सायकल चालविण्याची आरोग्यदायी सवय आत्मसात करावी - न्यायाधिश निलेश वासाडे



सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : विश्व सायकल दिवस हा एक जागतिक दिवस आहे. दुचाकी सायकल ही वापरण्यास आणि विकत घेण्यास सोपी आणि स्वस्त असा वाहन पर्याय आहे. त्यामुळे सर्वाँना सामावून घेणारे जागतिक स्तरावरील वाहन म्हणून सायकल कडे पाहणे याबद्दल हा दिवस साजरा करण्याचे ठरविले गेले. एप्रिल २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र समितीने ३ जून हा दिवस विश्व सायकल दिवस म्हणून निश्चित केला. या दिनाचे औचित्य साधून मारेगाव येथील न्यायालय तर्फे आज सायकल रॅली काढण्यात आली.

सदर रॅली मध्ये वकील मंडळी, पोलीस बंधू, कर्मचारी वर्ग, पत्रकार व विधी स्वंयसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रारंभी मारेगाव न्यायालयाचे न्यायाधिश निलेश प्रभाकर वासाडे यांनी सायकल चालविण्याचे महत्त्व पटवून सांगितले. ते दररोज ७ किलो मिटर सायकल चालवत असून सर्वांनी सायकल चालविण्याची आरोग्यदायी सवय आत्मसात करावी असे त्यांनी यावेळी आवाहन केले. 
                  
यानंतर न्यायालय ते मांगरूळ (वणी मार्ग) पर्यंत जाऊन ही रॅली परत न्यायालयामध्ये येवून जागतिक सायकल दिन साजरा करण्यात आला.दरम्यान,रॅलीत जनजागृतीच्या घोषणा देण्यात आल्या. या रॅली मध्ये मारेगाव न्यायालयाचे न्यायाधिश निलेश प्रभाकर वासाडे, अ‍ॅड.मेहमूद पठाण, अ‍ॅड.करिश्मा किन्हेकार,अ‍ॅड. रुणाली गाणार, अ‍ॅड.मेघा कोडपे, अ‍ॅड.काजल शेख, कर्मचारी पांडुरंग वासाड, सूरज टेंभरे, प्रणय बूजाडे, जोतिबा पोटे, अशोक कोरडे, नागेश रायपुरे, विधी स्वंयसेवक विवेक बोबडे, राजू घुमे, पोलीस जमादार नितीन खांदवे, ताजणे, शंकर बारेकर, शिपाई पवन राऊत, मोसिम शेख, नंदू झोडे, मोरेश्वर कणकुंटवार, चेतन गेडाम यांनी सहभाग घेतला.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूरच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना गुरूवार दिनांक ८ जून,२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. भालचंद्र ब्लड बँक सभागृह एस टी स्टँडच्या पाठीमागे लातूर येथे विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहेत. तसेच संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, मॅक्स महाराष्ट्रचे ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲड अमोल सकट, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, दैनिक पुढारीचे पत्रकार नितीन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे असणार आहेत.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, म. फुले महाविद्याय, अहमदपूरचे प्राचार्य डॉ वसंत बिरादार, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य उपाध्यक्ष विशाल पवार, पंकज वानखेडे, अजय सुर्यवंशी, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील संपादक, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहवे असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, ओमकार टाले व सर्व तालुका अध्यक्षांनी आवाहन केले आहे.

तालुक्यातील दहावी परीक्षेतील यशवंत, गुणवंतांचे अध्यक्ष अविनाश लांबट यांच्याकडून अभिनंदन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : ‘दहावीच्या परीक्षेतील यशानंतर करिअर निवडीसाठी विविध मार्ग दिसू लागतात. या मार्गावरून पुढे जाण्यासाठी, आवडते क्षेत्र निवडण्यासाठी आणि त्यात यशस्वी होण्यासाठी मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांमध्ये अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक अविनाश भाऊ लांबट यांनी दहावीच्या परीक्षेतील यशवंत, गुणवंतांचे अभिनंदन केले आहे.
शुभेच्छा संदेशात अध्यक्ष श्री. लांबट यांनी म्हटले की, शालेय जीवनात दहावीची परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. हा टप्पा यशस्वीपणे पार केल्याबद्दल, यशवंत, गुणवंतांचे मनापासून अभिनंदन. आपल्या या यशासाठी मार्गदर्शन करणारे गुरूजन, पाठबळ देणारे कुटुंबीय या सर्वांचेही अभिनंदन. या परीक्षेतील यशानंतर आपल्याला करिअरचे वेगवेगळे मार्ग खूणावू लागतात. हे मार्ग चोखंदळपणे, डोळसपणे निवडल्यास पुढे यश तुमचेच असेल. असे आवडते क्षेत्र निवडण्यासाठी, त्यात यश मिळावे यासाठी देखील मनापासून शुभेच्छा !

काहीजणांना या परीक्षेतील यशाने हुलकावणी दिली असेल. तर त्यांनी खचून न जाता नव्याने तयारी करावी. त्यासाठी फेर परीक्षेचा पर्याय उपलब्ध आहे, त्याचा अवलंब करावा, असे आवाहनही तालुका अध्यक्ष्यांनी केले आहे.

5 जून पासून ऑपरेटरला हटविण्यासाठी रोजगार सेवकाचे काम बंद आंदोलन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : रोजगार सेवकाना अपमानजनक वागणूक देणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या त्या टेबलवरून ऑपरेटर ला तात्काळ हटविण्यासाठी महाराष्ट्र रोजगार सेवक संघटनेच्या वतीने येत्या 5 तारखे पासून काम बंद अंदोलनासह धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच गावात विकास कामे झपाट्याने व्हावी यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मागेल त्याला गावातच कामे उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. रोजगार हमीची ऑनलाईन कामे करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर आपरेट करण्यासाठी आपरेटर देण्यात आले असताना गेल्या काही दिवसापासून या योजनेला कंत्राटी पद्धतीचे ग्रहण लागले असून, रोजगार सेवकांच्या अमंलाबजावणीला या टेबलवर केराची टोपली दाखविल्या जात आहे. तसेच येथील ऑपरेटर कंत्रांटदाराच्या दावणीला बांधला गेला असल्यामुळे स्थानिक विकास कामात मोठा पेच निर्माण झाल्याची ओरड आहे.

रोजगार सेवकांकडून स्थानिक कामे करून घेण्यासाठी ऑपरेटरला पैसे मिळत नसल्याने त्यांची कामे प्रलंबित ठेवली जात असून चिरीमिरी देणाऱ्या ठेकेदाराची कामे तातडीने केली जाते असा आरोप तक्रारीतुन आंदोलकांनी केली आहे. याबाबत रोजगार सेवकांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, वरिष्ठ पातळी वरून ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ऑपरेटरच्या मुजोऱ्या वाढल्या आहेत. ग्रामसभेने सुचविलेल्या विकास कामाची अमंलाबजावणी करण्यासाठी पंचायत समितीच्या ऑपरेटर ची महत्व पूर्ण जबाबदारी आहे. यामध्ये ऑनलाईन मस्टर काढणे, मजुरी अदा करणे, ऑनलाईन मंजुरात घेणे इत्यादी कामांचा समावेश आहे. मात्र, रोजगार सेवकांनी सादर केलेल्या मागणीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करून ठेकेदारांनी सादर केलेल्या प्रस्तावाची दखल येथील ऑपरेटर बादल खंडरे यांचे कडून घेतली जात असल्याने त्यांना तात्काळ या टेबलवरून 15 दिवसाचे आत हटविण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या मागणी अर्जातून देण्यात आला होता, मात्र या तक्रारीला केराची टोपली दाखविण्यात आल्यामुळे येत्या 5 तारखेपासून रोजगार सेवकांनी आंदोलनाचे शस्त्र उपसावे लागले आहे.

या आंदोलनाची नोटीस मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना रोजगार सेवकांनी बजावली आहे. शिवाय पोलिस स्टेशन तथा तहसील कार्यालयाला निवेदन देऊन या आंदोलनाबाबत अवगत केले. दिलेल्या नोटीसवर तक्रार संघटनेचे अध्यक्ष खुशाल येरगुडे, सचिव भगवान धाबेकर, उपाध्यक्ष प्रशांत सपाट, सहसचिव गणपत मडावी, संतोष कोंडेकर, अनिल कुमरे, रमेश सिडाम, महादेव गुरुनुले, शैलेश पेंदोर, नारायण सुसराम, विवेक नरवाडे, स्वप्नील ठावरी, गणेश कालेकर, आशिष किनाके, नितेश काटकर, मनोज दडांजे, संदीप जिवणे, वामन डोंगे, आशिष भोयर, गणेश कुळमेथे, सिद्धार्थ खैरे, शेषराव देवाळकर,अमित खिरटकर, गजानन बोधे, प्रमोद जुमनाके, संतोष बल्की, इत्यादीच्या सह्या आहेत.

तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शहरालगत असलेल्या चिखलगावातील एका शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आपल्या जीवनाचा अंत केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

पांडुरंग रामचंद्र सातपुते (48) असे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या मृतकाचे नाव आहे. 31 मे. ला पहाटेच्या सुमारास त्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पांडुरंग यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, पांडुरंग याचे आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्याचे अशा अकाली निधनाने घरातील कर्ताधर्ता परलोक गेल्याने सातपुते कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याचे पाठीमागे पत्नी,आई, व दोन मुले असा आप्त परिवार आहे.