श्रीमती सुशिला दाऊपूरे यांचे अल्पशा आजाराने निधन



सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

वणी : श्रीमती सुशिला दाऊपुरे यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवार, दि.31 आक्टोंबर 2023 ला पहाटे 5 वाजता निधन झाले आहे. त्यांचे मृत्युसमयी वय 80 वर्षाचे होते. सौ.मंगला गीत घोष यांच्या आई तसेच मा.गीत घोष यांच्या त्या सासू होत.

श्रीमती सुशिला दाऊपुरे यांच्या पच्छात त्यांच्या लहान बहीण श्रीमती कमल ब्राम्हणे तसेच मुली सौ.मंगला घोष, वैशाली वानखेडे, श्रीमती सुषमा धाबर्डे व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आजच म्हणजे मंगळवार 31 आक्टोंबर 2023 ला सायंकाळी 4 वाजता घोंसा येथे होणार आहे. अशी माहिती जावई गीत घोष यांनी दिली. 

येत्या 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील कृषी केंद्र बंदची हाक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : कृषि निविष्ठा विक्री करणा-या विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी सध्या प्रचलीत असलेले कायदे पुरेशे असतानाही राज्यशासनाकडुन विधेयक क. 40, 41, 42,43 व 44 नुसार पुन्हा नविन कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रस्तावित कायद्यातील तरतुदी विक्रेत्यासाठी अत्यंत जाचक आहेत व त्यामुळे विक्री व्यवसाय करणे अश्यक्यप्राय होणार आहे.

राज्यातील विक्रेते हे कोणत्याही प्रकारच्या कृषि निविष्ठांचे उत्पादन करीत नाही. कृषि विभागाच्या मान्यता प्राप्त कंपनीच्या कृषि निविष्ठा या सिलबंद पॅकिंगमध्ये खरेदी करून शेतक-यांचा सिलबंद पॅकिंगमध्ये विक्री करीत असल्याने व कृषि विभाग मान्यता प्राप्त सिलबंद निविष्ठाचे दर्जाबाबत कृषि विक्रेत्यांना दोषी समजण्यात येवू नये. तसेच योग्य निविष्ठा विकणारे कृषि निविष्ठा विक्रेत्यांवर जरब बसविणेसाठी अन्यायकारी कायदे विक्रेत्यावर लादू नयेत अशी राज्यातील सर्व विक्रेत्यांची मागणी आहे.

या संदर्भातील निवेदन आमदार सुभाष धोटे, राजुराचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना देऊन आपल्यावरील अन्याय दूर करण्याची मागणी कृषी केंद्र संचालकांनी केली आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या या जाचक नियम व प्रस्तावित कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व कृषी केंद्र दिनांक 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घोषित केला आहे.
या प्रसंगी तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशन अध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी सर्वांना आव्हान केले की, कुषी केंद्र संचालक हा नेहमीच शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्यांना खते, बियाणे व औषधांचा पुरवठा करत असतो. त्यांच्या वर शासन जर मोका कायद्या सारखा जाचक कायदा आणत असेल तर ते व्यवसाय करु शकणार नाहीत. त्यांचा व्यवसाय या कायद्यामुळे अडचणीत आला तर शेतकऱ्यांना कोणी ही वाली उरणार नाही शेतकरी देशोधडीला लागेल म्हणून आम्हा सर्व कुषी केंद्र संचालकांना न्याय मिळण्यासाठी आम्ही ही महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. या बंदमुळे शेतकऱ्यांना त्रास होणार आहे परंतु या कायद्यामुळे हतबल आहोत. त्यामुळे आम्ही कृषी केंद्र बंदचा निर्णय घेतला आहे.

या प्रसंगी प्रशांत गुंडावार, जिल्हाध्यक्ष ऍग्रो डीलर्स असोसिएशन चंद्रपूर, राजेंद्र चांडक, उपाध्यक्ष ऍग्रो डीलर्स असोसिएशन चंद्रपूर, नंदकिशोर वाढई, अध्यक्ष तालुका ऍग्रो डीलर्स अशोसिएन राजुरा, सुरेश सारडा, उपाध्यक्ष तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशन राजुरा, संतोष इंदुरवार, सचिव तालुका ऍग्रो डीलर्स अशोसिएन राजुरा, प्रकाश दातारकर, निखिल चांडक, नेताजी क्षिरसागर, अनिल बोनगिनवार, नितेश गिरडकर, जितेंद्र जयपुलकर, रमेश सारडा, प्रमोद जिवतोडे, डेरकर पाटील, शुभम बेजकीवार, सुधीर कुमार टुडरु, आनंद पडवेकर यासह समस्त तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशन राजुरा चे पदाधिकारी व तालुका कुषी केंद्र संचालक उपस्थित होते.

यवतमाळ येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात ८८१ कोटी रू. निधीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : गत दीड वर्षांत राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजना व निर्णयांमुळे युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला, वंचित, दिव्यांग आदी सर्व समाजघटकांच्या सर्वसमावेशक विकासाला गती मिळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. 

यवतमाळ शहरानजिक किन्ही गावाजवळ ‘शासन आपल्या दारी’ अभियानात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

 जिल्ह्यात ८८१ कोटी रू. खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार भरत गोगावले, प्रा. अशोक उईके, किरण सरनाईक, इंद्रनील नाईक, संदीप धुर्वे, संजीव रेड्डी बोदकुरवार, प्र. विभागीय आयुक्त संजय पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड आदी यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, औद्योगिक विकासाच्या दृष्टीने यवतमाळ शहर समृद्धी महामार्गाला जोडण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई, नागपूर या महानगरांशी वेगवान संपर्क होऊन दळणवळण, व्यापार व रोजगार वाढेल. यवतमाळ जिल्ह्यात व्हितारा कंपनीसह नामांकित उद्योग सुमारे ५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, मोठी रोजगारनिर्मिती होणार आहे. आदिवासी समाजबांधवांची संस्कृती व गौरवशाली इतिहासाच्या जोपासनेसाठी बिरसा मुंडा वस्तूसंग्रहालय उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. सुपर स्पेशालिटी रूग्णालय येथे पदे लवकरच भरण्यात येतील व ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येईल. वन्य प्राण्यांपासून शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी २१ हजार शेतक-यांना ‘सौर झटका’ यंत्रांचे वितरण करण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. शेतीसाठी आपत्तीकाळातील नुकसानभरपाईचे प्रमाण दुपटीवर नेले आहे. शेतक-यांना एक रूपयात पीक विमा देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

 सिंचनासाठी गत दोन वर्षांत ३५ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या किसान सन्मान योजनेत राज्य शासनाने प्रतिव्यक्ती ६ हजार रू. ची भर घालून अंमलबजावणीला गती दिली आहे. नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत देय उपचार निधी दीड लाखाहून पाच लाखांपर्यंत वाढविण्यात आला आहे. 
जिल्ह्यात अभियान कालावधीत १६ लाख नागरिकांना ६०१ कोटी रू. निधीतून विविध योजनांचे लाभ वितरण करण्यात आले. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्ह्यात ७५ ‘मॉडेल स्कूल’ सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाने महिलाभगिनींसाठी एसटी प्रवास सवलत, मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ‘लेक लाडकी लखपती’ योजना, महिला बचत गटांचे खेळते भांडवल दुप्पट करणे, तसेच गटांकडून उत्पादित वस्तूंचे ब्रॅडिंग व विपणन करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून, कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देऊ, अशीही ग्वाही त्यांनी दिली. 

पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले की, राज्य शासन शेतकरी बांधव, महिला व वंचितांसाठी अनेक योजना राबवत असून, भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. सिंचनाच्या दृष्टीने महत्वाची असलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे जिल्ह्यातील अनेक रूग्णांना मदत मिळाली आहे. जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळांतील रिक्त शिक्षक पदे भरण्याची मागणीही त्यांनी केली. 

खासदार श्रीमती गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले.      
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध योजनांच्या २५ लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी सौर झटका यंत्राच्या प्रात्यक्षिकाचे अवलोकन केले. त्यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना विविध कृषी अवजारे, तसेच ट्रॅक्टरच्या चाव्या वितरित करण्यात आल्या. 

जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी प्रास्ताविक केले. 
मंगला माळवे व अमिन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आभार मानले.

सौ. रत्नमाला शंकरराव मडावी अनंतात विलीन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सोमवार दि.30 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता सौ रत्नमाला शंकरराव मडावी यांचे दुःखद निधन झाले, त्या से.नि.नायबतहसीलदार, विद्यमान नगरसेवक तथा तालुका काँग्रेस सरचिटणीस श्री. शंकरराव मडावी यांच्या पत्नी. तर समाजकल्याण उपायुक्त डॉ. सचिन मडावी (गडचिरोली) यांच्या त्या मातोश्री होत्या.

गेल्या अनेक महिन्यापासून त्यांचेवर उपचार सुरु होते. मात्र दीर्घ आजाराने आज पहाटे गडचिरोली येथील हॉस्पिटल मध्ये त्यांचे निधन झाले. सर्वपक्षीय नेते तसेच शेकडो जनसमुदायाच्या साक्षीने मारेगाव येथील स्मशानभूमीत संध्याकाळी 4 वाजता त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेंद्र पा.ठाकरे यांच्या अध्यक्षतेत शोकसभा घेऊन अनेकांनी शब्दसुमनांजली अर्पित करून श्रद्धांजली वाहिली.

त्यांचा पश्चात पती, मुलगा, मुलगी, स्नुषा, जावई व नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

काँग्रेस पाठोपाठ युवासेनेचे ठाणेदारांना समर्थन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : स्थानिक दुर्गा विसर्जन सुरु असताना शाब्दिक चकमकी दरम्यान जीवे मारण्याची धमकी; कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाच्या रक्षकांना आकारण शिवीगाळ देणाऱ्या नगरसेवकाला पाठीशी घालणाऱ्या भाजप आमदारांनी चक्क ठाणेदाराचीच बदली करा. असा बिनकामाचा आग्रह धरल्याचा आरोप करित तालुक्यातील मनसे, काँग्रेस यांच्या पाठोपाठ आता युवासेनेने ठाणेदार यांना समर्थन देत, मारेगाव ठाणेदार खंडेराव यांची बदली करू नये, अशा आशयाचे निवेदन येथील पोलिसामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आज (ता.30 ऑक्टो.) ला देण्यात आले.

शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी स्थानिक दुर्गा देवी विसर्जनानिमित्त पोलीस प्रशासन सज्ज असता, पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालत त्यांना जीवे मारण्याची धमकी सुभाष नगर दुर्गा उत्सव मंडळाचे सदस्य तथा भाजप नगरसेवक राहुल राठोड यांनी दिल्यावरून शहरात संतापाचे वातावरण निर्माण असताना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या कार्यकर्त्याला पाठीशी घालत ठाणेदार यांची तत्काळ बदली करण्यात यावी, यासाठी घटनेच्या दुसऱ्या दिवशी मारेगाव ठाण्यात ठिय्या मांडून कर्तव्यदक्ष ठाणेदार जनार्धन खंडेराव यांच्या बदलीची मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांना ठाण्यात पाचारण करून रेटून धरली. व पाच तास ठिय्या दिला. मात्र, जीवे मारण्याची धमकी व अकारण शिवीगाळ केल्याने काँग्रेसने या घटनेची तीव्र निंदा करित कर्तव्यात अडथळा निर्माण करणाऱ्यावर उलट कारवाई करा व ठाणेदार यांची बदली करू नका अशी मागणी केली होती. 

त्यानंतर ठाणेदार जनार्धन खंडेराव यांची नागरिकांप्रती चांगली वागणूक आहे तसेच ठाणेदार हे योग्यरीत्या आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या दबावात न येता मारेगाव ठाणेदार यांची बदली करू नये, अशी आग्रही मागणी आज जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनातून मारेगाव युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेदार यांच्या प्रती समर्थनाचा ओघ वाढतच असल्याचे चित्र दिवासेंदिवस दिसून येत आहे.

निवेदन देताना युवासेनेचे तालुका अध्यक्ष मयूर ठाकरे, डॉ मनिष मस्की, राजू भाऊ मोरे, लक्ष्मीकांत देठे, रतन धानोरकर, पंकज नेहारे, शुभम कोंगरे, अनिकेत मानकर, यश निब्रड, गजानन ठाकरे, अंकुश जोगी, चंद्रशेखर थेरे, अमोल झोटिंग, अमोल डाहुले तथा युवा सैनिक आदींची उपस्थिती होती.