मार्डी येथे ३१ मार्चला महिला समूह नृत्य स्पर्धा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : जनहित कल्याण महिला संघटना तथा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावच्या संयुक्त विद्यमाने मार्डीत 31 मार्चला महिला नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी जनहित कल्याण महिला संघटनेच्या अध्यक्षा कविता मडावी राहणार असून उदघाटन सुवर्णा खामनकर करणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे,मारेगाव वन विभागाच्या प्रेमीला सिडाम, एकात्मिक महिला व बाल कल्याण विभागाच्या पर्यवेक्षिका जयाताई मोरे, माजी सभापती शितलताई पोटे, माजी नगराध्यक्षा इंदुताई किन्हेकर, शुभांगी ताई देवाळकर उपस्थित राहणार आहे.

मार्डी येथील जि प शाळेच्या मैदानात होऊ घातलेल्या या स्पर्धेचे उदघाट्न 31 मार्च ला सायंकाळी 4 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात जनहितासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कार्यरत महिला लोकप्रतिनिधी तथा लोकसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

महिलांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळण्यास व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या महिला समुह नृत्य स्पर्धेत महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक 'जनहित कल्याण महिला संघटना व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ,मारेगाव यांचे वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे प्रशिक्षण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

शेतकरी हा आपल्या राज्याच्या विकासाचा कणा आहे. त्यामुळे त्या बळीराजाचा आर्थिक आधार बळकट करीत त्याच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प नुकताच राज्य शासनाने सादर केला. शेतकऱ्यांना आपत्तीच्या काळात मदत आणि त्यासोबत शेतीसाठी आवश्यक तंत्रकुशलतेची जोड देण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. शेती, सहकार आणि सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कष्टाला राज्य शासनाची साथ या माध्यमातून मिळणार आहे.

राज्य शासनाने अर्थसंकल्प सादर करताना कृषि या महत्त्वाच्या घटकाला अधिक महत्त्व देत शेतकऱ्यांप्रती असणारी बांधिलकीच व्यक्त केली आहे. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती व्हावी यावर अर्थसंकल्पात दिलेला भर स्पष्टपणे दिसून येत आहे. बळीराजाच्या समृद्धीसाठी राज्य शासन सदैव पाठीशी असल्याचा विश्वास या माध्यमातून राज्यातील शेतकरी वर्गाला दिला आहे.

शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे प्रशिक्षण

शेतकऱ्यांना फक्त आधुनिक यंत्रे देऊन शेती कशी करायची हे सांगून उपयोगाचे नाही. तर त्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची ही गरज आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या नागपूर कृषी महाविद्यालयाच्या जागेवर सर्व सुविधांनी परिपूर्ण असे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषी कन्वेंशन केंद्राची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी 227 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद प्रस्तावित केली आहे तंत्रकुशलतेची जोड शेतीला देऊन शेती अधिक सुलभ करण्याचे प्रयत्न होत आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या कृषि विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे.

राज्यात फळबाग योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन फळ पिके व फुल पिके यांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक बांधावर, सलग शेतावर व पडीक जमिनीवर फळझाड व फुलपीक लागवड करता येते. यामध्ये सगल फळबाग लागवडीअंतर्गत वैयक्तिक लाभार्थीला आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, लिंबू, संत्री, सीताफळ, ड्रॅगनफ्रुट, अव्हाकडो, केळी, द्राक्ष आदि फळ पिकांची लागवड करता येते, तसेच, पडीक जमिनीवर लागवड आंबा, बोर, नारळ, सीताफळ आदि फळ झाडांची लागवड करता येते. तसेच गुलाब, मोगरा, निशिगंध आदी फुलझाडांची लागवड करता येते.

या योजनेत लाभार्थींनी क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी जास्त करण्यास परवानगी आहे. परंतु देय अनुदान फळपीक लागवडीचे निकष विद्यापीठ शिफारसीनुसार अंतर मर्यादेतच देय राहते. अतिरीक्त कलमे रोपे यांचे अनुदान देय नसते. लागवड वर्षासह सलग तीन वर्षात मंजूर अंदाजपत्रानुसार अनुदान देय राहते. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती वृक्ष पिकांच्या बाबत जे लाभार्थी कमीत कमी २० टक्के आणि कोरडवाहू वृक्षपिकांच्या बाबत किमान ७५ टक्के झाडे रोपे जिवंत ठेवतील, अशाच लाभार्थींना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील. सन 2022-23 मध्ये मजुरीचा दर 256 रुपये मनुष्यदिन राहील.

ड्रॅगनफ्रूट, अव्हाकॅडो, केळी, द्राक्ष, आंबा, चिकू, डाळिंब, बोर, सीताफळ, पेरु, कागदी लिंबु, मोसंबी, संत्रा, आवळा, कवठ, जांभुळ नारळ, चिंच, फणस, अंजीर, पानपिंपरी, शेवगा, काजू आदि फळ पिकांना तसेच गुलाब, मोगरा, निशिगंध या फुल पिकांना अनुदान देय राहील.

लाभार्थीचे निकष - कमीत कमी ०.०५ हे. व जास्तीत जास्त २.०० हे. प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा राहील. इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास व ७/१२ च्या उताऱ्यावर कुळाचे नाव असेल तर योजना राबवत असताना कुळाची संमती आवश्यक आहे.

अल्प व अत्यल्प लाभार्थी, महिला लाभार्थी, दिव्यांग व्यक्ती कुटूंब प्रमुख असलेल्या कुटुंबियांना तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीस व पंतप्रधान आवास योजनेला प्राधान्य राहील. लाभार्थी शाश्वत उत्पन्नाची साधने उपलब्ध नसावीत. तसेच तो नोकरदार व्यक्ती नसावा. लाभार्थी ऑनलाईन रोजगार कार्डधारक असावा. लाभार्थीस ग्रामसभेची मंजुरी असावी व ग्रामपंचायत लेबर बजेटमध्ये त्याचा समावेश असावा व ग्रामसभेचा ठराव आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र इच्छुकांनी अधिक माहितीसाठी कृषि सहायक व तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा.

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

कमी पावसाच्या प्रदेशामध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबास महत्त्व आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये पाटाद्वारे पाणी देणे शक्य नसते. अशा प्रदेशामध्ये सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाण्याची उपलब्धता दिल्यास उत्पन्नामध्येही वाढ होते आणि पाण्याचीही बचत होते. याच उद्देशाने सूक्ष्म सिंचन म्हणजेच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती क्षेत्राला पाण्याची उपलब्धता देण्याच्या उद्देशानेच प्रति थेंब अधिक पीक योजना राबवण्यात येत आहे.      

पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाखालील क्षेत्र वाढविणे. अचूक पाणी व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. पिकांची व्याप्ती वाढविणे. सूक्ष्म सिंचन पद्धतीच्या वापरास चालना देणे. कृषि आणि फलोउत्पादन विकासासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा प्रचार, विकास आणि प्रसार करणे. कुशल आणि अकुशल व्यक्तींसाठी, सूक्ष्म सिंचन प्रणालीची स्थापना आणि देखभाल करण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, असा या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संचाच्या खर्चाच्या 45 ते 55 टक्के इतके अनुदान देण्यात येते. त्यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना संचाच्या अनुज्ञेय खर्चाच्या 55 टक्के किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 55टक्के यापैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान दिले जाते. तर इतर शेतकऱ्यांना संचाच्या अनुज्ञेय खर्चाच्या 45 टक्के अथवा प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या 45 टक्के यापैकी जी कमी असेल ती रक्कम दिली जाते. तसेच या योजनेचा लाभ घेतलेला शेतकरी हा अटल भूजल योजनेत निवड झालेल्या गावातील असल्यास त्यास अटल भूजल योजनेचा लाभ दिला जातो. तर इतर लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत पूरक अनुदानाचा लाभ दिला जातो. याअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के व इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पुरक अनुदान देण्यात येते. असे एकूण अनुक्रमे 80 ते 75 टक्के मर्यादेत अनुदान दिले जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी http://mahadbt.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर शेतकरी योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत 7/12 व 8 अ चा उतारा, समाईक क्षेत्र असल्यास साध्या कागदावर इतर खातेदारांचे संमती पत्र, शेतजमीन भाडेतत्वावर घेऊन सूक्ष्म सिंचन योजनांचा लाभ घेताना अर्ज मंजूर झाल्यापासून 7 वर्षांच्या कालावधीसाठी लाभार्थ्याने शेतमालकाशी केलेला नोंदणीकृत करार. 7/12 उताऱ्यावर विहीर, शेततळे इत्यादींवर सिंचन सुविधांची नोंद नसेल तर याबाबत साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र, जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती / जमाती लाभार्थ्यांसाठी) इ. कागदपत्रे जोडावीत. 

सूक्ष्म सिंचनामध्ये पाणी हे थेट पिकास दिले जाते. ठिबकमुळे पाण्याची 30 ते 80 टक्के बचत होते. वाफसा स्थिती कायम राहत असल्याने पिकांची जोमदार आणि सतत वाढ होते. पिकाला गरजेनुसार पाणी मिळते. मुळाच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती आणि हवा यांचा समन्वय साधला जातो. कमीत कमी वेगाने पाणी दिले जात असल्याने मुळाच्या सभोवती ते जिरते, त्यामुळे पिकांची जोमाने वाढ होऊन दर्जेदार उत्पादन मिळते. द्रवरुप खते देता येतात. खतांचा 100 टक्के वापर तर होतोच शिवाय खताच्या खर्चात 30 ते 35 टक्के बचत होते. खताचा अपव्यय टळून सम प्रमाणात खते देता येतात. जमिनीची धूप थांबते त्याचबरोबर तणांवर नियंत्रणास मदत होते. असे सुक्ष्म सिंचनाचे फायदे आहेत.

सातारा जिल्ह्यात यंदाच्या वर्षी 1 हजार 389 शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी 3 कोटी 85 लक्ष रुपयांचे अनुदानही वाटप करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हे शासनाचे मुख्य उद्दीष्ट आहे. त्याअनुषंगाने पाण्याची कमी उपलब्धता असणाऱ्या प्रदेशात सिंचनाच्या चांगल्या सुविधा उभारून त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा उद्दीष्ट साध्य करण्यासाठीचा मार्ग आहे. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळवण्यासाठी ठिबक सिंचन हे कमी पावसाच्या प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच वरदान ठरत आहे.

 

     -हेमंतकुमार चव्हाण
माहिती अधिकारी,जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

महिलांना तिकिट दरात ५० टक्के सूट दिली तशीच गॅस सिलेंडरच्या दरातही ५० टक्के कपात द्या-क्रा. सा. फु. म. स. स


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा कधी? किमती कमी होण्याचं नाव घेत नसून दिवासेंदिवस महागाई वाढतच आहे. जिथे कपात हवी तिथे देत नसून महिलांना प्रवासात कपात देऊन काय उपयोग, द्यायची असेल गॅस मध्ये या अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सरकार ने एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना टिकिट दरात ५० टक्के सूट जाहीर केली. हा अतिशय अभिनंदनीय निर्णय आहे. पण महागाईने होरपळणाऱ्या जनतेचाही सरकार ने विचार करायला हवा. ज्याप्रमाणे एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना टिकिट दरात ५० टक्के सूट दिली, त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरचे दरही ४०० ते ५०० रुपये करून महागाईचे चटके सोसणाऱ्या जनतेला दिलासा द्यावा.या मागणीचे निवेदन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समितीच्या वतीने वणी उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांना देण्यात आले.पुढे असेही निवेदनात नमूद केले की,सरकारी मालमत्तांचे खासगीकरण करण्याचा जो सपाट लावला आहे, तो थांबवावा, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमीभाव निश्चित करून त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देण्यात यावा, रास्तभाव दुकानातून राशन देतांना दुजाभाव न करता सर्वच लाभार्थ्यांना राशन देण्यात यावे, त्याचबरोबर गरीब व गरजू लाभार्थ्यांनाच राशन देण्यात येते काय, याचे निरीक्षण करावे, तसेच रास्तभाव दुकाने बंद करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये, महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याने निराधारांच्याही मानधनात वाढ करण्यात यावी, या सर्वसामान्यांशी निगडित असलेल्या मागण्याही मान्य करून जनतेला जगण्याचा आधार द्यावा, अश्या मागण्या करण्यात आल्या.
या वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह वणी झरी मारेगाव वतिने ह्या मोर्चात वणी, गणेशपूर, राजूर, पळसोनी झरपट, निंबाळा, कळमना येथील शेकडो महिला उपस्थित होत्या.