मारेगाव : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक वर कारवाई

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक वाहनावर आज शुक्रवारी (दि.29) महसूल पथकाने जप्तीची कारवाई केली. यावेळी रॉयल्टी न आढळल्याने महसूल पथकाने ट्रकसह रेती जप्त केली.

अवैध रेती वाहतुकीला आळा बसावा, यासाठी मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी हे पथक मार्डी परिसरात ग्रस्त घालत होते. यावेळी मालवाहतुक करणारा ट्रक क्र. (एम एच 27 बी एक्स 4559) तपासला असता रेती वाहतूक होत असल्याचे मार्डी ते मजरा रस्त्यावर आढळून आले. यावेळी वाहन चालक याच्याकडे कागदपत्र्यांची चौकशी करण्यात आली. मात्र, तो काहीच बोलायला तयार नसल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आज सकाळी दोन तास चाललेल्या कारवाई दरम्यान,कागदपत्र्यात तफावत आढळल्याने पथकाने रेतीसह ट्रक ताब्यात घेऊन जप्ती ची कारवाई केली व रेती सह ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. ही कारवाई मंडळ अधिकारी अमोल गुघाने मारेगाव, तलाठी कुळमेथे, तलाठी मडावी, तलाठी सोयाम, कोतवाल भोंगळे, कोयचाडे, येवले यांनी केली.

अभिकर्ता राजेश पुण्यानी यांचे अपघाती निधन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मारेगावहून दैनिक बचतीचे कलेक्शन आटपवून वणी कडे परत येत असताना मंगरूळ (रोड) जवळ रात्री साडे आठ वा. च्या दरम्यान अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने दैनिक बचत अभिकर्त्याचे नागपूर येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

राजेश नरसिंग पुण्यानी (53) असे अपघातात निधन झालेल्या दैनिक बचत अभिकर्त्याचे नाव आहे. ते अनेक वर्षापासून दैनिक बचत वसुली अभिकर्ता म्हणून विविध पतसंस्थामध्ये, तसेच वणी येथील दैनिक बचत अभिकर्ता म्हणून परिचित होते. 

काल गुरुवारी नेहमीप्रमाणे राजूर, वणी येथील खातेदारांची जमा रक्कम कलेक्शन करून मारेगाव वरून वणी परतत असताना त्यांना अज्ञात वाहनाने मागून जबर धडक दिली असा कयास आहे. यात राजेश खाली पडले व गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना मांगरूळ जवळ घडली असून दरम्यान,लोकांनी त्याला प्रथम मारेगाव येथे व नंतर वणीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविले, मात्र त्यांचा रात्रीच मृत्यू झाला. 

राजेश यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

सामान्य निवडणूक निरीक्षकांची चंद्रपूर येथील मिडीया सेंटरला भेट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी जाहिरातींचे प्रमाणीकरण, पेड न्यूज, फेक न्यूज, समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी) स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे कार्य जिल्हा माहिती कार्यालयाच्या मिडीया सेंटर येथून सुरू असून या सेंटरला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., कार्यकारी अभियंता तथा निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी मुकेशकुमार टांगले उपस्थित होते.

यावेळी श्री. जाटव यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि सोशल मिडीयाच्या मॉनेटरिंगबाबत माहिती जाणून घेतली. तसेच सोशल मिडीयावर करण्यात येणा-या पोस्टबाबत अतिशय गांभिर्याने लक्ष ठेवावे, वृत्तपत्रात पेडन्यूज तसेच फेकन्यूज प्रकाशित झाल्यास त्वरीत कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या. प्रमाणीकरणासाठी उमेदवारांचे अर्ज किती दिवसात निकाली काढल्या जातात, याबाबत त्यांनी विचारणा केली. तसेच फाईल्सची पाहणी केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीचे कार्यपध्दती तसेच मिडीया सेंटर बाबत सामान्य निवडणूक निरीक्षकांना अवगत केले.

चंद्रपूर लोकसभा निवडणूक: छानणी नंतर 15 उमेदवार रिंगणात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरीता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवार 27 मार्च च्या दिवसापर्यंत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अर्ज भरणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या 36 तर दाखल नामनिर्देशन पत्रांची एकुण संख्या 48 झाली आहे. आज दि.28 मार्च रोजी अर्जाच्या छानणी नंतर 15 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

वैध उमेदवारी अर्जांमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस धानोरकर प्रतिभा सुरेश, भारतीय जनता पक्ष मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद, बहुजन समाज पार्टी रामटेके राजेंद्र हरिश्चंद्र, जनसेवा गोंडवाना पार्टी सयाम अवचित श्यामराव, जय विदर्भ पक्षाचे राठोड अशोक राणाजी, गोंडवाना गणतंत्र पक्ष शेडमाके नामदेव माणिकराव, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी घोनमोडे पूर्णिमा दिलीप, वंचित बहुजन आघाडी बेले राजेश वारलुजी, अखिल भारतीय मानवता पक्ष राऊत वनिता जितेंद्र, सन्मान राजकीय पक्ष लसंते विकास उत्तमराव, भीमसेना कसालवार विद्यासागर कालिदास, पीपल्स पार्टी ऑफ भारत (लोकशाही) बर्के सेवकदास कवडू, अपक्ष उराडे दिवाकर हरि, अपक्ष दहिवले मिलींद प्रल्हाद, अपक्ष गावंडे संजय निलकंठ हे उमेदवार रिंगणात आहेत.

लोकशाही महोत्सवाची पहिल्या टप्प्याने सुरुवात केली आहे. काल 27 मार्चला उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख होती आणि या अंतिम तारखेला विविध उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली असून 30 मार्च पर्यंत उमेदवारांना आपले नामांकन अर्ज वापस घेता येणार आहेत, त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होऊ शकेल.

“लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्र व विशेषत: विदर्भाच्या राजकारणाची दिशा आदिवासी समाज ठरविणार”- दिनेश बाबुराव मडावी

 सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्र राज्यात 4 लोकसभा निर्वाचन श्रेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत, आणि 24 विधानसभेसाठी राखीव आहेत. महाराष्ट्र निर्वाचन आयोग अनुसूचित जमातीची लोकसंख्या 7.50 टक्के नमुद करते. परंतु 2011 ची जनगणना झालीच नाही. ती लोकसंख्या गृहीत धरत नाही. ही वाढीव लोकसंख्या नमुद केल्यास ती 9.76 टक्के इतकी वाढते. ही लोकसंख्या महाराष्ट्रातील सरकार घोषित करित नाही. कारण त्या प्रमाणात बजेट व राजकीय आरक्षण वाढवावे लागेल.
  
विदर्भात आदिवासी समाजाच्या मतदारांची संख्या 37 टक्के आहे. गडचिरोली 4.30 लाख, चंद्रपूर 5.50 लाख, भंडारा-गोंदिया 4.75 लाख ,रामटेक 5.05 लाख, नागपूर 2.45 लाख,अमरावती 3.70 लाख, यवतमाळ-वाशीम 5.60 लाख, अकोला 3.50, बुलढाणा 2.80 लाख, वर्धा 2.30 लाख, ऐवढी आहे,महाराष्ट्रात राखीव जागा सोडून 16 लोकसभा निर्वाचन क्षेत्रात आदिवासींचे मतदान निर्णायक आहे. कोणत्याही पक्षाला लोळविण्याची महा-शक्ती आदिवासी मतदारांची आहे. असे असतांनाही आदिवासी समाजावर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अन्याय वाढतच आहेत. मतदानापुरता त्यांचा उपयोग होतो.प्रत्येक निवडणूकीत M-3 (मास, मदीरा व मनी) चा वापर करून मतदारांना सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षाकडे वळविण्याचा फंडा वापरतो.
   
वर्तमान काळात या प्रथेला संपविण्याचा चंग प्रत्येक आदिवासी संघटनांनी बांधला आहे.आपली ताकद त्यांनी ओळखली असून आदिवासी विरोधी पक्षांना त्यांची जागा दाखविण्याचा निर्धार प्रत्येक आदिवासी मतदार करणार आहे.मुठभर सत्तेचे लोभी वगळून आदिवासी समाजाच्या न्याय- हक्कांसाठी व सर्वांगीण विकासासाठी, अस्मितेसाठी प्रत्येक आदिवासी मतदार सजग झाला आहे. याची परिणीती येत्या लोकसभा निवडणूकीत दिसतीलच ही बाब प्रत्येक राजकीय पक्षाने गाठ बांधून घ्यावी..! हा निर्वाणीचा सूचक इशारा सह आदिवासी समाज बांधवाना आवाहन सामाजिक कार्यकर्ते दिनेश मडावी यांनी दिला आहे.