चर्मकार महासंघाच्या वतीने सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने दि.15 फेब्रुवारी 2025 ला सामूहिक भव्यदिव्य विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम राष्ट्रीय चर्मकार संघाचे विदर्भ अध्यक्ष संभा वाकुजी वाघमारे यांच्या सुबक संकल्पनेतून करण्यात येत आहे. 
समाजातील युवक युवतीनी तसेच इच्छुकांनी सामूहिक विवाह सोहळ्यात आपले नावाची नोंद दि.१५ जानेवारी २०२५ पुर्वी करावी असे आवाहन आयोजकांनी केले असून या विवाह सोहळ्याला नाव नोंदविण्यासाठी ८६५७४१२३८९ ९९२२९५६९५६,९७६३५७८४३३, ७६६६०८९३२७ या क्रमांकावर परिसरातील युवक-युवतींनी संपर्क साधण्याचे आवाहन विदर्भ अध्यक्ष संभा वाघमारे यांनी केले आहे.




थोर संताच्या पुण्यतिथी निमित्त मोहदा येथे विविध कार्यक्रम संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी :  वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथी व थोर समाज सुधारक राष्टसंत संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मोहदा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गावात पहाटे 5 वा.ग्रामस्वच्छता मोहीम राबविण्यात आली.त्यानंतर पालखी सोहळा गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. दरम्यान, श्री गुरुदेव भजन मंडळ, महिला भजन मंडळ तसेच पदावली भजन मंडळानी सहभाग घेतला होता. पुण्यतिथी निमित्ताने गावातील पुरुष महिला बालक एकत्र होत पुढील कार्य सोहळ्यास सुरुवात झाली. राष्ट्रसंतांना श्रद्धांजली वाहल्या नंतर 6 वा.सामुदायिक प्रार्थना झाली. दिवस भर विविध कार्यक्रम संपन्न झाल्यावर सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचा लाभ घेत या कार्यक्रमाची सांगता झाली, यावेळी परिसरातील श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, श्री दत्त गुरुदेव पदावली भजन मंडळ, जय हनुमान भजन मंडळ,व समस्त ग्रामवासी मोहदा उपस्थित होते.

बळीराजा व्याख्यानमाला २०२४ चे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 
                           
वणी : शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष.२०१५ पासुन प्रारंभ झालेल्या या व्याख्यानमालेला सुरुवातीपासूनच श्रोत्यांचा प्रचंड प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. ही व्याख्यानमाला बौद्धिक मेजवानीत रस घेणाऱ्या सुजाण श्रोत्यांनी स्वेच्छेने दिलेल्या वर्गणीतून आयोजित करण्यात येते. 
          
यावर्षी ही व्याख्यानमाला २८ व २९ डिसेंबर २०२४ रोज शनिवार व रविवार ला बाजोरिया लॉन येथे पार पडेल.सायंकाळी ६ वाजता प्रारंभ होणाऱ्या या दोन दिवसीय व्याख्यानमालेला प्रख्यात साहीत्यिक प्रा.रंगनाथ पठारे संबोधित करतील.पहिल्या दिवशीचे स्मृतीपुष्प रामचंद्र जागोजी सपाट यांना समर्पित असुन "सामाजिक वास्तव: काल आज आणि उद्या" या विषयावर विचारमंथन होईल.तर नारायणराव सांबशिव देवडे यांना दुसरे दुसऱ्या दिवशीचे स्मृतीपुष्प समर्पित असुन "साहित्य कशासाठी?" या विषयांवर पठारे संबोधन करतील.दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजन समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन प्रशासकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

दरवर्षी प्रमाणेच श्रोत्यांनी याही वर्षी उपस्थित राहून या व्याख्यानमालेचा बौद्धीक आस्वाद घ्यावा.असे आवाहन शिव महोत्सव समिती वणीच्या वतीने उपाध्यक्ष प्रा.डॉ.करमसिंग राजपुत,निमंत्रक कृष्णदेव विधाते यांनी वणीकरांना केले आहे.

वाहनांशी संबंधित नियमांत बदल,न पाळल्यास भरावा लागेल 'इतका' दंड!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

महाराष्ट्र सरकारने वाहनांची सुरक्षा वाढवण्यासाठी हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) {नंबरप्लेट} बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2025 पासून या नियमाची अंमलबजावणी सुरू होईल. जर नियम पाळला नाही तर 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.  

काय आहे HSRP?
HSRP म्हणजे हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, ही प्लेट
- विशेष ॲल्युमिनियमपासून बनवलेली असते.  
- परावर्तित रंगांचा वापर करते, त्यामुळे रात्रीही सहज दिसते 
- सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सहज ट्रॅक केली जाऊ शकते   
- अशोक चक्र आणि 'INDIA' लोगो यावर मुद्रित असतो 

जर HSRP नसली तर काय होणार?
- मोटार वाहन कायद्यांतर्गत ₹10,000 चा दंड आकारला जाईल.  
- वाहन नोंदणी किंवा पत्ता बदलणे यासारख्या सेवा बंद केल्या जातील   
- चोरी झालेली वाहने शोधण्यात अडथळे येतील 

HSRP बसवण्यासाठी किती खर्च? 
- दुचाकी/ट्रॅक्टर– ₹450  
- तीनचाकी वाहन– ₹500  
- प्रवासी वाहन – ₹745  

HSRP कुठे बसवायची?
आरटीओने नियुक्त केलेल्या अधिकृत एजन्सीकडूनच ही प्लेट बसवली जाईल. वाहन तपशीलांची पडताळणी करून योग्य क्रमांक प्लेट दिली जाईल.  

 महत्त्वाच्या तारखा:
2029 पूर्वीच्या वाहनांना सुद्धा HSRP बसवणे बंधनकारक
- 31 मार्च 2025: सर्व वाहनांवर HSRP बसवणे आवश्यक.  
- 1 एप्रिल 2025: नियम लागू; पालन न करणाऱ्यांना दंड 

HSRP उपक्रमाचा उद्देश:
- वाहनांची सुरक्षा वाढवणे 
- चोरी गेलेल्या वाहनांना परत मिळवणे.  

HSRP बसवा आणि नियमांचे पालन करा; सुरक्षित आणि जबाबदार वाहनचालक बना! 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प २.० चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मुंबई : राज्यभरात सौर ऊर्जेचा वापर करणारे सौर ग्राम आपण तयार करत आहोत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज ऊपलब्ध होणार असून भविष्यात या हरित ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख ऊपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत आणि मोफत वीज ऊपलब्ध होणार आहे. तसेच शासनावरचा बोजा देखील कमी होणार आहे. सध्या आपण राज्यातील शेतकऱ्यांना 16 हजार मेगावॅट इतकी वीज देतो. हे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणण्याचे काम आपण दोन वर्षापासून सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्व फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांसाठीचे मोफत वीज योजना ही सरकारवर बोजा राहणार नाही आणि शेतकऱ्यांना दिवसाही वीज ऊपलब्ध होऊ शकेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला उंबरठा आणि नारंगवाडी गावातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.