पाटबंधारे विभागाने प्रकल्पाच्या नावावर शेतकर्‍यांचे स्वप्न केले भंग


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (३० ऑगस्ट) : आर्णी तालुक्यातील कवठा बाजार, कोसदनी, साकुर, मुकींदपुर , दोनवडा, या गावामध्ये सन १९८२- १९८३ साली अधरपुस प्रकल्पाचा नावाखाली भूसंपादन करुन सिंचन विभागाने ३८ वर्षात कुठल्याही सिंचनाचा येथील शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. 
या भागातील ४३ शेतकर्‍यांच्या जमिनी अधर पुस प्रकल्पाचा नावावर सिंचन विभागाने प्रकल्पाच्या नावावर संपादित केल्या गेल्या होत्या पंरतु नाममात्र मोबदला देउन अतिशय उपजाऊ जमिनी अधिग्रहण केल्या गेल्या. पाटसंराचे पाणी शेताला मिळणार या आश्वासनावर शेतकर्‍यांनी जमिनी दिल्या पंरतु ३८ वर्षात सिंचनाचे कुठलेही काम इथवर पोहचू शकले नाही.

या पाचही गावाचा भूभाग डोंगराळ असल्याने प्रकल्पाचे काम अथवा पाणी इथवर पोहचवण्यात असमर्थ आहोत असे सिंचन विभागाने आपले मत व्यक्त केले आहे. 
सतत च्या नापिकी व दुष्काळामुळे व सिंचनाचा लाभ मिळत नसल्याने येथील शेतकरी हतबल झाला असून या अधीग्रहणामुळे काही शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. 
(१)कवठा बाजार २९ एकर ९२ गुंठे , (२)मुकीदपुर ०९ एकर २१ गुंठे, (३)साकुर ८६ एकर ५६ गुंठे, (४)कोसदनी ३४ एकर ०२ गुंठे, (५)दोनवाडा १०० एकर ९१ गुंठे एकुण २६० एकर ६२ गुंठे 

 पाच गावातील अधिग्रहन करण्यात आलेली एकुण जमिन २६० एकर ६२ गुंठे सिंचन विभागाने प्रकल्पाच्या नावावर अधिग्रहण करुन शेतकर्‍यांना प्रकल्पाचा नावावर ठेगा दाखविला आहे.

काही शेतकरी तर भूमिहीन झाले आहे. येथील शेतकरी सनदशिर मार्ग अवलंबून या शेतकऱ्यांच्या जमिनी वरील शासनाचा हक्क काढुन आमच्या जमिनी आमच्या ताब्यात देण्यात याव्या अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांना पत्राद्वारे केली आहे.

तालुक्यात बनावट सुगंध तंबाखूमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात


सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार 
केळापूर, (३० ऑगस्ट) : पांढरकवडासह संपूर्ण तालुक्यात व शहरातील सुगधं भंडार व काही किराणा दुकानात मोजके व्यापारी प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री गेल्या अनेक वर्षा पासून करत आहे. बंदी असलेले हे सुगंधित तंबाखू चक्क बनावट/नकली असतांना सुद्धा नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता झटपट पैसा कमवण्याच्या नांदात ते खुलेआम विकत आहे. परंतु अन्न व औषधी प्रशासन विभाग यावर कुठलीच कारवाई करण्याचे सौदार्य करत नसून याकडे  जाणीवपूर्वक दूर्लक्ष होत आहे.

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम लक्षात घेता शासनाने सुगंधित तंबाखूवर बंदी आणली. तसेच अवैधरित्या तंबाखूची विक्री करणाऱ्यावर कायद्याने कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषधी प्रशासनाच्याकडे देण्यात आल्याचे बोलल्या जाते. मात्र, पांढरकवडा शहरातील काही सुगधं भंडार व किराणा दुकानाचे मोजके व्यापारी प्रतिबंधित बनावट/नकली तंबाखूची सर्रास विक्री होत आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे डोळे झाक होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर पूर्ण बंदी घातली असतांना दरम्यान, या कालावधीत सुद्धा बेभावाने हे व्यापारी तंबाखूची विक्री आपल्या घरूनच करत पान टपरीवाल्या कडून आर्थिक लुटमार करत असल्याची ओरड होत होती. परंतु यावर संबधीत प्रशासनाचे दूर्लक्ष होत होते. आता तर हेच मोजके व्यापारी झटपट पैसा कमावण्याच्या नांदात नागरिकांच्या आरोग्याचा खेळ खंडोबा करत मजा, हुक्का, ईगल, बागवान, बाबा १२०, रत्ना, आदी सारख्या प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूच्या नावावर चक्क बनावट/नकली तंबाखूची खुले आम विक्री शहरासह ग्रामीण भागात आपल्या मालवाहतूक ने पान टपरी वाल्यांना करत आहे.
यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने संबधित विभाग हा कुंभकर्णी झोपेत तर नाही ना ? असाही सवाल जनमानसात उपस्थित होत आहे.

भाजपा मच्छिमार सेलच्या वतीने भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण


सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार 
केळापूर, (३० ऑगस्ट) : भाजपा मच्छिमार सेल च्या वतीने भाजपा ओबीसी मोर्चा पश्चिम विदर्भ संयोजक व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष मा.श्री.राजू भाऊ डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केळापूर इथे करण्यात आले.

मार्गदर्शक भाजपचे जिल्हा सचिन किशोर बावणे, सहकारी जिल्हा सचिव डॉ.अंगाईतकर, जिल्हा सचिव शंकर लालसरे व भाजपा मच्छिमार सेल यवतमाळ चे जिल्हा महामंत्री प्रदिप नागोराव भनारकर व ओबीसी आघाडी यवतमाळ चे जिल्हा उपाध्यक्ष रमेश ऊगेवार यांच्या हस्ते करण्यात आले.

पहापडचे शाखा अध्यक्ष प्रविण हामंद, केळापूर चे सामाजिक कार्यकर्ते संजय राऊत, सुनिल पारशिवे, रोशन मसराम, प्रविण भनारकर, राहुल गेडाम, संदीप विश्वकर्मा, प्रविण इजगीलवार, योगेश पारशिवे, राहुल गेडाम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

पुरोगामी साहित्य संसदेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नरेंद्र सोनारकर यांची नियुक्ती


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
बल्लारपूर, (३० ऑगस्ट) : शासन मान्यता प्राप्त पुरोगामी पत्रकार संघ संलग्नित 'पुरोगामी साहित्य संसद' च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी बल्लारपूर शहराचे रहिवासी पत्रकार,कवी-साहित्यिक, नरेंद्र सोनारकर यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी आणि राज्य कोअर कमिटीने केली आहे.        
     
पुरोगामी महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी, अंधश्रद्धेचे समूळ नष्ट करण्यासाठी पुरोगामी कवी, साहित्यिकांची हक्काची संसद निर्माण व्हावी यासाठी पुरोगामी साहित्य संसद नरेंद्र सोनारकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काम करणार आहे.
सोनारकर यांनी गेली अनेक वर्षांपासून सामाजिक सांस्कृतिक, साहित्यिक आंदोलनात सक्रिय भूमिका बजावून आपल्या लेखणीने अनिष्ट रूढी, समाज विघातक परंपरा, अंधश्रद्धा यावर प्रखर हल्ला चढविला आहे. परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचारांना पेरण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे.
      
साहित्य समीक्षक,प्रखर वक्ता,पत्रकार,कवी, साहित्यिक नरेंद्र सोनारकर यांची साहित्य संसदेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने पत्रकार मित्र,साहित्य क्षेत्रातील कवी-साहित्यिकांनी त्यांना भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत. तर अत्यंत चुरशीच्या वेळी विजय सूर्यवंशी यांनी दिग्गजांना डावलून महाराष्ट्राचे अध्यक्षपद दिल्याबद्दल सोनारकर यांनी त्यांचे आणि कोअर कमिटीचे आभार मानले आहे.

तालुक्यातील पाटणबोरीत डेंगू मलेरिया चा शिरकाव

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (३० ऑगस्ट) : तालुक्यातील पाटण (बोरी) सह परिसरात गेल्या एक महिन्यापासून डेंगू च्या रुग्णात वाढ होत असल्याने मलेरिया व डेंगू चा मोठ्या प्रमाणात शिरकाव दिसत आहे. मलेरिया टायफाईड डेंगू  सदृश्य आजारने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

गेल्या दीड वर्षापासून आधीच नागरिक कोरोना महामारीने चिंताग्रस्त असून, आता पुन्हा मलेरिया, टायफाईड, डेंगू या सदृश्य आजाराने  लोकं परेशान आहे. गावोगावी परिसरात डेंगू आजरांची संख्या वाढत असल्याने पालकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. लहान मुलांसह व मोठ्यांना सुद्धा डेंगू ची लागण होत असल्याने सरकारी दवाखान्यात भर्ती होत आहे. तर काही रुग्ण आदिलाबाद, यवतमाळ आणि नागपुर येथील खासगी दवाखान्यात जाऊन आपला इलाज करून घेत आहे.

या गंभीर विषयाची गावापातळीवर उपाय योजना राबविणे आवश्यक असून, गावातील नाली रस्ते, शेणखत, ठिकठिकाणी साफसफाई होत नसल्याने तसेच जागो जागी सांडपाणी जमा होऊन त्या पाण्याचे डबके तयार होत असल्याने रोगराई पसरत असून, रुग्ण संकेत वाढ होताना दिसून येत आहे. येथील ग्रामपंचायत चे साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकात ओरड आहे. परिणामी मलेरिया डेंगूचे रुग्णात वाढ  होत आहे. सध्याचे वातावरण किटक जन्य आजारला पोषक आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून कीटक जन्य सदृश रुग्णांची संख्या वाढत आहे, या रोगराईला आळा घालण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय कीटक जन्य रोगनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. तसेच मलेरिया, टायफाईड, डेंगू, चिकन गुनिया, सदृश्य आजारांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी घरासमोर परिसर स्वछ ठेवावा तसेच घरसमोर कुठेही पाणी जमा होऊ देऊ नये, कूलर चे पाणी आठवड्यात बदलत राहावे. शिवाय  गावातील अनेक वार्डालगत शेणखतांचे ढिगारे असल्याने त्यापासून सुद्धा रोगराई पसरत असून, ग्रामपंचायतने या धिगाऱ्यांचा विल्हेवाट लावला असेही मत व्यक्त होत आहे.

गावत सांडपाणी पाणी रस्त्यावर वाहत असल्याने दुर्गंधी, रोगराई पसरत असून, नाल्या वेळीच साफ होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंच्यायतीने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन गावातील नाली स्वच्छता याकडे लक्ष्य द्यावे. तसेच फॉगिंग मशीन करण्यात यावे, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.