चंद्रपूर मतदार संघात शुक्रवारी अग्निपरीक्षा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात उद्या शुक्रवारी (ता.19) पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पूर्व विदर्भात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा- गोंदिया या पाच मतदारसंघाचा समावेश आहे.

भाजपसाठी नागपूरनंतर सर्वात महत्वाचा मतदारसंघ चंद्रपूर आहे. इंडिया,महाविकास आघाडीने या मतदारसंघातील दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. राज्याचे वन व सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे उमेदवार आहेत. मुनगंटीवार केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढत आहेत. धानोरकर यांचा मतदारसंघातील जातीय समीकरणावर भर आहे. त्यांनी मतदारसंघात विकासच केलेला नाही. मुनगंटीवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. त्यामुळे येथे सर्वांत आटीतटीची आणि चूरशीची लढत होणार आहे.

2019 मधील निवडणुकीत पाच पैकी चार जागा भाजप-शिवसेना युतीने तर एक जागा काँग्रेसने जिंकली होती. ह्या ठिकाणी थेट आमने सामने लढत होत आहे. या दोन्ही उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आता या मतदारसंघातून कोणाला कौल मिळतो यासाठी जून महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जून महिन्यात मान्सूनच्या आगमनांसह अनेकांच्या चेहऱ्यावर विजयाच्या आनंदाचे भावपूर्ण आहेत तर काहींच्या नशिबी पराभवाचा पाऊस पडणार आहे. येथील उमेदवारांचे भवितव्य जरी उद्या शुक्रवारी ईव्हीएममध्ये लॉक होत असले तरी कोणाचे भाग्य उघडते याची प्रत्यक्ष सर्वच उमेदवारांना 47 दिवस करावीच लागणार आहे.

पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा 18-19 या वयोगटातील 1 लाख 41 हजार 457 नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांनी मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून दुर्गम भागातील मतदान केंद्रापर्यंत आवश्यक मतदान साहित्य पोहोच करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरसह आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात नवमतदारांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करुन घेतली आहे.

18-19 वयोगटातील सर्वाधिक नवमतदार रामटेक मतदारसंघात आहेत. त्यापाठोपाठ भंडारा-गोंदिया या मतदारसंघात आहेत. रामटेक मतदारसंघात 31,725, भंडारा-गोंदिया 31,353, नागपूर 29,910, चंद्रपूर 24,443 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 24,026 इतके नवमतदार आहेत. यासह 20-29 वयोगटांतील सर्वाधिक मतदारही रामटेक मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 3,83,276, भंडारा-गोंदिया 3,66,570, चंद्रपूर 3,42,787, नागपूर 3,37,961 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 3,28,735 इतके मतदार आहेत.

30-39 वयोगटातील सर्वाधिक मतदार हे नागपूर मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 5,06,372, रामटेक 4,90,339, चंद्रपूर 4,25,829, भंडारा-गोंदिया 3,99,115 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 3,56,921 इतके मतदार आहेत.

पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक मतदार सर्वाधिक नागपूर मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 70,698 इतके मतदार आहेत. त्यापाठोपाठ रामटेक 46,413, भंडारा-गोंदिया 38,269, चंद्रपुर 37,480 आणि गडचिरोली-चिमुर 33,559 असे एकूण 2,26,419 ज्येष्ठ मतदार आहेत. येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून सर्व मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी केले आहे.

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी जवळ आली असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. शिवाय मतदानातूनच आपण आपले व देशाचे उज्वल भविष्य निश्चित करू शकतो. त्यामुळे मतदारांनो, कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सामील व्हा, असे कळकळीचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मतदारांच्या नावे संदेशपत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहनही केले आहे.

जिल्हाधिकारी म्हणतात की, भारत हा उत्सवप्रिय देश आहे. प्रत्येक उत्सव आपण सर्वजण मोठ्या आनंदाने साजरा करीत असतो. यावर्षीदेखील लोकशाहीचा उत्सव देशभरात साजरा होत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश मानला जातो. या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवून मतदानाचे कर्तव्य पार पाडायचे आहे.

भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. या मतदानाच्या माध्यमातूनच आपण आपले भविष्य घडवू शकतो. देशाच्या भविष्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन नि:ष्पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणुका घेण्यासाठी कटिबद्ध आहे.

त्यामुळे येत्या 19 एप्रिल 2024 रोजी 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीत सहभागी व्हा. विशेष म्हणजे कोणाच्याही दबावात न येता निर्भिडपणे मतदान करा. लक्षात ठेवा मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे सर्व कामे बाजुला ठेवून कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रातून केले आहे.

महाविकास आघाडीचा राजूर येथे झंझावत प्रचार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : इंडिया, महाविकास आघाडीचा लोकसभेचा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या निवडणूक प्रचाराला शेवटचा एक दिवस शिल्लक असताना तालुक्यातील सर्वात मोठे गाव ज्याला मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते अश्या राजूर गावात आघाडीचे सर्वच घटक पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी गावातील नागरिकांच्या भेटी घेत इजारा येथे सभा घेतली. हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढत असल्याने लोकशाही, संविधान व देश वाचविण्यासाठी प्रतिभा धानोरकर यांना निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले.

महाविकास आघाडीचे घटक पक्षातील उभाठा सेनेचे नेते संजयभाऊ देरकर, कांग्रेसचे डॅनी संड्रावार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कुमार मोहरमपुरी, मो. असलम, डेव्हिड पेरकावार, महादेव तेडेवार, प्रवीण खानझोडे, माजी जि प सदस्य संघदीप भगत, बालाजी मिलमिले, राजू तुराणकर, गणेश मिलमिले, फैजल खान, रावबान उईके, प्रणिता असलम, दिशा फुलझेले, आदींचा प्रमुख उपस्थितीत गावातील प्रमुख मार्गाने प्रतिभाताई धानोरकर यांचा प्रचार करण्यात आला. 

येथील वॉर्ड क्र. 1 येथे संत गाडगेबाबा चौकात कॉर्नर सभा घेण्यात आली. "चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात भाजपाच्या मंत्री असलेल्या व स्वतःला विकास पुरुष म्हणवून घेणाऱ्या उमेदवाराचा पुढे कांग्रेसच्या महिला उमेदवार धानोराकर यांना जनतेचा प्रचंड समर्थन मिळत असल्याने भाजपाचा पायाखालची वाळू निसटत असल्याने भाजप कडून घाणेरडे विधान केले जात आहे, तर प्रचार करण्यासाठी सिनेकलाकारांना आणावे लागत आहे. भाजपाचा जनविरोधी कार्यामुळे जनते मध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न महायुतीकडून केल्या जात आहे. सध्या भाजप कडे निवडणूक रोख्या द्वारे आलेल्या पैशाचा महापुरा मुळे कुठलेही गैरप्रकार करू शकतात, त्यामुळे जनतेने ह्यापासून सावध राहावे." असे संजयभाऊ देरकर यांनी कॉर्नर सभेत बोलताना सांगितले, तर कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी, "भाजपाची सरकार ही शेतकरी विरोधी, कामगार विरोधी व महिला विरोधी आणि जगात सध्या युवकांची सर्वात जास्त संख्या असलेल्या देशात शिक्षित युवकच बेरोजगार असल्याने युवक विरोधी भाजप सरकारला सत्तेवरून बेदखल केले पाहिजे" असे आवाहन केले. यावेळेस बालाजी मिलमिले, संघदीप भगत, संतोष माहुरे, डेव्हिड पेरकावार, प्रवीण खानजोडे, यांनीही सभेला संबोधित करून "हुकूमशाहीला घालवून लोकशाहीचा विजय करून धनबल भाजपापासून गाफिल न राहता सावध राहण्याची गरज आहे" असेही ते म्हणाले.

या राजूर गावातील प्रचाराला भाकपाचे कॉ. नंदकिशोर लोहकरे, राजूर विकास संघर्ष समितीचे जयंत कोयरे, व असंख्य गावकऱ्यांनीं सहभाग नोंदविला.

या निवडणुकीत 'आघाडी'ची प्रचंड चर्चा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : भाजप काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार झाला आणि 10 वर्षानंतर 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तेवर परतला आणि लोकसभेत पूर्ण बहुमत मिळवले. त्यानंतर मागील काळात केंद्र सरकारकडून महागाई, बेरोजगारी, ईडी, सीबीआय कारवाया आणि महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करून विशेष करून शिवसेना, राष्ट्रवादी फोडून राज्यात सत्ता मिळवली असे राजकीय विश्लेषक सांगतात. महाराष्ट्रात काय चाललंय हे उघड्या डोळ्यांनी इथल्या मराठी माणसांनी बघितलं. दिवसामागून दिवस गेले आणि पाहता पाहता लोकसभा निवडणूक लागली. त्याअगोदर महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण, शेतकऱ्यांच्या शेत मालाला भाव, सुशिक्षित बेरोजगारांना नौकऱ्या, योजनेत बदल अशा विविध समस्या आणि त्यातील परिणाम गोर गरीब जनतेने सोसले. शेतकरी त्रस्त,शेतमालाला भाव मागत आहे, पण मिळत नाही. विद्यार्थ्यांना नौकरी मिळत नाही, खाजगीकरण थांबण्याचे नाव घेत नाही, महागाई तर कित्येकांचे कंबरडे मोडत आहे. पेपर फुटी ने डोकं वर काढलं, महिलावर होणारे अत्याचार आणि सरकार च्या योजना खास करून मोफत वाळू योजना ही घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही.कित्येकांचा संसार उघड्यावर आला आहे. धावपळीत जिवन जगत असताना अनेक ठिकाणी लक्ष द्यावे लागल्यामुळे होणारी मनाची, बुद्धीची, विचारांची, आणि कृतींची संभ्रमित अशी अवस्था. अशी त्रेधा तिरपीट उडाल्यामुळे सामान्य माणसाला एकही काम लक्षपूर्वक आणि धड करणे अशक्य होऊन बसले. त्यामुळे आता लोक मोदी सरकारला कंटाळलेले दिसून येत आहे. मोदींची क्रेज ओसरली आणि ती म्हणजे पूर्व विदर्भातून परिणाम दिसून येणार अशी चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे. चंद्रपूर येथील प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सभेत चक्क उमेदवारांनेच बहीण भावाच्या नात्याला कलंकित करणारे घृणास्पद जाहीर बोलून आपली वोट बँक किंबहुना मतदार संघ नाराज झाल्याचे बोलल्या जात आहे. आता ते बोलण्यामागचे कारण प्रत्येक सभेमधून नेते मंडळी सांगत फिरत आहेत. मात्र तो शब्द आणि बोलणं जनतेच्या चांगलेच जिव्हारी लागल्याने मतदारांचा कौल आघाडी कडे वळता होत असल्याचे चित्र ग्रामीण भागातून दिसून येत आहे. यासाठी सर्व घटक पक्ष, मित्र पक्ष एकत्र येत लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरल्यागत आघाडी च्या उमेदवाराचा प्रचार प्रचंड कमालीचा दिसून येत आहे. ताई येणार असं जरी म्हटलं तर विरोधी पक्षातील कार्यकर्ता म्हणतोय आमच्या नेता दुर्लक्ष करत असल्याने आम्ही टेन्शन घेत नाही, मात्र ही एक प्रकारची गहरी चाल असू शकते. हे समजून घेतलं पाहिजे असेही काही राजकीय जाणकार सांगतात. सोशल माध्यमावर वातावरण एकदम तापल्याचे दिसून येत आहे. मतदानाला तीन दिवस आहे. 19 एप्रिल ला सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या अनुषंगाने निवडणूक अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. वरिष्ठ वेळोवेळी कार्यक्रम तपासत आहे. असेच आता पुढाऱ्यांनी मतदार तपासला पाहिजेत, कोणकोणाच्या पथ्यावर आहे. ह्याकडे विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. ही निवडणूक नुसतीच निवडणूक नसून मोठी लढाई आहे. आणि या लढाईत ताईंना जनतेशी "मेनीफेस्टो" घेऊन संवाद साधत भाऊंचे पानिपत करायचं आहे. मात्र, हे दिसते वाटते तेवढे सोपं नाही. ही निवडणूक मोठी आटीतटी ची होणार, असे बोलल्या जात आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन भाऊंचे मतदार फिक्स आहे. ते फुटणार नाही, पण ताईंचे मतदार तीन तिघाडा आणि काम बिघाडा, हे ट्रिपल इंजिन कधी गंडतील सांगता येत नाही. नुसतं वातावरण आहे म्हणून गाफिल राहून चालता येणार नाही.यंदा कर्तव्य आहे म्हणून,समजून मतदान पारड्यात पाडून घ्यायचे आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी हा मतदार संघ फार मोठा आहे, यात अनेकांचे राजकीय वलय आहे. त्यापुढे नवख्यांचे काय चालणार असे चर्चील्या जात आहे. परंतु आपला समाज म्हणून संख्याबळ मोठ्या प्रमाणावर आहे, तसेच इतरी समाज, जनता पाठीशी असल्याचे समर्थन देत आहे. हे इतपत ठिक असले तरी मतदार मत दान करणं आणि तो आपल्यालाच मतदान करतो का?हे आतातरी सांगणं किंवा गणित जुळवणं अवघड आहे. उद्यापासून रात्र वैऱ्याची आहे. आणि असं म्हटलं जात की रात्रीस खेळ चाले... त्यामुळे या निवडणुकीत भाऊ की ताई,कोण बाजी मारणार? हे येणारा काळ सांगेल...