जागतिक महिलांदिनी कर्तृत्वान महिलांचा मारेगावात सत्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : जागतिक महिलां दिनाचे औचित्य साधून मारेगावात कर्तृत्वान महिलांचा सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.मैत्री कट्टा मारेगाव ग्रुपच्या वतीने आयोजित या सोहळ्यात स्त्री शक्तीच्या कर्तृत्वाची शोभा यात्रा,कर्तृत्ववान महिलांचा साळी चोळी देऊन सन्मान,नृत्य स्पर्धा इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहे.मारेगाव येथील शेतकरी सुविधा केंद्रात आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ 8 मार्चला होणार आहे. या दिवशी दुपारी 2वाजता प्रसिद्धीच्या प्रवाहात नसलेल्या परंतु सकारात्मक कार्य करणाऱ्या कर्तुत्वान नोंदणीकृत महिलांचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात येणार आहे.       

माजी नगराध्यक्षा इंदुताई किन्हेकर वसंत जिनींग चे संचालक गजाजन खापणे,हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
9 मार्चला सायंकाळी 4 वाजता भव्य स्त्री सन्मान शोभायात्रा काढली जाणार आहे.या शोभायात्रेत विविध राज्याचे लोकनृत्य आणि देखावे सादर केले जाणार आहे. महिला सांस्कृतिक रॅली चे उदघाटन किरणताई देरकर करणार आहे.तर प्रमुख पाहुणे म्हणून इजहार शेख,संध्या पोटे, मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष गौरीशंकर खुराणा हे उपस्थित राहणार आहे.

10 मार्चला सायंकाळी 5वाजता 30 वर्षा वरील वयोगटाच्या महिला करीता नृत्यस्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे.
वसंत जिनिंगच्या पटांगणावर समूह नृत्य व एकल नृत्य अश्या दोन प्रकारची नृत्य स्पर्धा होणार आहे.या नृत्य स्पर्धा चे उदघाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर करणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंगनाथ स्वामी पत संस्था वणीचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जगन्नाथ मल्टी स्टेट क्रेडिट को आप.सोसायटी वणीचे अध्यक्ष संजय खाडे,वसंत जिनिगचे संचालक रवि धानोरकर, मारेगावचे नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की डॉ.विनोद आदे उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन दीपक जूनेजा,उदय रायपुरे, गजानन जैस्वाल,शहाबुद्दीन अजानी, दुष्यंत जैस्वाल यांनी केले आहे.

या उन्हाळ्यात 150 विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलेल ‘हास्य’


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : स्माईल फाउंडेशन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘स्पोकन इंग्लिश’ अर्थात इंग्रजी संभाषणाचे उन्हाळी शिबिर घेत आहे. या शिबिरात दिव्यांग, अनाथ, आर्थिकदृष्ट्या असमर्थ अशा 150 विद्यार्थ्यांना या शिबिरात मोफत प्रवेश दिला जाईल. इतरांकरिता नाममात्र शुल्क आकारण्यात येईल. 3 मार्चपासून या शिबिरात प्रवेश घेण्यासाठी नोंदणी होईल. ही नोंदणी एस. पी. शाळेजवळील वॉटर सप्लाय कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव यांच्याकडे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करता येईल. हे शिबिर 1 ते 31 मे दरम्यान जनता शाळेजवळील गुरूनगर येथील हनुमानमंदिर जवळ होईल. शिबिरार्थी 7038204209 या मोबाईल नंबरवरदेखील नोंदणी करता येईल.

 हे शिबिर इयत्ता 4 थी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी राहील. नोंदणी करताना एक पासपोर्ट साईज फोटोसह फॉर्म भरणे आवश्यक आहे. याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2024 ही राहील. या शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बेसीक इंग्लीश म्हणजेच पायाभूत इंग्रजीवर भर दिला जाईल. व्यक्तिमत्व विकासाचं नवं तंत्र या शिबिरातून विद्यार्थ्यांना मिळेल. नेतृत्वगुणांचा विकास व्हावा म्हणून तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. आरोग्यम् धनसंपदा या सत्रात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे तज्ज्ञ सांगतील. वक्तृत्वकला तथा संभाषण कौशल्य, वाचनकौशल्य यावर त्या त्या क्षेत्रांतील एक्सपर्ट्स प्रशिक्षण देतील. 

 शिबिरार्थ्यांना हसतखेळत हे प्रशिक्षण पूर्ण करता यावं म्हणून जोडीला अनेक उपक्रम राहतील. यात शिबिरार्थ्यांसाठी सहल होईल. संपूर्ण शिबिरार्थ्यांसह सिनेमा पाहिला जाईल. स्विमिंग आणि अन्य इनडोअर आऊटडोअर गेम्स होतील. प्रतिभावंताच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नृत्य, अभिनय आदी कलाप्रकारांचं सादरीरकण होईल. सामाजिक कार्यकर्ते तथा उदार दानदाते विजयबाबू चोरडिया, महाराष्टृ राज्य पणण महासंघाचे संचालक संजय खाडे आणि प्रसिद्ध उद्योेजक किरण दिकुंडवार, तुषार नगरवाला, सचिन दुमोरे, हितेश मेहता, डाॅ. अनिकेत अलोणे, मनीष कोंडावार, डाॅ. आशुतोष जाधव, रमेश तामगाडगे, रवी रेभे, राजू पिंपळकर, मनीष बुरडकर, प्रसाद पिपराडे, दत्तात्रेय पुलेनवार यांनी या शिबिरातल्या अनेक जबाबदाऱ्या उचलल्यात.

 तेव्हा लवकरात लवकर आपल्या नावाची नोंदणी सायंकाळी 5 ते 7 या वेळेतच संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर जाधव यांच्याकडे करावी. या शिबिराच्या यशासाठी अध्यक्ष सागर जाधव, उपाध्यक्ष पीयुष आत्राम सचिव आदर्श दाढे, विश्‍वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, कुणाल आत्राम, सचिन जाधव, तन्मय कापसे , अनिकेत वासरीकर, घनश्याम हेपट, मयूर भरटकर, राज भरटकर, कार्तिक पिदुरकर, विष्णू घोगरे हे सदस्य कार्यरत आहेत.

तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील तरोडा येथे 24 व 25 फेब्रुवारी असे दोन दिवस भक्तिमय वातावरणात गावात वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 55 वा पुण्यस्मरण सोहळा व संत गाडगे महाराज यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली.

विश्वव्यापी गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने या गावात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 55 वा पुण्यस्मरण सोहळा व वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या 148 वी जयंती निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन सोहळा आनंदात साजरा करण्यात आला आहे. दरम्यान, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार व काँग्रेसचे कार्यकर्ते सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

पंढरपुर येथील तुकडोजी महाराज आश्रमचे संचालक सेवक राम मिलमीले यांच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गावातील ज्या महिलांच्या घरी तुकडोजी महाराजांचे फोटो नव्हते अशा तरोडा गावातील 17 महिलांना मोहन वैद्य यांचे कडून महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे व प्रचार करावा असे मनोगत व्यक्त केले.

संपूर्ण कार्यक्रम नियोजन बध्द व शिस्तीत, जवाबदारीने साजरा झाला. गावातील कार्यकर्ते राहुल भोयर, राहुल जेऊरकर, भास्कर डोंगे, सौरभ भोयर, संदेश तीतरे, दीपक रासेकर, महेश जेऊरकर, मंदा भोयर, पूजा भोयर, मंजु हरडे, रुपाली वैद्य, सीमा गोवरदिपे, कल्पना क्षीरसागर, वंदना पाऊनकर, मोरेश्वर जेऊरकर, शामसुंदर भोयर, संतोष गोवरदिपे, ताराचंद नागपुरे, रमेश क्षीरसागर, मोहन हरडे, घनशाम क्षीरसागर आदींनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.

विविध प्रकल्प व योजनांतून देशाच्या भविष्याची पायाभरणी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : विविध योजना व प्रकल्पांद्वारे गेल्या 10 वर्षात देशाच्या विकासाचा नवा पाया रचण्यात आला. देशाचा प्रत्येक कानाकोपरा विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यासाठी गरीब, युवक, शेतकरी व महिला या घटकांच्या सशक्तीकरणासाठी व्यापक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विकासप्रक्रियेला गती मिळून देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ, पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 21 हजार कोटी रू. व महाराष्ट्रातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सुमारे 6 हजार 900 कोटी रू. चे वितरण, तसेच राज्यातील सुमारे पाच हजार कोटी रू. निधीतून रस्ते, रेल्वे व सिंचन प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन, तसेच यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरणही प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार भावना गवळी, खा.हेमंत पाटील, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नीलय नाईक, मदन येरावार, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार,डॉ. संदीप धुर्वे, नामदेव ससाणे, इंद्रनील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, गत 10 वर्षातील योजनांच्या अंमलबजावणीने देशात पुढील 25 वर्षांच्या विकासाचा पाया रचला आहे. गरीब, नवयुवक, शेतकरी व महिला हे चार घटक सशक्त झाले तरच देश विकसित होईल. हे लक्षात घेऊन अनेक प्रकल्प व योजनांतून शेतक-यांसाठी सिंचन, गरीबांसाठी घरे, महिलांच्या स्वावलंबनासाठी अर्थसाह्य व युवकांच्या भविष्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा निधी थेट हस्तांतरित करण्यात येत आहे. ग्रामीण विकासासाठी हर घर जल, पीएम किसान निधी, लखपती दीदी योजना, स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण आदी विविध योजनांचा त्यांनी उल्लेख केला.

प्रधानमंत्र्यांनी भाषणाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. मराठी व बंजारा भाषेतही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मागील दशक देशासाठी सुवर्णकाळ ठरला असून त्याचे शिल्पकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. महिला, शेतकरी, गरीब आणि तरुण या समाजाच्या चार स्तंभांना बळ देण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी संपूर्ण जीवन देशाला समर्पित केले असून, ‘नेशन फर्स्ट’च्या माध्यमातून देशाला पुढे नेत आहेत. महाराष्ट्र संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्यासमवेत आहे, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शेतकरी सन्मान योजनेत 4 हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, मोदी आवास योजनेत घरांमध्ये महिलांना घराचा संयुक्त मालकी हक्क मिळेल. साडेपाच लाख महिला बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करून दिला जात आहे. गरीब, शेतकरी, युवक आणि महिलांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे लक्ष्य आहे. त्यानुसार राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा आमचा निर्धार आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी झाल्यापासून महिलांसाठी अनेक महत्वाच्या योजना सुरू झाल्या. त्यांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना हजारो कोटींचे भांडवल आणि कर्ज देण्यात आले आहे. पालकमंत्री श्री. राठोड, खा. गवळी, आमदार डॉ. धुर्वे यांचीही भाषणे झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रधानमंत्री श्री. मोदी यांना बंजारा समाजाची पगडी, तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले.

रस्ते व महामार्गांचे लोकार्पण

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध रस्ते, महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ व लाभ वितरण झाले. त्यात वरोरा - वणी महामार्गावरील 18 कि.मी. चौपदरीकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस, वणी, तडाळी, पडोळी यांसारख्या विविध औद्योगिक क्षेत्रांना फायदा मिळेल. सुमारे 378 कोटी रू. निधीतून सलाईखुर्द - तिरोरा महामार्गावरील 42 कि.मी. काँक्रिटीकरणामुळे गोंदिया ते नागपूर प्रवासाच्या वेळेत एक तासाची कपात होऊन नागझिरा अभयारण्याच्या पर्यटनाला चालना मिळेल. सुमारे 291 कोटी रू. निधीतून साकोली - भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या 55.80 कि.मी. दुपदरी रस्त्याचेही लोकार्पण झाले.

सिंचन प्रकल्प

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत 1 हजार 683 कोटी रू. निधीतून विदर्भ आणि मराठवाड्यातील 6 प्रकल्पांचे लोकार्पण झाले. या प्रकल्पातून 2.41 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 1 हजार 180 कोटी रू. निधीतून विदर्भ आणि मराठवाड्यातील 45 सिंचन प्रकल्पांमुळे 51 हजार हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

रेल्वेसेवेचा शुभारंभ

अहमदनगर - बीड-परळी रेल्वे मार्गावर 645 कोटी रू. निधीतून न्यू आष्टी - अंमळनेर टप्प्याचे व अंमळनेर - न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा शुभारंभ झाला. त्याचा लाभ बीड जिल्ह्यातील नागरिक व कामगार वर्गाला मिळेल. सुमारे 675 कोटी रू. निधीतून वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावरील वर्धा -कळंब या टप्प्याचे लोकार्पण व नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ झाला. त्यामुळे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील दळणवळण गतिशील होईल. यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच ब्रॉडगेज रेल्वे सेवा सुरू झाली आहे.

महिला सशक्तीकरण अभियान

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत 5.50 लाख महिला बचत गटांना 825 रू. कोटी फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले. स्वयंसहाय्यता समूहांना अतिरिक्त खेळते भांडवल देण्यासाठी 913 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली. आयुष्मान भारत अंतर्गत महाराष्ट्रात 1 कोटी आयुष्मान कार्डचे वितरण होत असून, योजनेच्या 3 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कार्डचे वितरण करण्यात आले.

इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभही झाला. त्यात येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यात येणार असून, 2.5 लाख लाभार्थ्यांना रु. 375 कोटींच्या पहिल्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले.

पीएम किसान सन्मान निधीचा 16 वा हप्ता थेट बँक खात्यात

पीएम किसान सन्मान निधीच्या 16 व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरित झाले. देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 21 हजार कोटी रुपयांचे, तसेच राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांना 1 हजार 969 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. आधार लिंक बँक खात्यात लाभांचे डिजिटल हस्तांतरण करण्यात आले. नमो शेतकरी महासन्मान निधीअंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. त्यात राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांना 3 हजार 800 कोटी रुपयांचा लाभ मिळाला.

यवतमाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सभेस अलोट जनसागर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण व लाभ वितरण कार्यक्रमासाठी आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला अभूतपूर्व जनसागर लोटला होता. या सभेला जिल्हाभरातील बचत गटाच्या महिलांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधणारी होती.

यवतमाळ शहराजवळील डोरली येथे आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या सभेला जिल्ह्यातील अंदाजित तीन लाखहून अधिक महिला, शेतकरी, युवकांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
या कार्यक्रमात वर्धा - कळंब रेल्वे मार्ग या टप्प्याचे लोकार्पण व नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ, न्यू आष्टी-अंमळनेर रेल्वे, अंमळनेर- न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा शुभारंभ, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभ, पीएम किसान सन्मान निधीच्या 16 व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरण, नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण, यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण, आयुष्मान भारत अंतर्गत महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्डचे वितरण, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला बचत गटांना फिरत्या निधीचे वितरण, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील सहा प्रकल्पांचे लोकार्पण, बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील 45 सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण, रस्त्यांचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रधानमंत्री मोदी या सभास्थळी पोहोचताच उपस्थित नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत होता. त्यांच्या नावाच्या जयघोषाने संपूर्ण सभास्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रधानमंत्री मोदी यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी महिला अत्यंत शिस्तबद्ध रितीने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण कार्यक्रमाचे केलेले नियोजन उल्लेखनीय ठरले. या जाहीर कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकारही घडला नाही ही बाब प्रामुख्याने लक्षवेधी ठरली.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार भावना गवळी, खा.हेमंत पाटील, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नीलय नाईक, मदन येरावार, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, डॉ. संदीप धुर्वे, नामदेव ससाणे, इंद्रनील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.