नगरसेवक हेमंत नरांजे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश करीत सभापतिपद मिळविले.
   
मारेगाव येथील 17 सदस्य असलेल्या नगरपंचायत मध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. यावेळी भाजप विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढण्याची तयारी केली होती. त्यामुळे अल्प मतात असलेला भाजप एकटा पडल्याने त्यांनी निवडणुकीत भाग घेतला नाही. त्यामुळे ही निवडणूक अविरोध झाली.
आठ दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपत गेलेले हेमंत नरांजे यांनी भाजप सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश करीत पाणी पुरवठा सभापतिपद मिळविले. तर मनसेच्या नगरसेविका शेख अंजुम शेख नबी यांची बांधकाम सभापतिपदी, तर शिवसेनेच्या वर्षा किंगरे यांची आरोग्य सभापती म्हणून निवड झाली. काँग्रेसच्या नगरसेविका थारांगना पटेल यांची महिला व बांधकाम उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल सर्व एकत्र आलेल्या पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी त्यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव करित पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कृषी निविष्ठा सुधारणा विधेयक सर्वसामान्य शेतकरी व प्रामाणिक निविष्ठा विक्रेत्यांना जाचक नाही – कृषिमंत्री धनंजय मुंडे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : कृषी निविष्ठा सुधारणा विधेयकाबाबत 2000 पेक्षा जास्त हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. हे सुधारणा विधेयक शेतकरी तसेच प्रामाणिक कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी जाचक असणार नाही, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

अप्रमाणित, भेसळयुक्त व बनावट बियाणे, कीटकनाशके पासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावित कायद्याच्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी नियुक्त संयुक्त समितीची तिसरी बैठक आज मंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात झाली.

या बैठकीस संयुक्त समितीचे सदस्य आमदार अमोल मिटकरी, डॉ. मनीषा कायंदे, समीर कुणावर, संजय रायमुलकर, कैलास पाटील, बाबासाहेब पाटील, दिलीप बनकर, प्रकाश आबिटकर, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, विधान भवन सहसचिव मेघना तळेकर व अधिकारी उपस्थित होते.

या समितीच्या मागील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात आला. गैरप्रकार करणाऱ्यांना कायद्याचा धाक वाटला पाहिजे, त्याचवेळी सर्वसामान्य शेतकरी आणि प्रामाणिक निवीष्ठा विक्रेत्यांना जाचक वाटायला नको याची काळजी घेतली जाईल. समितीचे आजपर्यंत झालेले कामकाज विधिमंडळाच्या निदर्शनास आणणार असल्याचे सुद्धा यावेळी कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

बोगस व बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी पावसाळी अधिवेशन 2023 मध्ये कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी अत्यावश्यक वस्तू, बियाणे, कीटकनाशके आणि महाराष्ट्र विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम या 4 कायद्यांमध्ये विविध सुधारणा सुचवणारी विधेयके सादर केली होती. तसेच अप्रमाणित व भेसळयुक्त निविष्ठांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण विधेयक 2023 सुद्धा मांडले होते.

वणीत विदर्भ केसरी जंगी शंकरपटाचे उदघाटन थाटात पार पडले

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : काल 20 फेब्रुवारी रोजी विदर्भ केसरी या शंकरपटाचे थाटात उद्घाटन पार पडले. पहिल्या दिवशी 30 जोड्या हाकण्यात आल्या. शंकरपटाचा हा थरार पाहण्यासाठी केवळ वणीतूनच नाही तर परिसरातील अनेक गावातील प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संजय खाडे व मित्र परिवारातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार वामनराव कासावार होते. तर अध्यक्ष हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमांडे होते. राजेंद्र गायकवाड, नरेंद्र पाटील ठाकरे, अरुणाताई खंडाळकर, प्रा. शंकर व-हाटे, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद वासेकर, संजय निखाडे, पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे, मारोती गौरकार, यांची कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

दुपारी 2 वाजता मान्यवरांच्या हस्ते पटाच्या मैदानाची पूजा करण्यात आली. त्यानंतर रितसर फित कापून पटाचे उद्घाटन करण्यात आले. पहिली उद्घाटनपर जोडी ही श्रुती वाळगे या 18 वर्षीय तरुणीने हाकली. त्यानंतर वणी विधानसभा क्षेत्रासाठी आयोजित गावगाडा या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील 30 बैलजोड्या हाकण्यात आल्या.

राधाने गाजवले मैदान गावगाडा स्पर्धेत रांगणा येथील शेतकरी गुणवंत वांढरे यांच्या तेजा व वायफर या जोडीने अवघ्या 8.1 सेकंदात अंतर कापत पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे राजूर इजारा येथील भाविका मिलमिले व गणेशपूर (वणी) येथील कु. राधा बोबडे या दोन तरुणींनी सहभाग घेतला होता. राधा हिने मैदान गाजवत अवघ्या 8.33 सेकंदात अंतर कापत पाचवा क्रमांक पटकावला. या दोन्ही तरुणीच्या जिद्दीचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. बुधवारी मुख्य विदर्भ केसरी शंकरपटाला सुरुवात झाली. दुस-या दिवशी 40 पेक्षा अधिक जोड्या हाकण्यात आल्या. गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कार्यक्रमाची सांगता व बक्षिस वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खाडे यांच्या मार्गदर्शनात संजय खाडे मित्र परिवार परिश्रम घेत आहे.