शेलू पुरड शिवारात वाघांचे दर्शन, शेतकरी मजूर भयभीत

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तालुक्यात मागील काही दिवसापासून वाघांचे दर्शन होऊ लागले असून,वन्यजीवावर झडप घेता घेता आता मानवावर हल्ला करून ठार करू लागले. याचे ताजे उदाहरण कोलार येथील गुराख्याला ठार मारले,ब्राम्हणी येथील टॉवर चे काम करणाऱ्या मजुराला गंभीर जखमी केले तर, गेल्या आठवड्यात भुरकी येथील 25 वर्षीय युवा शेतकरी असे अनेक प्रकरण लक्षात घेता येईल. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष होण्यापूर्वी या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेलू येथील सरपंच उमेश आसुटकर, राजु मालेकर, शंकर मोहितकर, विनोद आसुटकर, तुकाराम वासेकर यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत वनपरीक्षेत्र अधिकारी वणी यांना दिलेल्या निवेदनातून केली.

तालुक्यातील वरील घटना ताज्या असतांना आज दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी सहा वाजता शेलू येथील शेतकऱ्यांना शेलू पुरड शिवारात दोन वाघांचे दर्शन झालेत. त्यात एक वाघ एक पिलू असा समावेश असून पुन्हा दहा ते अकरा वाजता त्याच परिसरात टॉवर चे काम करणाऱ्या कामगारांना तीन वाघ दिसले. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांना हातातील कामं सोडून वाघाच्या भीतीपोटी घराची वाट धरावी लागली. दिवसेंदिवस वाघांचे हल्ले वाढले असून शेलू (बु), पुरड येथील गावकरी भीतीच्या सावटात आले आहेत.

परिणामी या मुक्त वावर असणाऱ्या नरभक्षी वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी वनपरीक्षेत्र अधिकारी यांना करण्यात आली आहे. यावेळी शेलू (बु) पुरड परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

सरपंच, सदस्य होण्यासाठी 'इतकं' शिक्षण लागणार, ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय..!

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : मुंबई ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होण्यासाठी उमेदवार किमान सातवी पास असावा, असा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. गावगाडा चालवण्यासाठी शैक्षणिक अर्हतेची मर्यादा घालण्यात आली आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने सरपंच अथवा सदस्यांचा शैक्षणिक अर्हतेबाबत आदेश जारी केला आहे. त्यानुसार, 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेली व्यक्तीस सरपंच अथवा सदस्य होण्यासाठी किमान सातवी पास असणे आवश्यक आहे.
प्रमाणपत्र द्यावं लागणार

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना, सातवी पास असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र इच्छूक उमेदवारांना सादर करावे लागणार आहे. अर्थात, ज्यांचा जन्म 1995 पूर्वी झालेला असेल, त्यांना मात्र ही शैक्षणिक अट लागू नसेल.

दरम्यान, राज्यात सध्या सुमारे 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरु असून, सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची रणधुमाळी चालली आहे. त्यामुळे ऐन थंडीत गावचे राजकीय वातावरण तापले आहे. सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने चुरस आणखी वाढली आहे.

पहिली ते आठवीचे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकले

सह्याद्री चौफेर | न्यूज 

नवी दिल्ली : पहिली ते दहावीपर्यंतच्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेतून केंद्र सरकारमार्फत दरवर्षी एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज भरून घेणे व पडताळणी करून केंद्राकडे पाठविण्याची जबाबदारी शिक्षण संचालक (योजना) कार्यालयाकडे दिली होती. सुरुवातीला अत्यल्प अर्ज भरले गेल्याने संचालनालयाने ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवून दिली. त्यानंतर पुन्हा ५ नाेव्हेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली. 

मात्र, आता विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज शाळास्तरावर प्रमाणित झाल्यानंतर नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अचानक अर्ज रद्द करण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले. या परिपत्रकानुसार पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना आरटीईनुसार मोफत शिक्षणाचा लाभ दिला जातो. त्यामुळे त्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाऊ शकत नाही. केवळ नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांचेच अर्ज प्रमाणित करून केंद्र शासनाकडे पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या. यामुळे महाराष्ट्रातील पहिली ते आठवीचे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकले आहेत.

मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख विद्यार्थ्यांना फटका

अल्पसंख्याक वर्गवारीतील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारसी व जैन समाजातील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीकरिता धर्मनिहाय कोटा दोन लाख ८५ हजार ४५१ इतका निश्चित करून देण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत या योजनेत 'फ्रेश' विद्यार्थ्यांचे ३ लाख ८२ हजार ५१४ अर्ज प्राप्त झाले.

मागील वर्षी तब्बल ७ लाख ८४ हजार १५१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली होती. त्यांना यावर्षी 'रिनिवल'मधून अर्ज करणे आवश्यक होते. नूतनीकरणासाठी यंदा सात लाख २४ हजार ४९५ अर्ज एनएसपी पोर्टलवर भरण्यात आले. ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर अशी मुदतवाढ मिळाल्यानंतर अर्जांच्या संख्येत आणखी वाढ झाली. मात्र यातील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक अर्ज नामंजूर करण्यात येत आहेत.


बल्‍लारपूर येथील दुर्घटनेतील मृतकेच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतून ५ लाखाचे अर्थसहाय्य जाहीर


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

बल्लारपूर : बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्‍या कुंटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्‍याचप्रमाणे जखमींवर योग्‍य उपचार शासकीय खर्चाने करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत.
रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्‍थळाला भेट दिली व सामान्‍य रुग्‍णालय चंद्रपूर येथे भेट देत जखमींची विचारपूस देखील केली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याशी संपर्क साधुन मृतकाच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रु.चे अर्थसहाय्य प्रदान करण्‍याची विनंती केली. त्‍यानुसार मुख्‍यमंत्र्यांनी ५ लाख रु.चे अर्थसहाय्य मृतकेच्‍या कुटूंबियांना जाहीर केले आहे.

पत्रकारांवर हल्ला केल्यास ३ वर्षाचा तुरुंगवास : डी. टी. आंबेगावे


सह्याद्री चौफेर | न्यूज 

महाड, रायगड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची महाड तालुका कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे व कोकण युवाध्यक्ष सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जाहीर करण्यात आली.
महाड तालुका अध्यक्ष ॲड. स्वप्नील ढवण, तालुका उपाध्यक्ष विशाल मोहिते, सचिव समीर पवार, खजिनदार अभिजित ढाणीपकर, संघटक राकेश देशमुख, सहसंघटक सुयोग जाधव, कार्याध्यक्ष मिलिंद पवार, सदस्य नितेश पवार, सुमेध साठे, आदेश प्रसाद, सौरभ बनकर, सचिन चांदोरकर, सतीश मेहता, निलेश शिंदे, संदेश चौधरी आदी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

 याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कोकण युवा संपर्क प्रमुख सागर पवार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम, माणगाव तालुका अध्यक्ष सचिन पवार, उपाध्यक्ष मंगेश मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी पत्रकारांची आचारसंहिता व पत्रकारांच्या अंगी कोणते गुण असावेत? या विषयावर मार्गदर्शन केले. पत्रकारांवर हल्ले करणाऱ्याला, हिंसाचार करणाऱ्याला अथवा तशी चिथावणी देणाऱ्याला 3 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड अशी पत्रकार संरक्षण कायद्यात तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या एकाही पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल होऊ देणार नाही. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबासाठी संघटना अहोरात्र कार्य करीत आहे त्यामुळे पत्रकारांनी नेहमी निःपक्षपातीपणे बातमी प्रसिद्ध करावी असे प्रतिपादन केले.
यावेळी कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कोकण युवा संपर्क प्रमुख सागर पवार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. महाड तालुका अध्यक्ष ॲड स्वप्नील ढवण यांनी आभार मानले.