शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सावित्री बाई फुले जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 

वणी : एस.पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यायात सावित्री बाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर व उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर यांनी सावित्रीच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

बल्लारपूर-बामणी मार्गावरील महाराजा बियर बार जवळ स्विफ्ट-सुमोचा भीषण अपघात, एक गंभीर जखमी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर :  बल्लारपूर - बामणी मार्गावरील बामणी येथील असलेल्या महाराजा बियर बार जवळ काल शनिवार दि.१ जानोवारीला सायंकाळी ७:०० वाजताच्या दरम्यान बल्लारपूर कडून बामणीकडे जात असलेल्या स्विफ्ट गाडीने सुमोला मागुन जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातामुळे काही काळ त्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली हाेती. घडलेल्या अपघातात सुदैवाने काेणतीही जीवितहानी झाली नाही. 
परंतु या अपघाताने सुमो ही रस्त्याच्या दुभाजकावर चढली हाेती. दरम्यान सुमोतील पाचही प्रवासी बालबाल ब़चावले आहे. सदरहु अपघातात स्विफ्ट वाहन चालक बचावला असुन तो गंभीर जखमी झाला आहे. त्यास स्थानिक बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यांत आल्याचे वृत्त आहे.

 उपराेक्त अपघाताची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीसांनी घटना स्थळी भेट दिली. ते या घटनेबाबत अधिक चाैकशी करीत आहे.

वनस्पतीशास्त्र मंडळाद्वारे व्याख्यानाचे आयोजन

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील वनस्पतीशास्त्र विभाग व मंडळाद्वारे अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

अतिथी व्याख्यानाकरिता इंदिरा महाविद्यालय कळंब येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा डॉ किशोर सुरडकर उपस्थित होते. डॉ सुरडकर यांनी "Ecological succession" या विषयांवर अतिशय मोलाचे व महत्वाचे मार्गदर्शन केले. सरांनी अतिशय मंत्रमुग्ध करून विद्यार्थ्यांना विषय समजुन सांगितला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विविध विषयाचे प्राध्यापक मंडळी उपस्थित होते. त्यामध्ये प्रा सोडनर, प्रा तानूरकर, प्रा घोडखांदे, प्रा कुलकर्णी, प्रा देशमुख, प्रा आत्राम, प्रा जेनेकर, प्रा राऊत, प्रा वांढरे, प्रा चिरडे, श्री पंढरपूरे, श्री कुमरे मंडळी इत्यादी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा भांदकर, प्रा अडसरे, प्रा माकडे यांनी मोलाचे सहकार्य केले तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश घरडे यांनी परवानगी देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा डॉ विनोद चव्हाण यांनी सगळ्यांचे आभार मानले. 

टिळक चौक येथे झालेल्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या आंदोलनकर्त्यांना माकपच्या वतीने वाहण्यात आली श्रध्दांजली

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी शहरातील टिळक चौक येथे 1974 साली झालेल्या महागाई विरोधातील आंदोलनात आंदोलनकर्त्यांवर झालेल्या गोळीबारात सात आंदोलकांना आपला जिव गमवावा लागला होता. त्या हुतात्म्यांना दरवर्षी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने श्रध्दांजली वाहिली जाते. यावर्षीही टिळक चौकातील या हुतात्म्यांची नावे कोरलेल्या स्मारका जवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात आला. त्या आंदोलनात पुढाकार घेतलेले माकप चे जेष्ठ नेते कॉ. शंकरराव दानव यांच्या हस्ते हुतात्म्यांची नावे कोरलेल्या स्मारकाला पुष्पगुच्छ वाहुन गोळीबारात मरण पावलेल्या आंदोलकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माकपचे पदाधिकारी व हुतात्म्यांचे नातेवाईक उपस्थीत होते.

तत्कालीन भारताच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या शासन काळात  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अन्य पुरोगामी पक्षांच्या वतीने महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील टिळक चौकातही माकप व अन्य पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 1974 साली झालेल्या या आंदोलनात आंदोलकांवर पोलिसांकडुन बेछूट गोळीबार करण्यात आला. पोलिसांच्या गोळीबारात सात आंदोलक मृत्युमुखी पडले. या घटनेला 2 जानेवारीला 48 वर्ष पुर्ण झाले.

दरवर्षी या हुतात्म्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात येते. यावर्षीही टिळक चौकात या हुतात्म्यांची नावे कोरून असलेल्या स्मारकाला माकप चे जेष्ठ नेते व त्या आंदोलनात सहभागी असलेले कॉ. शंकरराव दानव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ वाहुन आंदोलनात हुतात्म्य आलेल्या त्या सातही जणांना त्यांच्या नेतृत्वात श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी माकपचे पदाधिकारी व हुतात्म्य पत्कारलेल्या आंदोलनकर्त्यांचे नातेवाईक उपस्थीत होते.

कार्यकर्ता अधिकारी होण्याचे ध्येय असावे - डॉ. अविनाश धर्माधिकारी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : "प्रामाणिकपणे मिळणारा पर्याप्त पैसा, कायमस्वरूपी सुरक्षा, हवाहवासा सन्मान, कार्यसाधक सत्ता किंवा अधिकार या सर्व गोष्टी स्पर्धा परीक्षेच्या यशासोबत आपल्याला आपोआप मिळतील मात्र त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मिळेल देशसेवेची संधी. स्वच्छ आणि कार्यक्षम जीवन जगत, हाती घेतलेले कार्य सुंदर रितीने करणे हीच देश आणि ईशसेवा आहे. ती करण्यासाठी कृत संकल्प असलेला कार्यकर्ता अधिकारी होणे हे या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाचे ध्येय असायला हवे." असे प्रेरक विचार माजी सनदी अधिकारी तथा चाणक्य परिवारचे सर्वेसर्वा डॉ. अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
     
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीच्या विद्यार्थ्यांना, सिनर्जी या अभिनव उपक्रमात आभासी पद्धतीने, "स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या संधी" या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला उपस्थित होते.
    
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी अशा विद्यार्थी हिताला देशहित माणणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनाद्वारे आपल्या महाविद्यालयातून यशस्वी सनदी अधिकारी निर्माण व्हावेत ही आशा व्यक्त केली.     
नमस्ते, सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा आणि प्रार्थना अशा त्रिसूत्रीच्या आधारे आपल्या विवेचनाचा आरंभ करणाऱ्या डॉ. धर्माधिकारी यांनी लोकमान्य टिळकांच्या कथेच्या द्वारे सर्वच करियर आपापल्या स्थानी श्रेष्ठ असल्याचे सांगून नवीन तंत्रज्ञानाने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या सुविधां बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
    
कोणत्याही क्षेत्रात आता स्पर्धा परीक्षेला पर्याय नाही हे अधोरेखित करीत प्राथमिक परीक्षेत आपले माहिती वरील प्रभुत्व, मुख्य परीक्षेत आपले ज्ञानावरील प्रभुत्व तर मौखिक परीक्षेत आपल्या व्यक्तिमत्त्वाची तपासणी केली जाते असे सांगत स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी ? इथपासून तर मुलाखतीत कसे वागावे? बोलावे? इतपर्यंत अनेक पैलूंना सोदाहरण स्पष्ट केले.
   अत्यंत अभ्यासपूर्ण तरीही सहज, सुलभ, प्रेमपूर्ण आणि कळकळ युक्त अशा या संवादाने उपस्थितीचे सर्व विक्रम मोडले हे विशेष उल्लेखनीय.
   
अध्यक्षीय मनोगतामध्ये नरेंद्र नगरवाला यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतक्या लहान आणि सुदूरस्थित महाविद्यालयात इतकी मोठी व्यक्तिमत्वे येऊ शकतात याचा आनंद व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास मंडळाचे संयोजक डॉ.अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. महादेव भुजाडे यांनी केले.
     
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ गुलशन कुथे, डॉ.परेश पटेल,पंकज सोनटक्के यांनी विशेष परिश्रम घेतले.