राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार – महिला व बालविकास मंत्री

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आज राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक देत आहोत. अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत ऑक्टोबर २०२२ पासून विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ३ हजार ६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत त्यामुळे राज्यात एकूण ४ हजार ४१८ अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचे सहकार्य मिळत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित सामंजस्य कराराप्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते.



मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यात १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून 'अंगणवाडी दत्तक' धोरण आणले आहे. सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या धोरणातंर्गत कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी, अशासकीय स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट इ. आणि व्यक्ती, कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. आज दालमिया फाऊंडेशन यांनी सोलापूर-कोल्हापूर मधील १० अंगणवाड्या दुरूस्तीसाठी, भागीरथी फांऊडेशनने पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथे १५ अंगणवाडी दुरूस्तीसाठी, कॉरबेट फाऊंडेशन पुणे येथे १६ अंगणवाड्या दुरूस्तीसाठी व पूर्व शालेय शिक्षण, युनायटेड वे ऑफ हैद्राबाद यांनी पुणे येथील २० अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृद्धी, आर.एस.एस.जनकल्याण समितीने मुंबई उपनगर मधील २५ अंगणवाडी बळकटीकरण, होप फॉर दि चिल्ड्रेन यांनी पुणे येथे ४१ अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृद्धी, युनायटेड वे दिल्ली पुणे ४५ अंगणवाडी दुरूस्ती, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांनी पुणे येथील १०० अंगणवाडी दुरुस्ती, के कॉर्प फांउडेशन गडचिरोली, नंदुरबार १७९ अंगणवाडी दुरूस्ती आणि न्युट्रीशियन, यार्दी फाउंडेशन पुणे ३०० अंगणवाडी दुरूस्ती, न्युट्रीशियन तसेच क्षमता वृद्धीसाठी अंगणवाडी दत्तक घेतल्या आहेत

रामनवमीनिमित्त सह्याद्री चौफेर च्या शुभेच्छा


                      रा|म|न|व|मी ~ रा|म|ज|न्मो|त्स|व 


श्री रामनवमीनिमित्त चीफ एडिटर कुमार अमोल कुमरे यांनी जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादक आपल्या संदेशात म्हणतात की, प्रभू श्रीरामानं जीवनभर सत्य आणि धर्माचे आचरण केलं. ही शिकवण सगळ्या मानवजातीला प्रेरणा देणारी आहे. प्रभू श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. त्यांनी कधीही मर्यादांचे उल्लंघन केलं नाही. ज्यांना वचन दिलं, ते पाळलं. एक आदर्श पुत्र, शिष्य, भाऊ, पती आणि राजा म्हणून प्रभू श्रीरामाकडे पाहिले जाते.

राक्षसी प्रवृत्तींना नेस्तनाबूत करणाऱ्या श्रीरामाच्या चरणी आम्ही नतमस्तक आहोत, असेही कुमार अमोल म्हणतात.

वणीच्या स्थानिक कलावंतांनी सादर केली हास्यजत्रा


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : येथील जैताई देवस्थान मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवात उद्बोधक तथा विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी वणीकरासाठी सुरू आहे. या शृंखलेत सागर झेप बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दि. 28 मार्चला येथील स्थानिक कलावंतांनी हास्यजत्रा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून हास्याचा फुलोरा फुलविण्यात यशस्वी झाले. वणीकरांनी या कलावंतांना भरभरून दाद दिली. 
या सर्व कलावंतांनी सुरुवातीला नांदी सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. संदीप उरकुडे, सागर मुने यांनी ससा व बर्फाची फॅक्टरी सादर करून सगळ्यांना हसवले. "सासू माझी ढासू" यात सुनंदा गुहे, सोनल टिकले या सासासुनेचे भांडण होते. त्यात निकुंज सातपुते याची गोची होते. 
   
महिलांच्या टूर प्लानिग साठी तृप्ती उंबरकर, श्रुती उपाध्ये, राधा वैद्य, तारा कुळकर्णी, कविता सातपुते, प्रिया बिवलकर, या टूर प्लानिग साठी येऊन विचित्र प्रश्न विचारून टूर मॅनेजर सागर मुने व असिस्टंट वेदांती उंबरकर यांच्या प्रहसनातून धमाल विनोद या कलावंतांनी सादर केला. कांदे पोहे या प्रहसनात अशोक सोनटक्के, शैलेश अडपवार, प्रिया कोणप्रतिवार, प्राची चंदेलकर, सीमा सोनटक्के, सागर मुने यांनी धमाल विनोद सादर केला. यातून शेतकरी नवरा उत्तम असतो असा संदेश देण्यात आला. 
सागर मुने, प्रवीण सातपुते, करिष्मा नवले, निखिल वाघाडे, यांच्या पप्पा या प्रहसनामध्ये मध्ये मुलीच्या आधीच झालेल्या तीन लग्नच्या घोळातून सगळा रसिक वर्ग हसून हसून लोट पोट होतो. व्हराड चाललं बँकेला या प्रहसनात बँकेचा मॅनेजर पाणी पुरी विकणाऱ्या व त्याच्या बायकांना कर्ज देत नाही व त्याचे महिन्याचे उत्पन्न पाहून तो सुद्धा पाणी पुरी विकण्याचा काम सुरू करतो. यातील विनोदी अभिनयाद्वारे सीमा सोनटक्के, अशोक सोनटक्के, उमाकांत मसे, मीना वानखेडे यांनी प्रहसन सादर केले. या कार्यक्रमात स्नेहलता चुंबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर एकपात्री प्रयोग सादर केला. तसेच पोटाची खळगी भरायला काय काय करावे लागते हे प्रकाश खोब्रागडे यांनी आपल्या एकपात्री प्रयोगातून दाखवले. प्रसिद्ध मिमिक्री कलावंत आकाश महादूले यांनी विविध पद्धतीने रसिकांचे मनोरंजन केले. 

ध्वनी व्यवस्था संदीप आस्वले यांनी सांभाळली, पार्श्वसंगीत अभिलाष राजूरकर, अक्षय करसे, राधा सोनटक्के यांनी दिले.

वन क्षेत्रातील ‘कुरणाचे कुंपण’ करणार शेताची राखण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

कुंपणानेच शेत खाल्ले' ही एक प्रचलित म्हण...आणि वन्यजीवांकडून होणारे पिकांचे नुकसान ही शेतकऱ्यांच्या परिश्रमावर पाणी फिरवणारी बाब. वारंवार उद्भवणाऱ्या या संघर्षावर उपाय म्हणून वन हद्दीतच 'कुरण विकास कार्यक्रम' वन विभाग राबवित आहे. आता वन्यप्राण्यांच्या उपद्रवापासून हे वनांतील 'कुरणांचे कुंपण शेताची राखण' करणार आहे.

वन्यजीव शेतात शिरुन पिके खातात वा रानडुकरांसारखे प्राणी नासाडीही करतात. शेतकऱ्यांसाठी हा मोठा संघर्षाचा प्रसंग असतो. याच मुद्यावरुन वन विभागालाही शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागतो. रहदारीचे नियम वा प्रवेश बंदी या सारख्या उपाययोजना वन्य प्राण्यांवर कशा लादायच्या? त्या तशा अशक्यच. पण ज्या अन्नाच्या शोधात वन्यप्राणी शेतीकडे वळतात ते अन्न म्हणजेच 'गवत' त्यांना वन हद्दीतच उपलब्ध व्हावे,यासाठी वन विभागाने कुरण विकास कार्यक्रम राबविला आहे.

अकोला जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ९० हेक्टर तर दुसऱ्या टप्प्यात ८५ हेक्टर वनक्षेत्रावर वन्य प्राण्यांचे खाद्य असणारे गवत लागवड करुन त्याचे संवर्धन करण्यात येत आहे. सन २०२२-२३ मध्ये पहिला टप्पा पूर्ण झाला असून व आता सन २०२३-२४ मध्ये दुसरा टप्पा सुरु झाला आहे.

दोन टप्प्यात कुरण विकास

पहिल्या टप्प्यात सन २०२२-२३ मध्ये बोरगाव (२० हेक्टर), बाभुळगाव (२५ हेक्टर), सोनखास (३० हेक्टर) या प्रमाणे व याशिवाय बाभुळगाव मध्येच अतिरिक्त १५ हेक्टर क्षेत्रात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतूनही कुरण विकास करण्यात आले असून एकूण ९० हेक्टर क्षेत्रावर कुरणांचा विकास करण्यात आला आहे. या कुरण विकास कार्यक्रमाला १ कोटी २० लक्ष रुपये इतका खर्च आला आहे.

दुसऱ्या टप्प्यात पातुर (२० हेक्टर), सोनखास (३० हेक्टर), परांडा (३५ हेक्टर) अशी ८५ हेक्टरवर कुरण विकास कार्यक्रम राबविला जात आहे.

असा होतो 'कुरण विकास'

कुरण विकासात गवताचे बी पेरले जाते. त्यासाठी वन विभागाच्या हद्दीतील मोकळ्या जमिनींची नांगरणी करुन त्यावर सरी पद्धतीने गवत बी पेरले जाते. साधारण एक मिटर अंतरावर ह्या सरी पाडल्या जातात. काही वेळा गवताचे रोप तयार करुनही लागवड केली जाते. पाऊस पडण्याच्या आधीच हे काम केले जाते. पाऊस आल्यावर गवत अंकुरते. या कालावधीत तेथे प्राण्यांचा वावर होऊ दिला जात नाही. गवत मोठे झाल्यावर त्याचे बी पुन्हा जमिनीत पडते. पुढल्या पावसात हेच बी पुन्हा अंकुरते आणि गवताची घनता वाढते. साहजिकच हे गवत वन्य प्राण्यांचा अन्नाचा शोध सुरु होतो तेव्हा त्यांना खाता येते. या जादाच्या वेळात तिकडे शेतांमधील पिके शेतकऱ्यांच्या हाती आलेली असतात आणि नुकसान टळलेले असते.

विविध गवतांची लागवड

कुरण विकास करतांना वन्य प्राण्यांना (तृणभक्षी) आवडते असे गवत लागवड केले जाते. त्यात मारवेल, मोती तुरा, पौन्या, काळी मुसळी, जंगली हरळी, गोंडे गवत, राई गवत, सोंद्री गवत, लहान गवत, गोंधळ, तिखाडी, वैद्य गवत या लागवड करता येणाऱ्या गवताच्या जाती आहेत. याशिवाय रान तूर, रान मुग, रान सोयाबीन, रान शेवरी या जंगली जातीही उगवत असतात. ही सर्व गवते वन्य प्राणी आवडीने खातात.

पाळीव जनावरांसाठीही चारा उपलब्धता

केवळ वन विभागातील जनावरे शेतात जाऊन पिके खातात असे नव्हे तर गावातील पाळीव जनावरे (गाय, बैल, म्हैस इ.) सुद्धा वन हद्दीत चरावयास जातात. त्यांच्या तेथील कुरणात वावरण्याने त्यांच्या खुरांखाली गवत दाबले जाते. जमिन कडक होऊन उगवण कमी होणे, अशा समस्या निर्माण होतात. त्यासाठी वन विभाग लिलाव पद्धतीने लगतच्या ग्रामस्थांना 'कापा आणि घेऊन जा', या तत्त्वावर गवत नेण्यास परवानगी देतात. त्यामुळे गावातील पाळीव जनावरांनाही चारा उपलब्ध होऊन गावातील लोकांना रोजगारही मिळतो, असे सहा. वनसंरक्षक सुरेश वडोदे यांनी सांगितले.

वन्य प्राण्यांना अन्न उपलब्धता हाच उद्देश

मुळात वन्य प्राणी हे जंगलात खाद्याचे दुर्भिक्ष्य झाले की, मगच मानवी वस्त्यांकडे म्हणजेच शेतांकडे जातात. त्यासाठी त्यांना दुर्भिक्ष्य कालावधीत पुरेसे खाद्यान्न उपलब्ध करणे हाच या कुरण विकासाचा उद्देश आहे. जेणे करुन ते शेतांकडे जाणार नाही. जंगलांची घनता कमी होणे, जैविक ताणात वाढ, तापमानात होत असलेले बदल यासर्व पर्यावरणीय कारणांमुळे खाद्य गवत कमी होते. त्यासाठी कुरण विकास कार्यक्रम राबवून गवत लागवड व संवर्धन केले जात आहे, असे उपवनसंरक्षक अर्जूना के. आर. यांनी सांगितले.

आत्महत्येची धग... वरुड येथील युवकाने घेतला गळफास

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यात आत्महत्येच्या मालिका कायम घडताना दिसत आहे. सतत होणाऱ्या घटनेने तालुक्यात चिंता व्यक्त केली जात असतांना आणखीन वरुड येथील एका 32 वर्षीय युवकाने गळफास घेतल्याची घटना 28 मार्च ला दुपारी उघडकीस आली.

गजानन रामचंद्र जगताप रा.वरूड असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. घरी कोणी नसताना त्याने वरुड येथील आपल्या राहत्या स्वगृही गळफास घेतल्याचे आढळून आले.

वृत्त लिहेपर्यंत गजाननच्या आत्महत्येचे कारण काय हे कळु शकले नसून सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.