पदवीधरांनो एका "क्लिक" वर नाव नोंद करा - मारोती गौरकार

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : येत्या काही दिवसात पदवीधर मतदार संघाची निवडणूक होऊ घातलीय. यात केवळ पदवीधर असणाऱ्यांनाच मतदार करता येणार आहे. अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यातील पदवीधरांना मतदार करायचे आहे. शासनाने जुनी यादी रद्द केली असल्याने सर्वच पदवीधरांना नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. या करिता तालुका अध्यक्ष मारोती गौरकार काँग्रेस कमिटी मारेगाव यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील पदवीधरांना आवाहन करण्यात येत आहे की, आपले नाव पदवीधर मतदार संघात नोंदणी करावे. त्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdWIjvxgd1NB_-qeM8Sf-3LrQ9Fk33lysqSwDEz1N4zprAv-g/viewform या दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपलं नाव भरून 
घेण्यात यावे. आपलं नोंद करतांना पासपोर्ट फोटो, सही, पदवी मार्कशीट, आणि आधार कार्ड जवळ असणे आवश्यक असून मतदार नोंदणीसाठी 1 नोव्हेंबर 2019 अगोदर पदवी असणे महत्वाचे आहे. सदर माहिती ही गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

ग्रामीण व शहरी भागातील सर्व क्षेत्रातील पदवीधरांना नौकरी विषयक, शेती विषयक, उद्योग विषयक, शासनाच्या योजनांचा लाभ पोहचवण्याकरिता व सर्व पदवीधरांना दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना न्याय देण्याकरिता पदवीधरांच्या सशक्तीकरणाकरिता संघटित होण्याची वेळ आली असून या अनुषंगाने एक होणं गरजेचे आहे. त्यासाठी आपली जबाबदारी टाळू नका आपल्या विभागातील पदवीधर मतदार संघांसाठी मतदार नोंदणी सुरु झाली आहे. अर्ज क्र.18 भरा आणि आजच पदवीधर मतदार व्हा. अधिक माहितीकरिता 9881557165,95275 30631,9552914882 संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले. 

रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरीबाबत परिवहन आयुक्तांनी घेतला आढावा

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीत मुख्यत्वे परिवहन विभागातील दैनंदिन प्रशासकीय कामकाज व रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरी या दोन बाबींवर प्रकाश टाकण्यात आला.

बैठकीला नागपूर(शहर/ग्रामीण)प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयसिंह चव्हाण, भंडाऱ्याचे राजेंद्र वर्मा, चंद्रपूरचे किरण मोरे, गोंदियाचे राजवर्धन करपे, वर्धाचे समीर शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 राज्यात परिवहन विभागातील प्रशासकीय कामकाज गतिमान, सुलभ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने बहुतांश सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. सदर ऑनलाईन सेवांबाबत सेवेचे लाभार्थी म्हणजेच अर्जदार यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद साध्य होतो की नाही यांची प्रत्यक्ष परिणामकारकता तपासण्याविषयी निर्देश, त्यासोबतच सेवा हमी कायद्याअंतर्गत 14 सेवांचा आढावा घेऊन कोणतेही अर्ज प्रलंबित राहणार नाही याविषयीच्या सूचना परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिल्या.
परिवहन आयुक्त श्री. भिमनवार यांनी मोटार वाहन कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी म्हणजे दंड वसुली व संख्यात्मक वाढ हे नसून अपघाताचे प्रमाण कमी करणे व रस्त्यावरील सुरक्षेबाबत गुणात्मक बदल घडवून आणणे याविषयी मार्गदर्शन केले. थोडक्यात विभागाच्या कामकाजाविषयी सर्वसामान्य जनतेला सकारात्मक वाटण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी असे निर्देश दिले.

चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात भेटीदरम्यान परिवहन आयुक्त श्री. भिमनवार यांनी गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी अद्ययावत यंत्रणासह सुसज्ज अशा तपासणी वाहनाचे निरीक्षण केले. सदर वाहन विशेष केंद्रीय सहाय्य योजनेच्या माध्यमातून उपलब्ध केल्याबद्दल गडचिरोली चे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयसिंह चव्हाण यांचे कौतुक केले.

सणा-सुदीच्या दिवसात जास्त गोड-तेलकट खाणं झालं ? असे करा शरीराचे डिटॉक्स

सह्याद्री चौफेर | न्यूज 

सणांच्या दिवसांत खूप जास्त तळलेले पदार्थ आणि खूप मिठाई खाल्याने बऱ्याच वेळेस आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं. ऍसिडिटी, अपचन आणि ब्लोटिंगचा त्रासही होऊ शकतो. अशा वेळी शरीराला डिटॉक्स करण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकतो.
लिंबू पाणी – शरीर डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे कार्य करते. याचे सेवन केल्याने ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात नियमितपणे लिंबू पाण्याचे सेवन करावे._
फळं – फळांमध्ये अनेक पोषक तत्वं असतात. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स हे मुबलक प्रमाणात असतात. तसेच त्यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्मही असतात. तुम्ही सॅलॅड किंवा ज्यूसच्या स्वरूपात फळांचे सेवन करू शकता. अन्यथा ती स्वच्छ धुवून कच्चीही खाऊ शकता. फळं खाल्लायने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
दही – दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिआ असतात. ते आतडे स्वस्थ व निरोगी राखण्याचे काम करतात. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासही दह्यामुळे मदत होते. दह्याचे सेवन केल्याने ब्लोटिंग आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
ग्रीन टी – ग्रीन टी मध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. ते शरीराचे फ्री- रेडिकल्सपासून होणारे नुकसान रोखतात व संरक्षण करतात. ग्रीन टी चे नियमित सेवन केल्यास आपले शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

ग्रंथपालन परीक्षेच्या फेर गुणमोजणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, राज्यात एकूण ७०.१३ टक्के निकाल लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी करावयाची आहे. त्या विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालकांनी केले आहे.

सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा ग्रंथालय संचालनालयामार्फत घेण्यात येते. या परीक्षेची गुणपत्रिका http://www.dol.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका १४ नोव्हेंबरनंतर मिळणार आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी करावयाची आहे, त्यांनी प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी १० रूपये याप्रमाणे शुल्क व अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पाठवावेत. यानंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाही, असे ग्रंथालय संचालकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कळमना येथे विषारी द्रव्य प्राशन करून इसमाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | नितीन वनकर 

वणी : तालुक्यातील मौजा कळमना (बु) येथील ऐका 35 वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य प्राशन केले, त्यातच त्याचा मृत्यू झाला ही घटना दि.26 ऑक्टोबर 2022 रोजी अंदाजे दुपारी 2 वाजताचे दरम्यान घडली.

गणेश हरिदास खंदरे रा. कळमना (बु) असे मृतकाचे नाव आहे. स्थानिक चौकशी केली असता घरगुती वादामुळे विष घेतल्याचे समजते. मृतक भूमिहीन असून त्याचे पाठीमागे पत्नी सुनीता, मुलगा निदान्त व मुलगी दुर्गा असा आप्त परिवार आहे.