लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता व मुदतीमुळे चिंतातूर महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे

राळेगाव : "माझी लाडकी बहीण" योजनेला लागणाऱ्या कागदपत्रे पुराव्यांची पुर्तता व योजनेला असलेल्या मुदतीत करु शकत नसल्याने मी लाडकी बहीण योजनेतुन दर महिन्याला मिळणाऱ्या १५०० रुपये लाभापासून वंचित राहणार तर नाही ना? या चिंतेमुळे दिनांक ३-७-२०२४ रोजी खैरी येथील कलावती लक्ष्मण बुरडकर (वय ५८) या महिलेने शेतातुन मजुरी करुन आल्यावर सायंकाळी पाच वाजताचे दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदर घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनला मिळतात खैरी बिट जमदार रमेश आत्राम, अविनाश चिकराम,हे घटनास्थळी पोहचुन सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहे.

"लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी मुदतीची अटच कशाला? अनेक महिला या सासरी आहे, तर अनेक महिला निरनिराळ्या कारणांमुळे बाहेरगावी आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी मुदत दिल्याने काही महिलांचे कागदोपत्री पुरावे हे लवकरच होणार असे नाही. त्यामुळे महिला चिंतातुर होऊन यापलीकडे पण अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजना ही मारेहचा अहेर की बहिणीच्या गळ्यात असलेला गळफास अशी चर्चा परीसरातील नागरिकांतून ऐकायला मिळत होती."

जेव्हापासून योजना आली तेव्हा पासून माझी आई चिंतेत आणि नाराज राहायची, प्रमाणपत्र सह कागदपत्रे माझे वेळेवर होणार नाही, मलाही लाभ घेता येणार नाही म्हणून तीने हे टोकाचे पाऊल उचलले.
-गोलु लक्ष्मण बुरडकर
मृतक माहिलेचा मुलगा रा. खैरी ता. राळेगाव जि. यवतमाळ
 

TDRF द्वारा "एक जवान, एक वृक्ष" उपक्रमाद्वारे विविध ठिकाणी वृक्षारोपण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : १ जुलै रोजी हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषि दिनानिमित्त वन महोत्सव अंतर्गत टी.डी.आर.एफ. संचालक हरिश्चंद्र ब. राठोड यांच्या मार्गदर्शनात एक जवान एक वृक्ष हा उपक्रम राबवून TDRF उपविभागीय अधिकारी कार्यालय वणी कडून विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आले. TDRF उपविभागीय अधिकारी कार्यालय वनी कडून TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद यांच्या नेतृत्वात वणी मधील विविध ठिकाणी एकूण २०० वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. 

TDRF द्वारा वृक्ष लागवडीचा प्रण
TDRF संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात सर्व TDRF अधिकारी आणि जवानांनी १ जुलै २०२४ ते ५ मार्च २०२५ पर्यंत वृक्षरोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा प्रण घेतला आहे. या कालावधीत TDRF द्वारा विविध ठिकाणी झाडे लावण्यात येईल व नागरिकांमध्ये पर्यावरण संबंधित जनजागृती करून झाडे लावण्यास इच्छुक नागरिकांना झाडांचे वाटप करून त्यांच्या हस्ते झाडे लाऊन त्यांचे संगोपन करण्यात येईल.

या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी वणी चे वन परिक्षेत्र अधिकारी प्रभाकर सोंडवले यांच्या प्रमुख उपस्थितीत छोरीया लेआउट, साईलीला नगरी, पशु वैद्यकीय रुग्णालय मध्येही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी पशुवैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. तुषार बावणे उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमात वड नीम, पिंपळ, जामुन, गुलमोहर, वेल, सीताफळ,जाम, सिंदूर, निलगिरी इत्यादी उपयोगी रोपांची लागवड करण्यात आली. 

या उपक्रमासाठी TDRF वणी कंपनीचे कंपनी कमांडर गणेश दत्तू बुरांडे, ईशा विशाल जुनगरी, वृषाली विलास वाटेकर, प्राची गोपाल डोंगे ,दुर्गा विठ्ठल डाखरे, सुमित घनशाम जुमनाके, वैभव गजानन माळावी, साहिल विजय लोघंडे, आकाश बालाजी पोयाम, इत्यादी TDRF अधिकारी व जवान उपस्थित होते.



राहुल गांधींच्‍या वक्‍तव्‍याचे मारेगावात पडसाद!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : लोकसभा सभागृहात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याचे पडसाद मारेगावात उमटले आहे. हिंदू धर्मावर आघात करत देवीदेवतांना अपमानित केल्‍याचा आरोप करताना संताप व्‍यक्‍त केला आहे. राहुल गांधी यांनी शब्द वापस घ्यावे आणि समस्त हिंदु धर्माच्या लोकांची माफी मागावी यासाठी आज ०४/०७/२०२४ ला दु. १२.०० वाजता मार्डी चौक येथे भारतीय जनता पक्ष च्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. 

यंदाच्‍या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये वाद-प्रतिसाद सुरू होते. यामध्ये धार्मिक टीकाटिप्पणीमुळे सामाजिक वातावरणही पेटले होते. निवडणुकींचे निकाल जाहीर झाले असले तरी अद्यापपर्यंत टीकाटिप्पणी सुरूच आहेत. अशात लोकसभा सभागृहात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नमूद केलेल्‍या वक्‍तव्‍याचा मारेगाव तालुका भाजपातून निषेध नोंदविला आहे. राजकारणासाठी हिंदू धर्माचा वापर करू नये, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्‍यक्‍त केल्‍या जात आहेत. 

"संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंच्या संदर्भात बेताल वक्तव्ये केली. त्याचा तीव्र निषेध करत मारेगाव तहसील कार्यालय, मारेगाव पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहेत. 

यावेळी तारेंद्र बोर्डे जिल्हाध्यक्ष, अविनाश लांबट तालुका अध्यक्ष, शंकर लालसरे, प्रशांत नांदे, अनुप महाकुलकर, मारोती तुराणकर, पवन ढवस, शशिकांत आंबटकर, विनीत जयस्वाल, यासह शेकडो भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

आज मार्डी येथे आरोग्य शिबिर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज दि.4 जुलै रोजी मार्डी येथे सकाळी 10 वाजता स्थानिक त्रिमूर्ती मंगल कार्यालयात स्व. पारसमल चोरडिया फाउंडेशन यांच्या विद्यमाने कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्रामतर्फे मोफत नेत्र चिकित्सा, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

वणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायित्त्वातून हे शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरात रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले जाणार असून, यासोबतच नेत्ररूग्णांवर सेवाग्राम येथे मोतिबिंदू शस्त्रक्रिया केले जातील. त्यानंतर रुग्णांना चष्मे सुद्धा वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजकडाकडून सांगण्यात येत आहे. 

संजय खाडे यांचा जनहित केंद्राच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा संकल्प

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त बाळूभाऊंनी चालवलेल्या लोककल्याणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन श्री. संजय रामचंद्र खाडे यांनी उद्या दिनांक ४ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता, खाती चौक, विराणी टॉकीज रोड वणी येथे “चालतं-फिरतं जनहित केंद्र" या नव्या मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 
श्री. संजय खाडे यांनी जनहित केंद्राच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकरी, मोलमजुर, महिला, युवा व दिव्यांग यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्वसामान्य जनतेचे जीवनमान सुलभ आणि सुकर करणे प्रामाणिक हेतू मनात ठेऊन ही मोहीम श्री. खाडे यांनी हाती घेतली आहे. 
तरी उद्या होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाला परिसरातील सर्व मायबाप जनतेने, पदाधिकाऱ्यांनी-कार्यकर्त्यांनी व पत्रकार बंधू - भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संजय रामचंद्र खाडे यांनी केले आहे.