ठाण्यात आमदार बोदकुरवार यांचे पाच तास ठिय्या आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील प्रभाग क्रमांक 16 मधील दुर्गादेवीचे विसर्जन सुरु असताना आणखी वेळेसाठी 20 मिनिटे वाजवू द्या,मात्र वेळ मागल्यानंतर मारेगाव येथील भाजपाचे नगरसेवक राहुल राठोड यांना ठाण्यात बोलाविले आणि कॅबिनमध्ये ठाणेदारांनी मारहाण केली. हा घडलेला प्रकार पिडीत नगरसेवक यांनी आमदार यांना कळविला. का? आणि कशासाठी? हा प्रश्न करित आमदार व पदाधिकारी कार्यकर्ते यासह काल ठाण्यात पाच तास ठिय्या मांडून ठाणेदार जनार्दन खंडेवार यांची तात्काळ उचलबांगडी करण्याची मागणी करण्यात आली.

शहरातील प्र. क्र.16 मधील सार्वजनिक दुर्गादेवी विसर्जन शुक्रवारी करण्यात आले. यात अनेक युवक नाचत असतांना पोलीस प्रशासनाचा आदेशानुसार विहीत वेळ संपल्याचे आदेश तोंडी स्वरूपात देण्यात आले. मात्र, मंडळांनी विनंतीवजा करीत 20 मिनिटांचा अधिकचा वेळ मागितला. विहीत वेळ संपताच ध्वनिक्षेपक बंद करण्यात आले. परंतु ठाणेदार यांनी नगरसेवक राठोड यांना स्टेशनला बोलावून घेत कॅबिनमध्ये अकारण शिवीगाळ करीत जबर मारहाण केल्याचा राठोड यांचा आरोप आहे. यात राठोड यांच्या पाठीला मारण्याचे व्रण असल्याने ठाणेदाराप्रती सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. हा संताप थेट ठाण्यात पोहचला आणि तब्बल पाच तास ठिय्या मांडण्यात आला.

दरम्यान, काल शनिवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचेसह पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येत रोष व्यक्त करित उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे यांचेकडे ठाणेदार उचलबांगडीची मागणी लावून धरली. ही मागणी पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड यांचेशी भ्रमणध्वनी वर सांगितली. मात्र, त्यांनी पारदर्शक चौकशी करून सकारात्मक निर्णय घेण्याचे अभिवचन दिले. परिणामी यावर समाधानकारक निर्णय न झाल्याने आमदार बोदकुरवार यांनी एसपी सोबत चर्चा करून उचलबांगडीची मागणी रेटून धरली अन्यथा, ठाणेदार विरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा गर्भित ईशारा देण्यात आला. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून, सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या माध्यमातून उचलबांगडीची दिशा ठरणार आहे. ठाणेदार हे यवतमाळ मिटिंग ला गेल्याने त्यांचा मुक्काम चार दिवस जिल्हास्थळी राहणार आहे. त्यांच्या अनुपस्थितीत या प्रकरणाची चौकशी होणार आहे.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, लोकसभा विस्तारक रवी बेलूरकर, जिल्हा संघटक नितीन भुतडा, मारेगाव भाजप तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, जिल्हा सरचिटणीस शंकर लालसरे, पदाधिकारी अविनाश लांबट, प्रशांत नांदे, पिडीत नगरसेवक राहुल राठोड, वैभव पवार, शशिकांत आंबटकर, सुधाकर बोबडे, युवा शहराध्यक्ष अनुप महाकुलकार, विनित जयस्वाल, मारोती पाचभाई, पांडुरंग उंबरकर, बोटोणी सरपंच सुनीता जुमनाके, राजेश पांडे, गणेश झाडे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

आमदार बोदकुरवार यांच्या नेतृत्वात पोलीस ठाण्यात तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. 
हे प्रकरण आता तापण्याचे संकेत आहे. पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या ताठर भूमिकेने प्रकरण कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता तिसरा डोळाच उचलबांगडी साठी दगडाचा मैल ठरणार आहे. 

धर्माधिष्ठित राष्ट्राची कल्पना अत्यंत गंभीर आणि धोकादायक - ज्ञानेश महाराव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : धर्माच्या आधारे निर्माण झालेले पाकीस्तान, बांग्लादेश आणि ईतर देशांची परिस्थिती बघीतली तर धर्माधिष्ठीत राष्ट्राची कल्पना किती अव्यवहार्य, तकलादू आणि फसवी आहे याची कल्पना येते. त्यामुळे हिंदूराष्ट्र -हिंदुराष्ट्र अशी संकल्पना आणि घोषणा करणाऱ्या तथाकथित लोकांच्या बुद्धीची किव करावी,तेवढी कमी आहे. सोबतच अशा कल्पनेतील फोलपणा आणि गांभीर्य लक्षात घ्यावे.धर्म कोणताही असो. धर्माधिष्ठीत राष्ट्र संकल्पना ही अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे,असा ईशारा प्रख्यात पत्रकार, संपादक आणि रंगकर्मी ज्ञानेश महाराव यांनी दिला.
       
शिव महोत्सव समिती वणी चे वतीने दि.२७ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या बळीराजा व्याख्यानमालेत "फक्त राष्ट्रभक्तांसाठी" या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणुन संबोधित करत होते.स्मृतीशेष सांबशिव नारायणराव देवडे यांच्या स्मृतीस समर्पित हे व्याख्यान बाजोरिया लॉन,वणी येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी विराजमान होते.तर प्रमुख अतिथी म्हणुन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर,शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोक सोनटक्के, एलआयसी चे अजय गेडाम, निलीमाताई काळे, शिरपुर च्या पोलीस पाटील सुवर्णा बोंडे उपस्थित होत्या.
    
" फक्त राष्ट्रभक्तांसाठी" या विषयाची गुंफण करतांना ज्ञानेश महाराव यांनी ईसराईल या देशाचे उदाहरण दिले.राष्ट्र हे फक्त भौगोलीक सिमांनी बनत नाही तर राष्ट्र हे मनात आणि विचारात असावे लागते. त्यामुळे सद्या देशात जी लोक राष्ट्रभक्तीच्या नांवाने गळे काढत आहे त्यांच्यापासुन सावध राहावे. देशांत,समाजात जे जे अनिष्ट आहे,विकृत आहे त्या विरुद्व आपण व्यक्त झाले पाहीजे.ते ईतरांनाही सांगीतले पाहीजे. तरच आपण काही ऊज्वल भविष्याचे स्वप्न पाहु शकु.पुराणकाळातील कल्पोकल्पित आणि भाकडकथांवर देशाची उभारणी होऊ शकत नाही. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षाच्या काळात आरबीआय बँकेची वापरलेली राखीव गंगाजळी, काही उद्योगपतींचे माफ केलेले अब्जोवधींचे कर्ज,अमर्याद झालेल्या जंगलतोडीमुळे झालेले पर्यावरणाचे नुकसान यांवर महाराव यांनी मार्मिक भाष्य केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांनी व्याख्यानमालेचा उद्देश कथन करून व्याख्यानमालेचे हितचिंतक, आश्रयदाते आणि श्रोत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
      
व्याख्यानमालेच्या प्रारंभी बळीराजा च्या प्रतिमेला माल्यार्पण आणि अभिवादन करण्यात आले.जयंत कुचनकार,अमोल बावने,दिगांबर ठाकरे आणि सोनाली थेटे यांच्या सामुहिक जिजाऊ वंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला. संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समितीचे वतीने संजय गोडे यांनी,प्रास्ताविक भुमिका गणेश बुटे यांनी तर आभार अजय धोबे यांनी मानले. मान्यवरांचे स्वागत समितीचे निमंत्रक कृष्णदेव विधाते,राजेंद्र देवडे,एडव्होकेट चंद्रकांत बोंडे, डॉ.श्रीकांत भगत, एडव्होकेट अरविंद सिडाम,वाल्मीक बनकर, अंकुश उपरे यांनी पुस्तक व स्मृतीचिन्ह प्रदान करून केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिव महोत्सव समितीच्या सर्वच सदस्यांनी परिश्रम घेतले.
        
     

उद्या पांढरकवडा येथे धिक्कार मोर्चा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पांढरकवडा : शासनाच्या चुकीच्या व पिळवणुकीच्या धोरणाविरोधात शासकीय, निमशासकीय कर्मचारी, बेरोजगार, शेतकरी व पेन्शनर्स असोसिएशन कृती समितीच्या वतीने 29 ऑक्टोबर रोजी धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्र व राज्य सरकारने गत काही वर्षांत घेतलेल्या निर्णयांचा संघटित, असंघटित क्षेत्रातील सरकारी, निमसरकारी व खासगी क्षेत्रांतील कर्मचारी, बेरोजगार, पेन्शनर्स, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम झाला आहे. समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये प्रचंड असंतोषही निर्माण झाला आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी विविध क्षेत्रांतील शंभरपेक्षा जास्त संघटनांनी एकत्रित येऊन टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा 29 ऑक्टोबर रोजी मोर्चाच्या माध्यमातून करण्याचे ठरविले आहे. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

याबाबत शासनाने दखल न घेतल्यास यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला असल्याची माहिती कृती समितीचे निमंत्रक सेवानिवृत्त तहसीलदार गणेश राऊत, मुख्य संयोजक कैलास खार्डे यांनी दिली. हा मोर्चा सकाळी 10 वाजता तालुका क्रीडा संकुल येथून निघणार आहे. शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडकणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडीसेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज श्री. शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रूपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित 'प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, आमदार आशिष शेलार, केंद्रीय सचिव इंदेवर पांडे, राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव, एकात्मिक बालविकासच्या आयुक्त रुबल अग्रवाल आदींसह देशभरातील महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नवरात्र संपल्यानंतर मातेला वंदन करण्याचा हा कार्यक्रम आहे. महिला या मातृशक्ती असून समाज, नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असल्याने ती आदिशक्तीही आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये महिलांना आरक्षण देवून त्यांचा सन्मान केला आहे. ग्रामीण भागातील महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याने त्यांनी स्वच्छ भारत ही मोहीम राबवून घरोघरी लाखो शौचालयांची निर्मिती केली. महिला समर्थ होतील, तरच देशाची प्रगती होईल, हे ओळखून प्रधानमंत्री देशातल्या दीन दलित, दुर्बल महिलांना स्वत:च्या पायावर सन्मानाने उभे करीत आहेत. ग्रामीण भागात लाखो महिलांच्या नावाने घरे करण्यासाठी पीएम आवास योजनेतील घरांवर महिलांची नावे आली आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतिहासात पहिल्यांदाच पोषण ट्रॅकर सुरु करून करोडो मात- मुलांना योग्य रीतीने पोषणाची सेवा मिळते किंवा नाही याची तपासणी सुरु केली. गेल्या दीड वर्षात राज्य शासनानेही महिलांच्या कल्याणासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' ही योजना राबवित असून १ एप्रिल २०२३ नंतर गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लखपती करणार आहे. प्रधानमंत्री यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो ११ कलमी कार्यक्रम” राबवून महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सूट, नोकरदार महिलांसाठी ५० वसतिगृहे, महिलांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित'सारख्या योजनेत एक कोटी ४० लाख महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ३० लाख ४० हजार उद्दिष्ट्य असताना सुमारे ३५ लाख महिलांना लाभ देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे नवीन पोर्टल, मोबाईल अॅप, ऑनलाईन बेनिफिटचा शुभारंभ सुरू केला. दोन कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करणार असून बचत गटांना सक्षम करण्यासाठी पदार्थांच्या विक्रीसाठी योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वर्षाला सहा हजार दिले जात आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे बळकटीकरण करण्याचे काम केले जात आहे. महिला व बालविकास विभागाच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

अंगणवाडीसेविकेंच्या विम्यापोटीचा हप्ता केंद्र शासन भरणार- श्रीमती स्मृती इराणी

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या की, राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२८०० रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईंच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरेल. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शहरी भागामध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी एक हजार पाळणाघरे सुरू करण्यास केंद्र शासनामार्फत लवकरच आदेश निर्गमित करण्यात येतील. आपदग्रस्त महिलांसाठी राज्यांमध्ये 40 पेक्षा जास्त वन स्टॉप सेंटर सुरू आहेत. या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून 38 हजार संकटग्रस्त महिलांना मदत झाली. राज्य शासनाच्या निर्भया फंडाबाबत केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. महेंद्रभाई म्हणाले की, महिलांच्या शाश्वत विकासासाठी पूरक पोषण आहार देणे, शिक्षण विषयक धोरणे प्रभावीपणे राबविणे, लैंगिक समानतेसाठी काम करणे, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या योजना केंद्र सरकारद्वारे राबवल्या जात आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या माध्यमातून एक सशक्त आणि सक्षम भारत निर्माण होण्यासाठी ही योजना सर्वांच्या सहकार्याने प्रभावीपणे राबवूया, असे आवाहन त्यांनी केले.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना प्रभावीपणे राबवणार- मंत्री आदिती तटकरे
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, माता व बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महिला व बालविकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून प्रभावीपणे काम सुरू आहे. आदिवासी पाड्यांमध्ये महिलांना संस्थात्मक प्रसुती होताना अडचणी येवू नयेत यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासी पाडे मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ता योजना सुरू केली आहे. याद्वारे 17 आदिवासी जिल्हे मुख्य रस्त्यांशी जोडण्यात येणार असून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून सर्व शासनाच्या योजना एकाच छताखाली राबवल्या जाणार आहेत. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील शेवटच्या बालकापर्यंत महिला व बाल विकास पोहोचत असून अंगणवाडी आणि मदतनीस यांच्या माध्यमातून सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती पुस्तिका, नवीन वेब पोर्टल आणि मोबाईल ऍपचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

विद्यार्थी आटो पलटी होऊन भीषण अपघात..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मार्डीहून मारेगावच्या दिशेने जात असलेल्या भरधाव विद्यार्थी वाहून नेणाऱ्या आटो ला नियंत्रण सुटून पलटी झालेल्या अपघातात एका शाळेकरी विद्यार्थ्याचा उपचाराअंती मृत्यू तर तीन विद्यार्थी किरकोळ झाल्याची घटना आज शुक्रवारला सकाळी 7 वाजताचे दरम्यान घडली.
मारेगाव तालुक्यातील केगांव येथील आटो चालक अनंता विठोबा देठे हा नेहमीप्रमाणे शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन हा केगांव मार्डी मार्गे मारेगाव येत असतो. आजही जवळपास 10 ते 12 विद्यार्थी घेऊन मारेगाव कडे जात असतांना पिसगांव जवळील पंढरकवडा वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव वाहणाला आटो भिडणार म्हणून आटो चालकांनी ब्रेक केला आणि नियंत्रण सुटून आटो पलटी झाला. यात अनिकेत श्रावण पिंपळशेडे (17) हा आटोत दबून दहा ते बारा फूट घासत गेला व जागीच मृत्यू झाला. तो राष्ट्रीय विद्यालय मारेगाव येथे दहाव्या वर्गात शिकत होता, तर इतर तीन विद्यार्थी किरकोळरीत्या जखमी झाले. सदर घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान,घटनेची माहिती कळताच पिसगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या दुर्देवी घटनेने केगांव सह तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
ग्रामीण भागात बसफेऱ्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने जिव मुठीत घेऊन शाळेत जावं लागत आहे. संबंधित विभागाने सतत होणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या अपघाताची गांभीर्याने दखल घेऊन गावोगावी बस फेऱ्या सुरु कराव्यात, अन्यथा काँग्रेस कमिटी च्या वतीने वणी आगाराच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

 -मारोती गौरकार
तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी, मारेगाव