अवकाळी पावसाने झोडपले; घरावरील टिनपत्रे उडाली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने मारेगाव तालुक्याला झोडपले असून अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाल्याची घटना घडली आहे. 

तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या कोसारा गावात या अवकाळीचा जोरदार फटका बसला असून, अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली तसेच विद्युतची तार तुटली असून विद्युत खांबासह डीपी सुध्दा कोसळली असल्याची माहिती आहे. 
मात्र, वृत्त लिहेपर्यंत कुठलिही जिवीतहानी झाली नाही. हा पाऊस जवळपास सायंकाळी 7 वाजताचे सुमारास बरसला आहे. शेतशिवारातून बहुतेक नागरिक घरी पोहचल्यानंतर पावसाची सुरुवात झाली होती. हा अवकाळी पाऊस तालुक्यात बहुतांश बरसला असून रस्त्याबाजूचे झाडें झूडपी कोसळल्याची घटना घडली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : नागपूर- 53 पैकी 26, भंडारा-गोंदिया- 40 पैकी 22, गडचिरोली-चिमूर- 12 पैकी 12, चंद्रपूर- 35 पैकी 15 आणि रामटेक लोकसभा मतदार संघात 41 पैकी 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 30 मार्च 2024 ही असून या मतदार संघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होईल.

चंद्रपूर येथे सामान्य निरीक्षकांनी घेतला निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 13-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी जिल्ह्यातील तसेच चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

नियोजन सभागृह येथे निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणा तसेच नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक श्री. जाटव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक सुजीत दास, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, सहायक जिल्हाधिकारी (आर्णी) सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.

लोकेशकुमार जाटव म्हणाले, निवडणुकीसाठी मतदानाचे साहित्य घेऊन जाताना डिस्पॅच सेंटरमध्ये आवश्यक प्रमाणात मनुष्यबळ ठेवावे. तसेच संबंधित यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना वैयक्तिक मॅसेज जाणे आवश्यक आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम गोळा करताना अतिशय दक्ष राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी सादरीकरण करताना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी, जिल्ह्याचा आढावा, मतदान प्रक्रियेमध्ये असलेले मनुष्यबळ व्यवस्थापन, अधिकारी-कर्मचा-यांचे प्रशिक्षण, साहित्य व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, मतदान यंत्र सुरक्षा व व्यवस्थापन, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणूक खर्च व्यवस्थापन, मतपत्रिका, पोस्टल बॅलेट, मतदार मदत केंद्र, तक्रार निवारण केंद्र, सी – व्हीजील ॲप, 85 वर्षांवरील व्यक्तींना तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींना गृहमतदानाची सुविधा आदींबाबत निवडणूक निरीक्षकांना माहिती दिली.

बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, नोडल अधिकारी व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

दिव्यांग आनंदने उपसरपंच अनिल डोंगरे यांचे मानले आभार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : दिव्यांग आनंद साव यांना नुकतीच मुंबई येथील आयकर विभागात नोकरी मिळाली. दिव्यांग आनंद साव याला सात आठ महिन्यापूर्वी क्षय रोगाने ग्रासले होते. त्यावेळी त्याला त्याच्या इलाजासोबत पोषक आहाराची सक्त गरज होती. दिव्यांग आनंद चे वडील वृद्ध व त्यांची परिस्थिती अतिशय हालाखीची असल्यामुळे ते त्याला पाहिजे तसा पोशाख आहार देऊ शकत नव्हते, ही बाब आरोग्य विभागाच्या लक्षात आली असता त्यांनी श्री.अनिल डोंगरे  उपसरपंच यांना माहिती दिली. श्री.डोंगरे यांनी लगेच दिव्यांग आनंद साव ला सहा महिन्याचा पोषक आहार देण्याची जबाबदारी घेतली. त्या पोषक आहारामुळे दिव्यांग आनंद ची तब्येत सुदृढ झाली आणि आयकर विभागाच्या नोकरी करिता चांगल्या प्रकारे अभ्यास करू लागला त्याने आयकर विभागाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून पास झाला.

दिव्यांग आनंद ने नोकरी मिळवली,मुंबईवरून आपल्या गावाला परत आल्यावर आनंद साव ने लगेच श्री.अनिल  डोंगरे यांचे घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली त्यांना मिठाई देऊन त्यांचे आभार व धन्यवाद मानले. आपण नेहमीच दिव्यांग असो की गरीब,निराधार व्यक्ती असो त्याच्या मदतीला धावून येतात माझ्या तब्बेतीची वेळी आपण धावून आले, मला मदत केली त्यामुळे मी अभ्यास करू शकलो व मी नोकरी मिळू शकलो, जर माझ्या तब्बेतीची वेळी आपण धावून आले नसता तर, कदाचित नोकरीच्या परीक्षेसाठी मी बसू शकलो नसतो. नोकरी साठी पात्र ठरू शकलो नसतो असे, यावेळी दिव्यांग आनंद साव ने त्यांच्या भेटी दरम्यान बोलून दाखवले.

एक दिव्यांग व्यक्ती आपण केलेल्या मदतीच्या कार्यातून धन्यवाद आभार मानते, यासारखे दुसरे पुण्याचे मोठे कार्य असू शकत नाही. माझ्या मनाला खूप समाधान वाटले असेच माझ्या हातून नेहमी सेवेचे कार्य होत राहणार असे श्री.अनिल भाऊ डोंगरे यांनी यावेळी सांगितले.

राजूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सहात साजरी


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : "शेतकऱ्यांना बी, बियाणे, शेतसारा कमी ठेवणे, दुष्काळात शेत सारा माफ करणे, शेतमालाचा देठा लाही हात न लावण्याचे फर्मान काढणे, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मुसक्या बांधून कठोर दंड देणे, गुलामांचा व्यापारावर बंदी म्हणजेच वेठबिगार, कष्टकऱ्यांचे शोषण बंद करणे, सर्व धर्मांना समान लेखणे आणि आपल्या सैन्यात बरोबरीचे स्थान देणे, कारभारात सामावून घेणे हे या छत्रपती शिवरायांचा कार्यामुळे रयतेला हे राज्य स्वतःचे आहे असे वाटायचे त्यामुळे त्यांच्यासाठी जीव द्यायलाही तयार असायचे, परंतु आज लोकशाही मध्ये निवडून दिलेले राज्यकर्ते मात्र जातीभेद, धर्मांधता, महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणे, त्यांच्यावर कार्यवाही न करणे, शेतकरी विरोधी, कामगार विरोधी कायदे करणे असे दुष्कृत्य करताना दिसत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आजचा लोकशाही लाही लाजवतील असे महान कार्य असल्याने आज लोकशाहीत सुद्धा त्यांचा जयजयकार होतो आहे." असा सूर काल राजूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथी प्रमाणे केल्या गेलेल्या जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या वक्त्यांनी काढला.

या जयंती कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून यवतमाळ जि. म. बँक लि. चे उपाध्यक्ष संजय देरकर तर अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य संघदीप भगत तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेनेचे अजिंक्य शेंडे, मा. उपसरपंच अशोक भगत, माकपचे कॉ. कुमार मोहरमपुरी, मा. सरपंच प्रणिता असलम, ग्रा. प. सदस्य अमर तितरे, बबिता सिंग, रेहाना सिद्दीकी,ओम चिमुरकर व पत्रकार अजय कंडेवार उपस्थित होते.
या वेळेस संजयभाऊ देरकर, संघदीप भगत, कुमार मोहरमपुरी, अजय कंडेवार यांनी विचार मांडले. 
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा व त्यांचा जीवनावर वक्तव्य असे स्पर्धेचे स्वरूप होते.या स्पर्धेत प्रथम पुरस्कार कु. लावण्या मारोती पुनवटकर, द्वितीय शाश्वत फुलझेले, तृतीय प्रतीक अमर सोलंकी तर प्रोत्साहन म्हणून अंशिका नंदकिशोर लोहकरे व लावण्या न. लोहकरे यांनी पटकाविले. 

या कार्यक्रमात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या प्रज्ञा मा. पुनवटकर यांचाही गौरव व सत्कार करण्यात आला. यावेळेस सुमधुर गीत गायन व क्लासिकल नृत्याचा सूर संगीतमय कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे संचालन सन्मान स्त्री शक्तीचा उपाध्यक्ष दिशा अमृत फुलझेले यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी युवा सेना शाखा प्रमुख अमृत फुलझेले, अभिजित सुरसे, सिनू दासारी, प्रफुल पाटील, आकाश जोगदंडे, बंडू मोडक, आकाश बोलगमवार, सचिन भालेराव, नामदेव व अन्य प्रभागातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.