शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करा - डॉ. मनिष मस्की

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अवकाळी पावसाने खरीपसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सरकारने सरसकट शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावे असे नगराध्यक्ष डॉ मनिष मस्की म्हणाले. तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानी संदर्भात तहसीलदार निलावाड यांना काल निवेदन देण्यात आले, त्यानंतर सह्याद्री चौफेरशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी सुनील गेडाम, जीवन काळे, विजय अवताडे, राजू मोरे, पंकज बलकी, प्रियंका देवाळकर, सोमेश्वर गेडेकर, संभा टोंगे, किसन मत्ते यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करणे हे सरकारचं कर्तव्य आहे, तालुक्यात सर्वत्र अवकाळी पाऊस झाला, यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरसकट नुकसान मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

 त्यामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून हेक्टरी २५०००/- रुपये द्यावे, मागील जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई त्वरित द्यावी, पिक विम्याची पूर्ण भरपाई सुद्धा तत्काळ देण्यात यावी, तसेच सी.सी.आय. कापूस खरेदी सुरु करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा दिलेल्या निवेदनातून सरकार ला करण्यात आली.

आपल्या सगळ्यांचे प्रेम हाच माझा सत्कार - सत्कारमूर्ती श्री विलासराव ताजणे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
              
मारेगाव : व्यक्ती समाजात राहत असताना इतरांसोबत कसा वागतो हे महत्त्वाचे आहे. व्यक्तीच्या वागण्यावरच व्यक्तीचे समाजातील स्थान ठरल्या जाते. आज आपण सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणात येथे एकत्र येऊन मला जो निरोप देत आहात हे खरोखरच आपल्या सगळ्यांचे प्रेम आहेत असे भावनिक उद्गार मार्डी येथील मुख्याध्यापक श्री. विलास ताजणे यांनी काढले. ते निरोप समारंभ प्रसंगी केलेल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते.

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री भास्करराव धानफुले होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून मार्डी येथील सरपंच रविराज चंदनखेडे, पोलीस पाटील डॉक्टर प्रशांत पाटील, दिवाकरराव पंडिले, सौ. पद्मावती ताजणे, युवराज ताजणे, ज्येष्ठ शिक्षक अनंता शिवरकर, शिक्षक रमेश ढुमणे आणि अंकुश कांबळे उपस्थित होते.
           
मार्डी येथील आदर्श हायस्कुल येथून नियत वयोमानानुसार दि.30 नोव्हेंबरला श्री. विलास ताजणे निवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा आदर्श हायस्कुल तर्फे सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात पुढे बोलताना श्री. ताजणे सर म्हणाले की, माणूस किती जगतो यापेक्षा कसा जगतो हे अधिक महत्त्वाचे आहेत. आपली जडणघडण जर चांगली असली आणि संस्कार चांगले असले तर साहजिकच माणूस समोर चांगल्या प्रकारे घडू शकतो. माणसासमोर कितीही संकटे आली तरी त्या संकटाला न डगमगता आपण जर धैर्याने सामना केला तर जीवनात यश नक्कीच मिळते.

यावेळी कु. गौरी देवाळकर, कु. तेजस्वी भगत, कु. मिनल इरदंडे या विद्यार्थिनींनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष भास्करराव धानफुले यांनीही ताजणे सरांच्या जीवनकार्याचा परिचय करून देत त्यांनी किती आपुलकीने शाळेसाठी कार्य केले हे सांगताना त्यांची विद्यार्थ्यांविषयी तळमळ आणि धडपड कशी होती हे सुद्धा सांगितले. डॉक्टर प्रशांत पाटील यांनीही त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

या प्रसंगी शिक्षकांमधून रमेश ढुमणे, अनंत शिवरकर, सुरेश नाखले, कु. नितु मेश्राम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन भास्कर राऊत यांनी, प्रास्ताविक जगन भोंगळे यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर दातारकर यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज गारगोटी पोड (इंदिराग्राम) येथे आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील मौजा गारगोटी पोड (इंदिराग्राम) येथे भारतीय संविधान दिन व विदर्भ रॉबिनहूड शामादादा कोलाम यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी कोलाम समाज सांस्कृतिक कला महोत्सव आज ३० नोव्हेंबर २०२३ ला स्थानिक कोलाम समाज मंदिरात आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक वणी विधानसभा क्षेत्राचे आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, तर अध्यक्षपदी भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विशेष प्रमुख अतिथी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पावडे, माजी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, किसन मोर्चा चे शंकर लालसरे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, सह आदी उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून माजी आयुक्त उत्तम मानकर, माजी गटविकास अधिकारी मधुकर घसाडकर, कोलाम संघटना जिल्हाध्यक्ष राहुल आत्राम राहणार आहे.

सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे,आवाहन आदिवासी कोलाम संघटना अध्यक्ष सूर्यभान ढोबरे, युवा मोर्चाचे ता. अध्यक्ष गणेश झाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अविनाश लांबट, भाजपा उपाध्यक्ष जयवंत ठेपाले, जिल्हा सचिव प्रसाद ढवस, सुषमा ठेपाले, सुनीता जुमनाके, प्रवीण बोथले, सुधाकर बोबडे, दिलीप आत्राम, पवन ढवस, रवी टोंगे, सह आदींनी केले आहे.

मारेगाव नगरपंचायतला लागले प्रभारींचे ग्रहण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष म्हणा अथवा मारेगावचा भूमीपुत्र लोकप्रतिनिधी नाही, यामुळे म्हणा 'पण मारेगावकरांना कायम सापत्न वागणूक मिळाली आहे. मग सत्ता कोणाचीही असो, येथील लोकांचे प्रश्न, समस्या, अडचणी, विकासकामे याविषयी पक्ष कोणताही असला, सत्ता कोणाचीही असली तरी मारेगावला न्याय मिळत नाही, ही वास्तव परिस्थिती आहे.

गेल्या अनेक वर्षापासून मारेगाव नगरपंचायत मध्ये मुख्याधिकाऱ्याचे प्रभारीराज सुरू आहे. कधी नायब तहसीलदार प्रभारी असतात, तर कधी इतर नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्याकडे प्रभार दिला जातो,  मारेगाव नगरपंचायतमध्ये प्रभारींची मालिकाच सुरू झाली आहे. एखाद्या प्रभारी अधिकाऱ्याची बदली झाली तरी पुन्हा येणारा प्रभारीच लादला जातो,हे या नगर पंचायतचे वैशिष्ट्य असल्याचे बोलल्या जातं.

घरकुल धारकांच्या प्रलंबीत समस्या, स्वच्छता, रस्ते, नाल्या इमारती असे सारेच प्रश्न प्रलंबित आहेत. मारेगाव नगर पंचायततील प्रभारींचे दुष्टचक्र कधी संपणार? असा प्रश्न लोकांमधून विचारला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथे प्रभारीच मुख्याधिकारी असल्याने आता तरी पूर्णवेळ अधिकारी मिळतील असे वाटत होते. परंतु पुन्हा एकदा प्रभारी मुख्याधिकारी मारेगावच्याच नायब तहसीलदाराला बसवले आहे. मुळ पदाचीच कामे होत नाहीत तर मारेगाव नगर पंचायतला कसा वेळ देणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
      
नगरपंचायत ही अशी संस्था आहे, जिथे लोकांची रोज कामे पडतात. मुख्याधिकारी कार्यालयात असल्याशिवाय ही कामे होत नाहीत. प्रभारी अधिकाऱ्यांना मूळ पदाचा कारभार हाकत पदभाराची कामे करावी लागतात. यामुळे ते कधी इकडे तर कधी तिकडे प्रभारी पदावर रुजू होतात. नियमित वेळ देऊ शकत नाही. या परिस्थितीत लोकांची आणि विकासाची प्रलंबित कामे कशी मार्गी लागणार? त्यांनी मारेगाव नगरपंचायतला लागलेले प्रभारीचे ग्रहण सोडवावे, अशी मागणी होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वणी तालुका कार्याध्यक्ष पदी खुशाल बासमवार यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : आज दि.29 नोव्हेंबर रोजी स्थानिक टिळक भवन यवतमाळ येथे यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली असता त्यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय नगराळे, यांच्या उपस्थितीत वणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खुशाल बासमवार यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त तालुका कार्याध्यक्ष खुशाल बासमवार यांना श्री देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबुत करण्यात आपला प्रामाणिक सहभाग व पक्षहित कार्य असावे, यासह एक उमदा तालुका कार्याध्यक्ष पार्टीला लाभल्याने पक्ष संघटन आणखीन वाढेल यात आता शंका नाही, असे मत व्यक्त करित त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
यावेळी जिल्हा सरचिटणीस रामकृष्ण वैद्य, वणी शहर अध्यक्ष विनोद भाऊ ठेगणे, कामगार सेल अध्यक्ष अर्जुन भाऊ शिरसाठ, ओबीसी सेल अध्यक्ष गुणवंत भाऊ टोंगे, महिला तालुकाध्यक्ष ज्योतीताई कोकणे, महिला वणी शहर अध्यक्ष सौ. मेघाताई मसेवार, वणी तालुका उपाध्यक्ष सौ.भाग्यश्री नागमोते यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. खुशाल बासमवार यांच्या निवडीबाबत सर्व राजकीय स्तरावरून शुभेच्छा सह अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.