पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अविरोध


सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार 

पांढरकवडा : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष बोरेले व उपसभापती प्रेम राठोड यांनी दिं १८ आगस्ट रोजी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते,त्याच्या रिक्त झालेल्या जागेकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी शुक्रवार दिं.१ सप्टेंबर रोजी पार पडली. यात १८ संचालकातून मतदानाद्वारे ही निवडणूक होणार होती.परंतु,सभापती व उपसभापती पदासाठी एक-एकच नामांकन पत्र दाखल झाल्यामुळे सभापती पदी बिशनसिंग नानकसिंग शिंदो तर उपसभापती पदी गंगारेड्डी पोतन्ना क्यातमवार यांची अविरोध निवड झाली.

आज १ सप्टेंबर रोजी १८ संचालकातून ही निवडणूक होणार होती परंतु १८ संचालकांपैकी १५ संचालक हे हजर होते.एक संचालक उशिरा पोहचले तर २ संचालक संतोष बोरले आणि निलेश मंचलवार हे गैरहजर होते. पांढरकवडा बाजार समितीमध्ये मोघे- पारेवकर - खेतानी हे तिन गट सक्रीय आहे.हे तिन्ही गट एकत्रीत असल्याने सभापती, उपसभापतीची निवडणूक अविरोध झाली. सभापती पदासाठी काँग्रेसचे बिशनसिंग शिंदो व उपसभापती पदासाठी गंगारेड्डी क्यातमवार यांचेच एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा आर.बि.निनावे, अध्याशी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था,यांनी केली,ही निवडणूक बाजार समितीच्या सभागृहात पार पडली.

मारेगाव तालुक्यात आठ तासाऐवजी बारा तास कृषीला विद्युत पुरवठा द्या - हिवरी येथील ग्रामस्थांची मागणी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभा असलेला हिरवेगार पिक पाण्याच्या अभावामुळे सुखत चाललेला आहे. अशा परिस्थिती मध्ये प्रशासनाने शेतकऱ्यांचा विचार करुन कृषीची लाईन आठ तासाऐवजी बारा तास देण्यात यावे,अशा आशयाचे निवेदन हिवरी येथील ग्रामस्थांनी अभियंता (मराविविक) मारेगाव यांना देण्यात आले. 

तालुक्यामध्ये ऑगस्ट महिन्यापासून मान्सूनने मोठा ब्रेक घेतला. त्यामुळे खरीपातील कापुस, तुर व सोयाबिन या पिकांची पाण्याअभावी नुकसान होण्याच्या मार्गवर आहेत. मारेगाव तालुक्यातील शेतकरी वर्ग हा फक्त शेतीवरच अवलंबुन असुन, त्यांचे उजीविका शेतातील उत्पन्न यावर आहे. परिणामी शेतातील संपुर्ण पिकांचे पाण्याअभावी माल वाळत चालला असताना शेतकऱ्यांजवळ शेतीशिवाय जगण्याकरीता इतर दुसरे कोणतेही साधन नसल्याने शेतातील पिकांच्या ओलीताकरीता मुबलक पाण्याची आवश्यकता आजघडीला आवश्यक आहे. त्यासाठी वीज पुरवठा हा तोकडा सुरु आहेत. कधी येतो कधी जातो, पाहिजे तसा विद्युत पुरवठा मिळत नाही. यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. तूर्तास पाणीअभावी शेत माल हातून जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. सतत च्या अतिवृष्टी, नापिकीने तालुक्यात आत्महत्याचा आलेख वाढत आहे, परिणामी प्रशासनाने आठ तासा ऐवजी बारा तास वीज पुरवठा देण्यात यावे तसेच पुढील दोन महीन्याकरीता ही लाईन (विद्युत) देण्यात यावी. या मागणीला घेऊन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी अभियंता शाखा मारेगाव यांना चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. 

निवेदन देतांना गुणवंता देरकर, गोपाल सोमलकर, प्रशांत काकडे, रामापाटिल झाडे, विनोद घोसले, संतोष पवार, महादेव पवार यासह अनेक शेतकरी व गावकरी उपस्थित होते. 


मारेगावात नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव येथील शेतकरी सुविधा केंद्रात नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ता विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात ग्रामीण भागातील नेत्र रुग्णांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला.

गेल्या काही दिवसापासून डोळ्यांचे आजार मोठ्या प्रमाणात तालुक्यात वाढले होते. यामध्ये डोळ्यांची साथ, अनेकांना मोतिबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा, अंधत्व यासारख्या आजाराचा सामना करावा लागत असताना वणी येथील प्रसिद्ध व्यावसायिक विजय चोरडिया व मित्र परिवार यांनी मारेगाव शहरात 31 ऑगस्ट रोजी भव्य शिबिराचे आयोजन करून ग्रामीण रुग्णांची सेवा केली.
या शिबिरामध्ये मोतिबिंदूचे 103 रुग्ण आढळले आहे तर, दृष्टीदोष चष्म्यासाठी 600 रुग्ण आढळून आले असून, नागपूर येथील धवन नेत्रालय यांच्या तज्ञ डॉक्टर व सहकाऱ्यांनी ही तपासणी केली. या तपासणीमध्ये मोतिबिंदू झालेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून चष्मे व औषधोपचार मोफत केला जाणार आहे तसेच रुग्णांसाठी जाणे-येणे प्रवास मोफत असणार आहे.अशी माहिती आयोजकाकडून देण्यात आली आहे. 
या शिबिरात सहभागी होऊन सहाशे च्या वर रुग्णांनी लाभ घेतला. नागरिकांचे विजय चोरडिया यांनी आलेल्या रुग्णांचे आभार मानले. गेल्या बारा वर्षांपासून हे सामाजिक उपक्रम विजय चोरडिया मित्र परिवाराकडून राबविण्यात येत आहे. 

मंजूर झालेले पंचायत भवन इथेच करा, इतरत्र हलवू नका अन्यथा...!

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत वागदरा-वसंत नगर येथे नव्याने मंजूर झालेले पंचायत भवन हे वसंत नगर याठिकाणीच बांधकाम करा, इतरत्र हलवून बांधकाम करू नका अन्यथा... आम्ही गावकरी उपोषणास बसू असा थेट ईशारा आज (ता.30) रोजी दिलेल्या निवेदनातून पंचायत समिती कार्यालयाला दिला. यावेळी वसंत नगर येथील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

मारेगाव तालुक्यातील वसंतनगर हे वागदरा गट-ग्रामपंचायत मध्ये समाविष्ठ असून दोन्ही गावे 500 मी. अंतरावर लागुन आहे. मौजा वसंतनगर येथे यापुर्वीपासुन गट ग्रामपंचायत कार्यालय आहे. तसेच गुरांचे पशु चिकीत्सालय दवाखाना व जि.प.शाळेची इमारत सुध्दा आहे. मात्र,आता वसंतनगर येथे नविन पंचायत भवनचे कार्यालय बांधकाम करणे हे नव्याने मंजुर झाले आहे. त्याकरीता लागणारी जागा सुध्दा उपलब्ध आहे. परंतु ग्राम पंचायतचे तत्कालीन सरपंच दादाराव ढोबरे हे बुध्दीपुरस्कर वसंतनगर येथे बांधकाम न करता गट ग्राम. मधील वागदरा येथे हलवण्यासाठी आग्रही असल्याची तक्रार निवेदनातून गट विकास अधिकारी पद्माकर मडावी यांना करण्यात आली आहे. पुढे निवेदनात असेही नमूद केले आहे की, मी सरपंच आहे. मी माझे मताने ग्राम पंचायत अंतर्गत मंजुर झालेले कोणतेही कामे माझे स्वतःचे मर्जीने कुठेही व कसेही करु शकतो. यास गावातील जनता माझे काही करु शकत नाही. व मला ग्राम पंचायतचे कोणत्याही सदस्याने अथवा गावातील जनतेने अडथळा निर्माण करु नये, अशा प्रकारचे स्पष्ट वक्तव्य वागदरा येथील गट ग्रामपंचायतचे सरपंच करीत असल्याचे निवेदनात म्हटलं आहेत. 

यापुर्वी सुध्दा वसंतनगर येथे असलेल्या गट ग्रामपंचायतचे कार्यालयाला ऑनलाईन महानेटचे केबल कनेक्शन मंजुर झाले होते ते सुध्दा तत्कालीन सरपंचांनी सरपंच नसतांना वसंतनगर येथे कनेक्शन देण्यास अडविले होते. व ते वागदरा येथील ग्रा.पं.कार्या. मध्ये बसविण्याचा घाट घातला होता. शिवाय सरपंच हे वसंतनगर येथे कोणतेही विकास कामे करत नसुन सदर सरपंचाच्या हुकूमशाही भूमिकेमुळे वसंतनगर येथील ग्रामस्थ पूर्णतः त्रस्त झाले आहे.आता आमचे वसंतनगर येथे नविन पंचायत भवन बांधकाम मंजुर झाले, त्यासाठी जागा उपलब्ध असुन सुध्दा सरपंच ठोबरे हे नविन होणारे बांधकाम वागदरा येथील हद्दीत बांधकाम करण्याच्या प्रयत्नात असल्याची वसंतनगर हे गावातील जनतेची तक्रार आहे. दिलेल्या निवेदनावर शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत. 

विशेष म्हणजे वसंतनगर येथे मंजुर झालेले पंचायत भवन चे बांधकाम वसंतनगर येथेच करा. इतरत्र हलवू नका, अन्यथा  गावकऱ्यांच्या वतीने जन आमरण उपोषणाचे हत्यार उपसल्याशिवाय राहणार असा गर्भीत ईशारा वसंतनगर येथील शेकडो ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे. त्यामुळे गावाकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल संबंधित अधिकारी दखल घेतात की? नाही की, सरपंचाना पाठीशी घालतात! याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहेत. 


हिवरा दरणे येथे शेतकरी मार्गदर्शन व गुलाबी बोंड अळी नियंत्रण जनजागृती कार्यक्रम साजरा

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख

कळब : तालुक्यातील हिवरा दरणे येथे कापूस उत्पादक शेकऱ्यां साठी एलडीसी गुलाबी बोंडअळी नियंत्रण जनजागृती तसेच शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
     
एलडीसी सीएसआर जागृती प्रकल्प अंतर्गत स्पेक्ट्रम कॉट फायबर, वाधवानी ग्रुप व कृषी विभाग कळंब यांच्या संयुक्त विद्यमानाने कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक नियंत्रण तसेच कापूस उत्पादकता वाढ व कृषी पायाभूत सुविधा निधी योजना प्रचार व प्रसार या कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एल डी सी चे तुकाराम बादाडे पाटील उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनाली गायकी ,वाधवानी ग्रुप,दिनेश उगले, कृषी सहाय्यक, मोहन बरडे ,प्रोजेक्ट कॉर्डिनेटर, नरेश बाजरे,पियू मॅनेजर,मुकेश मडावी,राम राऊत, वाधवाणी ग्रूप,सचिन दरणे,उमेश दरणे, ग्रामपंचायत सदस्य,वैभव मेघळ,लक्ष्मण यादस्कर, हितेश भोयर,आनंद मांढरे,नागसेन सुटे,सागर शुक्ला,वैभव इजपाडे,संदीप जगताप,शुभम डफळे,प्रियांका ओंकार व कोमल राऊत इत्यादी प्रक्षेत्र अधिकारी यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
      
एल डी सी तर्फे कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापना संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जागृती प्रकल्पाबाबत तसेच इतर कृषी निर्विष्टांच्या योग्य वापरा संदर्भात आणि शेतीमध्ये होत असलेल्या आधुनिक बदलांबाबत एल डी सी चे कृषी विश्लेषक तुकाराम बादाडे पाटील यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. तसेच वाधवाणी संस्थेने तयार केलेले कॉटन एस हे ॲप्लिकेशन कशाप्रकारे शेतकऱ्यांच्या गुलाबी बोंड अळीच्या संभाव्य धोक्याबाबत जागरूकता करते, तसेच योग्य वेळी योग्य नियोजनाचा सल्ला देते, याबाबत सोनाली घिके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक उगले सर यांनी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. स्पेक्ट्रम कॉट फायबर एलएलपी चे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर मोहन बरडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून शेती मधला अतिरिक्त होणारा खर्च कसा कमी करता येईल व शेती करताना काय काय उपाययोजना करायला हव्या याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना एल डी सी मार्फत गुलाबी बोंड अळी तसेच कपाशीवरील इतर रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने प्रत्येकी आठ कामगंध सापळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले. पियू मॅनेजर नरेश बाजरे यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता केली . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता स्पेक्ट्रम कॉट फायबर एलएलपी,वर्धा संस्थेच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी गावातील व आजूबाजूच्या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.