अन्न औषध प्रशासनाचे उपायुक्त मोहितेसह निरीक्षकांची नार्को टेस्ट करून निलंबनाची कारवाई करा


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील सहा वर्षापासून दारूबंदी होती दरम्यान सुगंधित तंबाखूसह घुटका आणि इतर नशा असणारे पदार्थ सुद्धा त्यावेळी अवैधरित्या विकल्या जात होते,परंतु आता दारूबंदी उठली असताना जिल्ह्यात सुगंधित तंबाखू विक्री जोरात सुरू आहे.

या सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन मोहिते व संबंधित निरीक्षक हे संरक्षण देत असून महिन्याकाठी लाखो रुपयाची अवैध वसुली त्यांच्याकडून होत असल्याची माहिती आहे. मात्र जनतेचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या प्रश्नावर त्यांच्याशी संपर्क साधला तर ते म्हणतात की आम्हाला केवळ खाण्याच्या पदार्थात जी भेसळ आहे त्यावरच कारवाई करण्याचे अधिकार आहे व सुगंधित तंबाखू संदर्भात पोलीस प्रशासन कारवाई करतात जे अत्यंत खेदजनक असून त्यांचे जिल्ह्यातील सर्व अवैध सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांशी आर्थिक देवाणघेवाणीचे सबंध आहे आणि महिन्याला 50 लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम हे अधिकारी सुगंधित तंबाखू,घुटका,पानमसाला व इतर अन्न पदार्थाच्या खरेदी विक्री साठवणूक व वाहतूक करणाऱ्याकडून वसूल करतात त्यामुळे या अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करून सत्य बाहेर आणा खोटे बोलून लाखो रुपयाची अवैध वसुली करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी राज्याचे अन्न औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगने यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केली आहे.

त्या निवेदनात राजू कुकडे यांनी नमूद केले की,जिल्ह्यात संपूर्ण ठिकाणी प्रत्त्येक पानठेल्यावर घुटका, सुगंधित तंबाखूचा खर्रा खुलेआम मिळत असताना हे अधिकारी त्यांच्या मोरक्यावर कारवाई करत नाही तर, साधे पैकेट मधील खजूर, बदाम व इतर खाण्याच्या गोड पदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करतात,त्यामुळे अन्न औषध प्रशासन विभाग आयुक्त मोहिते हे आपल्या विभागाला मूर्ख बनवून जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याने व त्यांच्याकडून खरी माहिती बाहेर येणे कठीण असल्याने त्यांची नार्को टेस्ट करण्याची आवश्यकता आहे. 

महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक असताना इतर राज्यातुन येणारा गुटखा व सुगंधित तंबाखूला आपण रोखू शकलो नाही. त्यामुळे सर्रासपणे त्या पदार्थांची विक्री होत आहे, ती रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करावी असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संबंधित मंत्री शिंगने यांच्या उपस्थितीत काही दिवसापूर्वी (दिनांक 25 नोव्हेंबरला) दिले होते, यावेळी अन्न औषध प्रशासन मंत्री शिंगने यांच्यासह बैठकीला गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव संजय सक्सेना, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, सहसचिव दौलत देसाई, यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात बनावट तंबाखू विक्री सह गुटखा, सुगंधित तंबाखू वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यापेक्षा त्यांच्याकडून वसुली मोहीम राबविण्यात अन्न औषध प्रशासन अग्रेसर आहे, यामधे शक्ती जुना पोस्ट ऑफिस जवळ चंद्रपूर, जयसुख ठंक्कर बल्लारपूर, वसिम झिगरी चंद्रपूर, गणेश गुप्ता, धुर्व गुप्ता रैयतवारी चंद्रपूर. नुतन ठक्कर, हरीष ठंक्कर, मनसुख ठक्कर बल्लारपूर, जितेन्दर ठंक्कर चंद्रपूर, सदानंद, बबलु मुल, नवसाद चंद्रपूर इत्यादीसहअनेक व्यक्ती सुगंधित तंबाखू विक्री करतात व त्यांच्यावर या अगोदर गुन्हे पण दाखल आहे. पण येथील उपायुक्त मोहिते व तीन निरीक्षक त्यांच्याकडून अवैध हप्ता वसुली करतात त्यामुळेच जिल्ह्यात सर्वत्र पानठेल्यावर घुटका व सुगंधित तंबाखू सह खर्रा खुलेआम मिळत आहे, अर्थात अन्न औषधी प्रशासन विभागाच्या संमती शिवाय हे शक्य नसल्याने यासंदर्भात उपायुक्त मोहिते व तीन निरीक्षकांची नार्को टेस्ट करून त्यांच्यावर शिस्तभंगाची व निलंबनाची कारवाई करावी अन्यथा आपण आपल्या प्रशासनाला पाठबळ देऊन जनतेच्या आरोग्याशी आपण सुद्धा खेळत असल्याची बाब राज्यस्तरावर प्रसारमाध्यमांसमोर मांडून जनांदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा राजू कुकडे यांनी निवेदनातून अन्न औषध प्रशासन मंत्री शिंगने यांना दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक,अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव. प्रधान सचिव संजय सक्सेना, अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल सिंग, अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंग, सहसचिव दौलत देसाई यांच्यासह चंद्रपूर चे जिल्हा पोलिस अधीक्षक साळवे यांना देण्यात आल्या आहे.

एका प्रकरणात एकाची हत्या व दुस-याचा पाय तोडला तर, चिचाेली प्रकरणात सहा मजुरांना बेदम मारहाण


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी चिचाेली येथील निर्दाेष व्यक्तींना बेदम मारहाण प्रकरणामुळे सध्या चांगलेच चर्चेत आले असून, अनेकांनी दाेषी असणां-या अधिकारी व कर्मचा-यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान आज चंद्रपूर जिल्हा आम आदमी पार्टीने राष्ट्रीय मानवाधिकारी आयाेग दिल्ली यांचे कडे अश्या मारहाण झालेल्या दाेन प्रकरणाच्या अनुषंगाने एक संयुक्तिक रित्या तक्रार पाठविली आहे. शहरातील गरीब कुटुंबातील समोसे विकण्याचा व्यवसाय करणारा सुरेंद्र देवडकर नामक व्यक्ती व इतर चौघे आपली झोपडी दुरुस्त करण्याच्या निमित्ताने बांबू आणण्यासाठी जुनोना जंगलात दि. 27 सप्टेंबरला गेले हाेते.
बांबू आपल्या सायकलवर बांधत असताना त्या ठिकाणी त्या परिसरातील बीट गार्ड बालाजी राठाेड व इतर तिघे तेथे आले. त्यांनी सगळ्यांना थांबवून बांबू का तोडले म्हणून सर्वांना बांबूच्या काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा घटना स्थळावरुन त्यातील दोघे जंगलात पळून गेले, पण त्या वेळी सुरेंद्र देवडकर, किशोर ठाकूर आणि विलास मुथा यांना बेदम मारहाण (त्या ठिकाणी )करण्यात आली.

सुरेंद्र यांच्या मुलाच्या म्हणण्यानुसार, तो घरी परतला नाही आणि वनविभागाचे लोक घरी येऊन त्याला आणि त्याच्या कुटुंबाला शिवीगाळ करतील या भीतीने तो लपून बसला. त्यातच भीतीपोटी 30 सप्टेंबरला सुरेंद्रने विष प्राशन केले, त्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यांत आले. रात्री उशिरा उपचार करून ताे घरी परतला. परंतु दुसऱ्या दिवशी 1 सप्टेंबरला सकाळी 6.30 च्या सुमारास सुरेंद्रची प्राणज्याेत मालवली.
मृताची पत्नी सविता हिने पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रत काढली. सरकारी रुग्णालयाने केलेल्या शवविच्छेदनात फुफ्फुसे, मांड्या आणि पाठीसह शरीराच्या विविध भागांवर अनेक जखमा आढळून आल्या, ज्याचा परिणाम सुरेंद्र देवडकर यांच्या वैयक्तिक आणि सामूहिक मारहाणीत झाला असावा असे डॉक्टरांचे मत आहे.
 मृत सुरेंद्र यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. सुरेंद्र यांच्यासोबत असलेल्या किशोर ठाकूर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, आजही त्यांच्या पायावर पट्ट्या बांधलेल्या आहेत, त्यास चालता किंवा उठता येत नाही. तर दुसऱ्या एका प्रकरणात चंद्रपूर जवळील चिचोली गावात 24 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर वन परिक्षेत्र अधिकारी हे आपल्या 6 ते 7 कर्मचार्‍यांसह गावात पोहोचले त्यांनी ईश्वर रामटेके, हनुमान आसुटकर आणि संदीप आसुटकर यांना चंद्रपुरातील रामबाग वनविभागाच्या कार्यालयात अवैध शिकारीच्या संशयावरून आणले. व त्या ठिकाणी त्यांना अमानुषपणे मारहाण केली, त्यानंतर त्याच्या पाठीवर आणि पायावर प्लास्टिकच्या काठ्यांनी वार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी 25 नोव्हेंबर रोजी पुन्हा आकाश चांदेकर, मंगेश आसुटकर, संदीप नेहरे यांना वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. त्यांना ही बेदम मारहाण करण्यात आली. काहींच्या गुप्तांगावर वारंवार करंट देण्याचे अमानुष कृत्य वनकर्मचा-यांनी केले. नंतर या लोकांनी शिकार केली नसल्याचे वन अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी या लोकांना सोडून दिले.
दोन्ही घटनांमध्ये वनकर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून एका गरीब व्यक्तीचा खून करणे, दुसऱ्याचा पाय तोडणे, संशयाच्या आधारे ६ जणांना ताब्यात घेणे, त्यांना मारहाण करणे, गुप्तांगांना अमानुष करंट लावण्याचा प्रकार केला आहे. त्यांनी अधिकारांचा गैरवापर करून घृणास्पद प्रकार सर्व वन अधिकारी व कर्मचारी यांनी संगठित गुन्हेगारी प्रमाणे संघटीत होऊन घटना घडवून आणली आहे. हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, अशा अनेक घटना या वन कर्मचाऱ्यांकडून घडवून आणल्या जातात, किंबहुना या गरीब लोकांमुळेच जंगलाचे संरक्षण होत आहे.

 जल, जंगल, जमीन या लोकांचा हक्क आहे. अगोदरच सरकारने काही भांडवलदारांना कवडीच्या दराने जंगलतील खनिज संपत्ति लुटायला दिली आहे. अश्या मोठ्या कंपनी कडून सर्रासपणे वन नियमाची मोडतोड होते पण यांच्या कारवाई करण्याची हिम्मत मात्र वन विभाग कड़े नाही. या प्रकरणात पीडीत हे गरीब आणि कष्टकरी कुटुंबातून आहे.

80, 90 च्या दशकात आदिवासीबहुल भागात वन अधिकारी ज्या प्रकारे अशा घटना घडवत होते. या लोकांना खोट्या केसेसमध्ये फसवून महिलांवर अत्याचार करीत होते.त्यावेळी येथील आदिवासींनी नक्षलवाद्यांची मदत घेतली आणि आता नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे अशा भागातील आदिवासींवरील वन कर्मचाऱ्यांची दहशत संपुष्टात आली आहे पण, या मुळे नक्षलवादला चालना मिळाली. ज्या पद्धतीने वन्यप्राण्यांसाठी वनविभाग आहे, त्याच पद्धतीने मानव अधिकारांसाठी मानवाधिकार आयोग आहे.
या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करून पीडित कुटुंबाला न्याय व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेवटी आम आदमी पार्टी ने केली आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली नवीन 5 आयुक्तांना शपथ

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई : सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेअन्वये, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती या महसुली विभागांकरिता राज्य सेवा हक्क आयुक्तांची नियुक्ती केली आहे. या 5 आयुक्तांना नवीन प्रशासकीय इमारती मधील आयोगाच्या कार्यालयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी शपथ दिली.

श्रीमती चित्रा विकास कुलकर्णी, यांची आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग, नाशिक महसुली विभाग, श्री. दिलीप मोहनराव शिंदे, आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग, पुणे महसुली विभाग, श्री. अभय बुद्धदेव यावलकर, आयुक्त राज्य लोकसेवा हक्क आयोग, नागपूर महसुली विभाग, डॉ. नरुकुल्ला रामबाबु, आयुक्त राज्य लोकसेवा हक्क आयोग, अमरावती महसुली विभाग आणि डॉ. किरण दत्तात्रेय जाधव, यांनी आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग, औरंगाबाद महसुली विभागात राज्य लोकसेवा हक्क आयुक्त म्हणून शपथ घेवून राज्य लोकसेवा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.

शपथविधीनंतर मुख्य आयुक्त श्री. स्वाधीन क्षत्रिय म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता, तसेच शासकीय विभाग, अभिकरणे व इतर सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंमलात आलेला आहे. अधिनियमाच्या कलम १३ पोट नियम-२ अन्वये प्रत्येक महसुली विभागासाठी एक राज्य सेवा हक्क आयुक्त नियुक्त करण्याची तरतूद आहे. त्यानुसार पाच आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.

महसुली विभागातील आयुक्तांच्या नेमणुकीमुळे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ ची अधिक प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित होईल तसेच अधिनियमाने निश्चित केलेल्या उद्देशांना चालना मिळेल असा विश्वास मुख्य आयुक्त श्री. स्वाधीन क्षत्रिय, यांनी व्यक्त केला.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणासाठी इन्फोसिस कंपनीसोबत सांमजस्य करार – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई : राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक डॉ.अभय वाघ, इन्फोसिसचे तिरूमला आरोही, संतोष अंनदापुर, किरण एम. जी, संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रात शासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. देशात पहिल्यांदाच इन्फोसिस महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी सहकार्य करत आहे. यामुळे जवळपास 40 लाख विद्यार्थ्यांना आणि एक लाख प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना उपयोग होणार आहे. हे शिक्षण पूर्णपणे इन्फोसिसकडून मोफत असून याचा राज्य शासनावर आर्थिक भार पडणार नाही.

इन्फोसिस या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत विविध विषयांवरील आणि विविध कालावधीचे 3 हजार 900 पेक्षा अधिक ऑनलाईन कोर्सेस तयार केले असून हे सर्व कोर्सेस कंपनीच्या स्प्रिंग बोर्ड (Spring Board) या ऑनलाईन मंचावर उपलब्ध करुन दिले आहेत. हे अभ्यासक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नि:शुल्क आणि औपचारिक (formal) अभ्यासक्रमासोबतच उपलब्ध राहणार आहेत. पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि रत्नागिरी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

यामध्ये संगणकाच्या प्रोग्रामिंग भाषा, क्लाउड तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या तांत्रिक कोर्सेस सोबतच बिझिनेस कम्युनिकेशन, बिझिनेस इंग्लिश, अर्थशास्त्र, लेखन कौशल्य, सकारात्मकता, नेतृत्व कौशल्य इत्यादी विषयांचे कोर्सेस असणार आहेत, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

या सामजंस्य करारामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत 1 हजार 600 महाविद्यालयातील 10 लाख विद्यार्थ्यांना आणि उच्च शिक्षण संचालनालयाअंतर्गत 3 हजार महाविद्यालयातील 30 लाख विद्यार्थ्यांना अशा एकूण ४० लाख विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे फायदा होणार आहे. त्यांना इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड या मंचावर उपलब्ध असलेले 3 हजार 900 पेक्षा अधिक कोर्सेस अभ्यासासाठी उपलब्ध होतील आणि सोबतच प्रशिक्षण पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र देखील प्राप्त होईल. तसेच इन्फोसिसच्या म्हैसूर येथील इन्स्टिट्युटमध्ये संबंधित प्राध्यापक, अधिकारी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचेही श्री.सामंत यावेळी सांगितले.

या उपक्रमाची वैशिष्ट्ये :

या मंचावरील कृती प्रवण (Learn By Doing) अध्ययनामुळे रोजगारासाठी आवश्यक व्यावसायिक कौशल्ये विकसित करून रोजगारक्षमता वाढविण्यासाठी या कोर्सेसची विद्यार्थ्यांना मदत होईल.

• अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रोग्रामिंग लॅंग्वेजेस, प्रकल्प व्यवस्थापन, संभाषण कौशल्ये इत्यादी व्यवसायाभिमुख कौशल्ये प्राप्त करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व व्यावसायिक रोजगारविषयक कौशल्ये प्राप्त होतील.

• उच्च शिक्षण संस्थामधील शिक्षक वर्गाला या मंचावर उपलब्ध सर्व कोर्सेस वापरता येतील.
उपक्रमाअंतर्गत डिजिटल किंवा आभासी पद्धतीच्या वर्ग खोल्या तयार करुन त्याद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचे काम संस्था करु शकतील. तसेच याद्वारे ऑनलाईन परिक्षा घेण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे.

• स्प्रिंगबोर्ड मंचावर उपलब्ध कोर्सेस विद्यार्थ्याकरिता वैकल्पिक कोर्सेस म्हणून शिकविता येतील व त्यासाठी शिक्षक वर्ग त्यांच्या आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमाचे संचालन करतील.

• महाराष्ट्र राज्य अध्यापक प्रशिक्षण संस्था जे अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण वर्ग राबविणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले डिजिटल कंटेट तयार करणे, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम तयार करणे, विद्यार्थ्याचे मूल्यमापन करण्याचे तंत्र इत्यादी बाबींचे प्रशिक्षण देखील इन्फोसिस कंपनीच्या विषय तज्ज्ञामार्फत दिले जाईल.

• शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी आणि शासकीय विज्ञान संस्था, नागपूर या संस्थांसाठी खास करून तयार केलेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना वरील सर्व सुविधासोबतच प्रोजेक्ट इंटर्नशिप बद्दलची सुविधा आणि एलएमएसची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. प्रोजेक्ट इंटर्नशिप आणि व्यावसायिक कौशल्य वाढविणाऱ्या कोर्सेसमुळे या दोन्ही संस्थांतील विद्यार्थी रोजगारक्षम होण्यास मदत होईल.

नव्वदीच्या तरुणाचा भावोत्कट सत्कार


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : येथील जैताई मंदिराचे नव्वदीत पदार्पण केलेले उत्साही व क्रियाशील संचालक आणि लोकप्रिय ज्येष्ठ समाजसेवक सुधाकर पुराणिक यांचा नुकताच विविध संस्थांतर्फे भावोत्कट सत्कार करण्यात आला.

या सत्काराचे आयोजन जैताई मंदिर व जैताई अन्नछत्र समितीच्या वतीने करण्यात आले होते. त्यांच्या सत्कारार्थ यवतमाळच्या श्रीराम सुंदरकांड महिला मंडळाच्या वतीने संगीतमय सुंदरकांड पठणाचा
सुश्राव्य कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.
             
नव्वदाव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार,शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला,मंदिराचे सचिव माधव सरपटवार अन्नछत्र समितीचे अध्यक्ष मुन्नाभाऊ पोद्दार, विद्यावाचस्पती स्वानंद पुंड, गजानन सेवा समिती अध्यक्ष विनय कोंडावार. टिळक नगरचे प्रा. माधमशेट्टीवार आणि अनेक संस्था व व्यक्तिंनी शाल, श्रीफळ, भेटवस्तु व पुष्पमाला देऊन पुराणिक यांच्या विषयी आपली आदर भावना व्यक्त केली.

सुंदरकांड कार्यक्रमात अखंड दोन तास ढोलकीची जोशीली साथ देऊन पुराणिक सरांनी नव्वदीतील आपल्या तारुण्याची श्रोत्यांना प्रचिती आणून दिली . आपल्याला भारावून टाकणारा हा कार्यक्रम व वणीकरांचे प्रेम आपण कधीच विसरु शकणार नाही असे सत्कार मूर्ती सत्कारार्थ उत्तर देतांना म्हणाले.