कर्तव्यात कसूर, कोसारा साजातील तलाठी 'शेख' निलंबित

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : रेती तस्करांना अभय तर देणं एका पटवाऱ्याच्या चांगलंच अलंगट आले असून त्याला निलंबित केल्याच्या कारवाईनं मारेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मारेगाव तालुक्यातील कोसारा साजातील रेती चोरट्यांना मुभा,अभय देणं 'त्या' तलाठ्याला भोवलं आहे. या प्रकरणात एक तलाठी निलंबित करण्यात आले आहे,तर अशाच कारवाईत एक जन आणखी गळाला लागणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

कोसारा भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा रेती उपसा होत असल्याबाबतच्या वारंवार बातम्या प्रकाशित होत होत्या, त्या पार्श्वभूमीवर कारवाई सुद्धा होत होत्या. मारेगाव तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या मात्र,कोसारा भागात कोणतीही बेकायदा रेती वाहतूक होत नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, एका कारवाई दरम्यान कोसारा साजातील पटवारी यांना तहसीलदार व त्यांच्या पथकातील कर्मचारी यांनी कोसारा गावालगत अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करीत असतांना पकडून जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयाला जमा करावयाची आहेत सदरची कार्यवाही सबंधीत तलाठी,कोतवाल यांना बोलविले असता त्यांनी तहसीलदार ह्यांचा आदेश धुडकावून लावत कर्तव्यात कसूर केल्याचा कारणाने कारणे दाखवा नोटीस देऊन उपविभागीय अधिकारी यांनी एका तलाठ्याचे निलंबन केले आहे. 

रेती वाहतूक आणि तलाठी प्रकरण आहे तरी काय ?

मारेगाव तालुक्यातील कोसारा घाटातील बेकायदा रेती उपसा होत असल्याबाबतचे मारेगाव तहसीलदार यांना समजल्यानंतर त्यांनी पटवारी यांना अलर्ट केले होते. 31 जानेवारी रोजीच्या सायंकाळी याच भागात रेती उपसा होत असल्याचे तहसीलदार उत्तम निलावाड यांना समजल्यानंतर त्यांनी आपली टीम आटो सारख्या खाजगी वाहन घेऊन तत्काळ ठिकाण गाठले होते. त्यावेळी 2 ट्रॅक्टर अवैधरित्या रेती भरून वाहतूक करत होते. त्यानुसार तहसीलदार निलावाड यांनी कोतवाल आणि तलाठी यांना जप्त केलेली वाहने कार्यालयात जमा करण्याबाबत सांगण्यात आले होते.मात्र, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत "मी काय करायचं बघतो तू जा.. असं कोतवालाना म्हटल्यावर कारवाई च्या हालचाली ला वरिष्ठाकडे सुरुवात झाली. कर्तव्यात कसूर,हे स्पष्ट झाल्यानंतर कोसारा साजातील तलाठी नझरूल इस्लाम अब्दुल कय्युम (शेख पटवारी) यांना निलंबित केले आहे. 

त्या तलाठ्यावर नेमका काय ठपका ?

तालुक्यातील कोसारा लगत वर्धा नदी पात्रात रेती घाट असून शासनाकडून हा घाट लिलाव करण्यापूर्वी वाळू तस्करांना मुभा देण्याचा ठपका सदर तलाठ्यावर होता. बेभान झालेल्या वाळू तस्करांनी चोरटी वाहतूक करीत करोडो रुपयांचा शासनाचा महसूल घशात घातला. मात्र, साजातील कारवाईला भोपळा दाखविण्यात येत होता. दरम्यान, नायब तहसीलदार व मंडल अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गौण खनिज उत्खनन कारवाईसाठी सहाय्यक म्हणून सदरील तलाठी यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र, येथेही ठेंगा दाखविण्यात येत होता. गौण खनिज सारख्या महसूल मिळवून देणाऱ्या व पर्यावरणाचा समतोल साधणाऱ्या संवेदनशील प्रकरणात कसूर व बेजबाबदारपणा दाखविल्याने त्यांनी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणे असे दोषारोपपत्र उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांचे कडे केले होते. त्यामुळे बहुचर्चित पटवारी 'शेख' यांना निलंबित करण्यात आले, असून शिवाय अशाच कारवाईत आणखी एक जन या गळाला लागणार आहे,अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. 

मागील वर्षी आणि आतापर्यंत केलेल्या कारवाईचा लेखाजोखा, तर नागरिकात खमंग चर्चा...

तालुक्यात माहे एप्रिल 2023 पासून ते आज पर्यंत चालू वर्षात एकूण 24 अवैध उत्खनन करून वाहतूक करीत असतांनाच्या कार्यवाह्या कोण किती केल्यात यांचाही वरिष्ठ पातळीवर लेखाजोखा होणे अत्यंत गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार कार्यरत असलेल्या क्षेत्रीय स्तरावरील 55 ते 60 अधिकारी, कर्मचारी यांच्या पैकी बोटावर मोजण्याइतके फक्त 6 ते 7 कर्मचारी यांनी कारवाई केली आहे असे समजते. इतर अधिकारी, कर्मचारी यांना रोडवर वाहने दिसतच नाहीत काय, अशी खमंग चर्चा नागरिकांतून ऐकायला मिळते.

महागांव येथे तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सोहळा संपन्न


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अखिल विश्वाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 55 वा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या उत्साहात मारेगाव तालुक्यातील महागांव येथे साजरा करण्यात आला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच, महागांव यांच्या पुढाकाराने साजरा करण्यात आलेल्या सोहळ्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्याने भजन किर्तन व जयघोषाणे अख्ख गाव दुमदूमले होते.

भल्या पहाटे पासून जय्यत तयारी सुरु झाल्यागत गावातील प्रत्येक घरी रंगीबेरंगी रांगोळी ने अंगण सजावट करण्यात आले होते. गावातील शेकडो महिला पुरुष आबाल वृद्ध, बालक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयघोषाणे अवघी महागांव नगरी दुमदुमली.

या पुण्यस्मरण निमित्ताने ग्रामसफाई, सामूहिक ध्यानपाठ, घटस्थापना, ग्रामगीता वाचन, किर्तन, जि प शाळा महागांव यांचे शालेय कार्यक्रम, सामूहिक प्रार्थना, भजन संध्या व किर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात होवून आज शुक्रवार दि.23 फेब्रुवारी ला सन्माननीय श्री.उत्तम निलावाड मारेगाव तहसीलदार साहेब यांच्या हस्ते काल्याच्या किर्तनाची दहीहंडी फोडून राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे प्रबोधनाने सोहळ्याची सांगता करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी भीमराव बी. व्हनखंडे, ठाणेदार जनार्धन खंडेराव, विस्तार अधिकारी माने, उपसरपंच अविनाश लांबट, माजी उपसभापती गजानन खापणे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली, या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचचे अध्यक्ष भास्कर आत्राम, सचिव प्रदीप पिंपळशेंडे, उपाध्यक्ष आशिष दर्वे, सह उपाध्यक्ष लखन लांबट, कोषाध्यक्ष रुपेश नेहारे, सदस्य अतुल बलकी, गौरव लांबट, योगेश बलकी, मोहन बलकी, मोहन नेहारे, राहुल मेश्राम, निखिल मिलमिले,हिमांशू काकडे, रोशन आत्राम, दिपक नेहारे, तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ, तथा समस्त महागांव ग्रामवासी मनोहर नेहारे, देविदास लांबट, गणेश खुसपुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुरलीधर बलकी, संजय तुराणकर, मनोज लांबट विशाल कसाडे, वैभव पिंपळशेंडे, यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ ढवस तर आभार पवन मिलमिले यांनी मानले. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौरा तयारीचा पालकमंत्र्यांकडून आढावा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि.28 फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानावर गटाच्या महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी आज तयारीचा आढावा घेतला. मेळावा उत्तमपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

महसूल भवन येथे आयोजित बैठकीला खा.भावना गवळी, आ.डॉ. अशोक उईके, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, बांधकामचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या तयारीसाठी प्रशासनाच्यावतीने विविध प्रकारच्या 30 समित्या तयार करण्यात आल्या आहे. या समितीच्या प्रमुखांकडून पालकमंत्र्यांनी तयारीचा आढावा घेतला. मेळाव्यासाठी जिल्हाभरातून येणाऱ्या महिलांची प्रवास, बैठक, पाणी व्यवस्था उत्तमपणे होणे आवश्यक आहे. परिसरात स्वच्छतागृह पुरेशा प्रमाणात उभारण्यात यावे. येथे येणाऱ्या महिलांच्या गर्दी व्यवस्थापनासह स्टेज, मंडप, वाहनतळ, सुरक्षा आदींचा देखील पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.

भारी येथे 42 एकरच्या खुल्या जागेत हा मेळावा होणार आहे. त्यासाठी मैदानात 26 एकर जागेवर भव्य मंडप उभारण्यात येत असून उभारणीच्या कामाला गती आली आहे. जिल्हाभरातून येणाऱ्या महिलांसाठी बसेसची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. त्यासाठी बसनिहाय समन्वयक व तालुका स्तरावर संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सांगितले.

यावेळी सर्व समिती प्रमुख अधिकारी यांनी आपल्याकडे सोपविलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा सादर केला. संबंधित अधिकारी यांनी आपआपली जबाबदारी चोखपणे पार पाडून मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

जिल्ह्यात ८६ हजार कामगारांना गृहोपयोगी संचांचे वाटप करणार – पालकमंत्री संजय राठोड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत राज्यभर गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात ८६ हजार कामगारांना या साहित्याचा संप वाटप करणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

नेर येथे साहित्य वाटपाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्र्यांहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे, नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज नाल्हे, पराग पिंगळे, सुभाष भोयर, नामदेवराव खोब्रागडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात १ लाख ४१ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे. त्यापैकी ८६ हजार कामगारांची नोंदणी जिवीत असल्याने त्यांना संचाचे वाटप केले जात आहे. उर्वरीत कामगारांनी आपल्या नोंदणीचे नुतनीकरण केल्यास अशा कामगारांसह नवीन नोंदणी केलेल्या कामगारांना देखील गृहोपयोगी साहित्य संचाचा लाभ देऊ, असे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले.

वर्षात ९० दिवस कामगार म्हणून काम केल्यास त्यांची कामगार म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा कामगारांनी त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करुन घ्यावे व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री.राठोड यांनी केले. जिल्ह्यात जास्तीत जास्त कामगारांना योजनांचा लाभ कसा देता येईल यासाठी मी व्यक्तीशः प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आजच्या साहित्य संच वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे तालुकास्तरावरच कामगारांना संच उपलब्ध झाले असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

जिल्हास्तरीय शुभारंभाला नेर तालुक्यातील २ हजार १४६ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पालकमंत्र्यांच्याहस्ते संचाचे वाटप करण्यात आले. या संचात १७ प्रकारच्या एकून ३० गृहोपयोगी साहित्याचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्वच तालुका ठिकाणी साहित्य संच वाटपाचे कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पराग पिंगळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे यांनी केले. कार्यक्रमास नेर तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध प्रवेश परीक्षार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणीस्माईल फाउंडेशन विविध उपक्रम नेहमीच राबवित असते. याचाच एक भाग म्हणून जेईई, नीट, सीईटी आदी परीक्षार्थ्यांना उपयुक्त पुस्तकांचे वितरण स्माईल फाउंडेशनने केले. यासाठी प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यात अग्रेसर किरण दिकुंडवार यांनी ही जबाबदारी उचलली. त्यांनी स्वखर्चाने ही सर्व पुस्तकं उपलब्ध करून दिलीत.

पुस्तक वितरण सोहळा एस.पी.एम. शाळेजवळील वॉटर सप्लाय कार्यालयात झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण दिकुंडवार होते. प्रमुख अतिथी म्हणून आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी स्माईल फाउंडेशनचे आभार मानले. या सोहळ्यात जवळपास 20 निवडक विद्यार्थ्यांना जवळपास 31 हजार रूपयांची पुस्तके वर्षभराकरिता वितरीत झालीत. त्यानंतर ही पुस्तके नवीन विद्यार्थ्यांना दिली जातील. किरण दिकुंडवार हे नेहमीच स्माईल फाउंडेशनला विविध स्वरूपांत सहकार्य करत असतात. भविष्यातही विविध उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. त्यांच्याच सहकार्यामुळं हा छोटेखानी सोहळा उत्साहात झाला.

विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची ही पुस्तके खरेदी करण्याची क्षमता नाही, अशांना यात प्राधान्य देण्यात आलं. स्माईल फाउंडेशनची स्वतःची बूक बँक आहे. या योजनेअंतर्गत पुस्तकांची देवाण-घेवाण होते. गरजूंना कपडे वाटप, पुस्तक वाटप, सायकल वाटप, ज्येष्ठांना काठी वाटप असे संस्थेचे उपक्रम सुरूच असतात. संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव यांनी ज्यांना शक्य असेल त्यांनी जी मदत करता येईल ती करण्याची विनंती केली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाल आत्राम, आदर्श दाढे, गौरव कोरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.