सरकारी कर्मचाऱ्यांना आता व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम वापरण्यास मनाई..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे व्हॉटसअप आणि टेलेग्राम ही दोन संपर्कासाठीची अ‍ॅप्स वापरता येणार नाही. यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी कामासाठी फक्त 'संदेश इन्स्टंट मेसेजिंग' अ‍ॅपच वापरावे लागणार आहे.

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) द्वारे विकसित करण्यात आलेल्या 'संदेश' अ‍ॅपचा वापर केंद्र शासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी, विविध - राज्य शासनांमधील 200 हून अधिक शासकीय संस्था करत आहेत. 350 हून अधिक ई-गव्हर्नन्स अ‍ॅप्लिकेशन्समध्ये संदेश सूचना आणि ओटीपी पाठवण्यासाठी केला जात आहे.

का घेण्यात आला निर्णय?
संस्थेच्या स्तरावर प्रोफाइल तपशिलाची दृश्यमानता (Visibility) लपवण्याची सुविधा आहे. संदेश सुरक्षितपणे पाठवणे आणि प्राप्त करणे, सुरक्षितपणे स्टोअर करणे, ओटीपी पाठवणे व वितरित न झालेला डेटा सुरक्षित ठेवणे यासाठी शासन व शासकीय कार्यालये यांच्या गरजेनुसार अनुकूलित करण्याची सुविधा आहे. एनक्रिप्टेड मेसेज आणि फाइल्स पाठवण्यासाठी egov ॲप्लिकेशन्ससह सेवा आधारित एकीकरण यात आहे. अनौपचारिक आणि अधिकृत गट तयार करण्याची सुविधाही यात आहे.

केंद्रद्वारे विकसित करण्यात आलेल्या 'संदेश' अ‍ॅपचा वापर करण्याबाबत सर्व विभाग आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय कार्यालयांना सूचना देण्यात येत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना इतर सोशल मीडिया अ‍ॅप वापरण्याची सवय झाल्यामुळे त्यांना या आदेशामुळे थोड्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 


वाटाघाटीसाठी काँग्रेसने नेमली समन्वय समिती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत घवघवतीत यश मिळाल्यानंतर काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात लोकसभेला काँग्रेस पक्षाला तब्बल १३ जागांवर विजय मिळाला. २०१९ मधील १ जागेवरून काँग्रेसने यावेळी १३ जागा मिळविल्या त्यामुळे पक्षश्रेष्ठींची मर्जी राखण्यात नाना पटोले यांना यश मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकाही त्यांच्याच नेतृत्वात लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या निवडणुका महाविकास आघाडीतून लढविल्या जाणार आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात वाटाघाटी होणार आहेत. त्यासाठी काँग्रेसने समन्वयासाठी १० जणांची समिती नेमली आहे. यात मुंबईसाठी या समितीत ३ नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशान्वये महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेसने १० सदस्यांची समिती गठीत केली. यामध्ये राज्यातील जागावाटपासाठी ७ जणांची तर मुंबईसाठी तिघांना स्थान देण्यात आले. 

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी हे नेते पुढाकार घेणार आहेत. यामध्ये जुन्या व वरिष्ठ नेत्यांना संधी देण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांत महाविकास आघाडीत प्रदेश जागा वाटपांच्या चर्चेसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान, नितीन राऊत यांना स्थान देण्यात आले तर मुंबईच्या जागा वाटपासाठी वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख यांचा समावेश करण्यात आला.

२८ जुलैला महाराष्ट्र शेतकरी परीषद यवतमाळ येथे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : ‘ रोज रोज मरण- रोज पेटते सरण- निगरगट्ट धोरण- अजुन किती करणार सहन? ’ असा सवाल उपस्थित करीत शहरातील वडगाव रोडवरील सहकार सभागृहात रविवार २८ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४.३० दरम्यान अनेक शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 
या शेतकरी परिषदेला शेतकरी नेते विजय जावंधिया, रघुनाथ पाटील, वामनराव चटप, अमर हबीब, प्रकाश पोहरे, ज्ञानेश वाकुडकर यांची उपस्थिती राहणार असुन ‘ कृषी बाजारात हस्तक्षेपाने भाव पाडणे, शेतकरी आत्महत्या आणि त्यावर उपाय’ या विषयावर परिषदेच्या प्रथम सत्रात सकाळी ९ ते १२.३० या कालावधीत विजय जावंधिया, रघुनाथ पाटील व वामनराव चटप यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. 
परिषदेच्या दुसर्‍या सत्रात दुपारी १.३० ते ४.३० या कालावधीत ‘ निष्फळ आंदोलने, प्रतिसादशुन्य धोरणकर्ते म्हणून लढा व आयुधांचा पुनर्शोध’ या विषयावर अमर हबीब, प्रकाश पोहरे, ज्ञानेश वाकडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या परिषदे दरम्यान शेतजागलच्या ‘ किसान कृतज्ञता कोषातून’ आत्महत्याग्रस्त विधवा भगिणींना अर्थसहाय्य वाटप करण्यात येणार असुन विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. तसेच शेतकरी सनदचे प्रकाशन करण्यात येणार आहे. 
या परिषदेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अधिवेशनाचे संयोजक व शेतजागल विश्वस्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुुरूषोत्तम गावंडे, प्रा. किशोर बुटले, प्रा. यादवराव ठाकरे, शुभम मुंडवाईक आदींनी केले आहे.

वणी येथे एकल नृत्य स्पर्धेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : कोणतीही कला असो... साहित्य, विज्ञान असो की शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील कोणतीही शाखा... गुरूंचं बोट धरल्याशिवाय या ज्ञानविवरात लीलया संचार करणे शक्य नाही. आपल्या आयुष्याचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या या गरूंप्रति कृतज्ञता म्हणजेच गुरुपोर्णिमा! कलेचं आराध्य दैवत नटराज पूजन. यानिमित्ताने "संस्कार भारती" विविध क्षेत्रातील गुरुतुल्य व्यक्तींना सन्मानीत करित असते. 
हे औचित्य साधून संस्कार भारती, सागर झेप बहुद्देशीय संस्था तथा स्व. पारसमल चोरडिया फाउंडेशन, वणी द्वारा आयोजित गुरुपौर्णिमा निमित्त गुरू पूजन व नटराज पूजन तसेच मुर्ती कलावंत सत्कार यानिमित्ताने भक्ती गीतांवर आधारीत 'एकल नृत्य' स्पर्धेचे आयोजन दि. २८ जुलै २०२४ ला सकाळी ११.३० वाजता श्री विनायक हॉल, छोरिया ले-आऊट, गणेशपुर,(वणी) येथे करण्यात आले आहे. 
या स्पर्धेमध्ये अ-गट ६ ते १४, ब-गट १४ ते वरील असणाऱ्यांना भाग घेता येणार असून प्रथम बक्षीस रोख ३०००, द्वितीय बक्षीस रोख २००० तर तृतीय बक्षीस रोख १००० असे देण्यात येणार आहे. त्यामुळे या भक्ती गीतावर आधारित स्पर्धेचा लाभ घ्यावा असे, आवाहन संस्कार भारती समितीच्या अध्यक्षा श्रीमती रजनीजी पोयाम, सचिव सागर मुने व स्व. पारसमल चोरडिया फाउंडेशनचे विजयबाबू चोरडिया यांनी केले आहे. 

केंद्र सरकारने सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियमानुकुल आदेश द्यावे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

भंडारा : राज्यात दलीत आदिवासी समाजाच्या लोकांनी महसूल व वन जमिनीवर शेती साठी अतिक्रमण केले आहे. वन जमिनींवरील अतिक्रमण नियमानुकुल करणे करिता केंद्र सरकारने अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्काची मान्यता अधिनियम 2006 च्या कायदा घोषित केला त्यानुसार वन हक्क समिती मार्फत वन हक्क दावे दाखल करण्याची तरतूद करण्यात आली असुन रीतसर दावे दाखल करण्यात येतात आणि सदर दावा मंजूर करण्याकरिता जिल्हा स्तरीय समिती कडे जातो तेंव्हा अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 नियम 2008 सुधारित नियम 2012 अन्वये वन हक्क पात्र करणे करिता 13 डिसेंबर 2005 पूर्वीचा पुरावा आवश्यक आहे. 

वन जमीन धारकांच्या कब्जा सन 2005 पूर्वीचा आहे परंतु त्याची महसूल व वन विभाग कडून नोंद न घेतल्यामुळे दावे अपात्र ठरविण्यात येतात जर दावे अपात्र ठरविण्यात आले तर वन विभागांकडून जमिनी ताब्यात घेण्यासाठी कारवाई करण्यात येते जर तसे झाले तर हजारो शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही,म्हणून बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीशकुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मानवी हक्क सुरक्षा दलाचे प्रदेश अध्यक्ष अशोक तिडके यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कडे जिल्हा अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले असून 
निवेदनाची दखल न घेतल्यास जंतर मंतर मैदान दिल्ली येथे बिगर सातबारा शेतकऱ्यांचे राज्यस्तरीय सत्याग्रह आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे. 

यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष प्रफुल कुमार इंगोले सहित मानवी हक्क सुरक्षा दलाच्या राष्ट्रीय कार्य अध्यक्षा डॉ रेखा रनबावले उपस्थित होत्या.