सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : "भारतीयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधन वृत्ती नाही असा खोटा आरोप करणाऱ्या आणि त्या आधारे त्यांना अनेक गोष्टींना करणाऱ्या पाश्चात्त्यांना आपल्या शांत आणि सातत्यपूर्ण कार्यातून भारतीय संशोधकांनी या देशाच्या वैज्ञानिक महत्तेला केवळ दाखवून दिले नाही तर संपूर्ण जगाला उपयोग अनेक संशोधने करीत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला यश आल्यानंतर स्वतंत्र भारताच्या विकासाचा भरभक्कम पाया त्या काळातील वैज्ञानिकांनी साकारला हेच त्यांचे सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण योगदान होय." असे विचार विज्ञान भारतीचे डॉ. नरेश चाफेकर यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्राचार्य राम शेवाळकर स्मृती व्याख्यानामध्ये " स्वातंत्र्यसंग्रामात वैज्ञानिकांचे योगदान" या विषयावर ते व्यक्त होत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश बोहरा यांच्यासह सचिव लक्ष्मण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के तथा प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना डॉ प्रसाद खानझोडे यांनी नानासाहेबांच्या योगदानाला अभिवादन करीत आजपर्यंत त्यांच्या स्मृतीत झालेल्या व्याख्यानमालेत साहित्य किंवा कला विषयातील लोक सहभागी झाले आज प्रथमच या व्यासपीठावर विज्ञान विषयक व्याख्यान होत असल्याचा आनंद व्यक्त केला.संस्थेचे सचिव लक्ष्मण भेदी यांनी नानासाहेबांच्या सोबतच्या व्यक्तिगत अनुभवांना कथन करीत वक्त्यांचा परिचय करून दिला.
आपण कधीही मुघल किंवा इंग्रजांच्या समोर शरणागती पत्करली नसल्याने आपण गुलाम होतो हे वाक्यच मुळात चूक आहे असे सांगत स्वातंत्र्ययुद्धाच्या आसेतुहिमाचल सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी इतिहासाचे वर्णन करीत पूर्वी फक्त भंजन करणारे शत्रू होते पण इंग्रजांनी खच्चीकरण करण्याचा अत्यंत दुष्ट खेळ केला हे सांगत प्रमथनाथ बसू, महेंद्रनाथ सत्काळ, जगदीश चंद्र बोस, सी व्ही रमण या सगळ्यांचे योगदान आणि आपली विद्वत्ता संशोधन आपल्या देशाच्या विकासासाठीच असावे ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका अधोरेखित केली.
सोबतच स्वामी विवेकानंद आणि जी आर डी टाटा यांच्या संवादातून या देशातील अध्यात्मिक व्यक्ती पासून व्यापारी वर्गापर्यंत सर्वत्र असणारी वैज्ञानिक वृत्ती त्यांनी विशेषत्वाने सुस्पष्ट केली.
अध्यक्षीय मनोगतामध्ये रमेश बोहरा यांनी भारताची यज्ञ संस्कृती देखील अशीच विज्ञाननिष्ठ आहे हे सांगत त्या दृष्टीने संशोधनाची आवश्यकता प्रतिपादन केली.
कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक गणांसह वणीतील गणमान्य व्यक्ती, संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तथा सुनील गढ आणि मनीषा घारे हे विज्ञान भारतीचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अभिजित अणे यांनी तर आभारप्रदर्शन सहसचिव अशोक सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनकर उरकुंडे, मनोज केळकर, जयंत त्रिवेदी, पंकज सोनटक्के, संजय बिलोरिया, कार्तिक देशपांडे, नितेश चामाटे यांनी विशेष परिश्रम घेतले.