अवैध खेडा कापूस खरेदीला मारेगाव तालुक्यात उधाण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात खेडा कापूस खरेदीला पहाटे कोंबडा आरवल्यापासून शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावात घेण्याची स्पर्धा काही अवैध व्यापाऱ्यांकडून गावाखेड्यात सुरू झाली, ही खेडा खरेदी तत्काळ बंद करून त्यांच्यावर कारवाई करा,अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने एपीएमसी (APMC) व पोलीस स्टेशन ला देण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष चांद बहादे, आकाश खामनकार, गजानन चंदनखेडे, ईशान दारुंडे, जमीर सय्यद, यांची उपस्थिती होती.

आत्महत्याग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुख्यता व्यवसाय शेती हा असून येथील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित शेतातील उत्पन्नावर अवलंबून असते. आधीच अतिवृष्टी व नापिकीने तालुक्यातील शेतकरी कमालीचा मेटाकुटीस आला आहे. सध्या कापसाला भाव नसल्याने जगाचा पोशिंदा पूरता बेजार झाला असून, बळीराजा च्या घरात साठवून ठेवलेल्या मालावर अवैध खेडा खरेदीदरांची करडी नजर असल्याने भल्या पहाटे पासून आपले वाहणे नेवून तोकड्या भावात कापूस खरेदीला मोठे उधाण आले आहे. मात्र, यावर नियंत्रण ठेवणारे कृषी उत्पन्न बाजार समिती व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करित असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. असा आरोप मनसे शहराध्यक्ष चांद बहादे यांनी निवेदनातून केला आहे.

दरम्यान, मारेगांव शहर, मार्डी, कुंभा, नवरगांव, वेगांव, वनोजादेवी, शिवनाळा, पेंढरी, बोटोणी, अर्जुणी, भालेवाडी, सालेभट्टी, कोलगाव, डोर्ली या सह तालुक्यातील अनेक गावात अवैध खेडा कापूस खरेदीदारांची त्यांच्या वाहानासह दररोज झुबंड असुन विविध प्रलोभनाच्या आधारे शेतकऱ्यांचा कापुस या नगदी पिकांची आर्थिक लुट सुरु असून हा सर्व प्रकार खुलेआम राजरोजपणे सुरू असल्याचे असे निवेदनात नमूद आहे.

त्यामुळे मारेगांव शहरासह तालुक्यातील अवैध खेडा कापूस खरेदीदारांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या संदर्भात तिव्र आंदोलन करू असा ईशारा देण्यात आला आहे. 

परवा ला वणीत होणाऱ्या इंदूरीकर महाराजांचे कीर्तन स्थगित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरात प्रथमच हास्याचे धनी, विनोदी कीर्तनकार,परखड प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम (ता.3 नोव्हें.) रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे आयोजकांनी जाहिर केले आहे.

विदर्भातील सप्त खांजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या नंतर राज्यात प्रसिद्ध असलेले इंदुरीकर महाराज यांच्या विनोदी आणि परखड कीर्तनाची संधी वणीकरांना लाभणार होती. किंबहुना त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था द्वारा आयोजित करण्यात आला होता. मात्र, राज्यभर मराठा आंदोलनाची धग वाढत असल्याने पुढील पाच दिवस मी कुठेही कीर्तनाचा कार्यक्रम करणार नाही, असे सांगुन महाराजांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा जाहिर केला होता.

दरम्यान, इंदुरीकर यांनी कुठेही कीर्तनाचे कार्यक्रम करू नये, अशा सुचना जिल्हाधिकारी यांचेकडूनही त्यांना प्राप्त झाल्याने अखेर वणी येथील आयोजित कार्यक्रमाला मी येऊ शकणार नाही, असे त्यांनी आयोजकांना कळविताच वणीकरांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. त्यांच्या आगमनाची तालुक्यातील जनता मोठ्या आतुरतेने वाट पाहत होती, परंतु काही कारणास्तव कार्यक्रम रद्द झाल्याने शुक्रवार ला वणी येथे होणारा कार्यक्रम तूर्तास स्थगीत करण्यात आला असून पुढील तारीख दिल्यानंतरच हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रा. टिकाराम कोंगरे यांनी माध्यमातून दिली.


शहरात जातीय दंगली घडवून आणण्याचा कटकरस्थान करणाऱ्यावर कारवाई करा - वंचितची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : आमदारांच्या सहकार्याने शहरात जातीय दंगल घडविण्याचे आणण्याचा कट कारस्थान करणाऱ्यावर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन ठाणेदार खंडेराव यांना दि.31 ऑक्टोबर रोजी देण्यात आले.

मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून शांतप्रिय तालुका म्हणून तालुक्याची ओळख आहे. मात्र, तालुक्यात गेल्या काही दिवसापासून शहराचे वातावरण कलुषित करण्याचे षडयंत्र गैरअर्जदारांच्या काही कार्यकर्ते करण्याचा प्रयत्न करित असून आमदाराच्या मर्जीने शहरात एका नगरसेवकाकडून अवैध मटका धंदा चालवीत असल्याचे दिसते. त्या मटक्याच्या धंद्यात आमदाराचा सहभाग असल्याचे दिसते. एवढे असुनही मारेगांव शहर शांतता राखत असतांना बेजबाबदार आमदारांनी एका मटका व्यवसाय करणाऱ्या नगरसेवकाचे सांगण्यावरुन गैरअर्जदार आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रवि बेलुरकर व त्यांचे काही साथीदारांनी दिनांक ०३/१०/२०२३ रोजी व दि. २७, २८/१०/२०२३ रोजी दुपारच्या वेळेस मारेगांव शहरात जातीय दंगल घडविण्याचे कटकारस्थान केले व आजही करित आहे.

मारेगांव शहरातील नागरीकांच्या तथा महीलांच्या भावना दुखावल्या जात आहे. एवढेच नसुन सर्व समाजातील जनतेच्या भावनांशी खेळ करित असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने निवेदनातून केला आहे. त्यामुळे आमदार व त्यांच्या इतर भाजप कार्यकर्त्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून दिलेल्या निवेदनावर विजय कांबळे युवा आघाडी ता. अध्यक्ष, राहुल भेंडारे ओबीसी क्रांति दल अध्यक्ष, खुशाल येरगुडे, अनिल कुमरे, पांडुरंग देवाळकर, रवि घुमे, धनराज मून, संजय पाटील, यांच्या सह्या आहेत तर वंचित चे ता. अध्यक्ष गौतम दारुंडे, ता. उपाध्यक्ष संजय जिवने, नूतनताई तेलंग महिला अध्यक्ष, गंगाधर महाराज लोणसावले, वासू वनकर आदींची उपस्थिती होती. 

...याप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्डी ते मारेगाव मोफत बस प्रवास करता येणार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : "शब्दाने सहानुभूती मिळवणे सोपे असते. परंतु कर्तुत्वाने मदत करणे हे कठीण काम आहे". अशी आपल्याकडे एक म्हण आहे. मात्र,ती म्हण अंगीकारून हे कठीण कार्य जनहित कल्याण संघटनेने करून दाखवत तालुक्यातील मार्डी परीसरातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्याचं सौदार्य केले आहे.

तालुक्यातील केगांव येथील अनिकेत पिंपळशेडे या सतरा वर्षीय विद्यार्थ्याचा आटोने प्रवास करताना अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली होती,तर सर्वत्र तालुक्यामध्ये तीव्र पडसादही उमटले होते. दरम्यान, ही सद्यस्थिती लक्षात घेऊन जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांच्या पुढाकारातून, उपाध्यक्ष रॉयल सय्यद, सचिव निलेश तेलंग व समीर कुळमेथे यांनी वणी आगार प्रमुखांची भेट घेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मार्डी ते मारेगाव प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना सोमवार दि.30 ऑक्टोबर पासून पुढील 10 दिवस दिवाळी सुट्या पर्यंत मोफत खासगी बस सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे दिवस सुरु असल्यामुळे व ज्ञानार्जनात विद्यार्थी मागे पडू नये,यासाठी संघटनेचा हा निर्णय व कार्य अभिनंदनासह कौतुकास पात्र असल्याचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले. तूर्तास त्यांच्या उदात्त भावनेला नागरिक सुद्धा सलाम करित मारेगाव-मार्डी या डामडौल रस्त्याचा प्रश्न प्रामुख्याने हाताळण्याचीही आग्रही मागणी होत आहे.


बस सेवा याप्रमाणे उपलब्ध आहेत...

मार्डी ते मारेगाव सकाळी 7 वाजता. (पहिला राउंड)
मार्डी ते मारेगाव सकाळी 10 वाजता. (दुसरा राउंड) 
मारेगाव ते मार्डी दुपारी 1 वाजता. (परतीचा प्रवास)
मारेगाव ते मार्डी दुपारी 3 वाजता. (परतीचा प्रवास)

मारेगाव येथे येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वरील प्रमाणे मार्डी मारेगाव बस प्रवास करता येणार आहे. काही अडचण आल्यास जनहित कल्याण संघटनेच्या कार्यकर्त्यांना संपर्क साधावा अशी माहिती तालुका उपाध्यक्ष रॉयल सय्यद, समिर कुळमेथे, निलेश तेलंग यांनी दिली. 

राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.

राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल.

आज मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली. यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत.

राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट आली असून रब्बी पेरण्या देखील संथपणे सुरु आहेत. आतापर्यंत १२ टक्के पेरण्या झालेल्या आहेत अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

जून ते ऑक्टोबर 2023 या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार 2 हेक्टर मर्यादेऐवजी आता 3 हेक्टर मर्यादेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने मदत देण्यात येईल.

त्याचप्रमाणे शेत जमिनीच्या नुकसानीसाठी 2 हेक्टर मर्यादेत मिळणारी केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणारी मदत आता अल्पभूधारक शेतकरी नसलेल्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 2 हेक्टर मर्यादेत मिळेल.