विद्युत दोषांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (०१संप्टें.) : कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे.

काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून बालकांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे नागपुरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांना प्राण गमवावे लागले. या आगी लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात असल्याने रुग्णालयातील वीज पुरवठ्याच्या संदर्भात अधिक काळजी व उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य सरकारने शासकीय व खासगी रुग्णालयांच्या संचालकांना दिलेले आहेत.

कोविड काळात रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळीत ठेवणे, जनित्र संच तसेच इन्व्हर्टरच्या माध्यमातून अंतर्गत वीज पुरवठा उपलब्ध करणे, ऑपरेशन थिएटर, आयसीयू येथील वातानुकूलित यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विद्युत उपकरणांची निगा व देखभाल योग्य रितीने करण्याच्या संदर्भात रुग्णालयांना शासनाने दिशानिर्देश दिलेले आहेत.

रुग्णालयात अंतर्गत वीज संचमांडणीच्या सुरक्षेसोबतच वीज पुरवठ्याची अखंडता तेवढीच महत्त्वाची आहे. अखंडीत वीज पुरवठा राखण्याची रुग्णालय प्रशासन तसेच पुरवठादार कंपनीची सामूहिक जबाबदारी राहणार आहे.

 
रुग्णांच्या जीवन सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य - डॉ. नितीन राऊत

कोरोना काळात शासकीय व खासगी रुग्णालयांवर बराच ताण होता. त्याचप्रमाणे वीज उपकरणांची निगा व देखभाल योग्य रितीने न राखल्याने या अनुचित घटना घडल्या आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयातील वीज पुरवठा योग्य राहावा, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या जीवन सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य राहावे, या उद्देशाने राज्य सरकारने हे निर्देश जारी केले असल्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

उच्चदाब व मध्यमदाब फिडर्सची नियतकालिक पेट्रोलिंग व पाहणी करणे, रुग्णालयातील वीज भार मंजूर भारापेक्षा अधिक राहणार नाही, याची तपासणी करणे केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम, २०१० नुसार वीजसंच मांडणी राखणे अनिवार्य आहे. १५ मीटरपेक्षा उंच इमारतीतील रुग्णालयांनी विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतर्गत वीज संचमांडणीचे निरीक्षण विद्युत निरीक्षक मार्फत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्याच्या एक वर्षाच्या आत प्राप्त करून घेणे बंधनकारक केले आहे. या इमारतींचे फायर ऑडिट नियमितपणे सक्षम संस्थेमार्फत करून अग्नी सुरक्षाप्रणाली प्रमाणित करावी लागणार आहे.

आयओटी तत्वावर चालणारे मायक्रोकंट्रोलर संयंत्र अंतर्गत वीज संरचना मांडणीमध्ये निर्माण होणाऱ्या दोष किंवा असामान्य बाबींचे विश्लेषण करून दोष निदान करणे शक्य होते. वीज संच मांडणीच्या संरचनेमध्ये उपलब्ध होणारी माहिती एकत्रित करून त्याचे विश्लेषण करू शकणारे एन.ए.बी.एल. टेस्टिंग लॅबद्वारे प्रमाणित असे आयओटी तत्वावर चालणारे मायक्रोकंट्रोलर सयंत्र सर्व शासकीय व खासगी रुग्णालये तसेच सार्वजनिक इमारतींमध्ये बसविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

तसेच शासकीय, खासगी रुग्णालये आणि सार्वजनिक इमारतींच्या परिसरात कार्यरत असलेल्या उद्वाहनामध्ये होणारे अपघात टाळण्यासाठीच्या मार्गदर्शक उपाययोजनाही या परिपत्रकानुसार जारी करण्यात आल्या आहेत.

नागपुरात नवे ट्रांसपोर्ट नगर होणार; ट्रकच्या पार्किंगसाठी अस्थाई जागा देणार


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
नागपूर, (०१ संप्टें.) : नागपुरात ट्रक पार्किंगसाठी कायम व्यवस्थेसाठी नवे ट्रांसपोर्टनगर होणार असून तोपर्यंत अस्थायी व्यवस्था त्वरित करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.

नागपूर ट्रक असोशिएशनच्या पदाधिकार्यांनी पालकमंत्री डॉ. राऊत यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. सध्या नागपुरात ट्रक पार्किंगची व्यवस्था नसल्याने दिवसा केवळ दुपारी १२ ते दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी आहे. यामुळे ट्रक चालकांना त्रास होत असल्याचे नागपूर ट्रक असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात संपूर्ण दिवसभर ट्रकच्या रहदारीला परवानगी मिळणार नसल्याचे स्पष्ट करून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, ट्रक पार्किंगसाठी कायम व्यवस्था होईपर्यंत अस्थायी व्यवस्था करण्यासाठी जागा सुचवावी, या जागेवर अस्थायी स्वरुपाची व्यवस्था करण्यात येईल.

कायम स्वरुपाच्या नवीन ट्रांसपोर्ट नगरसाठी सुद्धा सूचना कराव्या, यात लॉजीस्टिक, इतर नागरी सुविधा, दवाखाना व ट्रक चालकांच्या सोई सुविधा लक्षात घेऊन जागा सूचवावी, यासाठी देशात ट्रक पार्किंग असलेल्या शहरांची माहिती घ्यावी, असेही पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सुचविले. यावेळी कुक्कू मारवाह, मलकियत सिंग, जसमित सिंग भाटीया, कंवलजीत चौहान, पप्पू गोत्रा, टोनी जग्गी उपस्थित होते.

नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या दोघांचेही सापडले मृतदेह

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०१ संप्टें) : कोसळधार पावसामुळे शेतशिवारा जवळील नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या दोनही व्यक्तींचा मृतदेहच आढळून आल्याने सोनापूर हे छोटेशे गाव हळहळले आहे. गावातील दोन कर्त्या पुरुषांवर अकाली मृत्यू ओढावल्याने अख्ख गाव शोकसागरात बुडालं आहे. एक शेतकरी व एक साल गडी दोघांनाही जल समाधी मिळाली. नागाडा शिवारातील नाल्याला आलेल्या पुरात दोघेही जण वाहून गेले. नाला पार करतांना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. (ता. ३०) ऑगष्टला रात्री उशिरा पर्यंत दोघेही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोधाशोध घेतला. शेतशिवारा जवळ असलेल्या नाल्याला सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात ते वाहून तर गेले नसावे हा संशय आल्याने प्रवाहाच्या दिशेने त्यांचा शोध घेतला असता आज सकाळी शेतकऱ्याचा तर दुपारी सालगड्याचा मृतदेह आढळून आला. 
वणी तालुक्यातील सोनापूर येथिल शेतकरी सतीष मधुकर देठे (४०) हे सकाळी ११ वाजता शेतात जाण्याकरिता घरून बाहेर पडले, ते रात्री उशिरा पर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. त्यांच्या सोबत असलेला राजेंद्र नामदेव उईके (४३) रा. सोनापूर हा त्यांचा साल गडीही घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता आणखीच वाढली. सुरु असलेल्या कोसळधार पावसामुळे शेताजवळील नाल्याला मोठा पूर आल्याने नाला पार करतांना दोघेही वाहून तर गेले नसावे, हा संशय आल्याने नाल्याच्या प्रवाहाच्या दिशेने दोघांचाही शोध घेण्यात आला. रात्री ते कुठेही दिसून न आल्याने दिवसा त्यांचा नाल्याच्या पाण्यातच शोध घेण्यात आला. ३१ ऑगष्टला सकाळी ७.३० वाजता सतिष देठे या शेतकऱ्याचा तर दुपारी ४ वाजता सालगडी असलेल्या राजेंद्र उईके याचा मृतदेह आढळून आला. सतिष देठे हा शेती बरोबरच मालमत्ता विक्रीचीही कामे करायचा. दोघेही विवाहित असून घरातील कर्त्या पुरुषांच्या अशा या अकाली जाण्याने कुटुंबाचा आधारच हिरावला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या मृत्यूने अख्ख गाव हळहळलं आहे. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

नेरी व्यापारी असाेसिएशनची अध्यक्षपदासाठी अटीतटीची निवडणूक


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३१ ऑगस्ट) : चिमूर तालुक्यातील बाजारपेठे साठी प्रसिध्द असलेल्या नेरी येथील व्यापारी असाेसिएशनची अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच गुप्त मतदान पध्दतीने आज अटीतटीची निवडणूक पार पडली. एरव्ही ही निवडणूक सर्वानुमते हाेवून पदाधिका-यांची निवड कार्यकारणीत केल्या जात असे.! विशेष म्हणजे अध्यक्षपदासाठी व्यापारी वर्गांतुन सतिश आष्टनकर, विलास चांदेकर, व मंगेश चांदेकर यांनी आपले अर्ज दाखल केले. गुप्त मतदान पध्दतीने मतदान हाेवून त्यात सतिश आष्टनकर व विलास चांदेकर हे पराभूत झाले. सर्वाधिक मते मंगेश चांदेकर यांनी प्राप्त केले. या निवडणूकीत मंगेश चांदेकर यांचे विजयाची बातमी कानांवर येताच अनेक चाहत्यांनी व मित्र परिवारांनी त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, उपाध्यक्षपदी सुरेश पिसे, सचिवपदी राजु विश्वनाथ पिसे, सहसचिव पदी रवि चुटे, तर काेषाध्यक्ष पदाकरिता विलास टिपले यांनी नविन कार्यकारणीत स्थान मिळविले. या शिवाय सदस्य पदी धनराज पंधरे, देवा कामडी, चांदखाँ पठाण , मुस्तुफा शेख, अशाेक सिताराम पिसे, मिलिंद वाघे, रिजवान अजानी, विनाेद लक्ष्मण कामडी, बाबूराव पिसे, व शैलेश शेणमारे यांची निवड करण्यांत आली. ही निवडणूक प्रक्रिया नेरी व्यापारी असाेसिएशनचे भूतपूर्व अध्यक्ष सुरेश कामडी यांनी पार पाडली. सर्व नवनियुक्त पदाधिका-यांना त्यांनी शुभेच्छा या वेळी प्रदान केल्या. गुप्त मतदान पध्दतीने प्रथमच पार पडलेल्या या निवडणूकीची चर्चा अख्ख्या चिमूर तालुक्यातील व्यापारी वर्गांत आज ऐकावयास मिळाली. हे विशेष !

जीएम टेक्नॉलॉजी ट्रायल वरची बंदी उठवावी म्हणून प्रत्येक गावातून ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव घेऊन केंद्र शासनाला पाठवा - शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांचे आवाहन



सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (३१ऑगस्ट) : तालुक्यातील वागद ईजारा या गावी ग्रामपंचायत कार्यालय वर कृषी विभाग व बायर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या गावात शेतकऱ्यांना फवारणी सुरक्षितता अभियानाअंतर्गत दक्षता बाबत मार्गदर्शन करून गुलाबी बोंड अळी च्या संदर्भाने मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित असलेले शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांच्या हस्ते शेतकऱ्यांचे दैवत हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक साहेब यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बायर कंपनी चे जिल्हा प्रतिनिधी कीर्तिराज राजूभाऊ चिद्दरवार, सुरेश राठोड, अविनाश राठोड गायकवाड, भालेकर साहेब कृषी पर्यवेक्षक व डाखोरे साहेब कृषी साहाय्यक हे उपस्थित होते.

कार्यक्रमाला संबोधित करत असतांना शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन  केले की, सध्या उपलब्ध असलेले कॉटन सीड BG-1, BG-2 हा आता यामधील रोगप्रतिकारक शक्ति पूर्णतः संपलेली असून,ही कापूस वाण कालबाह्य झालेली आहे. केंद्र शासनाने जीएम टेक्नॉलॉजी जेनेटिक मॉडिफाइड या कॉटन सीड वर या कृषिप्रधान देशामध्ये ट्रायल वर बंदी घातल्याने हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे खंत व्यक्त केली. जगामध्ये तंत्रज्ञानाच्या आधारावर कृषी क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल होऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा आत्मसात करून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धता मिळाली आहे. पण दुर्दैवाने या कृषिप्रधान देशामध्ये मूठभर लोकांच्या मागणीवरून केंद्र शासनाने या ट्रायल वर बंदी घातल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कोंडमारा होतोय, त्यासाठी शेतकऱ्यांनी आता पुढाकार घेऊन गावागावातून ग्रामसभेच्या ठरावाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे ही जीएम टेक्नॉलॉजी वरची बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी ग्रामसभेच्या माध्यमातून करावी असे आवाहन केले.

यावेळी बाहेर कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी किर्तीराज  गायकवाड यांनी गुलाबी बोंडअळी च्या व्यवस्थापनासाठी यथोचित मार्गदर्शन केले व त्यासोबत फवारणी करत असतांना सुरक्षा किटचा वापर व त्यासंबंधाने घ्यावयाची काळजी दक्षता,याबाबत उपयुक्त मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले. यामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना चर्चेच्या माध्यमातून त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यात आलं. कापूस या पिकामध्ये फेरोमोन ट्रॅप कामगंध सापळे ट्रायकोडरमा व फवारणी या संदर्भाने वापरण्यासाठी कीटक नाशकाचा वापर कसा करावा, या संदर्भाने मार्गदर्शन झाले. यावेळी फवारणी करणाऱ्या शेतमजूर व शेतकऱ्यांना कृषी विभाग व बाहेर कंपनीच्या वतीने फवारणी सुरक्षा कीटचे वाटप मनीष भाऊ व राजूभाऊ चिद्दरवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला या गावातील प्रतिष्ठित नागरिक रमेश भाऊ जाधव नेहमीचं जाधव, दाऊ काळे, दिगंबर देवकर, रवि राठोड, देवराव राठोड, भारत चव्हाण, उमेश प्रल्हाद राठोड, रोहिदास पवार, शासन व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या कोविड-19 सारख्या विषाणूजन्य संसर्ग रोगाच्या प्रादुर्भावाची आदर्श आचारसंहितेचे पालन करून या कार्यक्रमाला शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भाऊ राठोड बायरचे प्रतिनिधी यांनी केले.