देवाळा येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : तालुक्यातील देवाळा येथे एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची आज सकाळी नऊ वा.च्या दरम्यान, घटना उघडकीस आली. सदर घटनेची वार्ता सर्वत्र पसरताच गावात शोककळा पसरली आहे.

जनार्दन कवडू महाकुलकर (38 वय) असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. जनार्दन हे वडिलांच्या नावावर असलेल्या पाच एकर शेत जमिनी वर आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करायचे, त्यातच यंदाच्या अस्मानी सुलतानी संकटाने आर्थिक अडचण, शिवाय डोक्यावर कर्जाचे ओझे यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या जनार्दन ने इतके टोकाचे पाऊल उचलले. त्याच्या अशा निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याला मारेगाव येथे रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. 

जनार्दन यांचे पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

तालुक्यात सतत आत्महत्या होत आहे, विविध माध्यमातून जनजागृती, आवाहनं केली जातेय.. तरी देखील शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने हा विषय आणखीनच गडद होत चालला आहे.

टँकरमुक्त जिल्हा हेच जलजीवन मिशनचे यश – सचिव संजीवकुमार जयस्वाल

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

यवतमाळ : जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत नळ देण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला आहे. त्यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. यावर्षी जिल्ह्यात भरपुर पाऊस झाला असून धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे 2023 - 24 या वर्षात जिल्ह्यात एकही टँकर न लागल्यास जलजीवन मिशन यशस्वी झाल्याचा तो सर्वात सबळ पुरावा राहील, असे मत पालक सचिव तथा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीवकुमार जयस्वाल यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आज पालक सचिव यांनी सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जिल्हाधिकारी अमोल येडगे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. पालक सचिव यांनी स्वच्छता व पाणी पुरवठा, जलजीवन मिशन, केंद्र शासनाच्या 13 फ्लॅगशिप योजना, जलसंधारण, कृषी पंप जोडणी, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकाचे नुकसान, पोकरा योजनेची अंमलबजावणी, प्रधानमंत्री पिक विमा योजना, आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या योजना, आदींचा आढावा घेतला. यावेळी आढावा घेताना ते म्हणाले, जल जीवन मिशन ही शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे.

सन 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळ पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे ध्येय आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासन यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे या योजनेची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी व्हावी. भविष्यात जिल्ह्यात एकही टँकर लागणार नाही या दृष्टीने ही योजना यशस्वीपणे राबवावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत पिण्याचे पाणी, हॅन्डवॉश स्टेशन, शोष खड्डे आणि स्वच्छता इत्यादी व्यवस्था करण्यात यावी. जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रस्ताव शासन स्तरावर पाठवावे त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे श्री जयस्वाल म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)च्या अंमलबजावणीमध्ये जिल्हा मागे आहे. शहरातील आवास योजनेच्या कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची जेवढी मागणी आहे तेवढे सर्व प्रस्ताव पाठविण्यात यावे. यासाठी स्वतः पाठपुरावा करण्याची हमी त्यांनी यावेळी दिली.

प्रधानमंत्री आरोग्य योजनेतील गोल्डन कार्डसाठी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी लोकांच्या सोयीनुसार शिबीर लावावे. तसेच पिक विमा योजनेचा वारंवार आढावा घेण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जलजिवन मिशनचे सादरिकरण केले. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

उमानदीघाट (रत्नापूर) येथे भव्य धम्म मेळावा थाटात संपन्न


सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके

नागभिड : जागतिक महिला मुक्ती दिन व आठवा वर्धापन दिन कार्यक्रम "धम्म भूमी विकास समिती", रत्नापुर, नाचनभट्टी, शिवणी, नउमानदीघाट येथे "भव्य धम्म मेळावा"आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या चंद्रपुर (पुर्व) जिल्हा शाखेचे अध्यक्ष डाॅ.राजपाल खोब्रागडे यांनी भुषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई, तसेच राष्ट्रीय सचिव व धम्मयान मासिकाचे सह संपादक बी.एम कांबळे मुबंई यांनीही मार्गदर्शन केले जगदीश गवईस उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आज भारतातील तमाम महिला सुशिक्षित झाल्या, सर्व दृष्टीने संपन्न झाल्याचे दिसते, त्यामध्ये परम पूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या त्यागाचे प्रतिबिंब पहायला मिळते. त्यांनी अत्यंत कष्टाने भारतीय संविधान निर्माण करून भारतातील तमाम जातीयवादी, वर्णव्यवस्थेला तडा दिला व सर्व मानवांची या गुलामगिरीतुन मुक्तता केली. परंतु आज येथील जातीयवादी सरकारमुळे, चुकीच्या धोरणांमुळे राज्य घटनेलाच मोठा धोका निर्माण झाला आहे.आपण सर्वच डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून या भारतीय राज्य घटनेला संरक्षण देवून ती आबाधित ठेवण्याची फार मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार व्हायला पाहिजे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी संस्थेचे विदर्भ प्रदेशचे प्रमुख भीमराव फुसे, संघटक आनंदराव सायरे, नागपूर जिल्हा सरचिटणीस विलास उंदिरवाडे, महिला विभाग प्रमुख विजयाताई रामटेके यांनी देखिल समायोचित मार्गदर्शन केले.धम्मभूमि सेवा समितीचे अध्यक्ष मेश्राम यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन सभेचे अध्यक्ष डाॅ राजपाल खोब्रागडे यांनी पार पाडले. सरणतय होवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.याच ठिकाणी भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमामध्ये सर्व छोट्या मोठ्या कलाकारांनी सहभाग घेतला.

१३५ कि.मी.ची. पदयात्रा करत धडकले शेतकरी


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : वणी ते नागपूर 135 किलोमीटरची पदयात्रा काढून राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या मोर्चाने सोमवारी विधिमंडळावर धडक दिल्ली. यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांच्या झालेल्या नुकसानीचे त्यांनी पाढेच वाचले. या मोर्चासह ग्रामरोजगार सेवक, वीज कर्मचारी, व्यवसाय शिक्षक, बांधकाम मजूर, वस्तीगृह कर्मचारी, परिवहन कर्मचारी, आदिवासी विद्यार्थी, आंबेडकरी विचार मोर्चा, भूमिहीन शेतकरी, आदी 15 संघटनांनी मोर्चातून आपल्या मागण्या रेटून धरल्या.

महाराष्ट्र राज्य लाल बटवा शेतमजूर युनियनच्या बॅनरखाली 21 डिसेंबर रोजी वणीहून शेतकरी, शेतमजुरांचा निघालेला मोर्चा सोमवारी नागपुरात धडकला. मोर्चाला टेकडी रोडवर पोलिसांनी अडकविल्यानंतर त्यांच्ये सभेत रूपांतर झाले. धरणातील पाण्याचे व्यवस्थापन, कोळसा खाण व्यवस्थापनात उभारलेले वर्धा नदीच्या काठावरील मातीचे ढिगारे, थर्मल पॉवर स्टेशनचे राख व्यवस्थापन, जलयुक्त शिवार योजनेतील अशास्त्रीय कामे आणि पुरामुळे झालेल्या जीवित व मालमत्तेच्या हानीबाबत न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कारवाई करा व आपदग्रस्तांना तत्काळ भरपाई देण्याची मागणी लावून धरण्यात आली.  
'प्रधानमंत्री पीक विमा योजने' अंतर्गत असलेले ॲडव्हान्स नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. यामुळे 500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात झाल्याचा आरोपही करण्यात आला. यावेळी मोर्चाचे निवेदन महसूल मंत्री रामकृष्ण विखे-पाटील यांना देण्यात आले. त्यांना मागन्यांसाठी मुंबईत बैठक लावण्याचे आश्वासन दिले.
युनियनचे अध्यक्ष नामदेव चव्हाण, राजन क्षीरसागर, अरुण बनकर, हिरालाल परदेशी, अनिल घाटे, हौसलाल राहंगडाले, गणेश कसबे, शिवकुमार गणवीर, राम बाहेती, अमृत महाजन, आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.

मागण्या : • पुरामुळे झालेली जीवित हानी व मालमत्तेच्या हानीबाबत न्यायालयीन चौकशी करून दोषींना शासन करा • आपदग्रस्तांना तत्काळ भरपाई द्या • तेलंगणाच्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबाचे पुनर्वसन करा • पूर्व अतिवृष्टीमुळे बाधित पीक नुकसानीबाबत पिक विमा जोखीम रक्कम इतकी एमडीटी द्या • रकटून गेलेल्या सर्व जमिनीचे पंचनामे करा • हेक्टरी 40 हजार रुपयांची मदत करा • वनाधिकार कायद्यानुसार वनजमीनधारकांना पट्टे द्या • चंद्रपूर जिल्ह्यात वाघ व रानटी पशुंच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या 50 मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ताडोबा अभयारण्य सफारी बंद करा, सर्व प्रकल्पातील कालवा दुरुस्ती युद्ध पातळीवर सुरू करा, १८ तास वीज पुरवठा करा.


उद्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर कोतवाल संघटनेचा मोर्चा धडकणार

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगांव : तालुक्यातील सर्व कोतवाल उद्या नागपुर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर विविध मागण्या घेऊन धडक मोर्चा काढणार असल्याबाबतचे निवेदन मारेगाव तहसीलदार दिपक पुंडे यांना देण्यात आले आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात आपल्या मागण्या घेऊन अनेक संघटना सरसावल्या असतांना राज्य संघटनेच्या वतीने सुद्धा दि.28 डिसेंबर रोजी धडक मोर्चा काढणार आहे. राज्याध्यक्ष शिवप्रसाद देवणे, जिल्हाध्यक्ष शशिकांत निमसटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सुरेश येरमे, तालुका उपाध्यक्ष गणेश उराडे व सचिव अतुल बोबडे यांनी सर्व कोतवालांना मोर्चा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कोतवाल संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनातून खालील मागण्या करण्यात आल्या:

कोतवालाला चतुर्थ श्रेणी प्रदान करणे, चतुर्थ श्रेणी प्रकिया पुर्ण होईपर्यंत समान काम समान वेतन नुसार १५०००/- लागु करणे, तलाठी पदभरतीत कोतवालांना २५ टक्के आरक्षण मिळणे, निवृत्ती नंतर कोतवालांना १०,००,०००/- निर्वाह भत्ता मिळणे, आदी प्रकारच्या मागण्यासाठी घेवून अधिवेशन वर धडकणार आहे.
यावेळी कोतवाल संघटनेचे सुरेश येरमे, गणेश उराडे, अतुल बोबडे, विनोद मडावी,अशोक पेंदोर, दिलीप पचारे, योगेश भट, प्रभाकर आत्राम, अमित कोयचाडे, देव मोहुर्ले, जगदीश भाऊ कनाके, व संदीप कुळसंगे आदींची उपस्थिती होती.