वसंत जिनींग निवडणूक: परिवर्तन पॅनलला वाढता प्रतिसाद माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नियोजनाचा होणार फायदा


सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : वसंत जिनिंगच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आणि उभे ठाकलेल्या पॅनलची रंगत वाढायला लागली असून परिवर्तन पॅनलला मतदारांचा वाढता कौल पाहता इतर पॅनलचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फीच होते की, काय असे वाटायला लागले आहे.
      
वणी विधानसभा मतदार संघातील सर्वात महत्वाची आणि राजकीय दृष्टया फायदेमंद असलेल्या वसंत जिनिंगची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. या निवडणुकीत एकूण चार पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहे. यात काँग्रेस समर्थित परिवर्तन पॅनल, सध्यास्थितीत सत्तारुढ असलेले अ‍ॅड. देविदास काळे गटाचे जय सहकार पॅनल, भाजप समर्थित शेतकरी एकता परिवर्तन पॅनल तर कम्युनिस्ट आणि शेतकरी संघटना समर्थित वसंत जिनींग बचाव पॅनल असे चार पॅनल मध्ये चौरंगी लढत आहे. यातील काँग्रेसचे असलेले परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांचा 'डोअर टू डोअर' जाऊन प्रचार सुरु आहे. मा. आमदार कासावार यांच्या योग्य नियोजनाचा यावेळी या पॅनलला फायदा होतांना दिसत आहे.

विशेष उल्लेखनीय की, ग्रामीण भागामध्ये काँग्रेसची पाळेमुळे रुजून असल्यामुळे आणि मागील काही निवडणुकीतील कटू अनुभव पाहता यावेळी एकदिलाने काम करतांना दिसत आहे. काँग्रेसमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने जरी दोन गट पडले असले तरी मोठया प्रमाणात नेते परिवर्तन पॅनल सोबत असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातही काँग्रेस कार्यकर्ते एकदिलाने परिवर्तन पॅनल सोबत एकजुटीने फिरतांना दिसून येत असून कार्यकर्त्यांच्या भरोशावरच ही निवडणूक जिंकण्याचा आशावाद काँग्रेस नेते माजी आमदार वामनराव कासावार यांनी व्यक्त केला.

नहरात वाहुन गेलेल्या युवकाचा दोन दिवसानंतर, व्याहाड बुज नहराजवळ मिळाला मृत्युदेह....


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : जनकापुर येथे आजीच्या अंत्यविधीसाठी आलेला युवक गोसेखुर्द नहराच्या पाण्यात वाहुन गेल्याची घटना रविवारी दि 30 आक्टो. पाथरी पोलीस ठाणे हद्दीत घडली होती.
मृतक चेतन रवींद्र कुमरे रा. चारगांव येथील रहिवासी असून.रविवारी दिवसभर त्याचा शोध घेण्यात आला परंतु त्याचा शोध लागला नाव्हता. सोमवारी सकाळ पासुन नहरात बोटीने शोधमोहीम राबविण्यात आले परंतु,सोमवारी पण उशिरापर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता, त्यामुळे मंगळवारी पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आले. मंगळवारला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान व्याहाड बुज. ते कापसी रोडवरील नागोबा देवस्थान नहराजवळ त्याचा मृत्युदेह तरंगत असताना मिळाला.तब्बल दोन दिवसानंतर चेतन कुमरेचा मृत्युदेह मिळाला.चेतन हा आजीच्या अत्यंविधीसाठी संपूर्ण परिवारासोबत जनकापुर येथे आला होता.

अंत्यसंस्कारानंतर तो निलकंठ गेडाम, कुणाल धुर्वे, शैलेश धुर्वे सोबतच काही लोकासोबत आंघोळ करण्यासाठी गोसेखुर्द नहराजवळ गेला होता.प्रज्जवल मडावी हा युवक सुरुवातीला नहरात उतरला,परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने वाहू लागला,त्याला वाचवण्यासाठी काही युवकांनी पाण्यात उडी घेतली,त्याच वेळी चेतनने सुध्दा पाण्यात उडी घेतली पण तो पाण्यात वाहु लागला.त्याला वाचविण्यात सोबतच्या युवकांना यश आले नाही.

 सदर नहरात आजपर्यंत पाच ते सहा व्यक्तीचा तर अनेक वन्यप्राण्यांच्या जीव सुध्दा गेला असल्याने यासाठी किमान पाचशे मीटर वर पायऱ्यांची तर प्रत्येक गावालगत धुणेघाठ बांधण्यात यावे अशी मागणी सावली पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांनी केली आहे. पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहोळ,यांच्या मार्गदर्शनात पाथरी पोलीस स्टेशनने शोध मोहीम राबविली,घटनेचा पुढील तपास सुरू आहे.मात्र चेतनचा दुर्दैवी मृत्यूने चारगाव येथे शोककळा पसरली आहे.

वन्यजीवांमधील आजाराचे जागतिक दर्जाचे संशोधन नागपूरमध्ये व्हावे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

नागपूर : जगामध्ये मोठ्या प्रमाणात प्राण्यांपासून मनुष्यांमध्ये जाणारे आजार वाढत आहे. कोरोना सारख्या आजाराने त्याची दृश्य भयानकता जगाला दाखवली आहे त्यामुळे वेळीच प्रतिबंध करण्यासाठी जागतिक दर्जाचे या संदर्भातील संशोधन नागपुरात व्हावे, अशा शुभेच्छा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सोमवारी येथे दिल्या.

नागपूर (गोरेवाडा) येथील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन वनमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. ईशान्य भारतासह अन्य भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील या संशोधन केंद्राचे उद्घाटन आज त्यांनी केले. यावेळी संबोधित करताना त्यांनी जागतिक दर्जाचे संशोधन या ठिकाणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणच्या वन्यजीव संशोधन केंद्रात होत असलेले हे संशोधन महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. वन्यजीवांपासून माणसांमध्ये येणाऱ्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आता मनुष्याचे आणि प्राण्यांचे वेगळे आरोग्य न बघता दोघांचेही एकच आरोग्य अशा पद्धतीने याकडे बघणे आवश्यक आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यालाच अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. मात्र या संशोधन क्षेत्रात भारताची भरारी अजून बाकी आहे. ही जबाबदारी आता नागपूरच्या केंद्राने घ्यावी, यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, या संशोधन केंद्राच्या सर्व अडचणी दूर करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी भंडारा -गोंदीयाचे खासदार सुनील मेंढे,माफसुचे कुलगुरु डॉ.आशिष पातूरकर, वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ.एस.व्ही. उपाध्ये, प्रकल्पाचे सल्लागार डॉ. अरुण कुमार रावत, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य वन्य संरक्षक वाय एल पी राव, आदींची यावेळी उपस्थिती होती.

शासनाचे शंभर टक्के अनुदान आम्हाला द्या- अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी


   

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : माहे जुलै ऑगस्ट 2022 मध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे. परंतु प्रती हेक्टरी अनुदान नावाने आमच्या खात्यात अजूनपावेतो पूर्ण मिळाली नाही. ते शंभर टक्के अनुदान आम्हाला मिळावे अशा आशयचे निवेदन तहसीलदार पुंडे यांना देण्यात आले.
यावेळी मागणी कर्ते प्रवीण बलकी, योगीराज बलकी, गणेश धोबे, किशोर खंडाळकर, राजू डावे,अविनाश बलकी,संजय बलकी,मनोज निखाडे,रविंद्र बोढे,हरी परचाके,सुभाष तिखट, प्रफुल जुनगरी,अनिकेत सोनेकर, दामोदर किनाके, रुपेश भरणे, यशवंत भरणे, राहुल किनाके, नितीन खंडाळकर, प्रशांत वाढई, वासुदेव परचाके, रविकांत वाढई यांची उपस्थिती होती. तालुक्यातील अतिवृष्टीबाधितांना सण 2022 या खरीप हंगामात माहे जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीने व पूर बुडीने अक्षरशः शेती पाण्याखाली जावून मोठे नुकसान झाले. यासाठी शासनाने अनुदान देण्याचं घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार अशी आशा असतांना प्रशासन स्तरावर एकमेकांवर चालढकल करून काय कागदीघोडे नाचवले हे कळायला मार्ग नसून दिवाळी पूर्वी अनुदान खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली हे खरं असतांना मात्र, शंभर टक्के मदत न मिळता तटपुंजे अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांनी निवेदनातून आम्हाला शासनाचे शंभर टक्के मंजूर अनुदान देण्यात यावी अशी आग्रही मागणी केली, शिवाय सदर बाबीस दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

त्यामुळे आता निवेदनाची दखल घेतील का? दोषीवर कारवाई होईल का? याकडे लाखापूर, आकापूर व डोलडोंगरगांव सह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सुशिक्षित बेरोजगारांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन


सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके

नागभिड : प्रथम एज्युकेशन फाउंडेशन तर्फे युथनेट प्रोग्राम अंतर्गत पळसगाव (खुर्द) येथे सुशिक्षित बेरोजगार 14 ते 35 वयोगटातील युवक युवतींना मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या ज्योती मडावी यांनी सदर शिबिरामध्ये युवक युतींना निशुल्क प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले.

या शिबिरात ओवाळा, जनकापूर, पळसगाव, येथील युवक-युवती सहभागी झाले होते. या गावातील युवक युवतीनी येऊन आपले नाव नोंदणी करून त्यांचे मोठ्या प्रमाणात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्यांना कोर्सची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे टूल प्रदर्शनीला पळसगाव (खुर्द)चे सरपंच उपसरपंच तसेच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी तिन गावाचे स्वयंसेवक उपस्थित होते तसेच या प्रशिक्षण शिबिराला प्रामुख्याने पळसगावचे सरपंच निरज सिद्धमसेट्टीवार, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, स्वयंसेवक शितल गणवीर, ग्रामपंचायत कर्मचारी हेमंत खोब्रागडे यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रशिक्षण शिबिरामुळे परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना निःशुल्क माहिती मिळत असल्यामुळे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.