क्रीडा स्पर्धेत हरू आश्रमशाळेची बाजी


सह्याद्री चौफेर | चेतन पवार 

दारव्हा : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये तालुक्याच्या हरू येथील वसंत विमुक्त जाती माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेने १९ वर्षीय खो-खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा स्पर्धेतील स्थान पक्के केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ तसेच जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय खेड व क्रीडा स्पर्धेमध्ये वसंत विमुक्त जाती माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा हरू येथील १९ वर्षीय खो-खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. याशिवाय याच शाळेतील १९ वर्षाखालील चारशे मीटर रनिंगमध्ये भावेश बावने, आठशे मीटर रनिंगमध्ये गोपाल वानखडे, तीन किलोमीटर रनिंग स्पर्धेमध्ये प्रणय टीचुकले तालुक्यात प्रथम आले. त्यामुळे या तिघांचीही जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. स्पर्धेमधील सर्व यशस्वी विद्यार्थी व प्रशिक्षक शिक्षकांचे प्राचार्य राजेंद्र मांगे, बंडू पाटील सरतापे यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.

थांबायचं नाव घेत नाही अवैध वाळूचा गोरखधंदा


सह्याद्री चौफेर : रवी घुमे 

मारेगाव : तालुक्यातील होणाऱ्या अवैध रेती तस्करीवर स्थानिक प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात चिंचमंडळ परिसरात दोन ट्रॅक्टर वर कारवाई केली होती. परंतु मारेगाव तालुक्यातील अजूनही रेती तस्करी वर पाहिजेत तसे नियंत्रण स्थानिक प्रशासन आणू शकले नसल्याचे बोलल्या जात आहे. 

मारेगाव शहरासह ग्रामीण भागात रेती चोरीला उधाण आले असून रात्रीचा फायदा घेत कोसारा, शिवणी, चनोडा, चिंचमंडळ, आपटी, मुकटा या रेती घाटातून खुलेआम रेती तस्करी केले जाते हे सर्वश्रुत असतांना देखील यावर का अंकुश ठेवण्यात प्रशासन सफसेल फेल होत आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
        (चिंचमंडळ येथील शेतातून रस्ता केल्याचे क्षणचित्रे)

बरं याबाबत असेही एकावयास मिळते की, गांव राजकीय पुढारी यात गुंतल्याचे, शुब्र घालून त्या आड गोरखधंदा चालवायचा. या धंद्यात आपापल्या परिसरातील आपला परिसर वाटून घेत "तू इकडे नको, मी तिकडे नाही" अशी चर्चा आहे. जर एल ओ सी झालंच तर त्याचा 'करेक्ट कार्यक्रम' करून गुपचूप राहायचं. परंतु यात बहुतांश हात ओले असल्याने नेमका कारवाईचा बडगा कसा राबवायचा, हा पेच'च आहे. याआधी अनेक थरारक प्रसंग अधिकाऱ्यांनी झेललेले आहेत. त्यामुळे ही भीतीच, माध्यमातून आपण वाचलेले आहे.

तूर्तास तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असून स्थानिक प्रशासन याला आळा घालू शकत नाही. त्यामुळे गरजूना वाळू मिळणं अवघड झाले असून तगड्या भावात हिच रेती घ्यावी लागत असून लाभार्थ्यांचे बजेट बिघडले आहे. त्यामुळे रेती तस्करी, अवैध दारू व तस्करांवर अंकुश ठेवायचे असेल तर "ड्रोन" चा वापर केल्या शिवाय मार्ग नाही, राज्यात अवैध तस्करी वर काही ठिकाणी याचा वापर केला गेला असून तोच प्रयोग मारेगाव तालुक्यात केला तर निश्चित अवैध धंद्यावर आळा बसेल...!

निधन वार्ता..स्वाती नवघडे यांचे दुःखद निधन

सह्याद्री चौफेर | न्यूज 

नागभिड : दै.लोकमत चे नागभिड तालुका प्रतिनिधी घनश्याम नवघडे यांची कन्या स्वाती नवघडे (वय २२वर्ष ) हिचे आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अकस्मात निधन झाले. या घटनेने नवघडे कुटुंबावर एकाएकी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना यातून सावरण्याची शक्ती प्रदान करो... हीच प्रार्थना. म.रा.मराठी पत्रकार संघ तळोधी (बा.) यांचे कडून भावपुर्ण श्रद्धांजली.

राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार- कौशल्य विकास मंत्री

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

मुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छूक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या मेळाव्यात विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी सहभाग घेऊन ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या.

राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सकाळी मेळाव्याचे उद्घाटन झाले. राज्य शासनाने ७५ हजार सरकारी नोकरी देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील, असे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, विभागाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, कौशल्य विकास उपायुक्त डी. डी. पवार, उपायुक्त शालिक पवार, माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांच्यासह विविध कंपन्या, आर्थिक विकास महामंडळे यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

 मंत्री श्री. लोढा म्हणाले की, युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम राबवीत आहे. नुकतेच १ लाख २५ हजार रोजगार देण्यासाठी विविध कंपन्यांबरोबर विभागाने सामंजस्य करार केले आहेत. रोजगार मेळावा उपक्रमालाही चालना देण्यात येत असून येत्या काळात राज्यभरात असे ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे. उद्योग आणि बेरोजगार उमेदवारांमध्ये समन्वय साधण्यासाठी येत्या दोन महिन्यात मोबाईलवर महास्वयम ॲप उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी घोषित केले.

कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. म्हणाले की, रोजगार मेळाव्यांसाठी आतापर्यंत 60 हजार रुपयांची खर्च मर्यादा होती, ती आता शासनाने ५ लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे. यामुळे रोजगार मेळावे प्रभावी पद्धतीने आयोजित करणे शक्य होत आहे. रोजगार मेळाव्यांमध्ये नोकऱ्यांबरोबरच स्वयंरोजगारासाठी शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजनांची माहिती, उमेदवारांचे कौन्सिलिंग असे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.

            मेळाव्यात विविध कंपन्यांचा सहभाग
टीएनएस एंटरप्राइजेस, फास्टट्रॅक मॅनेजमेंट सर्विसेस, बझवर्क्स बिजनेस सर्विसेस, इम्पेरेटिव्ह बिझनेस, युवाशक्ती स्किल इंडिया, स्मार्टस्टार्ट जॉब सोल्युशन्स, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, स्पॉटलाईट, इनोवेशन कम्स जॉईन्टली, बीव्हीजी इंडिया लिमिटेड, शार्प एचआरडी सर्विस, मॅट्रिक्स कॅड अकॅडमी, युनिकॉर्न इन्फोटेक, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्विसेस, करिअर एन्ट्री, टीम हायर, क्रिस्टल सोल्युशन्स लिमिटेड, पियानो प्रेसिडेल या कंपन्यांनी त्यांच्याकडील विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

याबरोबरच बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन देण्याकरिता मेळाव्यामध्ये संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ यांनी सहभागी होत उमेदवारांना विविध योजनांची माहिती दिली.

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांचेही स्टॉल मेळाव्यामध्ये होते. त्यांच्या मार्फत कौशल्य विकास आणि रोजगारविषयक विविध योजनांची माहिती देण्यात आली.

वॉर्ड बॉयपासून सायंटिस्ट पदापर्यंतच्या रिक्त जागांसाठी मुलाखती
           
दहावी-बारावी पास-नापास उमेदवार, पदविकाधारक, पदवीधारक, विविध शाखांमधील अभियंते, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी, मॅनेजमेंट, आयटी, विज्ञान पदवीधारक, मीडिया आणि एंटरटेनमेंट अशा विविध क्षेत्रातील नोकऱ्या या मेळाव्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या. बँक जॉब, एचआर एडमिन, आयटी जॉब्स, बीपीओ, बँक ऑफिसर, सेल्स ऑफिसर, पायथॉन डेव्हलपर, सेल्स एक्झिक्यूटिव्ह, टेली कॉलर, स्टोअर इन्चार्ज, कस्टमर सर्विस, फोन बँकिंग, ब्रांच बँकिंग, फॅसिलिटी अटेंडंट, हाउसकीपिंग, वॉर्ड बॉय, पॅन्ट्री बॉय, डाटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सायंटिस्ट, सीनियर सायंटिस्ट, कारपेंटर, वेल्डर, सिक्युरिटी गार्ड, ऑफिस बॉय, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, प्लंबर अशा विविध पदांसाठी या कंपन्यांनी मुलाखती घेतल्या.

शेलोडी शाळेतील शिक्षकाची शाळेला दांडी


सह्याद्री चौफेर | चेतन पवार 
8806632763

दारव्हा : तालुक्यातील शेलोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक मुख्यालयी हजर न राहता नेहमीच शाळेत वेळेवर न येता मनमर्जिने उशिराने येतात.शाळेतील शिक्षक उशिराने येऊन,तासिकेच्या वेळेत कार्यालयात बसून राहतात.यासंदर्भात पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्याकडे या आधी तक्रार करण्यात आल्यानंतरही शिक्षकांवर कुठल्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.याबाबत वारंवार तोंडी तक्रारी होत असल्याने दि २८ नोव्हेंबर रोजी काही पत्रकार व ग्रामस्थ शाळेत दाखल झाले असता,दुपारचे १२वाजता शाळेतील विद्यार्थी हे शाळेबाहेर फिरत असल्याचे आढळून आले.तसेच शाळेचा परिसर हा वाहतुकीचा परिसर असल्याने याठिकाणी अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण?या संदर्भात विचारणा करण्यासाठी कार्यालयात गेले असताना शाळेत कार्यरत वादग्रस्त शिक्षक अत्यंत उर्मट भाषेत उत्तर देत तुम्हाला शाळेत येण्याचा कुठलाही अधिकार नाही.तुम्ही आम्हाला विचारणारे कोण?तुम्ही आमचं काहीही करू शकत नाही. बातमी प्रसिद्ध केल्यास,पोलिस स्टेशन ला तक्रार करून अटक करायला लावू.या भाषेत धमकावत खोटे गुन्हे दाखल करण्याचा धमक्या दिल्याची तक्रार पत्रकार ईश्वर राठोड यांनी गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे दाखल केली आहे.

शेलोडी येथील शाळेत नेहमीच असे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे काही दिवसापूर्वीच शेलोडी शाळेतील विद्यार्थ्यांची पंचायत समितीच्या कार्यालयात शाळा भरविण्यात आली होती. वारंवार तक्रारी करुन व गटशिक्षण अधीकारी यांच्या कार्यालयात विद्यार्थांची शाळा भरविण्यात आल्या नंतर ही संबंधित शिक्षकावर कारवाई होत नसल्याने प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रा.प. सदस्य,पत्रकारांन ना जर शाळेत न येण्याची तंबी शिक्षक देत असेल तर शिक्षकांच्या मनमानी कारभाराला आळा घालून कारवाई होणार का व नेहमीच वादग्रस्त असणार्‍या शिक्षकाची बदली करण्याची मागणी होत आहे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे.