राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे. आज विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार,मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य,विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशन गुरुवार दि. ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि.२० डिसेंबर २०२३ या कालावधीत पार पडणार आहे. अधिवेशनाचे एकूण दिवस १४ (सुट्ट्यासह) प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, सुट्या (शनिवार व रविवार) ४ दिवस.

मारोती गौरकार यांचे सर्व काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : राज्यातील येणाऱ्या पुढील काळात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकतात. या अनुषंगाने अनेक पक्ष, राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटना, आतापासूनच आपापल्या तयारीला लागले असून त्यात काँग्रेसही मागे नाहीत.

मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येणाऱ्या सर्व निवडणूका करिता बूथ कमिटी नेमण्यात येत असून प्रत्येक बूथ वर किमान 10 सदस्य आणि त्या मधून एक अध्यक्ष व तर एक उपाध्यक्ष अशी निवड प्रदेश काँग्रेस व जिल्हा काँग्रेस यांच्या आदेशानुसार करण्यात येत आहे,अशी माहिती तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी दिली.

मारेगाव शहर तथा तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सूचना केली आहे की, वरीलप्रमाणे आपण सर्वांनी कार्याला लागून सदर, मोहीम 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करायची आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार मी तालुका अध्यक्ष म्हणून आवाहन करतो आहे की, हे कार्य करित असताना काही अडचण आल्यास मला स्वतः संपर्क साधावा. मी आपल्या सेवेकरिता पूर्णतः तटस्थ आहे, असे श्री.गौरकार "सह्याद्री चौफेर" ला बोलताना सांगितले.

यावेळी आमच्या प्रतिनिधीने होऊ घातलेल्या पाच राज्यातील निवडणूकांच्या निकालाबाबत संवाद साधला असता मारोती गौरकार म्हणाले की,पाच पैकी तीन राज्यात काँग्रेसचे सरकार येइल असे विविध माध्यमातून सांगितले जात आहेत. हे निश्चित स्वागतार्ह असणार आहे. मात्र, हा भाजपाला मोठा झटका आहे, भाजप आता सर्वसामान्य जनतेच्या नजरेतून उतरली असून आता शेतकरी, सर्वसामान्य जनतेचं सरकार, काँग्रेस सरकार येणार आहे. हे मानावं लागणार आहे.

रेशन दुकानदार धान्य देत नाही? विनाकारण त्रास देतोय? 'इथे' करा तक्रार..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

बऱ्याचदा रेशन दुकानदार रेशन कार्डधारकांना धान्य देताना गडबड करतात. दुकानदार धान्य कमी देणे, धान्य कमी देऊन जास्त पैसे घेणे, नवीन रेशन कार्ड बनवून देण्यास टाळाटाळ करणे असे प्रताप करत असतात. त्यामुळे सामान्य नागरिक भरडला जातो. परंतू आता सामन्यांना दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे, जर रेशन कार्डवर स्वस्त धान्य मिळवत असताना कोणतीही समस्या उद्भवली, तर तुम्ही याबाबत थेट ऑनलाईन तक्रार करु शकता. 

नागरिकांना सार्वजनिक अन्नधान्य वितरण यंत्रणेअंतर्गत गहू, तांदूळ, तेल आदी जीवनावश्यक अन्नधान्य स्वस्त दरात पुरवले जाते. मात्र काही रेशन दुकानदार ग्राहकांना वस्तू देण्यास टाळाटाळ करतात. काही वेळा धान्य ज्यादा दराने अन्य दुकानदारांना विकले जाते..

यासाठी सरकारकडून आता प्रत्येक राज्यानुसार रेशन तक्रारींसाठी हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही जर रेशन कार्डवर कमी धान्य मिळत असेल किंवा डीलर विरोधात तक्रार असेल, नवीन रेशनकार्डसाठी अडचण निर्माण करत असेल, किंवा अनावश्यक पैशांची मागणी करत असल्यास चिंता करायचे कारण नाही. तुम्ही सरकारच्या टोल-फ्री क्रमांकावर घरबसल्या ऑनलाईन तक्रार करु शकता. ज्या तक्रारीची दखल थेट तहसील कार्यालयाकडून घेतली जाऊन कार्यवाही होईल. तसेच सरकारच्या वेबसाईटवरही तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.

इथे करा तक्रार...
महाराष्ट्रात रेशन कार्ड संबंधित तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक –1967/1800224950
रेशन संबंधित तक्रारीसाठी ऑनलाईन वेबसाईट – https://mahafood.gov.in/pggrams/Entrygrv.aspx


वीजवितरण कंपनीच्या तकलादू धोरणाविरोधात मनसेचा 'झटका मोर्चा' तहसील कार्यालयावर धडकला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या गलथान कारभारविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव तालुक्याच्या वतीने पक्षनेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात आज मंगळवारला भर पावसात तहसील कार्यालयावर झटका मोर्चा काढण्यात आला. 
वीजवितरण कंपनीच्या ढेपाळलेल्या कारभाराचा कमालीचा मनस्ताप तालुक्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तर विजेच्या सतत च्या लपंडावाने शेतातील उभे पिके सुकल्या जात असून, सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होवून शेतकरी आर्थिक दृष्ठ्या मागे पडत आहे. सातत्याने विजेच्या खंडीत पुरवठ्याने छोटे-मोठे व्यवसायिक, जनताही कमालीची त्रस्त झाली असून यास नियंत्रित करण्यासाठी मनसे कडून आज मंगळवार ला संबंधित विभागाला "हाय होल्टेज झटका" मोर्चा च्या माध्यमातून देण्यात आला आहे.
शहरातील मार्डी चौकातून निघालेल्या भव्य झटका मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. पक्षनेते राजूभाऊ उंबरकर यांनी संबंधित विभागाला दरम्यान,चांगलेच धारेवर धरल्याचे निदर्शनास आले असून लेखी आश्वासनानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली. जन सामान्य व शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रशासनाने हयगय केल्यास मनसे गप्प बसणार नाहीत. या वेळी मारेगाव तालुक्यातील तमाम जनता, शेतकरी, शेतमजूर व असंख्य मनसैनिक या भव्य मोर्चात सहभागी झाले होते.

सराईत आरोपीला वाढदिवस साजरा करणे आले अलंगट

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : आता वाढदिवस साजरा करणे आले म्हणजे, पार्टी आली, केक आला, दारू आली जमलेच तर डीजे चा कर्कष आवाज. वाढदिवस प्रत्येकासाठी स्पेशल असतो, वाढदिवस साजरा करण्याची पद्धती वेगवेगळ्या असते. मात्र, एका सराईत आरोपीने वाढदिवसाला बंदूक पद्धत अवलंबल्याने सिधी जेलची हवा खावी लागली. म्हणजे वाढदिवस साजरा करणे त्याच्या चांगलेच अलंगट आले आहे. सराईत असलेल्या आरोपी कडून वणी पोलिसांनी 28 नोव्हेंबर चे पहाटे विदेशी बनावटीची रिव्हाल्वर जप्त केल्याची घटना पोलीस दप्तरी नोंद झाली.
प्राप्त माहितीनुसार राजुर-भांदेवाडा मार्गावरील मनोज कश्यप यांच्या शेतात डिजे लावून नाचगाणी करीत धिंगाणा घालीत वाढदिवसाची पार्टी सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे यांना मिळाली.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली माहितीच्या आधारे ठाणेदार अजित जाधव, सपोनि दत्ता पेंडकर आणि टीम सह पोलिस रात्री 2 वाजता घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, बर्थडे पार्टीतील तरूण व उमेश रॉय हा पोबारा करित असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले असता त्याच्या जवळ एक मॅगझिन पिस्टल आढळून आली. या वेळी पोलिसांनी दोन फायर केलेली खाली केस व पिस्टल जप्त केली. आरोपी उमेश किशोरचंद रॉय, प्रगती नगर कोलार पिंपरी (वणी), याचेवर कलम 3,7,25,27 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.
पोलीस रेकॉर्ड नुसार उमेश रॉय यांचेवर वणी पोलिस स्टेशन येथे खुन, अपहरण सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो खुनाच्या गुन्ह्यात 1 वर्षांची शिक्षा भोगून कारागृहातून सुटला. उमेश हा आपल्या जवळ अग्निशस्त्र बाळगत असल्याचे पोलिस अवगत होते.

सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव, जनार्धन खंडेवार, सपोनि मारेगाव, सपोनि दत्ता पेंढकर, सफौ.सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, संतोष आढाव, अमोल अन्नेलवार, अविनाश बनकर, विशाल गेडाम, शाम राठोड, मो. वसीम, पुरुषोत्तम डडमल, गजानन कुळमेथे, निरंजन खिरडकर यांनी केली.