नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समाधान शिबीर घेणार – पालकमंत्री संजय राठोड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : अतिपावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती बाधित झाली आहे. या बाधित क्षेत्रातील शेती नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन अहवाल सादर करावे. पंचनाम्याबाबत तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. लवकरच जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरिय समाधान शिबीर घेणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
महागाव तालुक्यातील विविध विषयांसंदर्भात पालकमंत्री संजय राठोड यांनी तहसिल कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या आढावा सभेला महागावचे उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोले, तहसिलदार व्ही एल राणे, जिल्हा परिषदेचे उप अभियंता विवेक जोशी, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र आडे, तालुका कृषी अधिकारी यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री संजय राठोड यांनी सुरुवातील तालुक्यातील पीक परिस्थिती, नुकसानीच्या पंचनाम्यांची माहिती घेतली. त्यावेळी महागाव तालुक्यात अंदाजे 37 हजार 760 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून 31 हजार 160 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. त्यावेळी पंचनाम्यातून कोणीही सुटणार नाही, याविषयी तक्रारी येणार नाही याची खबरदारी घ्यावी. नुकसानीच्या पंचनाम्याचे अहवाल 15 ॲागस्टपूर्वी शासनाला सादर करण्याच्या सूचना यापूर्वी दिल्या आहेत, त्यानुसार कार्यवाही करावी. यासोबतच ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाड्या, रस्ते, पुल आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री राठोड यांनी प्रशासनाला दिले.
शेतपिकांच्या संरक्षणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा

अतिपावसामुळे बाधित क्षेत्रातील शेतीपिकांची वाढ खुंटली आहे. पिके पिवळी पडली आहेत. उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शेतपिकांना कीड लागण्याचा धोका असून शेतीपिकांच्या संरक्षणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. राठोड यांनी प्रशासनाला दिल्या. लोकांचे प्रश्न सोडविणे ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी असून जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी लवकरच जिल्हास्तरीय समाधान शिबीर घेणार आहे. या शिबिराला पालक सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. त्या दृष्टीने तालुका प्रशासनाने तयारी करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. राठोड यांनी दिल्या.
यावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रताप पंडागळे यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदानाचा धनादेश आणि अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकाचे वितरण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केल्यास नवी पिढी समृद्ध भवितव्य घडवेल- प्रा.डॉ.करमसिंग राजपूत


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : आजच्या विद्यार्थ्यांना ज्ञानी आणि प्रगल्भ बनवायचे असेल तर शालेय अभ्यासक्रमातील वाचनाव्यतिरिक्त इतर वाचनाचीही गोडी पालकांनी मुलांना लावावी,पालकांनी स्वतःचा चैनीचा किंवा गरजेचा वस्तू एकवेळ नाही घेतले तरी चालेल त्याऐवजी स्वत: त्याच पैश्याने जर घरी नवनवीन पुस्तके आणून ठेवाल तर घरातील मुले ते पुस्तके वाचतीलच आणि अश्या प्रकारे जर मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केल्यास नवी पिढी समृद्ध भवितव्य घडवेल,असे प्रतिपादन लो.टि. महाविद्यालयाचे अर्थशास्त्र प्रमुख प्रा.डॉ.करमसिंग राजपूत यांनी वसंत जिनिंग येथे मादगी बहुउददेशीय संस्था, वणीच्या वतीने (दि.6.ऑगस्ट) रोजी आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते. 
सोहळ्याचे उद्घाटन प्रा.सुनिल मिद्दे (महासचिव महासंघ, (M4) यांच्या हस्ते झाले. उद्घाटन भाषणात समाजाचा विद्यार्थ्यांचा पुढील अभ्यासक्रमात गरजू विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची मदत महासंघाचा माध्यमातून करण्यात येईल असे आश्वासनही केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चरणदास कोंडावार (माजी नायब तहसीलदार) हे होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून ,"विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच कठोर परिश्रम व जिद्द बाळगल्यास बिकट परिस्थितीवरही सहजपणे मात करता येते असे प्रतिपादन केले." व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर लाटेलवार (उपकोषाध्यक्ष महासंघ,(M4), विठ्ठल शंकावार (जेष्ठ समाजसेवक), व्यकंटी अंधेवार, प्रदिप आधारे (उपाध्यक्ष M4), BMS अध्यक्ष निलेश परगंटीवार, संस्थेचे सचिव सुरज चाटे, सहसचिव रवी कोमलवार, दिपक गुल्लमवार, जी.आर.रेड्डी, कोषाध्यक्ष नत्थु नगराळे आदी उपस्थित होते.
या सोहळ्यात 10 वी व 12 वी परिक्षेत गुणवंत विद्यार्थी तसेच इतर विविध प्रकारच्या परिक्षेत विशेष प्राविण्य संपादन केलेल्या पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह प्रदान करुन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालक व विदयार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन प्रकाश तालावार व अजय कंडेवार यांनी केले तर आभारप्रदर्शन अरुण अरुण एनपल्लिवार यांनी केले. या कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी सुरज चाटे,रवि कोमलवार,राकेश शंकावार, किशोर मंथनवार,विक्की पगंटीवार, विजय कंडेवार, रितिक मामिडवार, रितिक बेलेवार, नागेश मोहूर्ले, शिवकुमार नलभोगे, प्रभाकर लिक्केवार, मनिष वालकोंडे, मोरेश्वर कुंटलवार, कैलास पौन्नलवार व आदी समाजबांधवांनी केले.

द्वितीय पुण्यस्मरण : विनम्र अभिवादन


पिता म्हणजे जीवन, शक्ती, सामर्थ्य, पिता हे विश्वाच्या निर्मितीचे प्रकटीकरण आहे.

आदरणीय पिता श्री प्रकाशचंदजी नेमीचंदजी भंडारी यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण विनम्र अभिवादन...
त्यांच्या चरणी सादर प्रणाम...!!

शोकाकुल :-
पत्नी शोभाबाई भंडारी, मुलगी प्रतिभा तातेड, मुलगा प्रशांतकुमार भंडारी, स्नुषा सौ.चेतना भंडारी, मुलगी सौ.सपना नरेंद्र कोठारी, मुलगी सौ. सुषमा अमितकुमार दुगड, नातवंड गुणेश, आदेश तातेड, प्रणय, प्रतिक्षा कोठारी,
जय, सिध्दी दुगड यश, लब्धी भंडारी तथा समस्त भंडारी परिवार तसेच आप्त परिवार व मित्र परिवार 

बुजाडे पाठोपाठ मुके यांची डॉ. लोढा यांच्या विरोधात तक्रार...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र लोढा यांच्या विरोधात आणखी एक तक्रार वणी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली. निष्काळजी व हलगर्जीपणामुळे व आर्थिक त्रास झाल्याचा आरोप येथिल विश्रामगृहात दिनांक 7 ऑगस्ट 2023 ला दुपारी 4 वाजता घेण्यात आलेल्या पत्र परिषदेतून केला आहे. विशेष म्हणजे दि.1 ऑगस्ट रोजी डॉ. लोढा यांचे विरोधात अशीच एक तक्रार जन्माला आलेल्या विकलांग नवजात बाळाच्या वडीलाने वणी पोलीसात दिलेली आहे. त्यामुळे त्या आरोपाचे डॉ लोढा यांनी पत्र परिषदेत खंडण केले. मात्र,आणखी असे किती प्रकरण समोर येइल? अशी शहरात चर्चेला उधाण आले आहे.

शहरातील तक्रारदार मनोहर रघुनाथ मुके रा. आवारी ले आऊट (वणी) यांनी पोलीस स्टेशन येथे दि.7 ऑगस्ट 2023 ला दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 27/9/ 2022 पासून त्यांची स्नुषा वैशाली महेश मुके ही दोन महिन्याची गर्भवती असताना डॉ. लोढा यांच्याकडे उपचार सुरू केला.
त्यानंतर तक्रारदार यांची स्नुषा वैशाली ही तिन महिन्याची गर्भवती असताना डॉ. लोढा यांच्या खासगी रुग्णालयात सोनोग्राफी केली तेव्हा बाळ निरोगी व सुखरुप आहे चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले होते मात्र, 3 डी सोनोग्राफी करण्यास सांगितले नव्हते असे त्यांचे म्हणणे आहे.

त्यानंतर 21 नोव्हेंबर 2022 ला फेरतपासणी केली. त्यानंतर पुन्हा दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी सोनोग्राफी काढली तेव्हा देखील बाळ सुदृढ आहे निरोगी आहे असे सांगितले. त्यानंतर दिनांक 9 एप्रिल 2023 ला नवव्या महिन्याची सोनोग्राफी काढली तेव्हा देखील सांगितले की बाळ सुखरूप व निरोगी आहे. त्यानंतर सुनेचे नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर तिला दि. 13 मे 2023 रोजी प्रसुती करिता वणी ग्रामीण रुग्णालय येथे नेले. त्याच दिवशी दुपारी 4.49 वाजता प्रसुती झाली. बाळाचा जन्म झाला. मात्र, नवजात बाळाच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड खुपच लहान असल्याचे दिसून आल्याने डॉ. लोढा यांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले. कारण बाळाला अपंगत्व असल्याचे दिसून आले. 3, 6 व 9 महिन्याची सोनोग्राफी केली तेव्हा डॉ.लोढा यांनी सदरची बाब का लपवून ठेवली? त्यांनी आमची फसवणूक केली असे तक्रारदार मनोहर रघुनाथ मुके यांनी पत्र परिषदेत सांगितले.

त्यानंतर तक्रारदार बाळाला घेऊन चक्क डॉ.महेंद्र लोढा यांच्या रुग्णालयात गेले तेव्हा डॉ. लोढा यांनी असमाधानकारक उत्तर देत निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे डॉ. लोढा यांचे वर उचित कारवाई करुन न्याय देण्याची मागणी यावेळी केली आहे.
आज घेतलेल्या पत्र परिषदेत बाळाची आई, आजी-आजोबा काका व मुके परिवारातील मंडळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेचा 14 व्या हप्त्याची प्रतीक्षा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : राजस्थान राज्यातील सिकर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये पाठवणार असल्याचे सांगितले आहे व यांनी पंतप्रधान किसान सन्मानिधीचा 14 वा हप्ता एका क्लिक वर सुद्धा हप्ता जारी केला आहे. मात्र, मारेगाव तालुक्यातील अजूनही काही शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांना आपली कैफियत मारेगाव तहसीलदार निलावाड यांना आज दिलेल्या निवेदनातून मांडली.
मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत असतांना,14 व्या हप्त्याचे तसेच काही शेतकऱ्यांना तीन चार हप्त्यापासून पी एम किसान योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना केली. दरम्यान, शेतकऱ्यांची कैफियत ऐकूण तहसीलदार निलावाड गहिवरले व संबंधितांना तात्काळ समोरासमोर.. कां मिळत नसल्याचे, कुठे काम अडले, कुणाकडे दाद मागावी शेतकऱ्यांनी? अशा एक ना अनेक प्रश्नांचे जॉब विचारला असता. संबंधितांकडून असमाधानकारक उत्तरे मिळाल्याने शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात हेलपाट्या माराव्या लागतात, त्यांना यांचा नाहक त्रास होतो. यापुढे असे व्हायला नको अशी तंबी संबंधितांना देत शेतकऱ्यांना दिलासा दिला.
दरम्यान, शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्या कार्यावर समाधान व्यक्त करित तात्काळ 14 व्या पी एम किसान योजनेचा लाभ मिळावा अशी आर्तहाक मागणी निवेदनातून केली. यावेळी कृ ऊ बा समिती संचालक तथा ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी विजय अवताडे, देविदास बोबडे, शरद ताजणे, पुरुषोत्तम बुट्टे, दिवाकर सातपुते, चंद्रशेखर आवारी, किशोर सुर, संतोष कळसकर, आदींची उपस्थिती होती. 

आता उर्वरित शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेचा 14 वा हप्ता,लाभ कधी पर्यंत मिळेल, किंबहुना मिळेल की नाही. याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.