आरोग्य केंद्र हे सेवेचे केंद्र व्हावे – पालकमंत्री वडेट्टीवार                                          


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : गोरगरीब जनतेसाठी त्या त्या परिसरातील शासकीय आरोग्य केंद्र हे आरोग्याचे मंदीर असते. वेदना घेऊन आलेला रुग्ण डॉक्टरांच्या उपचारानंतर बरा होत असला तरी त्याला मिळणा-या चांगल्या वर्तणुकीने तो 50 टक्के आधीच बरा होऊ शकतो. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी हे सेवेचे केंद्र व्हावे, अशी आशा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि कोरपना तालुक्यातील नांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातून आमदार सुभाष धोटे हे सुध्दा दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते.

अनेक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या चार प्राथमिक आरोग्य केंद्राचे आज (दि.31) राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, या चार पीएचसी मध्ये नांदा (ता. कोरपना), भंगाराम-तळोधी (ता. गोंडपिपरी), विरुर स्टेशन (ता. राजुरा) आणि शेणगाव (ता. जिवती) चा समावेश आहे. जिल्ह्यातील आणखी पाच नवीन आरोग्य केंद्राचे लोकार्पण लवकरच केले जाईल. या आरोग्य केंद्रात मॉड्युलर शस्त्रक्रिया विभागासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच जिल्ह्यात आरोग्य विभागात रिक्त असलेल्या पदांचा प्रश्न तातडीने सोडवावा.
कोरोनाकाळात संपूर्ण जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. जिल्ह्यात कँन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असून त्यासाठी खर्रा आणि तंबाखूचे सेवन कारणीभुत आहे. त्यामुळे याबाबत कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे. व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीकरीता मंत्रीमंडळासमोर हा विषय मांडला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कॅन्सरच्या निदानासाठी तातडीने स्क्रिनिंग करा : आरोग्यमंत्री टोपे  

 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी कँन्सरच्या वाढत्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली असून प्राथमिक स्तरावर स्क्रिनिंग झाले तर वेळेवर योग्य उपचार मिळून मोठा धोका टळू शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने कँन्सरचे निदान करण्यासाठी तातडीने स्क्रिनिंग करावे, अशा सुचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

पुढे श्री. टोपे म्हणाले, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वेगवेगळ्या ठिकाणी बसून चंद्रपूर जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्राचे एकाच वेळी लोकार्पण होत आहे, ही आनंदाची बाब आहे. राज्यात सद्यस्थितीत 1839 प्रा. आ. कें. असून 10673 उपकेंद्र आहेत. या माध्यमातून आरोग्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. संसर्गजन्य रोग नियंत्रण तपासणी नियमित होत असली तरी असंसर्गजन्य रोगांमुळे मृत्युचे प्रमाण वाढले आहे. मानसिक आरोग्य, दंत, नाक-कान-घसा आदी 13 प्रकारच्या सेवा उपकेंद्रातून दिल्या जातात. त्यामुळे या उपकेंद्रावर समुदाय आरोग्य अधिका-याची 100 टक्के पदे भरावी. तसेच आशा स्वयंसेविका आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांचे गावागावात नियमित भेटी होतात की नाही, याबाबत जिल्हा आरोग्य अधिका-यांनी लक्ष द्यावे.
एखाद्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसेल तर अशा परिस्थितीत खाजगी डॉक्टरांची सेवा शासकीय यंत्रणेत घेऊ शकतो, तसा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठवावा. चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या आणि अंतर लक्षात घेता जिल्ह्यात आणखी प्रा. आ. कें. व उपकेंद्राची आवश्यकता असल्यास तशी मागणी करावी. जिल्ह्याला आरोग्याविषयक सर्व बाबी देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे श्री. टोपे यांनी सांगितले.

यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी मांडवा आणि पाटण येथे प्रा.आ.केंद्राच्या नवीन इमारतीची तसेच तालुका आरोग्य अधिका-यासह इतर रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी आरोग्य मंत्र्यांकडे केली.

कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी, संबंधित प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, नर्स, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह गावकरी त्या त्या ठिकाणी उपस्थित होते.

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

सह्याद्री | चौफेर न्यूज 

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्र शासनाच्या एचएससीसी इंडिया लिमिटेड या सार्वजनिक उपक्रम कंपनीमार्फत महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणीचे काम सुरु असून येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात यावे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह एचएससीसीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री.देशमुख म्हणाले की, चंद्रपूर येथील बांधकामाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता यापूर्वीच देण्यात आली असून यानुसार काम सुरु आहे. एचएससीसी कंपनीची टर्न की तत्वावर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे बांधकाम नियोजित वेळेत पूर्ण करण्याबरोबरच पुढील 3 महिने यंत्रसामुग्री चाचणीसाठी (स्टॅबिलिटी) स्थिर कालावधी असा ठरविण्यात आला आहे.
 गेले काही दिवस कोविडमुळे बांधकाम कामावर परिणाम होत असला तरी आता मात्र बांधकामाच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. नेमून देण्यात आलेले काम वेळेत पूर्ण होण्यासाठी एचएससीसीच्या प्रतिनिधी यांनी वैद्यकीय शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण संचालक आणि उच्चाधिकारी समिती यांच्या सनियंत्रणात काम करण्याबाबतचे नियोजन करुन सप्टेंबर 2022 पर्यंत काम पूर्ण करावे, असे निर्देशही श्री.देशमुख यांनी दिले.

अधिकारी प्रभार न सोपवता राहतात गायब,जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : यवतमाळच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकारी गैरहजर असतात व दुर्गम भागाकडे विभागाचे दुर्लक्ष असते असा आरोप करीत झरी जामणी तालुक्यातील संतप्त सरपंचाने अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आरटीओ कार्यालयाबाहेर काढल्या. व ते इथेच न थांबता त्यांनी त्या खुर्च्या चार चाकी वाहनाने (कार) जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन तिथे जमा नेल्या व आरटीओ अधिकारी प्रभार न सोपवता गायब राहतात त्यामुळे नागरिकांची हेळसांड होते अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

झरीजामणी तालुक्यातील अहेरअल्ली ग्रामपंचायतचे सरपंच हितेश उर्फ छोटू राऊत हे सोमवारी दुपारी आरटीओ कार्यालयात गेले असता वरिष्ठ अधिकारी गैरहजर असल्याने त्यांनी हा त्रागा केला. झरीजामणी तालुका आदिवासी बहुल असून या भागात आरटीओ विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक समस्या निर्माण असून अपघातात कमालीची वाढ झाली आहे. याठिकाणी नियमित आरटीओ कॅम्प होत नाही. त्यामुळे वाहनांची नोंदणी, वाहनचालक परवाना व नूतनीकरण आदी कामे ठप्प पडली आहे. परिणामी नोंदणी नूतनीकरण न झालेली अनेक वाहने रस्त्यावर धावत आहेत. विनापरवाना वाहन देखील चालविल्या जात असल्याने अपघात वाढले आहे. त्यात ओव्हरलोड वाहतूक व तेलंगणा राज्यात गोवंश तस्करी व अन्य तस्करी करणारे अनियंत्रित भरधाव वाहने सुसाट धावत असल्याने लोकांचा जीव धोक्यात आला आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही कारवाई होत नाही अशी तक्रार सरपंच हितेश राऊत यांनी केली आहे. सोमवारी दुपारी आरटीओ कार्यालयात ते आले असता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दोघेही त्यांच्या कक्षात हजर नव्हते. विशेष म्हणजे त्यांच्या तक्रारींचे समाधान करण्यास कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने संतप्त सरपंच हितेश राऊत यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून दोघांच्याही खुर्च्या दालनाबाहेर काढल्या. वरिष्ठ अधिकारी कार्यालयात कुणालाही प्रभार न देता गैरहजर राहतात. झरी जामणी सारख्या दुर्गम भागातून नागरिकांना वाहनविषयक कामांसाठी आरटीओ कार्यालयात हेलपाटे खावे लागतात, नागरिकांच्या प्रश्नांचे कुठलेही समाधान याठिकाणी होत नसल्यानेच अधिकाऱ्यांच्या खुर्च्या दालनाबाहेर काढून त्या दोन्ही खुर्च्या वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन तिथे तालुक्यातील समस्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले अशी माहिती हितेश उर्फ छोटू राऊत यांनी दिली. 
अनोख्या कार्यातून नेहमीच चर्चेत

अहेरअल्लीचे युवा सरपंच हितेश राऊत यांनी जनसामान्यांच्या प्रश्नावरून आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी अनेकदा अनोखे कार्य केली. पाटणबोरी ते पाटण या रस्त्याची दुरवस्था आणि स्थानिक अभियंत्यांचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी या मार्गाने अभियंत्यांनी व बांधकाम ठेकेदारांनी परिवारासोबत प्रवास करून दाखवा व पाच हजार रुपये बक्षीस मिळवा या योजनेची जाहिरातच केली होती. पुसद येथे सरपंच परिषदेला संबोधित करणारे प्रशिक्षकच अज्ञानी असल्याचे त्यांनी उघड केले होते. तर अमरावती येथे सरपंच प्रशीक्षण परिषदेत सरपंचांनी केलेल्या प्रश्नाची प्रोसेडीग मध्ये नोंद करून संबोधित करणारे प्रशिक्षक द्वारा प्रश्नांचे निरसन होत नसल्यास आयएएस अधिकाऱ्यांकडून निरसन करण्यात यावे. अशा अनोख्या कार्यातून ते नेहमीच चर्चेत राहतात.
निवासी उपजिल्हाधिकारी यांनी काढली समजूत 

आदिवासीबहुल तालुक्यातील प्रश्नांची जाण असलेले युवा सरपंच हितेश राऊत यांनी केलेल्या आंदोलनाबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. त्यांची मागणी गांभीर्याने घेण्याची ग्वाही यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी सरपंच राऊत यांना दिली. शिवाय शासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्च्या भेट म्हणून स्वीकारण्याचे कुठलेही प्रावधान कायद्यात नाही. त्यामुळे या खुर्च्या साभार परिवहन विभागाला परत करण्यासही त्यांनी सांगितले. अखेर सरपंच राऊत यांनी समजूतदारी घेत त्या खुर्च्या साभार स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पोहोचत्या केल्या.


जिल्हा जात पडताळणी कार्यालयात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

सह्याद्री | चौफेर न्यूज 
 
नांदेड : अहिल्यादेवी होळकर यांनी शेतकऱ्यांसाठी कर माफी, शाळांच्या स्थापनेद्वारे विद्याप्रसार तसेच अंधश्रद्धा निवारण अशी अनेक समाजोद्धाराची कार्ये केली. न्यायनिष्ठ, दानशूर व अतिशय कर्तृत्ववान राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक 31 मे 2022 रोजी समितीचे उपायुक्त तथा सदस्य मा. श्री. ए. एम. शेंदारकर साहेबयांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी मा. श्री. आ. ब. कुंभारगावे साहेब, (संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव), श्रीमती सुनीता शिंदे मॅडम (पोलीस निरीक्षक), एस. एम. मुळे, एस. जे. रणभीरकर, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, बाबू कांबळे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होणवडजकर, अमोल वाकडे, संजय मंत्री लहानकर, अनिकेत वाघमारे, सुनिल पतंगे यांची उपस्थिती होती.


यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांचे यश, निकालात महिलांची बाजी

 
सह्याद्री | चौफेर न्यूज 

नवी दिल्‍ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण ६८५ उमेदवारांपैकी ६० हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास १० टक्के महाराष्ट्रातील आहेत. यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातूनही महिला उमेदवार पुढे आहेत. राज्यातून प्रियंवदा म्हडाळकर प्रथम तर अंजली श्रोत्रीय यांचा दूसरा क्रमांक आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार या दोघी १३ व्या आणि ४४ व्या क्रमांकावर आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष २०२१ च्या परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमधे महाराष्ट्रातील पाचपेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये प्रियंवदा म्हडाळकर (१३) अंजली श्रोत्रीय (४४), श्रध्दा गोमे (६०), शुभम अशोक भैसारे (९७), अंकित हिरडे (९८), आदित्य काकडे (१२९), शुभम भोसले (१४९), विनय कुमार गाडगे (१५१), ओंकार पवार (१९४), रामेश्वर सब्बनवाड (२०२), अक्षय वाखरे (२०३), अक्षय महाडिक (२१२), तन्मयी देसाई (२२४), अभिजीत पाटील (२२६), तन्मय काळे (२३०), विशाल खत्री ( २३६), संचित गुप्ता (२३७), उत्कर्ष खंडाळ (२४३), मृदुल शिवहारे (२४७), इशान टिपणीस (२४८), प्रतीक मंत्री (२५२), सुयश कुमार सिंग (२६२), सोहम मांढरे(२६७), अश्वीन राठोड (२६५), अर्शद मोहम्मद (२७६), सागर काळे (२८०), रोहन कदम (२९५), रणजित यादव (३१५) गजानन बाळे (३१९), वैभव काजळे (३२५), अभिजीत पठारे (३३३), राहूल देशमुख (३४९), सुमित रामटेके (३५८), विनायक भोसले (३६६), आदित्य पटले (३७५), स्वप्न‍िल सिसळे (३९५), सायली म्हात्रे (३९८), हर्षल महाजन (४०८), शिवहर मोरे (४०९), चेतन पंढेरे (४१६), स्वप्न‍िल पवार (४१८), पंकज गुजर (४२३), अजिंक्य माने (४२४), ओंकार शिंदे (४३३), रोशन देशमुख (४५१), देवराज पाटील (४६२), अनिकेत कुलकर्णी (४९२), शिल्पा खानिकर (५०६), अस्मर धनविजय (५५८), नितीश डोमले(५५९), निरज पाटील (५६०), आकांक्षा तामगाडगे (५६२), आशिष पाटील (५६३), शुभम नगराळे (५६८), अमीत शिंदे (५७०), स्वप्न‍िल माने (५७८), प्रशांत डगळे (५८३), अभय सोनारकर (६२०), अश्विन गोलपकर (६२६), मानसी सोनवणे (६२७), अमोल आवटे (६७८), पुजा खेडकर (६७९).
एक नजर निकालावरः केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी २०२१ मध्ये परीक्षा घेण्यात आली. जानेवारी २०२२ मध्ये मुख्य लेखी परीक्षा घेण्यात आली असून एप्रिल-मे २०२२ महिण्यात मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण ६८५ उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (खुला) गटातून २४४, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) ७३, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) २०३, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) १०५, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ६० उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये २६ दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने १२६ उमेदवारांची आरक्षित सूची तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट ६३, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) २०, इतर मागास वर्ग ३६, अनुसूचित जाती ०७ उमेदवारांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीच्या एकाही उमेदवाराचा आरक्षित सूचीत समावेश नाही.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू: भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण 180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) ७२, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) १८, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) ४९, अनुसूचित जाती (एस.सी.) २७, अनुसूचित जमाती (एस.टी.) १४ जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण ३७ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (खुला) १४, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) ०४, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) १०, अनुसूचित जाती (एस.सी.) ०६, अनुसूचित जमाती (एस.टी.) ०३ जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण २०० जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (खुला) ८३, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) २०, इतर मागास प्रवर्गातून ५१, अनुसूचित जाती प्रवर्गातून २६, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून २० उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.
केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण २४२ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (खुला) १०३, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) २३, इतर मागास प्रवर्गातून ६८, अनुसूचित जाती प्रवर्गातून ३१ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून १७ उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब या सेवेमध्ये एकूण ९० जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (खुला) ३६, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) ०८ उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून २५, अनुसूचित जाती प्रवर्गातून १५ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून ०६ उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.       
 ८० उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.