थांबवा फसवणुकीचा प्रकार; अपडेट करा ‘आधार’

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

देशातील पहिले आधार कार्ड 29 सप्टेंबर 2010 रोजी रंजना सोनवणे यांचे बनले होते. रंजना या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली येथील रहिवासी आहेत. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंभली गावातून आधार कार्ड बनवण्याची सुरुवात झाली. आज भारतात मोठ्या संख्येने लोकांकडे त्यांचे आधार कार्ड आहे. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या सर्वांना याची गरज आहे.

आधार कार्ड आणि त्यासंबंधी होणारी फसवणूक टाळण्यासाठी भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागानं नागरिकांना आधार अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे. तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल आणि याआधी कधी ते अपडेट केलं नसेल, तर ते ताबडतोब अपडेट करुन घेण्याचा सल्ला आधार म्हणजेच यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथॅरिटी ऑफ इंडियानंही दिला आहे. याविषयी स्पष्ट सूचना 'आधार' च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. आधार अपडेट केल्यास ते वापण्यास सुलभता येईल आणि त्यामुळे अचूकता वाढेल, असं या सूचनेत म्हटलं आहे.

तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या भागातील आधार केंद्रावर जाऊन अपडेट करू शकता किंवा ऑनलाईनही ते अपडेट करता येईल. आधार कार्डवरील कोणती माहिती ऑनलाईन पद्धतीनं अपडेट किंवा दुरुस्त करता येते याचीच माहिती आता जाणून घेऊया.

आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्यासाठी https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. इथं लॉग इन (Log in) पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, पुढे केपचा (Captcha) टाकून सेंड ओटीपी पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक एटापासून (OTP) पाठवला जाईल. तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. मग लॉग इन (Log in) वर क्लिक करायचं आहे.

पुढे माय आधार (‘My Aadhar’) नावाचं एक नवीन पेज ओपन होईल. इथं वेगवेगळ्या सेवांची यादी तुम्हाला दिसेल. त्यातील आॉनलाईन अपडेट सर्व्हिस (‘Online Update Services’ ) या रकान्यावर क्लिक करायचं आहे. एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथल्या अपडेट आधार ऑनलाईन (‘Update Aadhar Online’) या रकान्यात क्लिक करायचं आहे. आता पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल. इथं आधार अपडेट कसं होतं, त्याची सविस्तर प्रक्रिया 9 मुद्द्यांमध्ये सांगितलेली असेल. uidai या पोर्टलवरून तुम्ही तुमचं नाव, जन्मतारिख, लिंग आणि पत्ता अपडेट करू शकता, अशी सूचना पहिल्याच मुद्द्यात दिलेली असेल.

पण, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आणि बायोमेट्रिक डेटा अपडेट करायचा असेल तर मात्र जवळच्या आधार सेवा केंद्रावर जावं लागेल. आधार अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क लागेल, त्यानंतर तुम्हाला एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (Service Request Number) दिला जाईल, ज्याचा वापर करून तुम्ही अपडेटचं स्टेटस पाहू शकाल. 30 दिवसांत ही प्रक्रिया पार पडेल आणि एसएमएसद्वारे तुम्हाला तसं कळवलं जाईल, अशा सूचना इथं असतील.

पुढे तुम्हाला प्रोसीड टू अपडेट आधार ‘Proceed to Update Aadhar’ या पर्यायावर क्लिक कराचयं आहे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला नाव, जन्मतारिख, लिंग आणि पत्ता यापैकी जे काही अपडेट करायचं आहे, तो एक पर्याय निवडायचा आहे. समजा मला पत्ता अपडेट करायची असल्यास ॲडरेस (address) या रकान्यावर क्लिक केलं आहे. त्यानंतर प्रोसीड टू अपडेट आधार ( ‘Proceed to Update Aadhar’ ) या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तिथे Current Details रकान्यात तुम्हाला तुमचा आधीचा पत्ता दिसेल, डिटेल्स टू बी अपडेटेड (Details to be Updated ) या रकान्यात जी माहिती अपडेट करायची आहे तुम्हाला ती भरायची आहे. सुरुवातीला इंग्रजी आणि मग मराठीत नाव टाकायचं आहे. एरिया (Area) या रकान्यात गावाचं, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. हीच माहिती खालच्या रकान्यात मराठीत टाकायची आहे. पुढे पीन कोड (Pin Code) टाकला की राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येतं. पुढे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव (Village) आणि पोस्ट ऑफिसचं (Post Office) नाव निवडायचं आहे.

सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट टाईप (Select Valid Supporting Document Type) या रकान्यामध्ये दिलेल्या कागदपत्रांपैकी एक कागपदत्र निवडायचं आहे. त्यानंतर व्ह्युव डिटेल्स ॲंन्ड अपलोड डॉक्युमेंट्स (View details and upload documents )वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रीनवर एक सूचना येईल, ती वाचून कंटीन्यु टू अपलोड (continue to upload ) वर क्लिक करायचं आहे. हे डाक्यूमेंट अपलोड झालं की नेक्स्ट (next) वर क्लिक करायचं आहे.इथं तुम्हाला तुम्ही अपडेट केलेला डेटा दिसून येईल. तो वाचून खाली असलेल्या दोन्ही पर्यायावर तुम्हाला टिक करून नेक्स्ट (next) वर क्लिक करायचं आहे.पुढे तुम्हाला 50 रुपये एवढं पेमेंट करायचं आहे. इथल्या सूचनेवर टिक करायचं आहे आणि मग मेक पेमेंट (make payment) वर क्लिक करायचं आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, यूपीआय, नेटबँकिंग, पेटीएम, व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही हे पेमेंट करू शकता.

पेमेंट केलं की ते सक्सेस झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल. येथील download acknowledgement वर क्लिक केलं की तुम्हाला पेमेंट केल्याची पावती पीडीएफमध्ये डाऊनलोड होऊन मिळेल. या पावतीवर तुमची आधीची माहिती आणि अपडेट करून काय हवंय, तेही नमूद केलेलं असेल. आधारच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 30 दिवसांत तुमचं आधार कार्ड अपडेट होईल. त्यानंतर आधार लेटर तुमच्या पत्त्यावर पाठवून दिलं जाईल.

-रणजितसिंह राजपूत
जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

सोयाबीनच्या नवीन वाणाचे बियाणे रास्त दरात उपलब्ध होईल- महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांची ग्वाही

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : सोयाबीनचे नवीन वाण फुले संगम, फुले किमया, एमएयूएस-६१२, एमएयूएस-१६२, येलो गोल्ड इत्यादी वाणाचे उच्चतम गुणवत्तेचे प्रमाणित बियाणे रास्त दरात उपलब्ध होईल, अशी ग्वाही महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी दिली.

कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून महाबीज विक्रेते व व्यवस्थापन यांच्या मध्ये प्रत्यक्ष संवाद न झाल्यामुळे प्रत्यक्ष चर्चा व विक्रेत्यांचे समस्यांचे निवारण करण्याकरिता जिल्ह्यामध्ये संमेलनाचे आयोजन हॉटेल व्हेनेशियन सेलेब्रेशन यवतमाळ येथे करण्यात आले होते. यात व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी विक्रेत्याशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच हिरवळीचे खत पिकाचे विक्री करून जमिनीचे आरोग्य सुधारण्याकरिता शेतकऱ्याना मार्गदर्शन करण्यास सांगितले. उत्पादकता वाढवण्याकरीता सर्व शेतकऱ्यांना महाबीज चे जैविक खताचे बिज प्रक्रिया करावी असेही त्यांनी सांगितले.

महाव्यवस्थापक विपणन प्रकाश टाटर यांनी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन व तूर पिकाचे दहा पेक्षा जास्त नवनवीन वाणाचे प्रमाणित बियाणे आवंटीत केल्यामुळे वाण बदल होऊन उत्पादकता वाढण्यास मदत होईल असे सांगितले.
महाव्यवस्थापक उत्पादन विवेक ठाकरे यांनी उच्च गुणवत्तेच्या बियाण्याचे बिजोत्पादन साखळी बाबत मार्गदर्शन केले. विभागीय व्यवस्थापक जगदीश खोकड यांनी विभागातील एकूण बियाणे, जैविक खते, जैविक बुरशीनाशक तसेच केळी व पपई रोपांचे विक्री बाबतचा आढावा घेतला. जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे यांनी येणाऱ्या खरीप मधील यवतमाळ जिल्ह्यातील उपलब्ध पिक वाणा बाबतचे नियोजनाचे सादरीकरण केले.

याप्रसंगी महाबीज विक्रेते भैयासाहेब मानकर यांच्या उपस्थितीत सुदर्शन कृषी केंद्र,आर्णी चे कोषटवार,जैन ॲग्री कल्चर एजन्सी यवतमाळ,दर्डा मकावनी कृषी केंद्र नेर चे शाहरूख, तसेच सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल (व्ही.सी.एम.एस),चे राजगुरू व झरीजामनी तालुका खरेदी विक्री संघ मुकुटबन चे गोंगलवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कृषी क्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख यांनी केले व कार्यक्रमाचे आभार कृषी क्षेत्र अधिकारी विजय भागवत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करणेकरीता कृषी क्षेत्र अधिकारी, जीवन चव्हाण, केंद्र अभियंता स्वप्निल बुळे व इतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

सहकारी संस्था कार्यालयात सुविधांचा अभाव

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील आदिवासी बहुल शेतकऱ्याच्या विकासाकरिता स्थापन करण्यात आलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेला त्याच्या कार्यालयाच्या विकासासाठी स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षानंतरही अधिकार प्राप्त झाला नाही. हा अधिकार कधी मिळेल ? असा प्रश्न पेसा क्षेत्रातील नागरिकासमोर उभा ठाकला आहे.

सन १९९० पूर्वी अवसानात गेलेल्या आदिवासी सेवा सहकारी संस्थेची मालमत्ता डी आर डी.च्या ताब्यात असून, ही ताब्यात असलेली मालमत्ता हस्तांतर करावी अशी मागणी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने केली आहे. हस्तांतर प्रकरण प्रलंबित असल्याने येथील कार्यलयात विविध सुविधाचा अभाव कायम आहे. नव्या उमेदीने सुरु करण्यात आलेल्या नव्या संस्थेचा कारभार हा अवसानात काढलेल्या तत्कालीन संस्थेच्याच इमारती मध्ये सुरु असून,  दरमहा ५००/- रुपये प्रमाणे इमारत भाडे,डीआरडी (DRD) ला अदा करीत आहे. मात्र, भाडेपट्टा डीआरडी कडून देण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्युत सेवा मिळविण्यासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

एकीकडे डीआरडी स्वतः विद्युत पुरवठ्या बाबत असमर्थतता दर्शवीत असून, दुसरीकडे या संस्थेला स्वतः विद्युत पुरवठा मिळविण्यासाठी लागणारा भाडेपट्टा किंवा हस्तांतर दस्ताऐवज देण्यास असमर्थ आहे. त्यामुळे आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या आदिवासी संस्थाना डी आर डी कडून मिळत असलेली सावत्रपणाची वागणूक संतापजनक असल्याच्या भावना व्यक्त होत आहे.

परिणामी दुसऱ्याचे कल्याण करणाऱ्या या संस्थेला स्वतःचे कल्याण करण्यास असमर्थ राहण्याची पाळी आली आहे. डिजिटल युगातील सर्वच कार्यालये सोयी,सुविधांनी सुरु असताना आदिवासी संस्थावर अशी पाळी का आली ? असा प्रश्न प्रगतशील आदिवासी बांधवा मध्ये चर्चील्या जात आहे.

कार्यालयाला सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी
बोटोणी, गोंड-बुरांडा, पिसगांव या तीनही आदिवासी विविध कार्यकारी संस्थे अंतर्गत ३ हजाराच्या वर कर्जदार, बिगर कर्जदार लाभार्थीचा समावेश आहे. या शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनाची अमंलाबजावणी करणाऱ्या या संस्थेला हस्तांतराच्या भानगडीमुळे कार्यालयीन समस्या सोडविता येत नाही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे डीआरडीने पुढाकार घेऊन या कार्यालयाला सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी क्षेत्रातील शेतकऱ्यां कडून होत आहे.

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, सेवा नगर येथील घटना

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : येथील एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वणी शहरातील येथील सेवा नगरात घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

प्रफुल विलासराव परचाके (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रफुल हा मूळ वणी शहरातील सेवा नगर येथील रहिवासी असून, तो आपल्या आई वडिलासह सेवा नगरात राहत होता. आज सोमवारी त्याने राहत्या घरात आत्महत्या केली. 
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला, त्याचे पश्चात आई वडील, भाऊ, एक बहीण असा आप्त परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे करण अस्पष्ट असून याप्रकरणी अधिक तपास वणी पोलिस करीत आहेत.

आरोपीला फाशी तर पीडित कुटुंबाना आर्थिक मदत व शासकीय नोकरी द्यावी- भालेराव हत्याकांड प्रकरणी डॉ. माकणीकर यांची मुख्यमंत्र्यांना मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : भीमसैनिक अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणात आरोपींना फाशी ची शिक्षा होऊन पीडित कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी तसेच शासकीय सेवेत सामावून घ्यावी असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथरावं जी शिंदे यांना केलेल्या निवेदनात डॉ. माकणीकर असे म्हणाले की,
बोंढार हवेली ता. जिल्हा नांदेड येथील अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणावर आपण जातीने लक्ष द्यावे, फास्ट ट्रॅक न्यायलयात प्रकरण नेवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. 

तसेच पीडित कुटुंबाला मदतीचा हाथ म्हणून तत्काल सहाय्यता निधी मिळवून द्यावा आणी कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे. 
होऊ घातलेली जातीयता मोडीत काढण्यासाठी असलेल्या कायद्यांचे तंतोतंत पालन करुन अश्या वृत्ती प्रवृत्तीना ठेचून काढावे. असेही डॉ. माकणीकर म्हणाले.

आठवडाभरात पीडित कुटुंबांना आर्थिक मदत नाही मिळाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशाराही पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.