मोदी सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाविरोधात किसान सभेचे भर पावसात आंदोलन

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भांडवलदारांचे हित जपत देशातील कष्टकरी शेतकरी,शेतमजूर व कामगार विरोधी धोरणे राबवित भाजपचा मोदी सरकारने शेतकऱ्यांची शेती हिसकावून घेणारे व पर्यायी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे काळे कायदे केले तर दुसरीकडे कामगार हिताची 44 कामगार कायदे रद्द करून उद्योजकांना सर्व हक्क देणारे कामगार विरोधी 4 कामगार संहिता आणल्या. ह्याचा विरोध करीत मोदी सरकारला वठणीवर आणून शेतकरी व कामगार विरोधी धोरणापासून रोखण्यासाठी देशातील शेतकरी व कामगार संघटनांच्या संयुक्त मोर्चा द्वारे देशातील सर्व राज्यातील राजधानीत दि.26 नोव्हे. संविधान दिन ते 28 नोव्हें. महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त आंदोलन करण्यात आले. त्याच अनुषंगाने वणी येथेही मार्क्सवादी किसान सभेच्या वतीने दि. 28 नोव्हे. ला भर पावसात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. 
या आंदोलनात 26 नोव्हे. संविधान दिन व 28 नोव्हे. महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिनाला होणाऱ्या शेतकरी,कामगारांच्या आंदोलनाला परवानगी नाकारणाऱ्या शासन व पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध, शेतकरी शेतमजूर संपूर्ण कर्जमाफी, पीक विमा कंपन्यांनी संपूर्ण पीक नुकसान भरपाई द्यावी, वनाधिकार कायद्यान्वये सुधारित नियम 2012 प्रमाणे अपात्र केलेले दावे फेरतपासणी करून पात्र करावे, देवस्थान, गायरान व पडीत जमीन कासानाऱ्यांना मालकी हक्क द्यावे, बेघरांना घरे व मालकी हक्काने जमीन देण्याचा शासकीय आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, आदिवासींना प्रकल्प कार्यालयातून मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा, महागाईवर नियंत्रण व अन्न, औषधे व कृषी साधनांवरील जी एस टी रद्द करण्यात यावा, आरोग्याची व्यवस्था भक्कम करून विनामूल्य उपचार करावा, पेट्रोल, डिझेल व गॅस वरील उत्पादन शुल्क कमी करण्यात यावा, कामगार विरोधी 4 कामगार संहिता रद्द कराव्यात, शेती मालाला उत्पादन खर्चाचा दीड पट हमी भाव द्यावा, वन संरक्षण कायद्यातील दुरुस्त्या मागे घेण्यात याव्या, कायमस्वरूपी कामावरील कामगारांना सेवेत कायम करा व आशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, वीज दुरुस्ती कायदा व स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करा, कंत्राटी पद्दत बंद करून बेरोजगारांना कायम स्वरूपाची नोकऱ्या द्या आदी मागण्यांचा जोरदार भर पावसात घोषणा करीत संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. 
या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड शंकरराव दानव यांनी केले. या आंदोलनात प्रामुख्याने कुमार मोहरमपुरी, ॲड.दिलीप परचाके, कवडू चांदेकर, संजय वालकोंडे, प्रकाश घोसले, मनोज काळे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्र्यांचे अभिवादन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : भारतीय संविधान दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ शहरातील संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रास्ताविकेचे मुख्य वाचन इयत्ता चौथीमध्ये शिकणारी अनुजा आनंद देवतळे हिने केले. यावेळी पालकमंत्र्यांनी संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

या रॅली प्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, तहसीलदार योगेश देशमुख, अनामी फाऊंडेशनचे सदस्य, अनुयायांची उपस्थिती होती.

'संविधान जागर रॅली'मध्ये पालकमंत्री संजय राठोड यांची उपस्थिती
भारतीय संविधान दिनानिमित्त यवतमाळ शहरात संविधान जागर अर्थात वॉक फॉर संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीला पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुणे यांच्या निर्देशानुसार अनामी फाऊंडेशन आणि समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या विद्यमाने शहरातील संविधान चौक येथे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, तहसीलदार योगेश देशमुख, अनामी फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

या रॅलीसाठी संविधान विचार मंच, सत्यशोधक मैत्री संघ, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, समता पर्व प्रतिष्ठान, स्मृती पर्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कृती समिती, बानाई, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना, भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल, ऑफिसर्स फोरम, भीम टायगर सेना, ऑल इंडिया पॅन्थर सेना, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी असोसिएशन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, यवतमाळ यांनी परिश्रम घेतले.

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

यवतमाळ येथील समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधान प्रास्तविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी शुभेच्छा दिल्या.

घरातील सामानाची नासधूस व मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : एका विवाहित महिलेसह मुलीलाही मारहाण केल्याची घटना 25 नोव्हेंबर, रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरून त्या 40 वर्षीय तरुणांवर 27 नोव्हेंबर ला वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 
मिळालेल्या माहितीनुसार सदर विवाहित महिला ही गेल्या 6 वर्षांपासून आपल्या पतीपासून विभक्त राहत आहे. असे असताना तिचे शहरालगत असलेल्या गावातील एका (40) वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पिडीत त्याच्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्याने किंबहुना त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. यामुळे संतापलेल्या रोमियोने माझा नंबर का ब्लॉक केला? व माझ्याशी का बोलत नाही? म्हणून 25 नोव्हेंबर रोजीच्या रात्री 9 च्या दरम्यान, मद्य धुंदीत पिडितेच्या घरी जाऊन तिला मारहाण करून सामानाची नासधूस करित सामान अस्तव्यस्त केले.
दरम्यान, पिडितेच्या मुलीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिलाही मारहाण केली. व त्यांचे फोटो सोशल मिडिया व आप्तेष्टांना सार्वजनिक करण्याची धमकी दिली तसेच त्यांना जीवे मारण्याचीही धमकी दिली. अखेर पिडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सोमवार 27 नोव्हेंबर ला वणी पोलिसांनी रियाज निजाम शेख रा. चिखलगाव याच्या विरुद्ध भादंवी कलम 323, 427, 452, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

जल मिशनने गावाचे सौंदर्यीकरण व स्वास्थ बिघडवले- मच्छिन्द्रा येथील नागरिकांची ओरड

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : अलिकडच्या वर्षांत सरकार जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विशेषतः ग्रामीण नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी 'वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर' काम करत आहे. सर्वांसाठी घरे, प्रत्येक कुटुंबाला शौचालय, स्वयंपाकाचा गॅस, परवडणारी आरोग्य सेवा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या विविध सरकारी योजनांमुळे लोकांच्या, विशेषत: खेड्यात राहणाऱ्या नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सर्वांसाठी, रस्ते, इ. आणि आता, लोकांची आकांक्षा त्यांच्या घरात आणि सार्वजनिक ठिकाणी पिण्यायोग्य नळ पाण्याचा पुरवठा आहे, जेणेकरून ग्रामीण-शहरी भेद दूर होईल. ग्रामीण भागाच्या या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी, प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन ची घोषणा केली.

त्या अनुषंगाने तालुक्यात जल जीवन मिशन 2024 पर्यंत प्रत्‍येक ग्रामीण घरात नियमित आणि दीर्घकालीन आधारावर पुरेशा दाबाने विहित गुणवत्‍तेच्‍या पुरेशा प्रमाणात नळपाणी पुरवठ्याची काम सुरु आहेत तर काही ठिकाणी पूर्णत्वावर आहेत. मात्र, मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मच्छिन्द्रा येथील नळ योजनेने गावाचे सौंदर्यीकरण संपूर्ण धोक्यात आणले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सर्व वार्ड निहाय खोदकाम करून नळ योजना राबविण्यात आली, परंतु अर्धवट कामे आणि नाली वरील मातीचे ढिगारे जशी च्या तशीच असल्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन आरोग्यास बाधा होण्याच्या तक्रारी येथील काही नागरिक करित आहे. सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे आणखीनच ठिकठिकाणी चिखल, सांडपाणी साचून घसरपट्टी तयार झाल्याने अनेकांना आपले हातपाय मोडून जातील अशी भिती पायदळ जाताना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याबाबत 3,2 प्रभागातील जनतेनी वारंवार पदाधिकारी व कर्मचारी यांना सूचना, मागणी देखील करून सुद्धा ग्रामपंचायत दुर्लक्ष करित असल्याचा आरोपही त्यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना केला आहे.

सरकारी योजना लोकांच्या फायद्यासाठीच आहेत, परंतु त्या योजना स्थानिक पदाधिकारी योग्य पद्धतीने राबविण्यात अपयशी ठरत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधिताशी चिरीमिरी करून व काम थातूर-मातुर करण्याची परंपरा येथील कर्मचाऱ्यांना असल्याचे अप्रत्यक्षरित्या नागरिकांतून बोलल्या जात आहे. त्यामुळे जल मिशन योजने ने गावाचे सौंदर्यीकरण धुळीस मिळवल्याचे आता ओरड होत आहे. गावोगावी पाहता विकास कामे झपाट्याने सुरु आहेत, मात्र मच्छिन्द्रा ग्रामपंचायत याला अपवाद ठरत असून गावातील अनेक समस्या जैसे थे आहे. आरोग्यच्या दृष्टीने सांडपाणी, रस्त्यावरील चिखल, शुद्ध पिण्याचा आरो प्लॅन्ट, सभोवताली वाढलेला कचऱ्याची विल्हेवाट लावावी व विशेष म्हणजे नळ योजनेच्या कामाची गुणवत्ता तपासणी व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे. 

अवकाळी पावसाची दोन दिवसापासून रिपरिप, तूर,कपाशी पिके धोक्यात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले असून कालपासून मारेगाव तालुक्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची रिपरिप सुरु आहे.

शनिवारी राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून यवतमाळ जिल्ह्याला 'यलो अलर्ट' दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यात मोठ्या पावसाचे वातावरण निर्माण झाले असून काल सोमवार आणि आज मंगळवार सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु झाली आहेत.

या पावसामुळे चना,गहू या पिकांना फायदा होत असला तरी तूर,कपाशी पिके धोक्यात आली असून किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाले, परिणामी कापसाला भाव नाही, व अस्मानी संकट जगू देत नसल्यामुळे शेतकरी राजा या अवकाळी पावसामुळे हवालदिल झाला आहे.