वणी गणेशपूर मार्गावरील निरगुळा नदीच्या पुलाजवळील खड्डे बुजविण्याची मागणी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (३१ जुलै) : शहरातून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्यातून मार्ग काढतांना वाहन धारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. वणी गणेशपूर मार्गावरील निरगुळा नदीच्या पुलाजवळ मोठं मोठे खड्डे निर्माण झाले असून हे खड्डे बुजविण्याची मागणी होऊ लागली आहे. रहदारीला अडथळे निर्माण करणारे हे खड्डे कित्येक दिवसांपासून दुर्लक्षित असून हे खड्डे तत्काळ बुजविण्याकरिता छत्रपती महोत्सव समिती गणेशपूरच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला अल्टिमेटम देण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना लेखी तक्रार देऊन दोन दिवसांत नदीच्या पुलाजवळील खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत हे खड्डे बुजविण्यात न आल्यास याच खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. 
वणी गणेशपूर या प्रमुख रहदारीच्या रस्त्यावरील निरगुळा नदीच्या पुलाजवळ ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून या खड्ड्यांमधून मार्ग काढतांना वाहन धारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. हे खड्डे अपघाताला आमंत्रण देत असून या खड्ड्यांमुळे आठवड्याभरात तीन अपघात झाले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार अनियंत्रित होऊन खाली पडल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. वणी वरून गणेशपूर मार्गे कायर व घोन्सा रोडवर निघणारा हा शॉर्टकट रस्ता असल्याने हा रस्ता नेहमी रहदारीने गजबजलेला असतो. छोरीया टाउनशिप कडे जाण्याकरिता हाच जवळचा मार्ग असल्याने या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या प्रमुख मार्गावर नदीच्या पुलाजवळ मोठं मोठे खड्डे तयार झाले असून मागील कित्येक दिवसांपासून हे खड्डे दुर्लक्षित आहेत. हे खड्डे आता अपघाताचे कारण बानू लागले असून दोन दिवसांत हे खड्डे बुजविण्याचा अल्टिमेटम छत्रपती महोत्सव समिती गणेशपूरच्या वतीने देण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना दिलेल्या लेखी तक्रारीतून येत्या दोन दिवसांत खड्डे बुजविण्याचे मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत नदीच्या पुलाजवळील खड्डे बुजविण्यात न आल्यास याच खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

मुखेड तालुक्यातील दिव्यांगाचे बार्हाळी ग्रामपंचायत समोर थालीनाद आंदोलन


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (३१ जुलै) : जिल्ह्यातील दिव्यांगानी आपल्या हक्कासाठी दि. ३० जुलै रोजी मुखेड तालुक्यातील बा-हाळी येथे
दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय समोर कुंभकर्ण शासन प्रशासनास जागे करण्यासाठी आज मुखेड तालुक्यातील बा-हाळी येथे दि. ३० जुलै २१ दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराल डाकोरे पाटिल, ता. अध्यक्ष आर एम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत समोर थालीनांद आंदोलन करण्यात आले. आंदोलनात घोषणेने थालीनांद करून परिसर दणाणून टाकले त्या वेळी निवेदन  स्वीकारण्यासाठी सशश ग्रामसेवकांनी निवेदन स्विकारून आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. खालील मागण्या संदर्भात दिव्यांगानी घोषणेने थालीनांद करून आपला संताप व्यक्त केला. 
       
ग्रामपंचायतचा दिव्यांग राखीव पाच टक्के स्वनिधी व तेरावा, चौदावा, पंधरावा विकासातून २०१६ ते आज पर्यंत राखीव दिव्यांग निधी न देणार्‍या दोषी अधिकारी यांचा आढावा घेऊन त्वरीत वाटप देण्यात यावा. 
दिव्यांग अँप मध्ये नोंदणी पासुन एकही दिव्यांग वंचित राहू नये म्हणून मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी तिन वेळा वेळापञक देऊन अकरा महिन्यात दिव्यांगाना माहिती न देता आपल्या आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍या दिव्यांगाना निधी व हक्कापासुन वंचित ठेवणार्‍या दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी.

दिव्यांग कायदा २०१६ ची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेऊन योजनेची माहिती देऊन देऊळ अंमलबजावणी करणे बाबत, पंचायत समिती अंतर्गत दिव्यांगाचा पाच टक्के निधी अनुशेष सहित वाटप न करणार्‍या गटविकास अधिकारी यांच्या वर कार्यवाही करावी.

दिव्यांगाना घरकुल योजनेतून प्राधान्य क्रमाने घरकुल गावातील रिकाम्या जागेत त्वरीत देण्यात यावा. 
दिव्यांगाना स्वरोजगार करण्यासाठी गाळे किंव्हा २०० फुट जागा त्वरीत देण्यात यावा. दिव्यांग कायदा २०१६ कलम ९२ ए, बी, सी प्रमाणे दिव्यांगाना ञास देणार्‍या दोषींवर कारवाईमुळे करावी.
    
थालीनाद आंदोलनात दिव्यांग वृध्द निराधार मिञमंडळ महाराष्ट्र मुखडे ता.अध्यक्ष रामकिसन कांबळे ता ऊपअध्यक्ष मगदुम शेख,ता सचिव रंजीत पाटिल इंगळे,पांचाळ वैजनाथ, मजा चव्हाण, हनमत बोईनवाड,माया फुलारी, योगेश देशमुख, मौलासाब तांबोळी, शंकर बोईऩवाड, गोपाळ गायकवाड, पांडूरंग गुडघे,ईत्यादी कार्यकर्त्यांनी आंदोलन यशस्वी केले.

किटकनाशक प्राशन करून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या: नेरड (पुरड) येथील दुःखद घटना

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (३१ जुलै) : शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरड (पुरड) येथील एका तरुण शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज ३० जुलैला उघडकीस आली. प्रदिप रामदास कौकमवार (२६) असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. २९ जुलैला तो कुणालाही न सांगता घरून निघून गेला. कुटुंबीय व नातेवाईक त्याचा शोध घेत होते. दरम्यान नातेवाईकांना तो पहाटे त्याच्याच शेतात निपचित पडून दिसला. शेतात फवारणी करणारे किटकनाशक त्याने प्राशन केले होते. त्याला तत्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्याला चंद्रपूरला रेफर केले. चंद्रपूर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळालेले नाही. 
प्रदिप कौकमवार हा अल्प भूधारक शेतकरी होता. त्याच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती असल्याचे समजते. शेतीतीलच उत्पादनावर त्याच्या कुटुंबाचा गाडा चालायचा. कुटुंबाचा तो एकमेव आधार होता. काही वर्षाआधी वेकोलीने कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाकरिता त्याचे शेत राखीव केल्याचे समजते. पण वेकोलिने शेत जमीन संपादित न केल्याने ते प्रदिप कौकमवार याच्याच ताब्यात होते. तोच शेत जमिनीवर वहती करीत होता. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. त्याने एकाएक आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही वर्षाआधी त्याच्या वडिलानेही विषारी द्रव्य प्राशन करूनच आत्महत्या केली होती. प्रदिप कौकमवार २९ जुलैला अचानक घरून बेपत्ता झाला. त्यानंतर ३० जुलैला पहाटे त्याच्याच शेतात तो निपचित पडून दिसला. त्याने किटकनाशक प्राशन केल्याचे दिसून येताच त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यास सांगितले. चंद्रपूर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या प्रदीप कौकमवार याने आत्महत्ये सारखा पर्याय निवडल्याने कुटुंब चांगलेच हादरले आहे. त्याच्या मागे पत्नी, आई व दोन बहिणी असा आप्त परिवार आहे. त्याच्या या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही.

गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस – अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, (३० जुलै) : गर्भपाताकरिता वापरात येणाऱ्या औषधाची Medical Termination of Pregnancy Kit (MTP) KIT) ऑनलाईन विक्री होत असल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने तपासणीकरिता विशेष मोहिम राबविण्यात आली. प्रशासनाने एकूण ३४ ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेबाबत पडताळणी केली.

त्यानुसार अमेझॉन या संकेतस्थळावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून मागणी नोंदविली. त्यानुसार डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या औषधाची मागणी दोन वेळा अमेझॉनवर स्वीकारून त्याची गुरुनानक इंटरप्राइजेस, लखनऊ, उत्तर प्रदेश व चौधरी फार्मास्युटिकल्स/पिरामल लि., कोरापूर, ओरिसा या संस्थेकडून औषधे पुरविण्यात आले. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय MTP kit औषधाची ऑनलाईन विक्री करणे हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० मधील तरतुदींचे उल्लंघन आहे. प्रशासनाने अमेझॉन व संबंधित वितरक यांना यासंदर्भात नोटीस बजावली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात फ्लिपकार्ट या ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाची मागणी नोंदविली असता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची मागणी न करता फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर दोनवेळा औषधाची मागणी स्वीकारण्यात आली व ते पुरविण्यात येणार असल्याचे देखील संकेतस्थळावरुन एसएमएस संदेशद्वारे कळविण्यात आले. वास्तविक गर्भपातासाठी वापरात येणाऱ्या औषधांची डॉक्टर प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्रीस होकार दर्शविणे, हे देखिल कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याने फ्लिपकार्ट या कंपनीस नोटीस बजाविण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

नुकतेच पुणे येथे अमेझॉन या संकेतस्थळावरुन MTP Kit ची विक्री पुण्यातील औषध विक्रेत्यास केल्याने औषध विक्रेत्याने पुणे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास तकार दाखल केली होती. या तक्रारी अनुषंगाने प्रशासनाने तातडीने कारवाई करुन यामध्ये सामील असलेला पुरवठादार, मे. आर. के. मेडिकल, अहमदाबाद, गुजरात यांचेकडे प्रत्यक्ष जावून चौकशी केली. या वितरकाकडे औषधाचे खरेदी बिल नसल्याचे उडकीस आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून संबंधिताविरुध्द पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

यंदाही स्वातंत्र्यदिनावर कोरोनाचे सावटः ‘या’ मार्गदर्शक सूचना पाळून साजरा करा १५ ऑगस्ट!


                        (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, (३० जुलै) : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापनदिन रविवार, १५ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत शासनाने ४ जून २०२१ अन्वये आदेश पारित केले आहेत. गत वर्षीप्रमाणेच यावर्षीही राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. हा कार्यक्रम साजरा करताना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आले आहेत.

स्वातंत्र्यदिनासाठी ठळक निर्देश असेः

राज्यात सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय, तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती व कोकण विभागीय आयुक्त यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

• विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्री ध्वजारोहण करतील. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा. या दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ वाजेपूर्वी किंवा ९.३५ वाजेनंतर आयोजित करावा.

• राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत वाजविण्यात यावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅण्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजवावा. यावेळी करण्यात येणाऱ्या भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्व विषद करणारे तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता याकरीता कार्य करण्यासाठी प्रेरित करणारे असावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

• ध्वजारोहण करणारे मंत्री, राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर पोहचू शकणार नसल्यास विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करुन ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. संबंधित प्रांत अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गाव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील.

• स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच कोरोनायोध्दे जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्यसेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रीत करावे. कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल, याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेल, आयोजकांनी त्यानुसार मान्यवरांना निमंत्रित करण्याची कार्यवाही करावी.

• समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. सुरक्षित वावराच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करावे व अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाइटद्वारे थेट प्रक्षेपण करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

• या कार्यक्रमातून व सोशल मीडियाद्वारे ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणेचा प्रसार करावा. दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे: वृक्षारोपण, आंतर शालेय, आंतर महाविद्यालय स्तरावर ऑनलाईन पध्दतीद्वारे वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा, देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. महत्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा. सोशल मिडीयाद्वारे निवडक विद्यार्थी, विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाणे, भाषणे आयोजित करावी.

• शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एखाद्या विषयाचा वेबिनार आयोजित करावा, एनएसएस व एनवायकेएसद्वारे देशभक्तीपर ऑनलाईन मोहिम राबविण्यात यावी, तसेच सोशल मिडीया व डिजीटल माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मतेसंबंधातील गाण्यांचा प्रचार करावा, संदेश द्यावा, नागरिकांनी घराच्या बाल्कनी, गच्चीवरुन राष्ट्रीय ध्वज हलविणे, याप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देखील स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
-राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर तसेच ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर (उदा. रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सिताबर्डी) राष्ट्रध्वज उभारण्यात यावा. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक दिनांक २० मार्च १९९१, ५ डिसेंबर १९९१ आणि ११ मार्च १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी.

• राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सुर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती विभागीय आयुक्त हे त्यांच्या मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाची व्यवस्था करणार असल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. कोकण विभागीय आयुक्त हे कोकण भवन येथील समारंभाची व्यवस्था करतील. मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहणाची कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.

• याप्रमाणे सर्वसाधारण निर्देश देण्यात आले असले तरी कोरोना पॉझिटिव्हीटी दर विचारात घेऊन संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आपआपल्या अधिकारक्षेत्रात स्वातंत्र्य दिनाचे महत्व लक्षात घेऊन साजेसा समारंभ साजरा करण्यासंबंधी पालकमंत्री यांच्या सहमतीने आवश्यक ती उचित कार्यवाही करण्यासाठी मुभा देण्यात येत आहे, असे शासन आदेशात म्हटले आहे.