गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक : अखेरच्या दिवशी धावल्या शेकडोंच्या वर जोड्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : जत्रा मैदानावर गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता विदर्भ केसरी शंकरपटाची सांगता व बक्षिस वितरण कार्यक्रम पार पडला. पटाच्या तिस-या दिवशी 100 जोड्या धावल्या. यात 'अ' गटात करोडी येथील मनोहर पाटील चव्हाण यांची लखन व जलवा ही जोडी पहिली ठरली. या जोडीने 6.54 सेकंदात अंतर कापत 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले. तर 'क' गटात दहिवड येथील कु. भव्या अमोल पवार यांची जलवा व सैराट ही जोडी विजेती ठरली. या जोडीने 6.79 सेकंदात अंतर कापत 41 हजारांचे रोख पारितोषिक पटकावले. बक्षिस वितरण कार्यक्रमाला आ. प्रतिभा धानोरकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. अखेरच्या दिवशी 40 हजार पेक्षा अधिक लोकांनी या शर्यतीचा थरार अनुभवला.

'अ' गटात दुसरे बक्षिस हिवरा येथील साहेबराव पाटील यांच्या लक्ष्या व राणा या जोडीने, तिसरे बक्षिस धारफळ येथील अशोकराव पाटील यांच्या बजरंग व वंशी या जोडीने पटकावले. 'क' गटात दुसरे बक्षिस वडगाव येथील नवनाथ महाराज प्रसन्न यांच्या हिरा व शिवा जोडीने तर घोंगशी कांडा येथील राम चव्हाण यांच्या बलमा व नंद्या या जोडीने तिसरे बक्षिस पटकावले. या दोन्ही गटात पहिल्या येणा-या 13 शेतक-यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस देण्यात आले. 

बक्षिस वितरण समारंभात बोलताना आ. प्रतिभा धानोरकर यांनी शंकरपट हा शेतक-यांना आनंद देणारा खेळ असून अनेक वर्षांनंतर हा खेळ सुरु झाल्याने बळीराजाच्या चेह-यावर समाधान दिसून येत असल्याचे मनोगत व्यक्त केले. तर आयोजक संजय खाडे यांनी हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानत यापुढेही कायम अशा स्पर्धा, खेळ भरवण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
  
परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
या शंकरपटा दरम्यान वणी विधानसभा क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, खेळ, कला, पत्रकारिता, उद्योजक्ता, महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रातील कार्यातून समाजासाठी योगदान देणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे सदस्य व संजय खाडे मित्र परिवारातील शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना बी.एल.ओ. च्या कामातून वगळण्यात यावे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : नुकतेच मुंबई व उपनगर भागातील शिक्षकांना बिएलओ च्या अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना सुद्धा या कामातून मुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने प्रसाद पाटील राज्याध्यक्ष, हरीश ससनकर राज्य सरचिटणीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी २२ फेब्रुवारी च्या पत्रानुसार शिक्षक व विद्यार्थ्यांची बाजू समजून घेतली.याबद्दल महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे. बी एल ओ च्या कामामुळे राज्यभरातील शिक्षक विद्यार्थी व पालक त्रस्त आहेत, विद्यार्थ्यांना शिकवण्याचा बराचसा वेळ यामध्ये वाया जात आहे. ज्याप्रमाणे मुंबई व उपनगर भागातील शिक्षकांना या कामातून वगळून दिलासा दिला आहे त्याचप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना सुद्धा दिलासा द्यावा व बी एल ओ हँडबुक मध्ये नमूद अन्य बारा संवर्गातील कर्मचारी व नव्याने ऍड केलेले सेवानिवृत्त कर्मचारी यांना बी एल ओ चे काम देण्यात यावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनावर राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, राज्य कार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये, राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, महिला राज्याध्यक्ष डॉ. अल्का ठाकरे, सचिव शारदा वाडकर, राज्य संघटक भुपेश वाघ,राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. असे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष मनिष राठोड, जिल्हा सरचिटणीस आनंदकुमार शेंडे जिल्हा यांनी यांनी कळविले आहे.

पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

केंद्र सरकार शिक्षण धोरणात बदल करत असून शिक्षण मंत्रालयाने पहिलीतील प्रवेशाचे वय बदलले आहे. केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी मुलाचे वय 6 वर्षे इतके निश्चित करण्याचे निर्देश दिले असून ही वयोमर्यादा NEP 2020 अंतर्गत प्रस्तावित आहे..

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता सहा वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही. याआधी खाजगी शाळांमध्ये कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा यामुळे विद्यार्थ्यांवर कमी वयात अभ्यासाचा भार पडायचा. यामुळे अनेकांना बालपण अनुभवायला मिळत नव्हते. तसेस विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या विकासावरही परिणाम व्हायचा.

दरम्यान, याआधी पहिलीत प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक राज्यात वेगवेगळी वयोमर्यादा होती. काही राज्यांमध्ये पाच वर्षांच्या मुलाला पहिलीत प्रवेश दिला जायचा. त्यामुळे या मुलांची पदवी इतर राज्यातील मुलांच्या तुलनेत एक वर्ष आधी पूर्ण व्हायची. त्यामुळे असे विद्यार्थी सरकारी नोकर भरतीसाठी इतरांच्या तुलनेत एक वर्ष आधी पात्र ठरायचे. याचा अर्थ या मुलांना सरकारी भरतीसाठी एक अटेंप्ट जास्त मिळायचा. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पहिलीच्या प्रवेशाची वयोमर्यादा संपूर्ण देशात एकसारखी असावी अशी मागणी अनेकांनी केली होती.


बोरी (गदाजी) येथे 19 दिवस रंगला क्रिकेट सामन्याचा थरार


यवतमाळ सत्ता | प्रतिनिधी 

मारेगाव : आज जमाना जरी मोबाईल, डिजिटल चा असला तरी खेळाडूनी खेळ खेळला पाहिजे, खेळाने व्यायाम होतो असे, प्रतिपादन कृ.उ. बा.समिती चे संचालक अविनाश लांबट यांनी केले, ते श्री संत गदाजी महाराज, बोरी क्रिकेट क्लब च्या वतीने भरविण्यात आलेल्या सामन्यात अंतिम विजयी संघाला प्रोत्साहित करित आपल्या भाषणात बोलत होते.

उदघाटक सरपंच अरविंद ठाकरे (कुंभा), कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण नान्हे (सरपंच बोरी), प्रमुख पाहुणे भाजपचे तालुका अध्यक्ष तथा संचालक अविनाश लांबट, पारस गंधर्व ब्रिक्स चे संचालक प्रवीणभाऊ बोथले, तसेच विशेष उपस्थिती सुरेशदादा लांडे (देवाळा उपसरपंच), उपसरपंच प्रदीप साबरे, सुनील पिंपळकर यांची उपस्थिती होती.

दि.11 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत क्रिकेट चे सामने खेळीमेळीच्या वातावरणात चालले होते. जिल्ह्याभरातून या सामन्यात संघांनी सहभाग घेतला होता. पुढे बोलताना ते म्हणाले की, पहिल्यांदाच बोरी क्रिकेट क्लब च्या वतीने उत्कृष्ट नियोजन करून सामान्यांचे आयोजन केले आणि खेळाडूंना एक प्रकारचे माध्यम उभारून जे कार्य केले आहे, हे असेच पुढेही चालू राहोत त्यासाठी आमचे सहकार्य आपल्या मंडळाकरिता असणार आहे असेही ते म्हणाले. तसेच या प्रसंगी इतर मान्यवारांनी सुद्धा आपापले मनोगत व्यक्त करून विजयी संघांचे कौतुक करित अभिनंदन केले.

तब्बल एकोणीस दिवस चाललेल्या सामन्यात प्रथम बक्षीस वडकी येथील संघांनी पटकावला, द्वितीय बक्षीस गोंडबुरांडा संघांनी तर, तृतीय बक्षीस रामनगर संघांनी मिळवले. चौथे बक्षीस बोरी (गदाजी) संघांनी ठेवले. विजयी संघांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी श्री संत गदाजी महाराज क्रिकेट क्लब बोरी चे अध्यक्ष राहुल खंडाळकर, उपाध्यक्ष गणेश नान्हे, सचिव नितेश खंडाळकर, सह सचिव प्रतिक राऊत, कोषाध्यक्ष सुमिन दास, क्रिडा प्रमुख प्रवीण बाबरे, या सर्व मंडळाच्या तसेच गावातील युवा वर्ग व नागरिकांच्या उपस्थितीत तब्ब्ल 19 दिवस चाललेल्या सामन्याचे शनिवार दि.24 फेब्रुवारी ला सायंकाळपर्यंत अंतिम सामना वडकी आणि गोंडबुरांडा यांच्या पार पडला असून वडकी संघाने प्रथम बक्षीस मिळवले.

दरम्यान,सर्व संघांचे मंडळाच्या वतीने कौतुक तथा आभार मानण्यात आले. या सामन्यात उपस्थित मान्यवरांनी सुद्धा आपल्या कलागुणांना उजाळा देत खेळाडूंच्या समवेत चौकार, षटकार मारून क्रिकेट चा आनंद लुटला, यावेळी प्रेक्षक तसेच गावातील युवा मंडळीं बघण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

मारेगावचे ठाणेदार जनार्धन खंडेराव यांची वाशिम येथे बदली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांची बदली झाली असून, त्यांच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे तालुका वासियांचे आता लक्ष लागले आहे.

अमरावती पोलीस महानिरीक्ष कार्यालय अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया नुकतीच  करण्यात आली आहे. मारेगाव येथील ठाणेदार जनार्धन खंडेराव यांची काल रात्री यांच्या बदलीचे आदेश निघाले.

लोकसभा निवडणुक-२०२४ च्या अनुषंगाने मा. केंद्रीय निवडणुक आयोग, मा. मुख्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य, मुंबई व पोलीस महासंचालक म.रा. मुंबई यांनी संदर्भीय निर्देशानुसार आणि निर्धारीत केलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे अमरावती परीक्षेत्रांतर्गत सहा. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा निर्णय घेणेकामी दि.२४/०२/२०२४ रोजी परीक्षेत्रीय आस्थापना मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकित महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ मधील कलम-२२ न, पोट कलम (२) अन्वये परीक्षेत्र स्तरावतील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन अमरावती परीक्षेत्र पोलीस आस्थापना मंडळ यांनी सहा. पोलीस निरीक्षकांच्या बदलीस मान्यता दिली आहे. त्यामुळे मारेगाव पोलीस ठाण्यात नवा गडी नवा राज सुरू होणार आहे.

विशेष उल्लेखनीय की, निष्क्रिय ठाणेदाराची बदली करिता सामाजिक,राजकीय लोकांची आग्रही मागणी होती. तालुक्यात मटका, जुगार, कोंबड बाजार, अवैध दारू, अवैध कोल डेपो, रेती तक्सरी यासह कौटुंबिक तंटे जसे च्या तसे असल्याचे नागरिकांनी अनुभवले त्यामुळे त्यांची बदली व्हावी अशी आग्रही मागणी होती. किंबहुना त्यांची या अगोदर बदली होणार होती असे समजते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे बदली थांबल्याचे बोलल्या जात असताना अखेर ठाणेदार जनार्धन खंडेराव यांची 24/02/2024 रोजी बदलीचे आदेश धडकले आणि त्यांची वाशिम येथे बदली झाल्याचा आदेश जिल्हा पोलीस यवतमाळ कार्यालय यांना धडकला.

संबंधीत घटक प्रमुखांनी या बदली आदेशाची प्रत संबंधीत पोलीस अधिकारी यांना तत्काळ बजावुन त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे. बदली झालेल्या पोलीस अधिका-यांना कार्यमुक्त करतांना पर्यायी/बदलीवर येणा-या पोलीस अधिका-यांची वाट पाहु नये. तसेच भारतीय निवडणुक आयोगाने दिलेल्या सुचनांचे काटोकोरणे पालन करावे, कोणत्याही घटकात निवडणुकिची प्रक्रीया किंवा त्या अनुषंगाने आचार संहिता सुरु असल्यास घटक प्रमुखांनी संबंधीत निवडणूक अधिका-यांशी संपर्क साधून आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेवुन संबंधीत अधिका-यास कार्यमुक्त करावे व तसा अनुपालन अहवाल सादर करावा असं पत्रात म्हटलं आहे.

नमुद बदली आदेशानंतर जे पोलीस अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर न होता रुग्णनिवेदन करतील किंवा गैरहजर रहातील ते पोलीस अधिकारी शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरतील याबाबतची समज त्यांना दयावी आणि भारतीय निवडणुक आयोगाने निर्धारीत केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केल्या जाईल, कोणत्याही प्रकारचे उल्लंघण होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आदेश पत्रात नमूद आहे.