वणी : विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश संपादन केले आहे. महायुतीने तब्बल २३० जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. या ऐतिहासिक विजयानंतर आता मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच भाजपकडून राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 जागा जिंकत भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपकडेच असणार आहे. भाजपकडून मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरु असतानाच दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीमध्ये भाजप हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे.